(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

अवास्तव भीती

तेजोमयीच्या घराजवळून जाणाऱ्या नाल्यात अवतीभवतीचं पाणी येतं. हा नाला वाहता असल्यानं त्यात घाण साचून राहत नाही. पावसाळ्यात तर या नाल्याला एखाद्या छोट्या नदीचंच स्वरुप येतं. अशा या नाल्याभोवती बरीच झाडं झुडपं आहेत. उन्हाळ्याचे काही दिवस सोडले तर ही झाडं हिरवीगार असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांनी ही झाडं बहरलेली असतात.

या झाडा-झुडपांकडे बरेच पक्षी आकर्षित होतात. त्यामध्ये कोकीळ, कोकीळा, निळकंठ, कबुतरं, सुतारपक्षी, वेगवेगळया आकाराच्या चिमण्या, घार, पोपट आणि आणखीही बरेच पक्षी सारखे येत जात असतं. त्यांच्या चिवचिवाट आणि किलबिलाटाने सगळा परिसर चैतन्यदायी होत असे.

 तेजोमयीच्या घरातील गॅलरीतून हा नाला, बहरलेली झाडं-झुडपं नि त्यावरचे पक्षी स्पष्टपणे दिसत. त्यांना न्याहळण्याचा , त्यांच्या वेगवेगळया क्रीडा बघण्याचा, उडण्याचं निरीक्षण करण्याचा छंद तेजोमयीस लागला. वेळ मिळाला की ती गॅलरीतून  नाल्याकडे बघत बसायची.

असचं, तिला एके दिवशी एक वेगळं दृष्य दिसलं. त्या नाल्यामध्ये काही काडीकचरा कुठून तरी वाहत येत होता. पाण्याच्या प्रवाहाबरोबर तो पुढे पुढे जात होता. तिथे बाजूच्या झाडावर बसलेला एक बगळा अलगद खाली उतरला नि तो पाण्यातील कचऱ्यावर जाऊन बसला. पाण्यासोबत तो कचरा नि त्या कचऱ्यावर बसलेला बगळा आपोआप पुढे जाऊ लागला. तो कचरा म्हणजे त्या  बगळयासाठी एखादी नाव झाली होती जणू!

त्याची गंमत  बघता बघता तेजोमयीचं लक्षं दुसऱ्या झाडांकडे गेलं. तिथे बसलेले पक्षी बगळ्याकडे एकटक बघत असल्याचं तिच्या लक्षात आलं. यापैकी एखादा पक्षी खाली उतरुन त्या कचारारुपी नावेत बसेल नि या छोट्या नदीची सफर करेल असं तिला वाटलं. पण तसं काही झालं नाही. एकही पक्षी खाली उतरला नाही. पुढचे दोनतीन दिवस असंच दृष्य तिला अनुभवायला मिळालं. इतर पक्षांना, बगळ्यासारखी नाल्यातून सफर कां बरं करावी वाटत नसेल? असा प्रश्न पडला. या प्रश्नाचं उत्तर बाबा देतील असं तिला वाटलं.

मग एके दिवशी तिने बाबांना हे दृष्य दाखवलं नि आपला प्रश्न विचारला.

बाबा काही क्षण विचारात पडले.

काय हो बाबा, काही सुचतय का तुम्हाला? तेजोमयीनं विचारलं.

अगं, थोडं थोडं सुचतय पण, झाडावरच्या पक्षांच्या मनातलं आपण काय सांगणार, नाही का?

पण बाबा या झाडावरच्या पक्षांना बगळ्यासारखा आनंद घ्यावा असं वाटत नसणार का हो?

आनंद घ्यावा असं वाटू शकतं. म्हणूनच ते एकटक बगळ्याकडे बघतात, असं मला वाटतं. बाबा म्हणाले.

मग घोडं अडतं कुठं? तेजोयमीनं विचारलं.

मला दोनतीन शक्यता दिसतात. बाबा म्हणाले.

कोणत्या हो?

अगं, त्यांना उत्सुकता वाटत असली तरी भीतीही वाटत असावी.

भीती ! कशाची भीती?

अगं, पाण्यात बुडायची किंवा कचऱ्यावर बसण्याची.

पण या भीतीपोटी मस्त आनंद आणि वेगळा अनुभव घ्यायला ते मुकतात, त्याचं काय?

यावर बाबा हसले. पक्षी कसा विचार करतात, याचा काही अंदाज बांधणं म्हणजे अंधारात तीर चालवण्यासारखं होतं. बाबांनी तेजोमयीला समजावलं.

पण बाळ, यातून एक धडा आपण म्हणजे तू शिकला पाहिजे. उगाच मनात भीती बाळगली की आपण आत्मविश्वास गमावून बसतो किंवा आपला आत्मविश्वास कमी होतो. मग आपल्या हातून कोणतंच कार्य घडत नाही. केवळ उत्सुकता असून उपयोग नाही.कार्यरत होणं महत्वाचं, त्यासाठी भीतीसारख्या अडथळ्याला दूर सारणं गरजेचं. बगळ्याने त्या भीतीवर मात केली असावी. त्यामुळे तो मजेत नदीविहार करतो. पाण्यातले किटक किंवा बारकीशी मासोळी दिसली झटदिशी तोंडातही घालतो. बाकिचे पक्षी विचारच करत बसतात. जोपर्यंत त्यांच्या मनात असलेली भीती जाणार नाही तोपर्यंत हे असचं घडत राहणार. बाबांनी तर्क मांडला.

तेजोमयीसही ते पटलं. भीतीमुळे आत्मविश्वास गमावून बसतो नि त्यामुळे मग काहीही करण्याचं पाऊल टाकलं जात नाही. हा धडा तिला मिळाला.

सुरेश वांदिले