तेजोमयीच्या सदनिकेच्या बाजूला राहणाऱ्या देशपांडे काकांकडे कुरिअरने आंब्याची पेटी नुकतीच आल्याचं तिने बघितलं होतं. देशपांडे काकांना कुणीतरी भेट म्हणून पाठवलेली असावी किंवा मग त्यांनी ऑनलाइन आंबे बोलावले असावेत असं तिला वाटलं. आपले बाबा असं कां करत नाही बॉ, असा प्रश्न तिच्या मनात आला.
हापूस आंबे तिला खूप आवडत. यंदा इतके दिवस होऊनही बाबांनी हापूस आणले नाही म्हणून ती नाराजच होती. देशपांडे काकांच्या घरी आलेल्या त्या आंब्याच्या पेटिने ही नाराजी आणखीनच वाढली.
आंब्यासाठी बाबांशी, कट्टी केली तर चालेल कां रे, तिने अलेक्झांडरला विचारलं. प्रश्नार्थक काही विचारलं की मान आणि शेपूट हलवायची अलेक्झांडरची सवय असल्याने, त्याने तेजोमयीच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे बघून मान हलवली.
चला तर, तुझा सुध्दा मला पाठिंबा आहे म्हणायचा. आता कट्टीपासून माघार नाही, तिच्या नकळत तेजोमयी जोरात बोलून गेली.
कुणाशी बरं कट्टी घेणार तू. माझ्याशी की या अलेक्झांडरशी. तिचा आवाज ऐकून आतल्या खोलित असणारी आई बाहेर येऊन म्हणाली.
तुम्हा दोघांशीपण नाही आई..
मग..
मग काय राहिलो मी एकटाच… बरोबर ना, तेजो. पेपर वाचन्यात गुंग झालेले बाबा डोके वर काढत म्हणाले.
तुमच्याशी कां बुवा तिची कट्टी? तुम्ही तर तिचे सारेच लाड पुरवता. त्यामुळे तर ती झालीय हट्टी. असं काहीसं ट ला ट लावत आई हसत म्हणाली.
अरे वा, तुझ्याशी, माझ्याशी आणि अलेक्झांडरशी कट्टी नाही म्हणेज स्वत:शीच कट्टी करणार की काय मिस तेजो. बाबा तिला चिडवत म्हणाले.
हे बघा बाबा, मला काही चिडवू नका. मी माझ्याशी नव्हे तर तुमच्याशीच कट्टी करण्याचं ठरवलय.
आँ ! कां गं ?आईने तिला जवळ घेत विचारलं.
तेव्हा, तेजोमयीने हापूस आंबा आपल्याकडे अद्याप कां आला नाही ते आज देशपांडे कांकाकडे आलेल्या आंब्याच्या पार्सलबध्दल सांगितलं.
अच्छा तर, गोड आंब्याची ही कडू गोष्ट म्हणायची..आई हसत म्हणाली.
आई हसतेय, तेजोमयी नाराज आणि बाबांचा वेगळाच मूड असे तीन तीन रुप बघून अलेक्झांडर गोंधळून गेला. या गोंधळात तो इकडून तिकडे आणि तिकडे फेऱ्या मारु लागला. एक दोन फेऱ्या झाल्या की मध्येच तिघांच्या चेहऱ्यांकडे बघे आणि पुन्हा जिभ लांब करुन फेऱ्या मारु लागे.
तुला, पण आंबे हवेत का रे ठोंब्या, आईने त्याचे कान हलकेच ओढत विचारलं. कुंSई ई करुन अलेक्झांडरने फतकल मारली नि डोळे मिटून घेतले.
अहो, आंबे प्रकरण मनावर घ्या जरा..तेजोमयीला आंबे खूप आवडतात हे ठाउुकाय ना तुम्हास. आई बाबांना म्हणाली.
हो गं मला ठाऊक आहे ना..कसं विसरणार ते.
मग कां आणले नाहीत आंबे आतापर्यंत, तेजोमयी गाल फुगवून म्हणाली.
बाबांनी तिला जवळ घेतले. तिच्या डोक्यावरुन हात फिरवत म्हणाले,
अगं बाळ, तुला खरच वाटतं का मी जाणूनबुजून आंबे नाही आणलेत ते….सांग बघू…
तसं नाही हो बाबा.पण…
मग, कां आणले नाहीत तुम्ही आंबे, आईने पुन्हा बाबांना विचारलं.
अगं, आत्ता आत्ता कुठे आंबे बाजारात आले आहेत. नव्याची नवलाई म्हणून लोकांची खरेदीसाठी झुंबड उडालीय. हजार रुपये, नऊशे रुपये अशी किंमत आहे डझनभर आंब्यासाठी..
पण बाबा, पैसे महत्वाचे की खाण्याचा आनंद मोठा..तेजोमयी बाबांच्या डोळयात बघत म्हणाली.
बाबांनी हलकसं स्मित केलं. तिच्याकडे बघत ते म्हणाले,
अगं, पैसेही महत्वाचे आणि आनंदही महत्वाचा. पण बाळ हा आनंद अनाठायी खर्च करुन कां बरं मिळवायचा ?
म्हणजे हो काय बाबा.. तेजोमयीन विचारलं..
अगं, आता खूप महाग असेलेले आंबे लवकरच स्वस्त होतील. त्यामुळे आपण एकदा नव्हे तर अनेकदा आणू शकू आणि खूप खूप आनंद मिळवू शकू ना.
हे मात्र बरोबर हं बाळ. कुणाच्या घरी आंबे आले म्हणून आपल्याकडे आलेच पाहिजे असं नाही ना. आज ज्या पैशात एकदाच आंबे आणू शकू ते आठ दिवसांनी तीन वेळा आणता नाही का येणार? पैशाची उधळपट्टी करण्याऐवजी जपून वापर केला ना की त्यातून मिळणारा आनंदही दुप्पट होतो बरं का? आईने तेजोमयीला समजावलं.
तेजोमयीला ते पटलं असावं. तिने लगेच बाबांशी दो करुन टाकला. डोळे बंद करुन असलेला पण ही चर्चा कान टवकारुन ऐकणाऱ्या अलेक्झांडरने शेपूट हलवून त्याचा आनंद व्यक्त केला.
०००