आई नापास (भाग दोन )
पूर्वसूत्र-आईच्या हट्टापायी आठवीत असणाऱ्या कल्याणीला आयआयटी शिकवणी वर्गाला जावं लागलं.मात्र त्याचा उलटाच परिणाम झाला.कल्याणी स्वत:चा आत्मविश्वास गमावून बसली…पुढे
चाचणी परीक्षेत शून्य गुण मिळाले त्या दिवशी कल्याणी खूप रडली. आपल्याला काहीच येऊ शकत नाही. असं तिला वाटू लागलं. घरी तिने पेपर दाखवला तेव्हा आईनं घर डोक्यावर घेतलं. ती, कल्याणीला वाट्टेल तशी बोलली. बाबांनी तिला थांबवायचा प्रयत्न केला. पण तिच्या तोंडाची टकळी सुरुच राहिली. कल्याणी बाबांच्या कुशित शिरुन हमसून हमसून रडू लागली. बाबांनी कसं बसं शांत केलं.
या दिवसानंतर कल्याणीचा आत्मविश्वास कमी झाला. आपल्याला काहीच येत नाही, असं तिला वाटू लागलं. शाळेच्या वर्गातही तिचं लक्ष लागेना. सदैव हसतमुख राहणारी कल्याणी एकदम शांतच झाली. तिने यंदा भाषण स्पर्धेत भाग घेतला नाही. आंतरशालेय महत्वाच्या स्पर्धेसाठीही तिने नाव नोंदवलं नाही. मुख्याध्यापकांना हे कळलं. खात्रीच्या खेळाडूनेच माघार घ्यावी आणि संघ पाण्यात बुडावा, असंच हे होतं. कल्याणी संघात नाही म्हंटल्यावर या स्पर्धेतून शाळेनेच माघार घेतली. तिने यावेळी स्नेहसंमेलनातही भाग घेतला नाही. कल्याणीने स्वत:ला आक्रसून घेतलं. मित्र मैत्रिणींमध्येही ती फारशी मिसळत नसे. तिच्यामधला हा बदल वर्गशिक्षिकेला धोक्याची घंटा वाटली.
000
एके दिवशी वर्गशिक्षिका शाळा सुटल्यावर कल्याणीच्या घरी आली. कल्याणी,आयआयटीच्या शिकवणीवर्गाला गेली होती. बाबा नुकतेच ऑफिसमधून घरी परतले होते. वर्गशिक्षिका घरी बघून आईबाबांना आश्चर्य वाटलं. आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. गेल्या सहा महिन्यात कल्याणीत झालेल्या बदलाने नाही म्हणायला ती सुध्दा चिंतित झाली होती. पण नेमकं काय झालं, हे काही तिच्या लक्षात येत नव्हतं. आयआयटी शिकवणी वर्गाचाच हा परिणाम असल्याचं बाबांच्या लक्षात आलं होतं. पण आईपुढे त्यांचं काही चालेना.
ठेच लागल्याशिवाय काही आईच्या लक्षात येणार नाही,काही काळ गेल्यावरच तिच्या लक्षात येईल. मग सारं सुरळीत होईल. अशी त्यांना आशा वाटत होती. तोपर्यंत कल्याणीची सुटका नव्हती. पण त्यांनाही कल्याणीत झालेल्या बदलाने काळजी वाटू लागली होती. आयआयटी शिकवणी लावल्यावर निर्माण झालेल्या परिस्थितीने घरातल्या वातावरणावर दु:खाचं सावट निर्माण झालं होतं.
वर्गशिक्षिकेचा आदरसत्कार झाल्यावर आईने त्यांना घरी येण्याचं प्रयोजन विचारलं. वर्गशिक्षिकेने कल्याणीमध्ये गेल्या सहामहिन्यात जे बदल झाले त्याच्याबद्दल सांगितलं.
तिचं काहीतरी बिनसलंय.पण काय बिनसलय हे मात्र कळलेलं नाही. तेच विचारायला आलेय. कल्याणीसारखी लाघवी आणि हुषार मुलगी अशी हातातून जाणं योग्य नाही. तिच्या मनातलं जाणून घेतलं पाहिजे.वर्ग शिक्षिका म्हणाल्या.
यावर काय बोलायचं,असा प्रश्न आईला पडला. पण आता सारं स्पष्टपणे बोलण्याची गरज असल्याचं बाबांच्या लक्षात आलं. सोनारानं कान टोचलं की बरं असतं,असं बाबांना वाटलं आणि वर्गशिक्षिकेला आयआयटी शिकवणी प्रकरण त्यांनी सांगून टाकलं. कल्याणीला पाचव्या चाळणी परीक्षेत मिळालेले शून्य गुण, त्यानंतर शिकवणी वर्गाच्या सरांनी त्यांच्याशी केलेली चर्चा याविषयीही सविस्तर सांगितलं.
वर्गशिक्षिकेच्या सारं काही लक्षात आलं .
मुलीच्या इच्छेविरुध्द असं वागून काय मिळवलत तुम्ही?आईकडे बघत वर्गशिक्षिका म्हणाली. यावर काय उत्तर द्यावे हे आईला कळेना. तिच्या मते कल्याणीच्या हितासाठीचं तिला आयआयटी शिकवणी वर्गात टाकलं होतं. पण भलतच झालं होतं.
पण मॅडम, कल्याणी काही बोलली नाही हो. आई रडकुंडिला येऊन म्हणाली.
ती कशी सांगणार नि काय सांगणार?किती लहान आहे ती अजून. खेळण्या- बागडण्याच्या दिवसात असं आयआयटी सारख्या वरच्या श्रेणीच्या शिकवणीचं लोढणं तिच्या गळयात टाकल्यावर पोरगी फार कोमेजून गेलीय. तिला इंग्रजीमध्ये रस असल्याचं तुमच्या लक्षात आलच असेल. त्यातही उत्तम करिअर करता येतं. कोणत्याही इंजिनीअरपेक्षा कितीतरी अधिकपट. पण अद्याप त्यालाही वेळ आहे. आठवीत मुलं अबोधच असतात हो. त्यांना स्पर्धा, करिअर यांची तशी फार कल्पना नसते. त्यामुळे लगेच त्यांच्या गळयात ते लोढणं लटकवण्याची गरज नाही. त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना फुलू द्या,उमलू द्या,खेळू द्या, बागडू द्या. त्यांनाही त्यांचं हित कळतं. पण आपणच असं त्यांच्या मनाविरुध्द वागून त्यांचं अहीत करतो. वर्गशिक्षिका म्हणाल्या.
खरय हो ते. रडवलेल्या सुरात आई म्हणाली. बाबा काहीच बोलले नाही. पण त्यांच्या डोळयात अश्रू आले. कल्याणीचं अहीत करण्यात त्यांचा नाकर्तेपणाही कारणीभूत होता. आईच्या हट्टाला त्यांनी मान्य केलं नसतं तर आज कल्याणी आत्मविश्वास गमावून बसली नसती. याची जाणीव त्यांना झाली.
000
आईबाबांचा निरोप घेऊन वर्गशिक्षिका निघून गेल्या. कल्याणी वर्गातून परतली. तिला आईने आपल्या कुशीत घेतलं. उद्यापासून आयआयटी शिकवणी वर्गाला जाण्याची गरज नाही, असं तिनं कल्याणीला सांगितलं. बाबाही तसच म्हणाले. पण कल्याणीचा चेहरा काही उजळला नाही. चेहऱ्यावर हास्य उमललं नाही.
कल्याणीने आयआयटीच्या शिकवणी वर्गास जाणं थांबवलं. आपणास काहीच येत नाही हे मात्र ती विसरु शकली नाही. तिचा गेलेला आत्मविश्वास पुढच्या सहामहिन्यातही परत आला नाही. वार्षिक परीक्षेत कल्याणी नापास झाली.
0000
ती नव्हे मीच नापास झाले हो, आई बाबांना म्हणाली. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबेना….