(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

गेल्या आठवड्यात आयटीआय(इंडस्ट्रियल ट्रेनिंग इंस्टिट्यूट- औद्योगिक प्रशिक्षण केंद्र)संदर्भात एक महत्वाची बातमी आली. यंदा आयटीआय प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या मुलांमध्ये बऱ्याच जणांना १० वीत ९० टक्के गुण मिळालेले आहेत. या मुलांचे व त्यांना पाठिंबा देणाऱ्या पालकांचे मनापासून स्वागतच करायला हवे.

कारण, ९० टक्के गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक,आपल्या मुलासाठी इंजिनीअर,मेडिकल अशी स्वप्ने बघू लागतात. त्यात काहीही गैर नाही.असे असतानाही त्यांनी आपल्या पाल्याला आयटीआयटमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतला,हे कौतुकास्पद आहे. ही सर्व मुलं पुढील काही वर्षात तंत्रकुशल बणून प्रगतीच्या दिशेने यशस्वीपणे वाटचाल करु लागतील. बुध्दीकौशल्य, तांत्रिक कौशल्य,परीश्रम आणि संयम या गुणांच्या बळावर काही वर्षात यशाला गवसणीही घालतील. तंत्रकुशल मनुष्यबळाला रोजगार आणि स्वयंरोगाराच्या संधी टप्प्याटप्यावर मिळत राहतील. जे या संधीचं सोनं करतील,ते कोणत्याही अभियंत्यापेक्षाही समोर जाण्याची क्षमतासुध्दा प्राप्त करतील.

जी मुलं मनापासून आयआयटीचे अभ्यासक्रम करतात आणि प्रशिक्षणाच्या कालावधीत कौशल्य हस्तगत करतात, ते स्वत:च्या पायावर लवकर उभे राहतात. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनतात. काही वर्षांच्या अनुभवनांतर ही मुले स्वयंरोजगारही सुरु करतात. काही मुलं, ज्या कारखान्यात, उद्योगात प्रशिणार्थी म्हणून लागली असतात, त्याठिकाणी आपलं स्थान आणखी बळकट करतात. काही मुलं वरच्या श्रेणीतही जातात. आयटीआयचं हे महत्व आता बऱ्याच पालक आणि मुलांना पटू लागल्याचं सुचिन्ह आहे. त्यामुळे किंतु-परंतु मनात न ठेवता आणि दहावीतील भरमसाठ गुणांच्या कौतुकात वाहून न जाता बरीच मुलं आता आयटीआयला प्राधान्य देऊ लागली आहेत. गेल्या दोन-तीन वर्षात आयटीआय प्रवेशामध्ये चांगलीच चुरस निर्माण झाल्याचंही दिसतं. ९० टक्के  किंवा त्याहून अधिक गुण मिळवलेले विद्यार्थीही आयआयटीचा रस्ता आनंदाने पकडतात.

आपल्या मुलाचा कल, बौध्दिक क्षमता, आर्थिक परिस्थिती आदी बाबींचा विचार करुन पालकांनी आयटीआयचा पर्याय स्वीकारायला हवा. आयटीआयटमधून प्राप्त होणारी तंत्रकुशलता ही आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व सक्षम करु शकते, ही बाब लक्षात ठेवायला हवी.

मोठी परंपरा

आयटीआय प्रशिक्षणाची महाराष्ट्राची मोठी परंपरा आहे. आपल्या राज्यातील ३५८ तालुक्यांमध्ये शासकीय आयटीआय आहेत. सध्या ही संख्या ४१९  आहे. यामध्ये ७० हजाराच्या आसपास मुला-मुलींना प्रवेश दिला जातो. याशिवाय ५७४ खाजगी आयटीआय आहेत. यामध्ये १ लाख ५४ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो.

केवळ तरुणींसाठी १५ ठिकाणी शासकीय आयटीआय आहे. (या शिवाय प्रत्येक आयटीआयमध्ये ३० टक्के जागा विद्यार्थीनींसाठी राखीव असतात.) अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी २ स्वतंत्र आयटीआय तर या सवंर्गातील उमेदवारांसाठी ४३ शासकीय आयटीआयमध्ये स्वतंत्र तुकड्या आहेत. आदिवासी उमेदवारांसाठी ६१ तर शासकीय आदिवासी आश्रमशाळा आयटीआय – २८ , अनुसूचित जाती आणि नवबौध्द संवर्गासाठी उच्च स्तर आयटीआय – ४ आहेत. याशिवाय वर्धा येथे केवळ दिव्यांगासाठी आयटीआय आहे. द चिल्ड्रेन एड सोसायटी खाजगी औद्योगिक संस्था, मानखुर्द, कुर्ला मुंबई, येथे केवळ अनाथ संवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. द लेप्रसी मिशन, खाजगी शिक्षण संस्था पंचवटी, नाशिक येथील खाजगी आयटीआयमध्ये केवळ कुष्टरोगग्रस्त उमेदवारांना प्रवेश दिला जातो. क्विन्स मेरी खाजगी आयटीआय पुणे येथे संरक्षण सेवेतील व्यक्तिंच्या मुलांना प्रवेश दिला जातो. २०२२ मध्ये नक्सलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी २ शासकीय आयटीआय सुरु करण्यात आले.‍ आपल्या राज्यात आयटीआयचे जाळे कसे विस्तृत आणि व्यापक आहे, ही बाब उपरोक्त माहितीवरुन सिध्द व्हावी.

राज्यातील शासकीय आयटीआय या चांगल्या प्रयोगशाळा आणि उत्तम यंत्रसामग्रीने युक्त आहेत. बहुतेक सर्वच ठिकाणी अनुभवी अध्यापक आहेत. या अभ्यासक्रमांमध्ये सत्तर टक्के भाग हा प्रात्यक्षिकांसाठी राखीव असतो, तर तीस टक्के भाग हा सैध्दांतिक ज्ञान देण्यासाठी उपयोगात आणला जातो.  आयटीआय स्थापन करताना संबंधित परिसरात असणारे छोटे-मोठे उद्योग आणि त्यांच्या गरजा लक्षात घेण्यात आल्या आहेत. संबंधित उद्योगांना स्थानिक प्रशिक्षित कुशल कामगार मिळावेत हा हेतू बऱ्याच अंशी साध्य झाल्याचे सध्याचे चित्र आहे.

आयटीआय मधील विद्यार्थी तंत्रकुशलतेने परिपूर्ण होत असल्याचे निदर्शनास आल्याने बऱ्याच शासकीय आयटीआय मधील विद्यार्थ्यांना स्थानिक औद्योगिक घटकांमध्ये सुलभतेने सामावून घेतले जाते. प्रारंभी अर्धकुशल कामगार म्हणून संधी मिळाल्यावर, संस्थातंर्गत कुशल कामगारांकडून मिळणारे प्रशिक्षण/सराव आणि अनुभवानंतर त्यास कुशल कामगाराचा दर्जा व संधी दिली जाते. शिकावू उमेदवारी कायदा १९६१ नुसार आयटीआय मधून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संबंधित व्यवसाय/उद्योगांमध्ये रोजगार मिळण्यासाठी साहाय्य केले जाते.

आयटीआय मधील प्रशिक्षण काळात उमेदवारांना विविध कारखान्यांमध्ये प्रत्यक्ष कामकाज बघण्यासाठी नेले जाते. उद्योग व्यवसायातील तज्ज्ञांची व्याख्याने नियमितपणे आजोजित केली जातात. कॅम्पसमध्ये मुलाखती आयोजित केल्या जातात. शिकावू उमेदवारी आणि नोकरी मिळवून देण्यासाठी सहाय्य केले जाते.

 

काही वैशिष्ट्ये

(१) १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आयटीआय मधून २ वर्षे कालावधीचा व्यवसाय अभ्यासक्रम पूर्ण करुन त्यांनी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या २ भाषा उत्तीर्ण केल्यास त्यांना १२ वीच्या समकक्ष समजले जाते.

(२) १० वी नापास विद्यार्थ्यांनी २ वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण  करुन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या २ भाषा उत्तीर्ण केल्यास त्यांना १० वीच्या समकक्ष समजले जाते. (३) आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घ्यायचे असेल त्यांना पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्गाला थेट प्रवेश दिला जातो.

उद्योगांचे सहकार्य

शासकीय आयटीआयची गुणवत्ता आणि दर्जा लक्षात घेऊन, टाटा मोटर्स, टाटा पॉवर, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, सॅमसंग, मारुती सुझिकी, सिमेंन्स, टाटा ट्रस्ट, बॉश, वोल्सवॅगन, भारत फोर्ज, सँडविक, हिंदुस्थान इलेक्ट्रॉनिक्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, माझगाव डॉक, लो-रिअल, कोंकण रेल्वे, स्लिंडलर या सारख्या मोठ्या कंपन्यांनी तंत्र शिक्षण मंडळाशी सामंजस्य करार केले असून ६२ कोटी रुपयांहून अधिक निधी आयटीआय अभ्यासक्रमांच्या उन्नतीकरणासाठी दिला आहे. विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग, अल्पमुदतीचे प्रगत प्रशिक्षण, अद्ययावत यंत्रसामग्री, उपकरणे, रोजगार संधी उपलब्ध करुन देण्यासाठी या निधीचा वापर केला जातो.

प्रवेश प्रकिया

यातील काही अभ्यासक्रमांचा कालावधी दोन वर्षे, तर काहींचा एक वर्षं असा आहे. दहावीची परीक्षा ज्या जिल्ह्यातून दिली असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी त्या जिल्ह्यातील आयटीआयमध्ये ९० टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात.

शासकीय आणि खाजगी आयटीआय मधील प्रवेश हे केंद्रिय ऑनलाईन पध्दतीने राबवण्यात येतात. अशी पध्दत राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य. या पध्दतीने सर्व प्रवेश प्रक्रिया या पारदर्शक आणि गुणवत्तेनुसारच होतात. त्यावर सर्वांनाच लक्ष ठेवणे शक्य होते.

आवश्यक प्रमाणपत्रे

व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती म्हणजे शिक्षण शुल्क परत मिळण्यासाठी विशिष्ट नमुन्यात अर्ज दाखल करावा लागतो. त्यासाठी सर्व गटातील उमदेवारांना पुढील कागदपत्रे जोडावी लागतात- (१) आधार कार्ड, (२) विद्यार्थी/विद्यार्थीनीचे नाव असलेली शिधा पत्रिका, (३) महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल सर्टिफिकेट), (४) पालकांचा उत्पनाचा दाखला, (५) जातिचा दाखला, (५) अनुसूचित जमाती संवर्गातील उमदेवारांसाठी जात वैधता प्रमाणपत्र, (५) खुल्या संवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र, (६) दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी वैद्यकीय मंडळाने दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र, यामध्ये अपंगत्व कायमस्वरुपी असून त्याचे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचा स्पष्ट उल्लेख असणे गरजेचे आहे. (७) पुढील वर्षाच्या ३१ मार्चपर्यंत वैध असणारे इतर मागास वर्ग/विमुक्त जाती आणि भटक्या जमाती व विशेष मागास प्रवगासाठी नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र, (हे प्रमाणपत्र उपविभागीय दंडाधिकारी/ उपजिल्हाधिकारी/ जिल्हाधिकारी/ महानगर न्याय दंडाधिकारी यांच्याकडून प्राप्त करता येते.), (८) भारतीय राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र (यासाठी पुढील प्रमाणपत्र मान्य केली जातात – शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रावर उमेदवाराचे राष्ट्रीयत्व भारतीय म्हणून नोंद/ योग्य प्राधिकाऱ्याने दिलेले भारतीय पारपत्र/ उमेदवाराचे जन्म ठिकाण भारतात असल्याचा जन्म दाखला.), (९) माध्यमिक शालांत परीक्षेची गुणपत्रिका, (१०) अलिकडील शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र.

ही प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी शैक्षणिक वर्षं सुरु झाल्यापासूनच प्रयत्न करायला हवेत. दहावीतील गुणांसोबत प्रमाणपत्रेही महत्वाची ठरतात. एखादे प्रमाणपत्र नसल्यास नुकसान सुध्दा होऊ शकते.

२०१९ सालापासून खुल्या संवर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना आयटीआयमध्ये जागा आरक्षित ठेवण्यात येतात. अशा उमेदवारांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

वाढीव गुण

आयटीआय प्रवेशासाठी पुढील बाबींसाठी वाढीव गुण दिले जातात. (१) इंटरिजिएट चित्रकला परीक्षा  (ही परीक्षा उत्तर्णी झाल्याचे प्रमाणपत्र), (२) क्रीडा (सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र), (३) तांत्रिक विषय घेतलेले विद्यार्थी (माध्यमिक शालांत परीक्षा (एसएससी) प्रमाणपत्रावर तांत्रिक विषयाचा उल्लेख असणे आवश्यक आहे), (४) माजी सैनिक (संरक्षण सेवा प्रमाणपत्र आणि उमदेवाराचे आई-वडील संरक्षण सेवेत होते आणि ते महाराष्ट्राचे अधिवासी (डोमिसाईल) असल्याचे प्रमाणपत्र), (४) संरक्षण सेवेतील कार्यरत व्यक्ती (संरक्षण सेवा प्रमाणपत्र आणि उमदेवाराचे आई वडील संरक्षण सेवेत असल्याचे  आणि ते महाराष्ट्राचे अधिवासी असल्याचे प्रमाणपत्र.)(क्रमश:)

सुरेश वांदिले