(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

तेजोमयीच्या सदनिकेला तीन गॅलऱ्या आहेत. प्रत्येक गॅलरीमध्ये वेगवेगळी फुलझाडं आईनं लावली आहेत. या झाडांची सगळी देखभाल आईच करते. बाबांकडे या झाडांना पाणी देण्याचं काम. ते न चुकता दररोज सकाळी करतात. हे काम त्यांना आता आवडायला लागलय.

सुरुवातीला भसाभसा पाणी टाकणारे बाबा आता हळूवारपणे झाडांना पाणी देतात. सगळयाच झाडांना सारखच पाणी लागत नाही. ते झाडाप्रमाणे बदलतं. त्यामुळे कमी जास्त करावं लागतं. ते आता बाबांना छान जमतय.

 पाणी देता देता या झांडाशी बाबांशी चांगली मैत्रीही झाली. ते आता केवळ झाडांना पाणी देऊन थांबत नाही तर, कुंड्यांमध्ये निघालेलं तण काढतात. शेवाळ दिसलं तर ते काढतात. या पावसाळयात तर त्यांनी झाडांसाठी खत आणलं. ते कसं टाकायचं, किती दिवसांनी टाकायचं हे आईकडून शिकूनही घेतलं.

काही काही झाडं बिन बुलाए मेहमान म्हणजेच न बोलावता येणाऱ्या पाहुण्यासारखे कुंडित उगवतात. मूळ झाडापेक्षाही ते अधिक वेगाने वाढतात. मूळ झाडाच्या वाढीला त्यामुळे खिळ बसतो. ते मूळ झाडाचं पाणी पितात. त्यांना दिलेलं खतही पळवतात, असं बाबांना सारखं वाटायचं. त्यामुळे अशा झाडांचं काय करावं हे काही बाबांना कळेना. सुरुवातीला काही कुंड्यांमधील अशी आगंतुक झाडं त्यांनी उपटून काढली आणि कचऱ्यात टाकली. आईला ते काही आवडलं नाही.

अहो, झाडं म्हणजे कचरा नव्हे ना..आईनं आपली नापसंती दर्शवली.

अगं, मग अशा अतिक्रमण करणाऱ्या झाडांचं करायचं काय? ते कुंडितल्या मूळ झाडाच्या मुळावरच येत आहेत ना..?

अहो, तसं वाटतं तुम्हाला. पण तुम्ही काळजीपूर्वक बघितलं काय?

काय?

अहो, ही झाडं आपल्यासारखी आप्पलपोटी नाहीत.कुंड्यातली बरीच झाडं एकमेकांना सांभाळून घेतात. दोन्ही झाडं एकाच कुंडीत छान वाढतात. तसं झालं नसतं व त्यांना मिळणारं पाणी, खत खूप अपुरं पडलं असतं तर दोघांपैकी एक कुणीतरी कोमेजलं असतं ना…

बरोबर…

पण तसं नाहीय. एखादा अपवाद सोडला तर ही झाडं छान सहजीवन जगताहेत की..

माझ्या लक्षात आलं नाही बुवा..

कसं येणार, त्यासाठी झाडांवर माया लावावी लागते. त्यांच्यासोबत बोलावं लागतं. त्यांचं म्हणणं एकून घ्यावं लागतं.आई म्हणाली.

हे सगळं तू करतेस.. इतका वेळ कसा मिळतो बॉ तुला..बाबांनी आश्चर्याने विचारलं.

अहो, ही आपली लेकरचं की. तेजोमयी आणि अलेक्झांडरसारखी.त्यांच्यासाठी वेळ काढायचा नाही तर मग कुणासाठी?आई हसून म्हणाली.

बाबांना आईचं खूप कौतुक वाटलं. त्यांनी कुंड्यांमध्ये उगवणाऱ्या उपटसुंभासारख्या झाडांना उपडणं सोडून दिलय.

अशी काही झाडे मूळ झाडास जास्त त्रास देत असल्याचं त्यांना वाटलं तर ते आधी आईला सांगतात. आईने परवानगी दिली तरच त्या झाडाला हळूवार उपडतात. पूर्वीसारखं अशा झाडांना ते कचऱ्यात टाकत नाहीत. आता ते कॉलनीतल्या आवारात अशा झाडांना लावतात. अशी बरीच झाडं तिथे बाबांकडून लावली गेली. बाबांचं बघून कॉलनीतल्या इतरांनीही झाडं लावली.ही बाग आता चांगलीच फुललीय. उपटसुंभांची बाग असं या बागेचं नामकरण बाबांनी केलय….कॉलनीतल्या लोकांना सुध्दा आता हे वेगळं नावं जाम आवडलय..

०००