(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

औरंगजेब हसले असते तर…

   हसण्यासारखं दुसरं (जालीम) औषध नाही. इंक्लुडिंग ऑल प्रॉडक्ट्स ऑफ पातंजली. आणि स्वत:वर हसण्यासारखं तर दुसरं च्यवनप्राश नाही . इंक्लुडिंग एकत्रित प्रभाव ऑफ डाबर, बैधनाथ,स् ाोनाचांदी ॲण्ड ऑफकोर्स पातंजली च्यवनप्राश. स्वत:च्या चुकांवर जे हसतात ते अमर होऊ शकतात. पण हे आलमगीर औरंगजेब यांसी जमले नाही. लॉफ्टर इज बेस्ट मेडिसिन या अजरामर वचनास जन्म घालण्यासाठी संधी त्यांसी आली होती. पण म्हणतात ना समय से पहले और भाग्य से जादा कुछ नही मिलता.असे काहीसे त्यांच्या बाबत झाले.

   आलमगीर औरंगजेब यांच्या स्वप्नात एके दिवशी ते स्वत:च आले नि त्यांनी त्यास सांगितले की तू दख्खणमध्ये येऊन मोठीच चूक केली आहेस. चूक झाली तर झाली. त्याची चिंता  करु नकोस, पण आता या चुकीचा स्वीकार कर आणि स्वच्छ हसून माघारी फिर, आगे सब कुछ ठीकठाक हो जायेगा. खामोश, कोन आहे रे तिकडे, पकडा  या औरंगजेबास, असा झोपेतच हुकूम देणाऱ्या औरंगजेबाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी त्याचे सैनिक धावले. जेव्हा खरा प्रकार त्यांच्या आणि आलमगिराच्या लक्षात आला तेव्हा ते आणखी मख्ख झाले.

   सैनिकांची मात्र इकडे यमुना आणि तिकडे गंगा नदी अशी अवस्था झाली. त्यातही एका सैनिकाला हसू आवरेनाच. त्याची परिस्थिती बिकट झाली. हे बघून आलमगीर बिथरलेच. त्यांनी त्याला शिक्षा फर्मावली की, जावो और बिरबल हुवाही नही. वो तो सिर्फ एक अफवा थी, ऐसा आग्रामे जाके सबको सुनावो. उसके बादही हमे मुँह दिखाना. बिच्चारा सैनिक.

   आलमगिराचा हा आदेश पाळण्यासाठी आग्‌रयाला गेला. या आदेशाचे पालन करुन जेव्हा तो आलमगिराला मुँह दाखण्यासाठी पुन्हा दक्षिणेत आला तोपर्यंत आलमगिर अल्लातालाला प्यारे झाले होते.

   आलमगीर स्वत:च्या चुकीवर हसून माघारी परतले असते तर ते नसते का अजरामर झाले.  खुद पे हसना बेहतर है लेकीन ,खुद के गलतीयो पे हसना उससे भी बेहतर है, असा निरोप आलमगिरास कंपनी सरकारच्या एका अधिकाऱ्यामार्फत दस्तुरखुद्द विल्ययम शेक्सपिअरने पाठवला होता. सोबत कॉमेडी ऑफ एरर या नाटकाची एक प्रतही पाठवली होती. पण आलमगिराने त्याकडे दुर्लक्ष केले. निरोपाकडे बघितले सुध्दा नाही.

   आलमगीर हसले असते तर, फक्त कल्पना करुन बघा कीकाय झाले असते. खरे तर शेक्सपिअरचा तोच उद्देश होता. आलमगिराने हसावे. त्यातून उदभवणाऱ्या स्थिती- परिस्थिती- गती वर एखादे नाट्य चितारावे. पश्चिमेतल्या राजे- महाराजे- राणी- सरदार-  दरकादार यांचे प्रेम- राग- लोभ- कट- कारस्थान यावर नाटके आणि सुनिते लिहून त्याच्या भेज्याचा कबुतरखाना झाला होता. त्यामुळे पूर्वेकडील आलगिरास आपल्या एखाद्या नाटकाचा नायक बनवण्याचे त्याने योजले होते.

   आलमगीर हसले असते. हसून हसून त्यांचे पोट दुखले असते. यामुळे ते गडबडा लोळले असते. लोळता लोळता त्यांच्या नयनी अश्रू आले असते. या अश्रूंनी त्यांची दाढी भिजली असती. आपल्या आजोबांची भिजली दाढी बघून त्यांच्या नातवांना गंमत वाटली असती. तेही मग खो खो हसले असते. नातवंड हसताहेत म्हणून आज्या हसल्या असत्या. असे सारे एका पाठोपाठ सारेजण हसत सुटल्याचे बघून बाहेर आलमगिरास वेडाचा तीव्र झटका आला आहे अशी अफवा उडाली असती. या अफवेतून गोंधळ उडाला असता. हा गोंधळ कॉमेडी ऑफ हॉरर मध्ये रुपांतर झाला असता. आपल्या अब्बाजानास हसता सुध्दा येते हे बघून आलमगिराच्या काही लेकरांना हायसे वाटले असते आणि काही लेकरांना यात काहीतरी काळेबेरे वाटले असते. आलमगीर हसतोय हे कळल्यावर छत्रपती महारांजापासून दक्षिणेतल्या आदिलशाही, नादीलशाही ते सर्वप्रकारच्या शाह्यांना प्रश्नचिन्हांवर प्रश्नचिन्ह पडले असते. त्यातून खलबतावर खलबते सुरु झाली असती. आलमगीर खराखरोच हसतो का, हे बघण्यासाठी चहुबाजूंनी हेर पाठवण्यात आले असते. खडकीमुक्कामी असलेल्या औरंगजेबाच्या राहत्या तंबुभोवती हेरांची ही म्हणता ही गर्दी झाली असती. कोण कुणाची हेरगिरी करतोय हे न कळून हेरांमध्येच तुंबळ युध्द झाले असते.

   आपले हसणे सुध्दा असे युध्दाचे कारण घडू शकते, हे बघून आलमगीर पुन्हा हसू लागला असता.. हसता पुन्हा गडबडा लोळू लागला असता. लोळता लोळता त्याच्या नयनातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या असत्या.. हसण्याच्या या डबल धमाक्याने त्याच्या धमन्या अधिक स्ट्राँग झाल्या असत्या. त्याच्या रक्तप्रवाहात काही समस्या असत्याच तर त्या दूर झाली असत्या. धमन्यांवरचे टेन्शन कमी झाले असते आणि त्यांना गर्जना करण्याची संधी मिळाली असती की, देखो देखा, लॉफ्टर इज बेस्ट द मेडिसिन.. पण छे नियतीस ते मान्य नव्हते. आलमगिरांच्या नावावर एक अजरामर वचन कोरण्यासाठी शेक्सपिअरची लेखणी तय्यारच होती. पण दैव देते नि कर्म नेते असे म्हणतात ते खरेच ठरले.

   अल्लातालानेच पाठवलेली संधी आलमगिराने गमावली. पुढचा इतिहास ठाऊकच आहे. न हसलेल्या आलमगिराने आपल्या पुढच्या पिढीला रडत ठेवले. रडता रडता ही पिढी संपली आणि आलगिराचे साम्राज्यही लयास गेले..