कार्यकुशलतेची दिशा
कोणत्याही यशस्वी उद्योजकांच्या यशाच्या ईमारतीचा पाया अनेक गुणवैशिष्ट्यांनी पक्का होत जातो. तस पाहू जाता यशाची व्याख्या सापेक्ष म्हणायला हवी. प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून ती बदलत राहते. पण आपणास ज्या व्यक्ती त्यांच्या व्यक्तिगत किंवा व्यावसायिक आयुष्यात यशस्वी झाल्या आहेत असं वाटतं, त्या काही समानसूत्रांचा अवलंब करत असल्याचं दिसून येतं. ही सूत्रं कधी कळत व ठरवून आणि काही वेळ नकळत वापरली जातात. यापैकी काही समान सूत्रे पुढीलप्रमाणे दिसून येतात.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर–
या व्यक्ती त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावीरीत्या वापर करतात. बहुतेकांच्या हातात सध्या फोर जी क्षमतेचा किंवा त्यापुढीलही क्षमतेचा स्मार्ट फोन असतो. स्वत:ची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हा स्मार्ट फोन प्रत्येकास अतिशय उपयुक्त ठरु शकतो. पण त्याचा तसा वापर कितीजण करतात ? बहुतेकजण व्हॉट्स ॲप, गाणे ऐकणे, चित्रपट डाऊनलोड करुन ते बघणे किंवा गेमिंगमध्ये रमणे, अशासारखा चार दोन गोष्टींच्या पलिकडे करत नाहीत. स्मार्ट फोनमध्ये तुमच्या प्रकृतीची काळजी घेणाऱ्या ॲप पासून तर तुमच्या कार्यालयीन कामकाजासाठी उपयुक्त ठरु शकेल अशा विविध ॲपपर्यंत कितीतरी ॲप असतात. किंवा आपण अशी ॲप्स डाऊनलोड करु शकतो.
आपलं गतिमान जीवन अधिक सुखकर, काळजीमुक्त आणि आनंददायी करण्यास स्मार्ट फोनचा उत्तम उपयोग करता येऊ शकतो. टॅब, लॅपटॉप, डेस्कटॉप यांचाही असाच वापर करुन कामांचा दर्जा आणि गुणवत्ता वाढवणे, गतिमानतेने काम करणं शक्य आहे. यशस्वी व्यक्ती या गॅजेट्समधील खेळांकडे कायम दुर्लक्ष करतात. अनावश्यक ईमेल बघावेच लागणार नाही यासाठी तंत्रज्ञानाचाच वापर करतात. अनावश्यक मेसेजेस म्हणजेच संदेश येणार नाहीत याची काळजी घेतात. असे संदेश आले तरी ते आपल्या नजरेसमोर येणार नाहीत याची काळजी घेतात.
प्रचंड वाचन –
श्रीमती काजोल देवगण, श्री शाहरुख खान किंवा श्री करण जोहर यांच्यामधील समान धागा म्हणजे त्या चित्रपट सृष्टीतील अत्यंत यशस्वी व्यक्ती आहेत. पण त्याहीपेक्षा त्यांच्यातील साधर्म्य म्हणजे या तिनही व्यक्ती प्रचंड वाचन करतात. आपण या तिघांना वेगवेगळया कार्यक्रमांमधून बघितलं असेलच. त्यांची प्रगल्भता, विचार करण्याची आगळीवेगळी पध्दती, स्वत:चं सादरीकरण यात ते इतरांपेक्षा चार पावले पुढंच असतात. कोणत्याही मांदियाळीत हे तिघे जण असले तरी त्यांचा प्रभाव पडतोच पडतो. याचं महत्चाचं कारण हे त्यांना, प्रचंड वाचनाने दिलेला आत्मविश्वास
वाचनामुळे नवे विचार तर कळतातच. पण आपणास वेगळा विचार करण्याची क्षमता प्राप्त होते. नवे शब्द, वाक्प्रचार कळतात. भाषेवर प्रभुत्व निर्माण होते. स्व.यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री असताना वा केंद्रात महत्वाची पदे भुषवताना अत्यंत व्यस्त असूनही वाचना खंड पडूच देत नसत. बिल गेट्स,मार्क झुकेरबर, वॉरन बफेट ही जागतिक कीर्तिची मंडळी सतत वाचनात मग्न असतात. टाइम मॅगेझिन दरवर्षी जगातील श्रेष्ठ मंडळी सध्या काय वाचतेय व इतरांनी काय वाचायला हवं हे सांगणारा विशेषांक काढत असते.
अतिव्यस्त श्रेणितील मंडळी वाचनासाठी दररोज वेळ काढू शकतात.आपण कां नाही. त्यांच्यापेक्षा आपणाकडे निश्चितच अधिक वेळ आणि कमी जबाबदाऱ्या आहेत. आपलं भावविश्व समृध्द करणाऱ्या किंवा आपल्या व्यावसायिक कार्याची गुणवत्ता वाढवण्यास उपयुक्त ठरेल अशा पुस्तकांचे वाचन नियमितरीत्या करायलाच हवं.
अधिकारांचे वाटप-
यशस्वी व्यक्ती स्वत:कडे असलेले अधिकार इतरांना सोपवण्यात कमीपण मानत नाहीत. असं केल्यानं आपलं महत्व कमी होईल किंवा स्वत:चे अधिकार इतरांना दिल्यास ते डोईजड होतील, असं या मंडळींना वाटत नाही. अधिकाराचे विकेंद्रिकरण केल्यावर अनावश्यक ताण-तणाव कमी होतो. इतरांना निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळते व त्याची जबाबदारीही वाढते. त्या जबाबदारीने कार्य करणे आवश्यक ठरते. आपला बॉस आपल्यावर विश्वास ठेवतो ही भावना निर्माण होते. बॉसच्या विश्वासाला तडा जाणार नाही यादृष्टिने हाताखालील मंडळी कार्यरत होतात. यामुळे संस्थेची वा कार्यालयाची कामगिरी चांगल्या दर्जाची होते. हाताखालील व्यक्तिंच्या क्षमता ओळखून त्यांच्याकडे अधिकार सोपवणं कठीण जाणारे नाही. यासाठी आपणच सर्व कामे करण्याचा हेका सोडला पाहिजे. जबाबदारी सोपवल्यावर संबंधितांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं पाहिजे. चांगल्या कामाचं कौतुक केलं पाहिजे. काम करताना काही गफलत झाल्यास त्या व्यक्तिस सांभाळून घेतलं पाहिजे आणि ते काम उत्तमरीत्या पूर्ण करण्यासाठी त्यास मार्गदर्शन केले पाहिजे.
चालढकलीला आळा–
यशस्वी मंडळी त्यांच्यापुढे असलेल्या कामांच्या बाबात चालढकल करत नाहीत. आजचे काम उद्यावर किंवा आता करावयाचे काम नंतर किंवा दोन तासांवर ढकलत नाही. कामाची काठीण्य पातळी अधिक असेल तर त्यास तत्काळ भिडून ते काम निपटवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांची कामे अपूर्ण राहत नाहीत. कामाची थप्पी वाढत नाही. सर्व कामे वेळच्या वेळेत होऊन ते तणाव मुक्त राहतात. त्यातून त्यांची व्यक्तिगत कार्यक्षमता व कार्यालयीन गतिमानता दिसून येते.
प्रगतीचा आढावा-
यशस्वी मंडळी आपल्या कामकाजाचा सतत आढावा घेत राहतात. उद्दिष्ट ठरवतात .त्यासाठी कार्ययोजना म्हणजेच रोडमॅप तयार करतात. त्यानुसार काम करण्यासाठी सर्व प्रकारच्या उर्जांना कार्यान्वित करतात. स्वत: कामास लागतात हाताखालील व्यक्तिंकडून काम उत्तमरीत्या होईल यासाठी प्रेरणा व स्फुर्ती देतात. कामांमधील त्रुटींचा सतत शोध घेऊन प्रत्येक टप्प्यावर या त्रुटी कशा दूर होतील याकडे लक्ष पुरवतात.
एकाच बाबींवर लक्ष केंद्रीत-
यशस्वी व्यक्ती बहुकामे-मल्टिटास्किंग, करण्यावर फारसा विश्वास ठेवत नाही. एका वेळी एकच काम करण्याची त्यांची वृत्ती असते. हाती घेतलेल्या कामावर पूर्णरीत्या झोकून देतात. त्यावरच लक्ष केंद्रीत करतात. काम लहान की मोठे हे त्यांच्यादृष्टिने महत्वाचे नसते. कामाची गुणवत्ता आणि दर्जा याकडे ते अधिक लक्ष पुरवतात. त्यासाठी एका वेळेला एकच काम करणे त्यांना आवश्यक वाटते.परिणामी कामात कोणत्याही त्रुटी राहत नाहीत. ते काम परिपूर्णरीत्या होतं. त्याकामात काही दोष आढळून येत नाही वा ते दोष दूर करण्यासाठी त्यांना वेळ खर्ची करावा लागत नाही. पुढच्या कामावर पूर्णपण लक्ष केंद्रित करता येणे शक्य होतं.
कामाची निश्चित दिशा-
यशस्वी व्यक्ती आपल्या कामाची निश्चित दिशा आदल्यादिवशीच ठरवतात. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी नेमके कशाला प्राधान्य द्यायचे आहे, याबाबत त्यांच्या मनात कोणताही गोंधळ नसतो. कामाची दिशा स्पष्ट असल्याने काय करायला हवे, कसे करायला हवे याची स्पष्टता असते. त्यामुळे वेळेचीही बचत होते. सकाळी ठरवलेले काम योग्य वेळेत पूर्ण झाल्याचे समाधान त्यांना मिळते. हे समाधान त्यांना पुढील काम तितक्याच सक्षमतेने करण्यासाठी उत्साह आणि उर्जा मिळवून देते.
आरोग्यदायी भोजन–
यशस्वी व्यक्ती स्वत:च्या खान्यापिण्याकडे विशेष लक्ष पुरवतात. आरोग्यास हानीकारक ठरेल असे खाणे आणि पिणे ते टाळतातच. त्यामुळे त्यांची उर्जापातळी ही कायम उच्च दर्जाची असते. त्यांना कामाचा कंटाळा वा आळस येत नाही. चालढकल करण्याकडे त्यांचा कल नसतो. कोणतेही आव्हान स्वीकारण्यासाठी ते सदैव तयार असतात.
उत्तम निद्रा –
या व्यक्ती स्वत:च्या निद्रेचे वेळापत्रक सुव्यस्थितरीत्या पाळतात. कामाची दिशा निश्चित केल्याने व त्याबरहुकूम काम केल्याने या व्यक्तींचे काम वेळेवर पूर्ण होतात. त्यामुळे त्यांना इतर बाबींमधील वेळेत कपात करावा लागत नाही. विशेषत: निद्रेच्या बाबातीत ते कधीच समझौता करत नाहीत. त्यांच्या निद्रेचे जे काही सात वा आठ तासाचे चक्र असते ते तुटू नये याची ते काळजी घेतात. या चक्राला अडथळा आणू शकणाऱ्या कोणत्याही घटकास कोणत्याही परिस्थितीत जवळपास फिरकू देत नाहीत. संपूर्ण निद्रा या व्यक्तिंना सकारात्मक ठेवतात आणि त्यांची तब्येतही उत्तम ठेवतात.
या काही घटकांचा आपणही अवलंब केला तर आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच बराच बदल संभवू शकतो. यापैकी कोणतीही बाब वा घटक अंगिकारणे कठीण नाही वा आवक्याबाहेरचे नाही. या घटकांना एकदा का अंगिकारण्याचा मनात निर्णय घेतला आणि त्या निर्णयाप्रमाणे वागत राहिलो तरी बराच फरक पडू शकतो.
तेव्हा, शुभस्य शिघ्रम!