(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

काळी पांढरी जादू

बादशाहा अकबरांच्या दरबारात नवरत्ने होती. त्यामध्ये बिरबल हा त्याचा आवडता होता. कोणतीही समस्या उद्भवली की आधी अकबर बिरबलांचा सल्ला घेत असे. बिरबलाचे सल्ले ऐकून, अकबराने घेतलेले निर्णय चुकत नसत. त्यामुळे बिरबल हा अकबराच्या गळ्यातील ताईत बनला होता. त्यामुळे अकबराच्या दरबारातील इतर सरदार आणि मनसबदार हे बिरबलास पाण्यात पाहत असत.

        बिरबल, अकबराच्या मनातून कसा उतरेल यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु असत. मात्र त्यांच्या प्रयत्नांना काही यश मिळत नसे. दिवसेंदिवस बिरबलाचं महत्व आणखीनच वाढत गेलं. त्यामुळे दरबाऱ्यांचा जळफळाटही वाढला.

संधी मिळाली की इतर सरदार-मनसबदार अकबराचे कान भरु लागले. बिरबल हा स्वत:ला प्रति सम्राट समाजायला लागलाय असही एका सरदारानं अकबरास एकदा सांगितलं. तेव्हा अकबर आधी फार गंभीर झाले आणि नंतर खो खो हसायला लागले..

ते बघून तो सरदार, घाबरला..आपण जे सांगितलं, त्यामुळे अकबराच्या मनावर परिणाम होऊन तो वेडा तर झाला नाही ना, अशी एक शंका त्याच्या मनात आली. आपण हे काय करुन बसलो,याचं दु:ख वाटून त्याने स्वत:च्याच हाताने स्वत:च्या कानशीलात लगावली.

हे बघून बादशाहा अकबर, हसायचा थांबला आणि तो आश्चर्यानं, त्या सरदाराकडे बघू लागला.

महाराज क्षमा असावी, मी वाट्टेल ते बोलून गेलो..

अरे, पण तू क्षमा कां मागतोस..

म्हणजे महाराज, तुम्हाला काहीही झालेलं नाही..

मला काय होणार? मी ठणठणित आहे.

मग महाराज आपण मघा,असे अचानक खो खो कां हसू लागलात..

अरे, तू बिरबलाबद्दल बोललास ना..तो प्रति बाहशाहा सारखा वागतो म्हणून..

खरं आहे खाविंद ते….

प्रति बादशाहा म्हणजे बादशाहा नव्हे. इतकं तुला कळत कसं नाही.

आँ..

अकबराकडे आपली डाळ शिजत नाही हे बघून तो सरदार निघून गेला..

त्याने महालात जे घडलं, ते इतर सरदारांना सांगितलं.

याचा अर्थ, आपला बादशाहा एकतर वेडा नक्कीच झाला असला पाहिजे किंवा मग त्याच्यावर बिरबलाने काळी जादू केली असली पाहिजे. ही जादू आपण उतरवली पाहिजे..

पण ती कशी उतरवणार..

बादशहांकडे तांत्रिक घेऊन जाऊ नि सांगू त्यांना..

अरे पण, बादशाहा, बिरबलाविषयी काहीही वाईट ऐकून घेत नाहीत ना..

बिरबलाचं नाव न घेता, आपण त्यांना सांगू की, तुमच्यावर कुणाचीही मोहिनी चालू नये म्हणून हा तांत्रिक,आणलाय …ही कल्पना इतरांना पटली.

त्याप्रमाणे एके दिवशी एका तांत्रिकास घेऊन काही सरदार अकबराला महालात भेटले.

त्यांनी येण्याचं प्रयोजन सांगितलं. अकबर आधी गंभीर झाला आणि पुन्हा खो खो हसू लागला..

हे बघून सरदारांना वाटलं, खरोखरच अकबर वेडा झाला की काय..तांत्रिकाचे पाय लटपटू लागले. त्याची बोबडी वळली.. तो त त प प करु लागला..हे बघून अकबराने हसण्याचं थांबवलं आणि त्याने तांत्रिकास पाणी दिलं..

अरे, तुम्ही माझ्यावरची काळी जादू दूर करायला आला होतात ना…मग तुमच्या मानगुटीवर भूत बसल्यसारखे कां करता..अकबर तांत्रिकास म्हणाले.

त्या तांत्रिकाने मान खाली घातली.. काय बोलावं हे त्याला सूचेना..

इतर सरदारांनीही मान खाली घातली.

अरे, गधड्यांनो जादू जादू असते,ती काळी किंवा पांढरी कशी राहू शकते..उद्या तुम्ही म्हणाल जादू निळी असते,परवा म्हणाल हिरवी असते..

नाही नाही खाविंद..

काय नाही..

म्हणजे जादू जादूच असते हेच तुमचं म्हणणं खरं आहे. पांढरी किंवा काळी नसते..

पटलं ना माझं म्हणणं..अकबर म्हणाले..

हो खाविंद…पण तुम्हाला कसं कळलं हे..

अरे, तो बिरबल आहे ना…तो शिकवतो मला जादू..आज पहाटे त्याने मला एखाद्याला कोबंडी कशी करायची ही जादू शिकवली. एखाद्या तांत्रिकावर ही जादू केली तर त्याची पटदिशी कोंबडी होऊ शकते हे गुपितही त्याने मला सांगितलं.. आणि बघा..बिरबल खराच त्रिकालदर्शी आहे..तो बोलतो तेच घडतं..त्याने सकाळी तांत्रिकाचं नाव घेतलं आणि दुपारी तांत्रिक माझ्यासमोर हजर..

म्हणजे महाराज तुम्ही काय करणार..तांत्रिक आता पुरताच घाबरुन गेला होता..

अरे तू घाबरतोस कशाला…

बिरबलाने शिकवलेली जादू खरी आहे का खोटी आहे हे बघायला नको का,खरी निघाली तर प्रश्नच नाही.तुझी कोंबडी होईल.मग तुला इथे आणणाऱ्या सरदारांना त्याची मस्त मेजवाणी करता येईल..

नाही नाही खाविंद..असं काही करु नका, तो तांत्रिक अकबराच्या पाया पडून गयावया करु लागला..

अरे काय नाही..समजा बिरबलाने शिकवलेली जादू फुस्स निघाली,तर बिरबल खोटारडा असून तो मला फसवतो हे सिध्द होईल ना…..अकबर सरदारांकडे बघत म्हणाला..

हो हा महाराज..सरदार कसे बसे बोलले…

ते एकदा सिध्द झालं की मग, बिरबलाची काही खैर नाही..त्याला हाकलूनच लावीन दरबारातून किंवा शिरच्छेद करेन त्याचा. बादशाहा अकबरास फसवतो म्हणजे काय,शिक्षा तर झालीच पाहिजे…बरोबरना,अकबर सरदारांकडे बघत म्हणाला.

बरोबर खाविंद,अगदी बरोबर..

पण त्यासाठी या तांत्रिकावर जादूचा प्रयोग करायला पाहिजे की नाही..अकबराने पुन्हा सरदारांकडे बघितलं..

सर्व सरदाराच्या माना खाली गेल्या..महालात स्मशान शांतता पसरली.तांत्रिक आता पूर्णपणे गर्भगळीत झाला होता.त्याने अकबराचे पाय पकडले आणि आपणावर जादू करु नका,म्हणून तो गयावया करु लागला…

अकबरास हसू येत होतं.पण त्याने ते कसंबसं थांबवलं..त्याने त्या तांत्रिकास उठवलं.

तुझी सुटका एकाच अटीवर करतो.

कोणती अट खाविंद.

या माझ्या सरदारांवर तुझ्याकडे असलेली जादू चालव आणि त्यांना कावळा करुन टाक..

बादशाहाचे हे बोल ऐकताच तांत्रिकासह सरदारांनी महालातून धूम ठोकली..पुन्हा कधी कुणी बिरबलाच्या विरुध्द अकबराकडे तक्रार करण्यास धजावला नाही.

सुरेश वांदिले

०००