आजोबांसाठी त्यांचा नातू, समीर जणू काही गुलाबाचं फुल. त्याला किती जपू नि कसं जपू, असं त्यांचं होतं. आजोबा नाही तर काय ते ट्रम्पबिम्प काका किंवा मोदीबिदी मामा नातवाचा हट्ट पुरवणार? असा त्यांचा खाक्या! इतके लाड चांगले नसल्याचं, समीरच्या बाबांनी आजोबांना एकदोनदा समजावून बघितलं. पण आजोबांनी काही बाबांचं ऐकलं नाही.
आजोबा आणि नातू यांच्यात यापुढे आपण यायचं नाही असं समीरच्या बाबांनी मग ठरवलं. त्यामुळे समीरच चांगलंच फावलं. समीरचे सगळेच हट्ट पुरवण्याच्या अट्टाहासामुळे आजोबांनी एकदा त्याला टीव्हीचा रिमोट दिला. सध्या देऊ नका, असा इशारा त्यावेळी बाबांनी केला, पण आजोबांनी तिकडे कानाडोळा केला.
रिमोट हाती आल्यावर समीरला जणूकाही अलीबाबाची गुहाच मिळाली. त्याच्या घरी असलेल्या स्मार्ट टीव्हीमध्ये असंख्य चॅनेल्स होते. शिवाय गुगल, यू ट्यूब, रिल्स नि आणखी काय काय ? समीरचं तर हे बघू की ते, असं होऊन गेलं. शाळेत जाईपर्यंत नि आल्यापासून झोपेपर्यंत रिमोट, अशी समीरची दिनचर्या झाली. जेवतानासुध्दा यूट्यूबचा कोणतातरी कार्यक्रम असल्याशिवाय पठ्ठ्याचा घासच तोंडात जाईना. आईबाबाने टीव्ही बंद केला की आदळआपट सुरु नि पाठोपाठ जोरात भोकांड पसरणं आलंच. कितीही बाबापुता करा. समीरचं नाही म्हणजे नाही. रिमोट मिळाल्यावरच गडी जेवणार.
हे सगळं तुमच्यामुळे होतय. असं समीरच्या बाबांनी आजोबांना सांगण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी पुन्हा दुर्लक्षच केलं.
एकदा समीरचा मामा बऱ्याच दिवसांनी मुंबईवरुन आल्याने त्याच्यासाठी मेजवाणीचा बेत समीरच्या आईने ठरवला. छान पंगत बसली. सगळेजण स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ लागले. पण समीर मात्र गाल फुगवून बसला. कारण बाबांनी टीव्ही सुरु केला नव्हता. समीर जेवत नाही म्हणून आजोबांचा जीव अगदीच कासावीस होऊ लागला. त्यांनी सुरुवातीला समीरला जेवण्याचा आग्रह केला. पण टीव्ही सुरु केल्याशिवाय जेवणारच नाही, हा हट्ट काही समीर सोडेना. तेव्हा ते उठले. बाबांच्या बाजूला असलेला रिमोट घेऊन टीव्ही सुरु केला. त्यामुळे समीर खिदळायला लागला. पण इकडे आतापर्यंत दाबून धरलेल्या रागाने बाबांना दगा दिला. ते ताडकन उठले नि त्यांनी समीरच्या हातातून खसकन रिमोट हिसकला, धाडकन टीव्ही बंद केला नि फाडकन रिमोट फरशीवर आदळला नि रागाने आजोबांकडे बघत, ताट बाजूला सरकावून ताडताड आतल्या खोलीत निघून गेले.
सगळेजण अवाक झाले. हसत खेळत सुरु असणाऱ्या पंगतीवर उदासवाणी छाया पसरली.
आपल्याकडे समीरच्या बाबाने डोळे वटारुन बघितलं, याचा राग घेऊन आजोबांनी जेवण अर्धवट टाकलं नि ते ताडताड त्यांच्या खोलीत निघून गेले.
या सगळ्या प्रकारानं समीर भांबावून गेला. बाबा आपल्यावर रागवतात इथपर्यंत ठीक होतं. पण ते त्याच्याही बाबांनाही रागावतात हे मात्र त्याच्यासाठी अघटीतच होतं. आता कुणीच कुणाशी बोलेना. समीरचं तोंड बारीक झालं.
समीरला जवळ घेत मामा म्हणाला,
“बघितलंस तुझ्या हट्टाचा परिणाम. बाबाही उपाशी, तुही उपाशी नि आजोबाही उपाशी. आम्हीसुध्दा धड जेवलो नाही.”
“सॉरी, मामा”, समीर रडत म्हणाला.
“आधी, आत जाऊन तू बाबांना सॉरी म्हण, नि यापुढे जेवताना टीव्ही बघण्याचा हट्ट करणार नाही असं त्यांना प्रॉमीस कर,” मामाने त्याला समजावलं.
समीरने मान डोलावली. आतल्या खोलीत जाऊन त्याने बाबांची क्षमा मागितली नि त्यांना यापुढे असं वागणार नाही, असं कबूल केलं.
मामाने लगेच, आजोबांना त्यांच्या खोलीत जाऊन बाहेर आणलं. त्यांचा राग काही शांत झालेला नव्हता.
“अहो काका, आपणच मुलांचे नको ते हट्ट पुरवण्यासाठी अशा सवयी लावतो. तुमच्या नातवाला आधी ठाऊक होतं का टीव्हीमधील युट्यूबचे कार्यक्रम? तुम्ही जर सुरुवातीलाच त्याला समजावलं असतं, त्याला याचे तोटे सांगितलं असते, गरज पडली तर रागावले असता तर अशी आजच्यासारखी परिस्थिती उद्भवली नसती ना.”
आजोबांना हे सांगणं पटलं असावं. ते तडक आतल्या खोलीत गेले नि त्यांनीही बाबांची क्षमा मागितली. बाबांच्या डोळयात अश्रू आले. त्यांनी बाबांना मिठी मारली. समीरने त्या दोघांचे हात पकडून समोरच्या खोलीत आणलं नि या पुढे आपण टीव्ही बघण्याचा हट्ट करणार नाही असं सर्वांदेखत सांगितलं. सगळयांच्या चेह-यावर हसू आलं. वातावरण पुन्हा हसरं खेळतं झालं.
सुरेश वांदिले