(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

तेजोमयीच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये कौन बनेगा करोडपतीला पहिला क्रमांक असतो. प्रश्नांची उत्तरं देताना स्पर्धकांना करावी लागणारी कसरत, अचूक उत्तराच्या आसपास पोहचल्यावरही, केवळ शंका असल्याने निसटून गेलेली संधी, सोप्या सोप्या प्रश्नातही उडालेली भंबेरी, स्पर्धकांसोबत आलेल्या साथिदारांमध्ये असलेली अस्वस्थता आणि उत्सुकता, अमिताभ अंकल यांचं खिळवून ठेवणारं सूत्र संचलन यामुळे हा कार्यक्रम तेजोमयीच्या गळयातल्या ताईतच बनलाय.

तेजोमयीसोबत बाबाही हा कार्यक्रम आवडीने बघायला लागले. आईला यात काही फार रस नव्हता. त्यामुळे या वेळेत तिचं दुसरच काही तरी चालायचं. एकाला खूपच रस, दुसऱ्याला अजिबातच रस नाही आणि तिसऱ्याचं अध्यातमध्यात हे, अलेक्झांडरच्या ध्यानात आलं होतं. त्यामुळे आपण नेमकं काय करावं हे काही त्याला कळत नसे. कधी टीव्हीकडे बघत, कधी आईच्या भोवती फेऱ्या मारत स्वारी आपला वेळ काढत असे. एखाद्या स्पर्धकाने खूप मोठी रक्कम जिंकली की टाळयांचा प्रचंड कडकडाट होई, त्यावेळी मात्र घरात कुठेही असला तरी तो धावत टीव्हीजवळ येई. उत्सुकेतने टाळयांकडे बघत राही. टाळया वाजणं बंद झालं हा पुन्हा आई जिथे असेल तिथे हळूच निघून जाई.

असच एकदा एका स्पर्धकाने अधिक रक्कम जिंकण्याची संधी असताना, त्याने ती संधी गमावली. याचं तेजोयमीस वाईट वाटलं.

तुम्हास वाईट वाटलं नाही का हो,तिने बाबांना विचारलं.

वाटलं ना..पण हा खेळ आहे बाळ..त्यात काहीही घडू शकतं. मात्र त्या स्पर्धकाच्या हरण्यातून तू कोणता धडा शिकलीस ते सांग बघू..

बाबा म्हणताहेत याचा अर्थ, त्या स्पर्धकाच्या हरन्यात नक्कीच शिकण्यासारखी गोष्ट असली पाहिजे याची खात्री तेजोमयीला पटली. ती विचार करु लागली. तेव्हा तिच्या लक्षात आलं की, त्या स्पर्धकास उत्तरासाठी एक पर्याय होता. पण त्याने तो घेतला नाही. याचा अर्थ त्याला स्वत:च्या बुध्दीमत्तेवर अतिआत्मविश्वास होता. तो त्याला घातक ठरला.

तेजोमयीनं आपलं विश्लेषण बाबांना सांगितलं.

अगदी बरोबर बाळ, अनेकदा संधी पुन्हा पुन्हा येत नसते, ही बाब कायम लक्षात ठेवली पाहिजे. आपल्यासमोर असलेल्या संधीचा पुरेपूर लाभ मिळवण्यासाठी अधिक काळजी घेणं चांगलं. सर्वबाजूंनी विचार करणं चांगलं आणि इतर पर्याय समोर असताना त्याकडे दुर्लक्ष न करणं हे महत्वाचं. कधी कधी घाई केली की संधी हातातून निसटून जाऊ शकते. बाबांनी त्यांचं विश्लेषण सांगितलं..

केबीसीमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धंकाच्या जिंकण्या-हरण्यातून सुध्दा बरचं काही शिकता येतं,हे तेजोमयीच्या लक्षात आलं..

०००