(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

कोल्होबाची जिरली

काळू गाढव आणि बाळू गाढव, हे दोघेही एकमेकांचे पक्के मित्र होते. दोघेही एकत्रच राहत. एकत्रच सगळीकडे जात. त्या दोघांची मैत्री वननगरीत चर्चेचा विषय झाली होती. मैत्री असावी तर अशी, असं जो तो प्राणी, आपल्या समुदायातील प्राण्यांना सांगू लागला.

काळू आणि बाळू सदैव एकत्रच राहत असल्याने जंगली कुत्रे, कोल्हा, रानडुक्कर, लांडगे असे प्राणी त्यांना वचकून असत. गाढवाचा लथ्थाप्रसाद जीवावर बेतू शकतो, असं प्रत्येकाला ठाऊक होतं. या दोघांची मैत्री जोपर्यंत तुटत नाही, तोपर्यंत त्यांची मेजवाणी काही आपल्याला मिळू शकत नाही, याची खूणगाठ या प्राण्यांनी बांधली होती. ही मैत्री काहीही करुन तुटायलाच हवी असं कोल्होबांना वाटू लागलं. हे दोघे एकमेकांपासून वेगळे झाले की मग त्यांच्यावर हल्ला करुन त्यांची मेजवाणी गट्टम करणं फारच सोप्पं असल्याचं त्याला वाटत होतं. त्यामुळे या दोघांना एकमेकापासून कसं दूर करायचं याचा तो रात्रंदिस विचार करायचा.

एके दिवशी काळू आणि बाळू नदीकिनारी गप्पा मारत बसले होते. तेव्हा गप्पा मारत मारता काळूला डुलकी आली. त्यांच्या मागावर असणाऱ्या कोल्ह्याने ही संधी साधून बाळूस म्हंटलं,

अरे, तुझा रंग किती पांढरा शुभ्र. दिसतोस कसा राजबिंडा, चालतोस कसा योध्द्यासारखा. तूच खरा या जंगलाचा राजा. पण तुझ्या या काळुंद्र्या दोस्तामुळे तुला कुणी राजा माणायला तयार नाही. तू त्याच्याशी मैत्री तोडली तर सगळे प्राणी तुला या जंगलाचा राजा करतील.

कोल्होबाने केलेली प्रसंशा ऐकून बाळू आनंदला. आपण खरोखरच राजा होण्याच्या पात्रतेचे आहोत असं त्याला वाटू लागलं. आत्ताच्या आत्ता काळूसोबत मैत्री तोडून टाकायला हवी असं त्याला वाटू लागलं.

पण, लगेच त्याला एकदा आजोबांनी सांगितलेली एक गोष्ट आठवली. ते त्याला नेहमी सांगत, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याच्यावर चारदा विचार करावा. घाई करु नये. सांगणारा कोण आहे? हे काळजीपूर्वक बघावे. तो कशासाठी सांगतो? हे लक्षात घ्यावे. कुणावरही लगेच विश्वास ठेऊ नये?

हे सगळं आठवताच, बाळूने आपलं मन बदलवलं.

तो कोल्होबास म्हणाला, कोल्होबा तुम्ही माझी जी काही प्रशंसा केली ती ऐकून मी अगदी भरुन पावलो. मी आत्ताच्या आत्ता या काळुंद्र्याची मैत्री तोडायची असं ठरवलं सुध्दा.

वा वा वा! बाळूस पूर्ण बोलू देण्याच्या आधीच कोल्होबा आतुरतनेने म्हणाला. आता शिकार आपल्या हाती आल्याचं वाटून,त्याला मोठ्ठा आनंद झाला.

पण कोल्होबा…

काय झालं.?

कोल्होबा, आताच एक मुंगी मला आडवी गेली.

मग..

अहो, मुंगीचं आडवं जाणं अशूभ असतं ना!

अरे वेड्या, मांजरीचं आडवं जाणं अशूभ असतं, मुंगीचं नाही. कोल्होबा हसत म्हणाला.

आमच्यामध्ये मुंगीचं आडवं जाणं अशूभ समजतात.

बरं मग…

मग मी उद्याच तुमच्याकडे येतो, या काळुंद्र्याला सोडून. बाळू म्हणाला.

एका दिवसानं काय असा फरक पडणार? म्हणून, कोल्होबा बरं म्हणाला आणि आनंदाने शिळ वाजवत निघून गेला.

काही वेळाने काळू जागा झाला. बाळूने त्याला कोल्हाबा पुराण सांगितलं.

काळूने त्याला सावध केलं.

अरे, हा कोल्हा तुला एकटं पाडून तुझ्यावर हल्ला चढवेल नि ठार करेल. आपण दोघेजण त्याला भारी आहोत हे कळलय, म्हणून तो आपल्यामध्ये फूट पाडायचा प्रयत्न करतोय.

बाळूस काळूचं म्हणणं पटलं.

मग आता या कोल्होबास चांगला धडा शिकवायला हवा.

हो हो. तो उद्या येईल तेव्हा मी बाजूला लपून बसेन. त्याला वाटेल तू एकटाच आहे. तो काय करतो हे सावध राहून बघ. त्याने काही दगाफटका करण्याचा विचार केला की मी लगेच उडी घेऊन लथ्थाप्रहार सुरु करेन. काळू म्हणाला.

ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी काळू बाजूच्या झाडीत लपून बसला. बाळू एकटाच झाडाखाली होता. त्याला तसे बघून कोल्होबास फार आनंद झाला. ज्या मेजवाणीची इतक्या दिवसांपासून वाटत बघत होतो, तो क्षण जवळ आल्याचे बघून त्याच्या मनात मोर नाचू लागला.

तो बाळूजवळ आला आणि त्याला कुर्निसात करुन म्हणाला, जंगलाच्या नव्या राजाचा जयजयकार असो.

म्हणजे मी राजा झालो सुध्दा, बाळूने विचारलं.

मग, तुला मी कालच नव्हतं का सांगितलं, काळुंद्र्यासोबत मैत्री तोडली की तुझा राज्याभिषेक लगेच होणार.

कुठे बरं होणार?

जंगलाच्या आत असलेल्या वनदेवतेच्या मंदिरात. मग चल आता माझ्या बरोबर,

इथे नाही का होणार? राज्याभिषेक.बाळूने विचारले

नाही इथे नाही. वनदेवतेसमोरच तो व्हायला हवा. कोल्ह्यानं समजावून सांगितलं.

चल तर मग, बाळू म्हणाला. त्याने काळूलाही इषारा केला. त्या दोघांच्या पाठिमागून, कोल्ह्याला दिसणार नाही व संशयही येणार नाही, अशी सावधगिरी बाळगत काळू चालू लागला.

जंगलाच्या थोडे आत गेल्यावर आजूबाजूला कुणी नाही याचा अदमास घेऊन कोल्होबाने बाळूवर हल्ला करण्याचा पवित्रा घेतला. त्याच्यावर लक्ष ठेऊन असणाऱ्या काळूने हे बघताच त्याच्यावर उडी घेतली आणि त्याला लथ्थाप्रहार देऊ लागला. बाळूलाही कोल्ह्याचा दुष्ट कावा समजल्याने त्यानेही त्याला लथ्था प्रहार द्यायला सुरुवात केली. यामुळे कोल्ह्याला बेदम मार मिळाला. त्याचे तंगडे तुटले. एक डोळा निकामी झाला. तो कसा बसा तिथून पळून जाऊ शकला.

बाळूने काळूचे आभार मानले. खोटे स्वप्न दाखवणाऱ्याच्या झकोल्यात आलो की नुकसानच होतं, हा धडा मिळाल्याचं तो काळूस म्हणाला. काळूबाळूंची मैत्री पुढे कधी तुटली नाही. त्यामुळे त्यांच्या वाटेलाही कुणी गेलं नाही.

सुरेश वांदिले