(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

उंदीर जरी मामा असले आणि श्रीगणेशाच्या जवळ असताना ते मूषकस्वामी असले, तरी घरी अधूनमधून येऊन दंगामस्ती करुन जाण्याची त्यांची खोड काही आईस आवडायची नाही.

उंदीरराव घरात दिसले रे दिसले की आई ते मामा आहेत की मूषकस्वामी याची कोणतीही तमा न बाळगता त्याच्या पाठीमागे लागायची. मामा पसार होण्यात यशस्वी झाले तर ठीक, अन्यथा काही मामांचे रक्तही सांडून जायचे. शत्रूपक्षातील एखाद्या सैनिकाचा पाडाव करण्याचा पराक्रम गाजवल्याचे भाव आईच्या चेह-यावर त्यावेळी उमटायचे.

धाराशायी पडलेल्या उंदीरमामांची विल्हेवाट लावली की आई स्नान केल्यावर लगेच देवघरात जाऊन, वक्रतूंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, म्हणून श्री गणेशाला वंदन करायची. तेजोमयीस याची फार गंमत वाटत असे.

श्री गणेशाला वंदन करताना आई त्याची क्षमा मागत असेल का? असा प्रश्न तिला पडायचा.

एकदा तिने हा प्रश्न आईला केलाच. आईसाठी हा प्रश्न अनपेक्षित होता. श्री गणेशाची कशासाठी बुवा क्षमा मागायची असे भाव तिच्या चेहऱ्यावर उमटले.

तुझ्या मनात काहीबाही प्रश्न येतात बाँ, ती तेजोमयीचा गालगुच्चा घेत म्हणाली.

अगं, पण श्री गणेश रागावले तर…

ते कशासाठी रागावणार?

तुला पक्की खात्री आहे का?

हो, माझी पक्की खात्री आहे. उंदीरमामांनी त्याचं काम केलं. मी माझं काम केलं. ते श्री गणेशाला बरोबर कळतं. कुणाच्या कामात ढवळाढवळ करायची नाही, असं त्यांचं तत्व आहे. आई म्हणाली.

तुला हे श्रीगणेशांनी सांगितलं का? तेजोमयीनं विचारलं.

अगं, तुला किती प्रश्न पडतात. श्री गणेश मला कशाला सांगतील. माझा मीच सिध्दांत शोधून काढलाय.

याला काय आधार आहे गं?

कार्टे, पुरे कर तुझा चावटपणा, श्री गणेशांना मध्ये-मध्ये करायचं आवडलं असतं तर त्यांनी माझे कान पकडले असते. उंदराचेही कान पकडले असते. केलं का त्यांनी तसं? नाही ना.

ते खरंच होतं म्हणा. त्यामुळे आता तेजोमयीस प्रश्न पडलाय की आईचं खरं की उंदीरमामांचं खरं की श्री गणेशाचं खरं!

हा प्रश्न तिने श्री गणेशांना जेव्हा जेव्हा विचारला तेव्हा तेव्हा त्यांनी डोळे मिटून घेतल्याचा भास तेजोमयीस झाला. त्यामुळे तेजोमयीचा हा प्रश्न सध्यातरी अनुत्तीर्णच राहिला आहे.

सुरेश वांदिले