गाढवांचा चमत्कार
एका वननगरीतल्या वाघोबांच्या चिरंजिवांनी गाढवोबाशी मैत्री केली. ते काही इतर वननगरीतील वाघोबांना आवडलं नाही. गाढवासारखा मूर्ख प्राण्याला वाघोबाचा मुलगा मित्र करतो, हा आपला अपमान असल्याचे वननगरीतील बहुतेक सर्व प्राण्यांना वाटलं.त्यामुळे त्यांनी निषेधाचे खलिते वाघोंबाकडे पाठवले.ते खलिते वाघोबांनी वाचले आणि फेकून दिले.
ते बघून चिरजीवांनी विचारलं,
आबासाहेब,तुम्हाला या निषेधाची भीती वाटत नाही का? म्हणजे आम्ही गाढवोबाशी मैत्री केली,हे तुम्हास आवडलं असं समजायचं का?
वाघोबा यावर हसले.ते चिरंजिवांना जवळ घेत म्हणाले,
अरे बाळा तू आमच्यासारखाच वागला पाहिजे,असा कुठे नियम आहे.तुला गाढवोबाशी मैत्री कराविशी वाटली,त्यात मला काहीच गैर वाटलं नाही.तू नक्कीच काहीतरी विचार करुन त्याच्याशी मैत्री केली असशील.याची मला खात्री आहे.तू जो काही निर्णय घेतला,त्यात मी कां म्हणून ढवळाढवळ करायची.मात्र एक लक्षात ठेव,तू ही मैत्री कायम टिकव.गाढवोबास कधी अंतर देउु नकोस,त्याला फसवू नकोस.चिरंजीवांनी हो म्हंटलं..
००००
वाघोबांनी आपल्या निषेधाच्या खलित्यांकडे दुर्लक्ष केलं तर केलच पण आपल्या मुलाला रागावण्याऐवजी,त्याला आणखी प्रोत्साहन दिलं,ही बाब इतर वननगरीतल्या वाघोबांना कळली.त्यामुळे त्या सर्वांच्या तळपायाची आग मस्तकात गेली.हा वाघोबा,जाणूनबुजून आपला अपमान करत असल्याचे या इतर वनगरितील वाघोबांचा समज झाला.त्या सर्वांनी मिळून या वाघोबांना चांगला धडा देण्याचे ठरवले.सर्वांनी ठरवलं की या वाघोबांवर हल्ला करुन त्याला ठार करायचे आणि आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा.
०००
चिरंजीवांच्या मित्र बनलेल्या गाढवोबाच्या कानी ही गोष्ट पडली.तो बिचारा घाबरुन गेला.आपल्यामुळे थोरले वाघोबा आणि त्यांचे चिरंजीव संकटात सापडल्याचे बघून तो दु:खी झाला.या दु:खातच त्याने चिरंजीवांना,आपणासोबतची मैत्री तोडून टाकण्याची विनंती केली.पण चिरंजीवांनी ही विनंती अमान्य केली.
तुझ्या मैत्रीसाठी आपण या सर्वांशी लढा देऊ असं त्याने सांगितलं.
या वाघोबांपर्यंत इतर वननगरीतील वाघोबांच्या हल्ल्याची गोष्ट पोहचलीच होती.तसा हा चिंतेचा विषय होता.कारण इतक्या सगळया वाघोंबासोबत एकट्याने लढा देणे सोपे नव्हते.
त्यामुळे ते चिंताग्रस्त झाले. त्यांचे अन्नपाण्यावरुन लक्ष उडाले.त्यांची ही अवस्था गाढवोबास बघवली गेली नाही.तो वाघोबांना म्हणाला,महाराज तुम्ही काही काळजी करु नका.माझ्यासारख्या अत्यंत शुल्लक प्राण्यास तुम्ही आणि राजपुत्राने सन्मान दिला.ही खूप मोठी गोष्ट आहे.हे युध्द झालेच तर आम्ही सर्व गाढवं तुमच्यासोबत आहोत महाराज.गाढवांचा मूर्खपणा फक्त सर्वांना ठाऊकाय.आमच्या पायातली शक्तीची कल्पना नाही कुणाला.गाढवोबा चिंताग्रस्त वाघोबांना म्हणाले.
पायातली शक्ती म्हणजे रे काय, वाघोबांनी त्याला विचारलं.तेव्हा गाढवोबांनी समजावून सांगितलं गाढवाच्या लाथेचा प्रसाद भल्या भल्याच्या डोळ्यांपुढे अंधारी आणतो,इतकी त्यात शक्ती असते.गाढव म्हणाले.मात्र वाघोबाचं समाधान झालं नाही.ते गाढवोबास म्हणाले,
अरे बाळा,माझ्यावरील आक्रमणाच्या वेळेस तुला पुढे करुन तुझा जीव काही मला धोक्यात टाकायचा नाहीय.
महाराज क्षमा असावी.माझा जीव धोक्यात येण्याची जशी शक्यता आहे,तशीच्या शक्यता आमच्यामुळे आपल्या शत्रूला पळता भुई थोडे होण्याची सुध्दा आहे.
म्हणजे कशी?
महाराज,राजपुत्राने मला मित्र केल्याने व तुमची त्याला संमत्ती असल्याने आपल्या वननगरीतील सर्व गाढवे तुमचा खूप आदर करतात.त्यामुळे तुमच्यावर संकट येणार असं समजल्यावर प्रत्येक गाढवाने तुमच्या बाजूने उभा राहण्याचे ठरवलं आहे.
म्हणजे रे काय मित्रा.राजपुत्राने विचारलं.
महाराज,आपल्यावर हल्ला करणारे इतर वननगरीतील वाघोबा असून असून किती असतील २० ते २५ किंवा शंभर.पण आम्ही गाढवं हजार आहोत.आम्ही वननगरीच्या सीमेवर दबा धरुन बसू.इतर वननगरीतील वाघोबा आपल्यावर आक्रमण करतील तेव्हा आम्ही त्यांच्यावर उड्या घेऊन त्यांना लाथेचा प्रसाद देऊन वेगाने पळून जाउु.त्यात काही गाढवांचा प्राण जाईल.पण महाराज आमच्या लथ्थाप्रसादाने इतर वननगरीतले वाघोबा त्रस्त होऊन जातील.असे काही घडेल याची त्यांनी कल्पनाही केली नसेल.
वा वा वा वा…वाघोबा म्हणाले. त्यांची चिंता बऱ्याच प्रमाणात कमी झाली.
महाराज,आणखी एक गुपित आहे,त्याची इतर वननगरीतील वाघोबा कल्पनाही करु शकणार नाहीत.
म्हणजे काय?वाघोबा आणि राजपुत्राने एकाच वेळेस विचारलं.
महाराज,तुम्ही आणि राजपुत्र एका गाढवास सन्मानाने वागवता,त्याचा आदर करता हे इतर वननगरीतील गाढवांना कळलं आहे.त्यांना तिकडे कुणीही मान सन्मान देत नाही.तुसडेपणाने वागतात.त्यामुळे इतर वननगरीतील गाढवांना तुमच्या बद्दल खूप आदर निर्माण झाला आहे.इतर वननगरीतील वाघोबा जेव्हा आपल्यावर हल्ला करतील तेव्हा आपल्या सीमेवर आम्ही त्यांना लाथ हाणून हाणून त्रस्त करुन सोडू.हे वाघोबा जेव्हा पळू लागतील तेव्हा दुसऱ्या बाजून हे सर्व गाढव त्यांच्यावर लथ्थाप्रहार करण्यासाठी सज्ज असतील.म्हणजे इतर वननगरीतील या वाघोबांना चौफेर लथ्था प्रहार मिळेल.काहींना ही भुताटकी वाटले.सगळयांना पळता भूई थोडी होईल.गाढवोबा एका दमात सांगता झाला.
खरच, याची कल्पना इतर वननगरीतले वाघोबाच काय मी सुध्दा करुन शकत नाही.वाघोबा म्हणाले.त्यांनी गाढवोबास शाबासकी दिली.
०००
पुढे काही दिवसांनी इतर वननगरीतील वाघोबांनी हल्ला केला तेव्हा गाढवोबांनी जसं वाघोबांना सांगितलं होतं तसचं झालं.
या अनपेक्षित हल्ल्याने इतर वननगरीतले वाघोबा एकदम गडबडूनच गेले.हल्ला तरी किती जणांवर करणार आणि किती जणांना ठार करणार?गाढवांच्या लाथांपुढे त्यांची शक्ती कमी पडू लागली.काही वाघांनी माघार घेतली तर दुसऱ्या बाजूने गाढवांची मोठी फळी तयारच होती.इकडे तिकडे गाढवच गाढवं.त्या गाढवांचा सामना करणं अशक्य असल्याचं बहुतेक वाघांच्या लक्षात आलं.प्रत्येकानं गाढवांचा लथ्थाप्रहार टाळण्यासाठी तिथून पळ काढला.
गाढवाशी मैत्री या वाघोबांना अशी फायदेशीर ठरली.
०००
महाराजांनी इतर वननगरीतील वाघोबांना खलिता धाडला.
जुनाट आणि बुरसटलेल्या विचारातून बाहेर पडला नाहीत आणि आपल्या शक्तीच्या गुर्मित राहिलात तर यापुढे असाच पळ काढावा लागेल.असं त्यांनी लिहिलं.जे काळाप्रमाणे बदलतात तेच पुढे टिकतात.महाराजांनी या वाघोबांना कळवलं…
या वाघोबांचं सांगणं किती वाघोबांनी ऐकलं माहीत नाही पण, नंतर कुणीही महाराजांच्या वननगरीवर हल्ला करण्याची हिम्मत दाखवली नाही. त्यांचं राज्य दिवसेंदिवस वाढतच राहिलं…
सुरेश वांदिले