
गाढवांचा चमत्कार
चंदनपूर वननगरीतल्या वाघोबांच्या चिरंजिवांनी गाढवोबाशी मैत्री केली. ते इतर वननगरीतील वाघोबांना आवडलं नाही. गाढवासारख्या मूर्ख प्राण्याला चंदनपूरच्या वाघोबाचा मुलगा मित्र करतो, हा आपला अपमान असल्याचं वननगरीतील बहुतेक सर्व प्राण्यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी निषेधाचे खलिते चंदनपूरच्या वाघोबांकडे पाठवले.ते खलिते वाघोबांनी वाचून फेकून दिले.
ते बघून, चिरंजिवांनी विचारलं,
“आबासाहेब, तुम्हाला या निषेधाची भीती वाटत नाही का? आम्ही गाढवोबाशी मैत्री केली,हे तुम्हास आवडलं, असं समजायचं का?”
यावर वाघोबा हसले. ते चिरंजिवांना जवळ घेत म्हणाले,
“बाळा, तू आमच्यासारखाच वागला पाहिजे,असा कुठे नियम आहे. तुला गाढवोबाशी मैत्री कराविशी वाटली, त्यात मला काहीच गैर वाटलं नाही.तू नक्कीच काहीतरी विचार करुन त्याच्याशी मैत्री केली असशील.याची मला खात्री आहे. तू जो काही निर्णय घेतला,त्यात मी कां म्हणून ढवळाढवळ करायची? मात्र एक लक्षात ठेव,तू ही मैत्री कायम टिकव.गाढवोबास कधी अंतर देऊ नकोस,त्याला फसवू नकोस.” चिरंजिवांनी हो म्हंटलं.
००००
चंदनपूरच्या वाघोबांनी आपल्या निषेधाच्या खलित्यांकडे दुर्लक्ष केलं तर केलच पण आपल्या मुलाला रागावण्याऐवजी, त्याला आणखी प्रोत्साहन दिलं,ही बाब इतर वननगरीतल्या वाघोबांना कळली.त्यामुळे त्या सर्वांच्या तळपायाची आग मस्तकात गेली.हा वाघोबा,जाणूनबुजून आपला अपमान करत असल्याचं, इतर वनगरितील वाघोबांचा समज झाला. यासर्वांनी मिळून, चंदनपूरच्या वाघोबांना चांगला धडा देण्याचं ठरवलं. चंदनपूरच्या वाघोबांवर हल्ला करुन त्याला ठार करायचं आणि आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा.
०००
चंदनपूर वाघोबांच्या, चिरंजिवांच्या मित्र बनलेल्या गाढवोबाच्या कानी ही गोष्ट पडली.तो बिचारा घाबरुन गेला.आपल्यामुळे थोरले वाघोबा आणि त्यांचे चिरंजीव संकटात सापडल्याचं बघून,दु:खी झाला.या दु:खातच त्याने चिरंजिवांना,आपणासोबतची मैत्री तोडून टाकण्याची विनंती केली. पण ही विनंती चिरंजिवांनी अमान्य केली.
“तुझ्या मैत्रीसाठी आपण, या सर्वांशी लढा देऊ,” असं त्याने सांगितलं.
चंदनपूरच्या वाघोबांपर्यंत इतर वननगरीतील वाघोबांच्या हल्ल्याची गोष्ट पोहचलीच होती.तसा हा चिंतेचा विषय होता. कारण इतक्या सगळया वाघोंबासोबत एकट्यानं लढा देणं सोपं नव्हतं.
त्यामुळे ते चिंताग्रस्त झाले. त्यांचे अन्नपाण्यावरुन लक्ष उडाले.त्यांची ही अवस्था गाढवोबास बघवली गेली नाही.तो थोरल्या वाघोबांना म्हणाला,
“महाराज तुम्ही काही काळजी करु नका.माझ्यासारख्या अत्यंत शुल्लक प्राण्यास तुम्ही आणि राजपुत्राने सन्मान दिला.ही खूप मोठी गोष्ट आहे.हे युध्द झालेच तर आम्ही सर्व गाढवं तुमच्यासोबत आहोत.गाढवांचा मूर्खपणाच फक्त सर्वांना ठाऊकाय.आमच्या पायातली शक्तीची कल्पना नाही कुणाला?”गाढवोबा, चिंताग्रस्त वाघोबांना म्हणाले.
“पायातली शक्ती म्हणजे रे काय?”, वाघोबांनी त्याला विचारलं.
“गाढवाच्या लाथेचा प्रसाद भल्याभल्यांच्या डोळ्यांपुढे अंधारी आणतो, इतकी त्यात शक्ती असते.”गाढव म्हणाले. मात्र, वाघोबाचं समाधान झालं नाही.ते गाढवोबास म्हणाले,
“अरे बाळा, माझ्यावरील आक्रमणाच्या वेळेस, तुला पुढे करुन, तुझा जीव काही मला धोक्यात टाकायचा नाहीय.”
“महाराज क्षमा असावी.माझा जीव धोक्यात येण्याची जशी शक्यता आहे,तशीच शक्यता आमच्यामुळे आपल्या शत्रूला पळता भुई थोडे होण्याचीसुध्दा आहे.”
“म्हणजे कशी?”
“महाराज,राजपुत्राने मला मित्र केल्याने व तुमची त्याला संमत्ती असल्याने आपल्या वननगरीतील सर्व गाढवे तुमचा खूप आदर करतात.त्यामुळे तुमच्यावर संकट येणार असं समजल्यावर प्रत्येक गाढवाने तुमच्या बाजूने उभं राहण्याचं ठरवलंय.”
“म्हणजे रे काय मित्रा?”राजपुत्राने विचारलं.
“महाराज,आपल्यावर हल्ला करणारे इतर वननगरीतील वाघोबा, असून असून किती असतील २० ते २५ किंवा शंभर. पण आम्ही गाढवं हजार आहोत.आम्ही वननगरीच्या सीमेवर दबा धरुन बसू.इतर वननगरीतील वाघोबा आपल्यावर आक्रमण करतील, तेव्हा आम्ही त्यांच्यावर उड्या घेऊन त्यांना लाथेचा प्रसाद देऊन वेगाने पळून जाऊ.त्यात काही गाढवांचा प्राण जाईल.पण महाराज, आमच्या लथ्थाप्रसादाने इतर वननगरीतले वाघोबा त्रस्त होऊन जातील.असे काही घडेल याची त्यांनी कल्पनाही केली नसेल.”
“वा वा वा वा! वाघोबा म्हणाले. त्यांची चिंता बऱ्याच प्रमाणात कमी झाली.
“महाराज,आणखी एक गुपित आहे.त्याची इतर वननगरीतील वाघोबा कल्पनाही करु शकणार नाहीत.
“म्हणजे काय?”वाघोबा आणि राजपुत्राने एकाच वेळेस विचारलं.
“महाराज,तुम्ही आणि राजपुत्र एका गाढवास सन्मानाने वागवता,त्याचा आदर करता हे इतर वननगरीतील गाढवांना कळलंय.त्यांना तिकडे कुणीही मान सन्मान देत नाही.तुसडेपणाने वागतात.त्यामुळे इतर वननगरीतील गाढवांना, तुमच्याबद्दल खूप आदर निर्माण झाला आहे. इतर वननगरीतील वाघोबा जेव्हा आपल्यावर हल्ला करतील तेव्हा, आपल्या सीमेवर, आम्ही त्यांना लाथा हाणून हाणून त्रस्त करुन सोडू.हे वाघोबा जेव्हा पळू लागतील, तेव्हा दुसऱ्या बाजून हे सर्व गाढव त्यांच्यावर लथ्थाप्रहार करण्यासाठी सज्ज असतील.इतर वननगरीतील या वाघोबांना चौफेर लथ्था प्रहार मिळेल.काहिंना ही भुताटकी वाटले.सगळयांना पळता भूई थोडी होईल.”गाढवोबा एका दमात सांगता झाला.
“खरंच, याची कल्पना इतर वननगरीतले वाघोबाच काय, मी सुध्दा करुन शकत नाही.”वाघोबा म्हणाले.त्यांनी गाढवोबास शाबासकी दिली.
०००
पुढे काही दिवसांनी इतर वननगरीतील वाघोबांनी चंदनपूरवर हल्ला केला तेव्हा गाढवोबांनी जसं वाघोबांना सांगितलं होतं तसचं झालं.
या अनपेक्षित हल्ल्याने इतर वननगरीतले वाघोबा एकदम गडबडूनच गेले.हल्ला तरी किती जणांवर करणार आणि किती जणांना ठार करणार?गाढवांच्या लाथांपुढे त्यांची शक्ती कमी पडू लागली.काही वाघांनी माघार घेतली तर दुसऱ्या बाजूने गाढवांची मोठी फळी तयारच होती.इकडे तिकडे गाढवच गाढवं.त्या गाढवांचा सामना करणं अशक्य असल्याचं बहुतेक वाघांच्या लक्षात आलं.प्रत्येकानं गाढवांचा लथ्थाप्रहार टाळण्यासाठी तिथून पळ काढला.
गाढवाशी मैत्री या वाघोबांना अशी फायदेशीर ठरली.
०००
चंदनपूरच्या वाघोबांनी इतर वननगरीतील वाघोबांना खलिता धाडला,
“जुनाट आणि बुरसटलेल्या विचारातून बाहेर पडला नाहीत आणि आपल्या शक्तीच्या गुर्मित राहिलात,तर यापुढे असाच पळ काढावा लागेल.जे काळाप्रमाणे
महाराजांच्या वननगरीवर हल्ला करण्याची हिम्मत दाखवली नाही. हे राज्य दिवसेंदिवस वाढतच राहिलं.
सुरेश वांदिले