गाढव महाराज भयंकर संतापले होते. त्यांचा थयथयाट सुरु होता. जो भेटेल त्याला लाथा हाणून हाणून ते हैराण करु लागले. त्याचवेळी तिथून नारदमुनी चालले होते. त्यांना बघताच गाढव महाराज जरासे शांत झाले.
महाराणींनी, नारदेश्वरांना वंदन करुन त्यांना बसण्याची विनंती केली.
महाराजांना काय झालं राणी सरकार? नारदेश्वरांनी विचारलं.
त्यांना काय विचारता मुनिवर, आम्हीच सांगतो ना, गाढव महाराज गुस्स्यातच म्हणाले.
असं होय, मग सांगा की, काय झालं ते? नारदेश्वर, गाढव महाराजांना म्हणाले.
गाढव महाराजांनी एका श्लोकाचं पान त्यांच्याकडे भिरकावलं.
हे काय महाराज?
माझा अपमान! गाढव महाराज लाथा झाडत म्हणाले. त्यांचा थयथयाट पुन्हा सुरु झाला. ते बघून नारदेश्वर श्लोक वाचू लागले.
” बोधितोSपि बहुसूक्तिविस्तरै:/ किं खलो जगती सज्जनो भवेत?/ स्नापितोSपि बहुशोनदीजलै:/ गदर्भ: किमु हय:भवेतू क्वचित//“ महाराज यात कोणती चूक तुम्हाला दिसली बरं? नारदेश्वरांनी गाढव महाराजांना विचारलं.
नारदेश्वरा, माझा अपमान होऊनही तुम्हास काही चूक वाटत नाही. जोराने ओरडत गाढव महाराज म्हणाले.
अहो महाराज, या श्लोकात म्हंटलय की, एखाद्या दुष्टाला शहाणपणाच्या कितीही गोष्टी सांगितल्या तरी त्याला ते पटणार नाही आणि तो सज्जन होणार नाही. नद्यांच्या पाण्याने गाढवाची कितीही वेळा आंघोळ करुन त्याला स्वच्छ केले तरी तो घोडा होणार नाही. अगदी तस्सं!
हे… हे… हेच कुणी सांगितलं, त्या श्लोककर्त्याला? गाढव महाराज लाथा झाडत म्हणाले.
म्हणजे, नद्यांच्या पाण्याने खूप वेळा स्वच्छ केले तर तुम्ही घोडा व्हाल असं तुम्हाला वाटतं का? नारदेश्वरांनी हसू दाबत गाढव महाराजांना विचारलं.
अलबत! नाक फुरफुरवत गाढव महाराज म्हणाले.
मग चला बरं माझ्यासोबत नदीकडे…नारदेश्वर गाढव महाराजांना म्हणाले.
गाढव महाराज निघाले की नारदेश्वरांसोबत. वाटेत एक नदी लागली. तिथे गाढव महाराजांनी स्नान केले. पण ते काही घोडा झाले नाहीत. मग नारदेश्वरांनी अनेक नद्यांवर त्यांना नेले. पण इतक्यांदा स्नान करुनही गाढव महाराज काही घोडा झाले नाहीत. मात्र पुन्हा पुन्हा घासून घासून स्नान केल्याने त्यांच्या पाठीची साल सोलून निघाली. चालताना उन्हाचे चटके बसू लागले. सोलून निघालेल्या पाठीवर माशा आणि इतर किटक बसू लागले. त्यामुळे गाढव महाराजांना वेदना होऊ लागल्या. त्या वेदना सहन न होऊन ते आणखी जोरजोराने लाथा हाणू लागले. अखेर नारदेश्वरांनी, गाढव महाराजांना सर्वात पवित्र अशा गंगा नदीकडे नेले.
या पवित्र नदित बुडी मारुन स्नान करा म्हणजे कदाचित तुम्ही घोडा व्हाल, नारदेश्वर, गाढव महाराजाला म्हणाले.
पण आता, गाढव महाराजांची पाण्यात उतरण्याची हिम्मतच होईना. ही सगळयात पवित्र नदी असल्याचं नारदेश्वर त्यांना पुन्हा पुन्हा सांगूनही गाढव महाराज काही गंगा नदीत आंघोळीसाठी उतरले नाहीत. सोललेल्या पाठीच्या वेदना सहन न होऊन ते जोरजारोत ओरडू लागले. नदीच्या पात्रात गडबडा लोळू लागले. पाठीवरच्या जखमांना नदीच्या कोरड्या पात्रातील दगडगोटे लागल्याने त्यांना असह्य वेदना होऊ लागल्या. अखेर त्यांनी नारदेश्वरांचे पाय धरले. आपलं चुकलं. यातून वाचवा अशी त्यांना विनवणी करु लागले.
नारदेश्वरांना गाढव महाराजांची दया आली. त्यांनी महाराजांच्या पाठीवरुन हात फिरवताच त्यांची सोललेली पाठ पूर्ववत झाली.
गाढव महाराज, आपल्या क्षमतेबद्दल असा उगाच गैरसमज करुन घेणे बरे नव्हे. पटलं ना तुम्हाला.
हो हो नारदेश्वरा… पुन्हा पुन्हा कितीहीवेळ आंघोळ करुन मी जसा घोडा होऊ शकत नाही, तसंच दुर्जनांना पुन्हा पुन्हा उपदेश करुन त्यांच्यात सुधारणा होऊन ते एकाएकी सज्जन होऊ शकत नाही, असंच श्लोककर्त्यास माझं उदाहरण देऊन सांगायचना?
हो हो अगदी बरोबर…नारदेश्वर म्हणाले. पुन्हा असा थयथयाट करायचा नाही, असं वचन घेऊन नारदेश्वरांनी गाढव महाराजांना त्यांच्या राज्यात आणून सोडले.
सुरेश वांदिले