गुणी बाळ
अलेक्झांडरचं
घरातल्या प्रत्येक घडामोडीकडे बारीक लक्ष असतं. त्याचं निरीक्षण
चांगलं असल्यानं घरी काय काय घडतं, कोण काय करतो, हे आता त्याच्या चांगलच लक्षात
आलय. त्यामुळे आई-बाबा किंवा तेजोमयीकडून दररोज घडणारी गोष्ट घडली नाही तर तो
बरोबर त्याच्या पध्दतीने तिघानांही आठवण करुन देतो. आईबाबत अशी वेळ फार कमी येते.
मात्र बाबा आणि तेजोमयीच्या बाबत अशी वेळ बरेचदा येते.
आता ही परवाची
गोष्ट. गॅलरितील झाडांना पाणी टाकण्याचं काम बाबांचं. हे काम ते न चुकता करतात.
परवा त्यांना सकाळीच एका दुसऱ्या कामासाठी बाहेर जावं लागलं. त्यामुळे त्यांनी
सकाळी काही झाडांना पाणी टाकलं नाही. लवकर काम आटोपून परत येऊ व पाणी टाकू असे
त्यांनी आईस सांगितलं. मात्र त्यांना यायला उशीर झाला. कामाच्या व्यापात झाडांना
पाणी टाकायला आई विसरली. तेजोमयीने काही तिकडे लक्षच दिलं नाही.
बाबा आले तेव्हा
दुपारचे १२ वाजून गेले होते. जेवणाची वेळ झाली होती. त्यांनाही भूक लागली होती.
त्यामुळे आईने जेवणाचं ताट लावलं. हात पाय स्वच्छ धुवून बाबा जेवणासाठी बसणार तोच
अलेक्झांडर त्यांच्या खुर्चीवर जाउुन बसला.
अरे ठोंब्या,
बाबांना जेवायचयना,त्यांना भूक लागलीय. उठ खूर्चिवरुन… आई त्याला म्हणाली. आईचं
म्हणणं अलेक्झांडरला कळत असल्याने, तो ती जे काही सांगायची, त्याप्रमाणे वागायचा.
मात्र, आज काही स्वारी खूर्चीवरुन उठलीच नाही..
अरे कसला हा हट्टीपणा,
कान उपटीन हं तुझे, अलेक्झांडरच्या कानाकडे बोट दाखवत आई म्हणाली. पण पठ्ठ्या काही
उठला नाही. आई आता चिडली. ती खरोखरच त्याचे कान उपटणार तोच बाबांनी तिला थांबवलं.
अहो, थांबा, थांबा
घाई करु नका. अलेक्झू असा वागतोय म्हणजे, त्याच्या मनात दुसरं काहीतरी दिसतय.
आज तुमच्या खूर्चिवर
बसून जेवायचा मूड दिसतोय त्याचा. बरोबरना रे अलेक्झू, तेजोमयी त्याच्याकडे बघत
म्हणाली. अलेक्झांडरने नकारार्थी मान हलवली.
आँ…
मग..
तेव्हा अलेक्झांडर
खुर्चीवरुन उठला, त्याने बाबांचा शर्ट पकडून त्यांना गॅलरीकडे नेले. पाणी
टाकण्याचे भांडे दातात पकडून त्यांच्या समोर टाकले.
आता चटदिशी बाबा आणि
आईच्या लक्षात आलं की, आज झाडांना पाणिच दिलं नाही ते.
अरेरे, चूक झाली
माझी गड्या…बाबा, अलेक्झांडरसमोर कान पकडून म्हणाले.
बाबा, चूक झाली
म्हणण्याचं काय कारण..एखादे दिवशी झाडांना पाणी नाही दिलं तर काय
बिघडेल..तेजोमयीनं विचारलं.
अग बाई, एखादे दिवशी
तुला जेवायला नाही दिलं तर काय बिघडेल?आईने प्रतिप्रश्न
केला.
आपण खूप चुकीचं
बोललो, हे तेजोमयीच्या लक्षात आलं. अन्न -पाणी -निवारा या तिन्ही गोष्टीची गरज
सर्वांनाच असते. ती कधीच विसरायची नसते. मग ती एखादी व्यक्ती असो की प्राणी असो की
झाडं असो. हा धडा या घटनेतून तेजोमयीस मिळाला.
बाबांनी तत्काळ
बादली घेऊन सर्व झाडांना पाणी दिलं. मगच ते जेवायला बसले. अलेक्झांडर त्यांच्या
गळयात पडला आणि त्यांच्या गालाला गाल घासून लाड करु लागला. ही त्याची थँक्यू
म्हणण्याची पध्दत होती..
तू नाही राज्या,
आम्हीच तुला थँक्यू म्हणायला हवं… आई अलेक्झांडरला जवळ घेत म्हणाली…
०००