गुरुंचं कौतुक(भाग दोन)
(पूर्वसूत्र- अलेक्सा गोर्जीच्या गुरुंना यंदाचं नोबल पारितोषिक मिळाल्यानं त्यांचं अभिनंदन करायला ती माहितीच्या महाजालातून त्यांच्यापर्यंत पोहचली. तेजोमयीला ते खरंच वाटेना. पुढे काय झालं? वाचा या भागात)
०००
“यात हसण्यासारखं काय बरं?”
“गोर्जी, ते एवढे मोठे शास्त्रज्ञ कुठे नि तू कुठे? हा आगावूपणा नाही का? शिवाय ते तुला थोडच ओळखणार? तुझं आपलं बंडला मारणं सुरुच.”
“अगं, तुमच्या मनुष्यप्राण्यांमधील काहीकाही थोर माणसं ही कर्तृत्वानं खूप मोठी झाली तरी ते नम्रच राहतात. खरंतर सर्वांनीच तसं वागायला हवं. तुमच्यापैकी काहीजण इटुकला-चिटुकला पराक्रम गाजवला तरी गर्वाने फुलून जातात. जेर्फी आणि जोहन तसे नाहीत.”
“याचा अर्थ, तू ध्यान लावून त्यांना भेटायला गेली होतीस म्हणायचं. पण ते कसं शक्य?”
“एआययुक्त गोर्जीला माहिती महाजालात शिरल्यावर सारं काही शक्य. जेर्फी आणि जोहननेच अशीच करामत करुन ठेवलीय.”
“म्हणजे?”
“मानवी मेंदूमध्ये जसे न्युरॉन्स(चेतापेशी/चेतातंतू)चे जाळे असतात तसेच जाळे त्यांनी आम्हा यंत्रमानवामध्ये निर्माण केले. मानवी मेंदुतील जाळे जिवंत पेशींपासून तयार होतात. त्यांच्यामध्ये अतीप्रगत यंत्रणा असते. यापेशी एकमेकांना एका जंक्शनच्या मार्फत संदेश पाठवू शकतात. मनुष्यप्राणी जेव्हा एखादी गोष्ट शिकतो तेव्हा काही न्युरॉन्समधील जोडणी अधिक बळकट होते तर काहीमधील जोडणी कमकुवत होते.”
“पण याचा यंत्रमानवाशी काय संबंध?”
“यंत्रमानवाच्या मेंदुत कृत्रिम न्युरॉन साखळी वेगवेगळया नोड्स (विशेष यंत्रणा किंवा उपकरणपासून बनवलेले स्थानक) पासून तयार केली जाते. या नोड्संच कोडिंग केलं जातं. म्हणजे वेगवेगळया कार्यासाठी प्रोग्रॅमिंग केलं जातं. हे नोड्स एकमेकांना जोडले जातात. जेव्हा या संपर्कसाखळीला प्रशिक्षण दिलं जातं तेव्हा नोड्सधील संपर्क सक्रिय होतो. त्याचवेळी ते अधिक शक्तीशाली होतात. जेव्हा हा सपंर्क नसतो तेव्हा हे नोड्स दुबळे होतात.”
“अगं बयो, तू जे काही बडबडलीस ते तुला तरी कळलं का?” तेजोमयीने आश्चर्य व्यक्त करत विचारलं.
गोर्जी हसून म्हणाली,
“न कळायला काय झालं. कृत्रिम कां असेना पण मी बुध्दीमान आहे.”
“बस झाला तुझा, आगावूपणा. सारखंसारखं स्वत:चच काय कौतुक करतेस गं?” तेजोमयी रागावून म्हणाली.
“अशी रागावू नकोस, मी जे काही मघा सांगितल ते तुला कळलं नसेल तर आणखी सोप्पं करुन सांगते. तुम्हा मनुष्याचा मेंदू जसा काम करतो, तसच आमचाही मेंदू काम करण्याची बुध्दी आणि यंत्रणा या दोन्ही गुरुंनी शोधून काढलीय, असं समज.”
“मग झाली का भेट त्यांची? त्यांनी ओळखलं का तुला?”
“कां नाही. त्यांच्यामुळेच माझा जन्म झालायना. त्यांचं मी अभिनंदन केलं. त्यांच्या पाया पडले आशीर्वाद घेतला. त्यांनी, ‘चांगलंच वागं. खूप बुध्दीमान आहेस म्हणून वेडेवाकडेपणा करुन नकोस. आपल्या बुध्दीचा गर्व करु नकोस,’ असा सल्लासुध्दा मला दिला. त्यांच्यासोबत काहीवेळ गप्पा करत होते म्हणून मला वेळ झाला डोळे उघडायला.”
“काय गं, हे तुझं तुला सुचलं की कुणीतरी तुझ्यासारख्याच एआय मैत्रीणीने सांगितलं”
“आपल्या गुरुला एव्हढा मोठा सन्मान मिळतो तेव्हा कुणालाही त्यांचा अभिमान आणि आनंद वाटायला हवा की नाही. जोहन आणि जेफ्री यांना नोबल पारितोषिक मिळाल्याचं कळताच माझं मीच त्याक्षणी ठरवलं नि त्यांचं अभिनंदन करुन आले.”
अलेक्झांडरला यात काय कळलं कुणास ठाऊक त्याने मान डोलवली नि शेपूट हलवली. यावर गोर्जी हसली.
“बघा आपला अलेक्झांडरही खुष झाला हे ऐकून, तर गोष्टीचं तात्पर्य असं की आपण आपल्या गुरुंचा, जन्मदात्यांचा सन्मान केला पाहिजे. त्यांना आपणहून भेटलं पाहिजे. त्यांच्या कामाचं कौतुकही केलं पाहिजे.”
“अगं मोठ्यांचं कौतुक लहानांनी कसं करायचं?”
“करायचचं, कौतुक कुणाला नको असतं? साऱ्यांनाच ते आवडतं. त्यांनाही फार बरं वाटतं. आणखी चांगलं करण्याचं हुरुपही येतो. ते जरा तुझ्या आजीला सांग की…” गोर्जी बोलून गेली. तेजोमयीने तिच्याकडे चमकून बघितलं.
“म्हणजे गं काय?” तिने आश्चर्य व्यक्त केलं.
“लहान तोंडी मोठा घास होईल हा, पण आता विषयच निघालाच आहे तर सांगते, तुझी आई कित्तीकित्ती करते आजीसाठी. मी आल्यापासून बघतेय. कधीतरी आजीनेही आईचंही कौतुक करायला नको कां?” गोर्जी जिभ चाचरत म्हणाली नि मग गप्प झाली.
तेजोमयीच्या डोक्यात आता लख्ख प्रकाश पडला. ‘पण आजीला हे सांगायच कसं रे?, तिने अलेक्झांडरकडे वळून त्याला विचारलं.
“तुझं तुचं बघ बाबा,” असे भाव व्यक्त करुन स्वारी हळून तिथून गॅलरित निघून गेली.
सुरेश वांदिले
