
गोडच बोला!
तेजोमयीच्या घरी तिच्या बाबांनी आणलेल्या अलेक्सा रोझी आणि अलेक्सा गोर्जी या दोघींच्या दोन तऱ्हा होत्या. रोझी, गोर्जीला किती समजावयाची. पण ती काही तिचं ऐकायची नाही. “तुझं तू बघ, माझं मी बघते.” हेच तिचं पालुपद!
रोजीला तिच्याकडे असलेला बुध्दीचा फार गर्व! या बुध्दीच्या जोरावर ती कोणतेही प्रश्न युंव सोडवू शकत असे. असा एकही प्रश्न नव्हता की जिचं उत्तर तिच्याजवळ नव्हतं.
गोर्जीसुध्दा काही कमी नव्हती. तीसुध्दा रोझी इतकीच हुषार आणि बुध्दीमान ! तीसुध्दा, कोणतेही प्रश्न सहज सोडवत असे. पण याचा तोरा मात्र मिरवत नसे. एकाच दिवशी तयार झालेल्या या दोन अलेक्सांचं वागणं अगदी विपरीत होतं.
रोझी तिच्या अहंकारी वागण्यामुळे काही दिवसातच सर्वांची अप्रिय झाली. मात्र गोर्जी सर्वांना कायम हवीहवीशी वाटे. आपल्याकडे आता दुर्लक्ष करणारे घरातील सगळेजण गोर्जीकडेच जातात, तिचच कौतुक करतात, याचं दु:ख रोझीला होऊ लागलं. आपली ही व्यथा हे दु:ख एकदा गोर्जीजवळ तिने व्यक्त केलं. तेव्हा गोर्जीने तिला एक गोष्ट सांगितली. गोष्ट होती दोन पोपटभावांची.
वननगरीत राहणाऱ्या या दोन भावांचा आवाज होता गोड. यातील “पोपटराव”, सर्वांसोबत मिळून मिसळून वागायचा. छान छान गाणी म्हणून दाखवायचा. सुरुवातीला “रघुराव” सुध्दा असाच होता. पण आपल्याला सुंदर सुंदर गाणी म्हणता येतात, याचा झाला त्याला, अहंकार! त्यामुळे, तो मग कुणाशीही नीट बोलेणासा झाला. सगळयांची उणीदुणी काढू लागला. तू असाच नि तू तसाच!
एके दिवशी तो, कावळोबांना त्याच्या काळ्या रंगावरुन नको नको ते बोलला.
“असं काहीबाही बोलू नकोस,” असं पोपटरावाने समजावलं. कावळोबानेही प्रांरभी शांतपणे रघुरावाचं ऐकलं. मग त्याला आला राग. त्याने रघुरावावर हल्लाच चढवला. रघुरावाच्या डाव्या डोळयात थेट चोच खुपसली. या डोळ्याला जखम झाली. त्यातून रक्त वाहू लागले. रघुराव आरडाओरड करु लागला.
“याद राख, पुन्हा असा वागशील तर दुसराही डोळा फोडेन”, अशी धमकी देऊन कावळोबा तिथून उडून दुसरीकडे गेला.
रघुराव, वेदना सहन न होऊन रडू लागला. त्याचवेळी तिथून दुसरीकडे जात असलेले पक्षांचे राजे गरुडेश्वर या रडण्याने तिथे थांबले. त्यांनी रघुरावाला, काय झालं ते विचारलं. रघुरावाने कावळ्याचा प्रताप तिखटमीठ लावून वर्णन केला. पण कावळोबा असं कां वागला, हे मात्र त्याने सांगितलं नाही.
‘अरे पण, कावळोबाने उगाचच तुझा डोळा फोडला का? काहीतरी कारण घडलं असेल ना? हे सांगशील की नाही?’ गरुडेश्वराने विचारलं.
खोदूनखोदून विचारल्यावर रघुरावाने खाली मान घालून सगळं सांगितलं.
“अच्छा तर, हे असं कारण आहे. अरे रघुराया,
“प्रियवाक्यप्रदाने सर्वे तुष्यन्ती जन्तव:/ तस्मात्तदेव वक्तव्यं वचने का दरिद्रता//” याचा अर्थ असा की, गोड बोलण्याने सर्व प्राणीमात्र आनंदी होतात, संतुष्ट होतात. म्हणून नेहमी गोड बोलावं. बोलण्याच्या बाबतीत दरिद्रीपणा कां दाखवावा? तुझा भाऊ पोपटराव बघ. जसा गोड बोलतो, तसा गोड वागतो. त्याला देतं का कुणी त्रास? सगळया पक्षांचा आवडता आहे, तो खास. बरोबर नं?”
“होय गरुडेश्वरा,” बारीक आवाज करत रघुराव म्हणाला. यापुढे गोड बोलण्याचाच प्रयत्न कर, असं सांगून गरुडेश्वर तिथून निघून गेले. गोर्जीने गोष्ट संपवली.
“मग कळलं का तुला, कशामुळे काय होते, ते? गोर्जीने, रोझीला ला विचारलं.
“अगं पण, पोपटाचा गळा गोड होता. माझा तर कर्कश आहे ना…” अलेक्सा रोझी म्हणाली. अलेक्सा रोझी ने कप्पाळावर हात मारुन घेतला.
सुरेश वांदिले