(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

घोडयाला प्रश्न आणि गाढवाची तक्रार (भाग एक)

    1

    पिंकू गाढवाने सिंहमहाराजांकडे ढिंकू घोड्याची तक्रार केली. तक्रारीचा विषय होता, पिंकूवर ढिंकूने केलेला आरोप. आरोपात काय होतं, तर ढिंकू परवा चावडीवर सर्वांदेखत सांगता झाला की, पिंक्यास गुळची चव कळूच शकत नाही. त्याच्या बापजाद्यांना ही चव कळली नव्हती, यालाही कळली नाही आणि पुढच्या गाढवांनाही कळणार नाही.

    हे प्रकरण हातघाईवर आलं. पिंकूने लाथही उचलली. ढिंकूही मागे हटायला तयार नव्हता. कसेतरी हे प्रकरण सिंकू हत्तीने मिटवलं. पण तेव्हढ्यापुरतच. तीनचार दिवसांनी पुन्हा हाच प्रकार घडला. तेव्हा पिंकूचा राग अनावर झाला. त्याने यावेळी लाथा हाणल्या नाहीत की वादविवादही केला नाही. त्याने थेट सिंह महाराजांकडे तक्रारच केली.

    महाराजांकडे तक्रार आल्यावर आधी तर ते हसले. पिंक्याला काही अक्कल नाही, असं प्रधानजी वाघोबा म्हणाले. ही तक्रार फाडून फेकून द्या, असा आदेश ते देणारच, तेव्हा सेनापती अस्वलरावांनी त्यांना थांबवले.

    महाराज, प्रजा मूर्ख असेल नाहीतर आणखी काही असेल, पण  महाराजांनी त्यांना न्याय दिला पाहिजे. पिंकूचं म्हणणं काय आणि ढिंकूचं म्हणणं काय, हे आपण ऐकलं पाहिजे. प्रधानजीकडे महाराजांनी एक नजर टाकली. दुसरी नजर सेनापती अस्वलरावांकडे टाकली. तिसरी नजर सरदार कोल्हाबांकडे टाकली. सर्वांनी होकार दिला.

    पिंकूच्या तक्रारीवर न्यायनिवाडा करण्यासाठी विशेष दरबाराचं आयोजन करण्याचा निर्णय महाराजांनी घेतला. पण गाढवाला गुळाची चव काय, याचा निवाडा कसा करायचा हा प्रश्न महाराजांना पडला. त्यांनी आपल्या दरबाऱ्यांसमवेत बराच खल केला. पण कुणासही गूळ कसा असतो, हेच माहीत नव्हतं. ही चव जोपर्यंत कळत नाही, तो पर्यंत न्यायनिवाडा अचूक होऊ शकत नाही, असं महाराजांनी दरबाऱ्यांना सांगितले. त्यामुळे आधी ही चव समजून घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे त्यानंतरच विशेष दरबार बोलावला जाऊ शकतो, ही बाब महाराजांनी स्पष्ट केली. सर्व दरबाऱ्यांना त्यांचं म्हणनं पटलं.

    महाराजांच्या सूचनेनुसार प्रधानजींनी दुसऱ्या जंगलप्रांतातील सिंह महारांजाकडे दूत पाठवून गुळाच्या चवीची विचारणा केली. पण त्यांनाही गुळाची चव सांगता आली नाही. त्या दुसऱ्या महाराजांनी तिसऱ्या प्रांतातील सिंहमहाराजांकडे विचारणा केली. त्यांनाही काहीच सांगता आलं नाही. मात्र हे गुळाच्या चवीचं प्रकरण महत्वाचं असल्याचं वाटून या तिसऱ्या महाराजांनी थेट दक्षिण आफ्रिकेतील सिंह महाराजांकडेच त्यांचे दूरस्थ नातेवाईक चित्तेसिंह यांच्याकरवी विचारणा केली.

    0000

    2

    दक्षिण आफ्रिकेतील सिंहमहाराजांकडे ही विचारणा जेव्हा आली तेव्हा, ते आणि त्यांचे दरबारी अतिशय गंभिर झाले. सर्वजण एकमेकांकडे बघू लागले. सूई पडल्यावरही आवाज येईल अशी शांतता दरबारात निर्माण झाली. काही क्षणानंतर महाराज खोखो असं जोरजोरानं हसू लागले. त्यांचं खोखो हसणं बघून इतर दरबारी होहो करत जोरजोराने खिदळू लागले.

    महाराज कशासाठी हसताहेत, हे विचारण्याची सोय नव्हती. एकदाचे महाराज खोखो हसण्याचे थांबले, तेव्हा दरबारीही होहो हसण्याचे थांबले. दरबारात पुन्हा  सूई पडल्यावरही आवाज येईल अशी शांतता निर्माण झाली.

    मुर्खांनो, महाराज गरजले, आम्ही कां हसलो, हे तुमच्यापैकी एकालाही विचारावं वाटलं नाही. अशी जर गाढवामागून वरात निघाली तर आपण सारे गटारगंगेत नाही का जावून पडणार?

    महाराज काय बोलताहेत हे नकळून सर्व दरबाऱ्यांनी होकारार्थी मान हलवली. आपल्या दरबाऱ्यांना काहीच येत नाही, सगळेच्या सगळे मूर्खशिरोमणी. आपणच तेव्हढे शहाणेसुर्ते, बुध्दीमान आणि हुषार आहोत,असं महाराजांना वाटलं. त्याचं समाधान त्यांच्या जबड्यावर विलसलं. या समाधानाचा आनंद मनवण्यासाठी त्यांनी सर्वदरबाऱ्यांसाठी खासा नास्ता आणण्याचे आदेश प्रधानजींना दिले. महाराजांच्या खोखो हसण्याला, होहो हसण्यानं प्रतिसाद दिल्यावर, आपणास काहीच कळत नाही असं सांगितलं वा दर्शवलं की खासा नाश्ता मिळू शकतो, ही बाब सर्व दरबाऱ्यांच्या मनानं टिपली.

    नाश्ता येईस्तोव महाराज दरबाऱ्यांशी बोलत राहिले, ते म्हणाले,

    आम्ही हसलो ते तुमच्या मूर्खपणावर नव्हे. आम्ही हसलो ते चित्तेसिंह यांनी आणलेल्या निरोपावर. पहिल्या महाराजांकडून दुसया आणि दुसऱ्याकडून तिसऱ्या महाराजांकडे आणि तिसऱ्या सिंह महाराजांकडून आमच्याकडे आलेल्या या निरोपात हसण्याचं बीज रोवलं आहे.

    ते कोणतं महाराज, युवराज पुटपुटले.

    बरं झालं युवराज तुम्हीच हा प्रश्न विचारलात ते. आपल्या दरबाऱ्यांना प्रश्नही पडत नसतात. ही आनंदाची आणि समाधानाची गोष्ट असली तरी कधीकधी प्रश्न पडल्यास गाढवांचं साम्राज्य थोडेच निर्माण होणार आहे नाही का? तेव्हा दरबाऱ्यांनो अधूनमधून प्रश्नही विचारत जा. आम्हास वाटले तर त्याचे उत्तर देऊ. वाटले तर तुम्हास बक्षीस देऊ, वाटले तर हाकलून लावू.

    होय होय महाराज, सर्व दरबारी एकसुरात म्हणाले. महाराज आता काय सांगतात याकडे सर्वांनी कान टवकारले.

    महाराज म्हणाले,

    आमच्याकडे चित्तेसिंहांनी जो निरोप आणला त्यावरुन आम्हास असं दिसतं की तिन्ही सिंह महाराजांनी बुध्दी कामातून गेली आहे.

    ते कसं काय महाराज, नम्रतापूर्वक प्रधानजींनी विचारलं.

    प्रधानजी, गाढवाला गुळाची चव काय, हा काय प्रश्न झाला. हा प्रश्न कोणत्यातरी घोड्याला पडला. त्याने गाढवाला चिडवलं. या चिडवाचिडवित गाढवानं तक्रार केली. या तक्रारीच्या निराकरणाची शेपूट एव्हढी लांबली की ती आपल्यापर्यंत पोहचली. एकाही महाराजाला गुळाची चव काय असते हे ठाऊक नाही.

    पण महाराज, आपणास तरीयुवराज कसेबसे बोलले.सर्व दरबाऱ्यांच्या पोटात हास्याचा कल्लोळ निर्माण झाला. पण सर्वांनीच तो दाबून धरला. फट म्हणता डायनोसॉर व्हायचा नि महाराज आपणासच लाथ हाणायचे, सर्वांनी हा विचार करुन मोठ्या कौतुकानं युवराजांकडे बघितलं. महाराजांनीही युवराजांकडे कौतुकानं बघितलं. त्यांनी त्यांना आपल्याजवळ बोलावून प्रेमानं कुरवाळलं.

    बघा दरबाऱ्यांनो, भविष्यातील तुमच्या राजाला कसे बुध्दिमान प्रश्न पडतात ते. आजपासून त्यांना आम्ही उत्तर आफ्रिका प्रांतातील जंगलाचे स्वतंत्र राज्य बहाल करत आहोत. सर्व दरबाऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

    दरबाऱ्यांनो, युवराजांच्या प्रश्नाच्या पोटात जे होतं ते तुमच्या ओठांपर्यंत आलं होतं. पण तुम्ही फिरत बसलात गाढवाभोवती. जाऊ द्या, मुद्दा असा आहे की, पहिल्या तिन्ही महाराजांना गुळाची चव ठाऊक नाही, तशीच आम्हाला सुध्दा नाही ना. पण आम्ही कुठे तसं सांगितलं. आपले पत्ते कधी असे उघडे करायचे नसतात. पण या तिकडच्या महाराजांना ते कळलं नाही. त्यांचा अडाणीपणा मात्र यातून आपणास कळला. या त्यांच्या अडाणीपणात आपल्या राज्यासाठी एक मोठी संधी आहे दरबाऱ्यांनो.

    कोणती महाराज, प्रधानजी भितभित म्हणाले.

    काय प्रधानजी, कोणत्या गाढवानं आपणास प्रधानजी बनवलं. ही साधी बाब आपणास कळू नये. आपले प्रधानजीपद अशाने काढून आपल्या जागी,त्या पहिल्या महाराजांच्या प्रांतातील गाढवास गुळाची चव काय, असा सवाल विचारणाऱ्या घोडेरावांनाच नेमावं लागेल.

    क्षमा असावी महाराज, चुकूभूल झाली.घाम पुसत प्रधानजी म्हणाले.

    प्रश्न नाही विचारले तरी मूर्खपणा आणि विचारले तर घोडेराव उरावर, त्यामुळे गप्प बसणच श्रेयस्कर,हे सर्व दरबाऱ्यांनी ताडलं, महाराज सांगू लागले,

    दरबाऱ्यांनो, गाढवाच्या गुळाच्या चवीच्या कथेत आपल्या राज्याचा कारभार तिन्ही महाराजांच्या प्रांतापर्यंत पोहचवता येऊ शकतो, याची बिजं दडलेली असल्याचं आमच्या चाणाक्ष बुध्दीनं ताडलं आहे. या तिन्ही महाराजांना आपण गुळाच्या चवित ढकलून देऊ आणि आपण त्यांचे राज्य ताब्यात घेऊ. आपण आता सम्राट आहोत, पण गाढवाच्या गुळाच्या कृपेनं चक्रवर्ती सम्राट होऊ.

    हो हो हो महाराज,अगदी बरोबर. एकासुरात दरबारी म्हणाले. आपला महाराज खरोखरच आपल्यापेक्षा दहापट बुध्दीमान असल्याची सर्वांची खात्री पटली. प्रधानजींनाही तसच वाटलं. आपले प्रधानजीपद कायम राहू देरे देवा, असं साकडं त्यांनी घातलं. एव्हाना नाश्ता आला होता. तो सर्वांनी भक्षण केल्यावर, महाराज म्हणाले,

    या तिन्ही महाराजांना गाढवाला गुळाची चव असते काय हे  सांगण्यासाठी आम्ही स्वत: त्यांच्या राज्याकडे सैन्यासह कूच करावं म्हणतो

    पण महाराज, आपणास कुठे ठाऊक आहे, गाढवाला गुळाची चव काय असते ते. युवराजांनी प्रश्न विचारला.

    युवराज तुमचा प्रश्न बरोबर आहे. पण या प्रश्नातच उत्तर दडलेलं आहे. ते उत्तर म्हणजे, नाही. गाढवाला,त्याच्या बापाला आणि त्याच्याही बापालासुध्दा गुळाची चव ठाऊक नाही. मग आपणास कुठे ठाऊक असणार? पण आपण ठोकून द्यायचं आम्हास ठाऊक आहे म्हणून

    अशानं त्यांनी आपणासच गाढव समजलं तर. युवराज घाबरत घाबरत विचारते झाले.

    मग उत्तमच ठरेल. गाढव बणून जायचं आणि सिंह बणून वार करायचा. आपण म्हणजे सिंहाचे कातडे पांघरलेले गाढव थोडेच आहोत. खऱ्या सिंहानं गाढवाचं रुप घेतलं तर काम सोपं नाही का होणार.

    होय महाराज, होय महाराज. सर्व दरबारी पुन्हा एका सुरात बोलले. गाढवाला गुळाची चव काय हे सांगण्यासाठी ते स्वत: येणार असल्याचा निरोप दक्षिण आफ्रिकेतील सिंह महाराजांनी चित्तेसिंहांमार्फत तिसऱ्या महाराजाकडे पाठवाला, तिसऱ्याने दुसऱ्याकडे हा निरोप पाठवला. दुसऱ्याने पहिल्या महाराजांकडे पाठवला.