
चार ड्रॅगन
खूप खूप वर्षांपूर्वी चीन देशात प्रचंड दुष्काळ पडला. पाण्यावाचून लोकं तडफडू लागली. जनावरांचे तर हाल विचारुच नका. त्यांना कुणी वालीच उरला नाही. पक्षांची तीच स्थिती झाली. वृक्षवेली करपून गेल्या. हसता, खेळता आणि बागडता प्रदेश या दुष्काळामुळे कोमेजून गेला. गावच्या गावं ओस पडू लागली. प्रेतांचा खच पडू लागला. मात्र चिनच्या राजाला याचं काहीच देणंघेणं नव्हतं. तो आपल्या राजदरबारात नाचगाण्यात आणि ऐषोआरामात मग्न होता.
राजाचा दरारा इतका मोठा होता की त्याच्यापुढे कुणाची बोलण्याची टाप होईना. आपल्या राज्यात इतका मोठा दुष्काळ पडलाय हे त्याची गावीही नव्हतं. दुष्काळाची तीव्रता वाढतच गेली. त्यामुळे लोकांच्या दैन्यात आणखी वाढ झाली. मात्र राजा काहीच हालचाल करीना. तेव्हा हैलाँगजिअँग, झुझीअँग, हुआंगे आणि चँग जिअँग या चार ड्रॅगनला ही परिस्थिती बघवेना. राजापुढे दुष्काळाची परिस्थिती कुणीच सांगत नाही हे बघून त्यांनी कोणत्याही परिणामाची तमा न बागळता, राजाला भेटण्याचं ठरवलं.
त्याप्रमाणे एके दिवशी ते राजदराबात गेले. नित्याप्रमाणे राजा नाचगाण्यात मग्न होता. हैलाँगजिअँगने सर्वात आधी राजाला अभिवादन करुन बोलण्याची परवानगी मागितली. पण राजाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मग झुझीअँगने विनंती केली पण,राजा ढिम्म राहिला. नंतर हुआँगेने राजापुढे हात जोडले. पण राजा त्याच्याकडे बघून फिदीफिदी हसला. ते बघून चँग चिअँग चिडून म्हणाला,
“जो राजा आपल्या प्रजेच्या हिताची काळजी घेत नाही तो कधीच सुखी होऊ शकत नाही.”
या बोलण्याचा राजाला प्रचंड राग आला. त्याने आपल्या सैनिकांना चारही ड्रॅगनला पकडण्याचा आदेश दिला. आपण पकडले गेलो तर राजा आपल्याला ठार करेल, मग आपल्या जनतेचं दु:ख दूर करण्यासाठी कुणीच समोर येणार नाही, हे चारही ड्रॅगनच्या लक्षात येताच त्यांनी स्वत:चं रुपांतर पोपटात करुन घेतलं नि पटदिशी तिथून उडून गेले.
“महाराज महाराज जादू घडली. ते ड्रॅगन उडून गेले.” काही दरबारी घाबरत घाबरत म्हणाले.
“गेले तर गेले. ड्रॅगन आले नि पोपट बणून गेले. जाऊन जाऊन कुठे जाणार ते. माझे शूर शिपाई त्यांना पकडून आणतील आणि मग आपण त्यांची मेजवाणी करु. स्वादिष्ट आणि रुचकर! अहाहा आणि वाहवा! राजा आपल्याच नादात म्हणाला. तो पुन्हा नाचगाण्यात मग्न झाला.
०००
इकडे पोपट झालेले ड्रॅगन राजवाड्याच्या बाहेर पडले नि एका जंगलात खाली उतरले. ते पुन्हा मूळ रुपात आले.
“या जुलमी राज्याचा आपण नायनाट करायला पाहिजे.” हैलाँगजिअँग म्हणाला.
“ते आता महत्वाचे नाही. आधी आपण आपल्या जनतेचं दु:ख दूर केलं पाहिजे”, झुझीअँग म्हणाला. हुआँगे आणि चँग जिअँगने मान डोलावली.
“पण आपण काय करु शकतो.” हुआँगेच्या मनात आलेली शंका त्याने बोलून दाखवली. त्याची शंका बरोबर असल्याचं तिघांच्याही लक्षात आलं. तेव्हा शेवटचा उपाय म्हणून ते जंगलातील देवाकडे गेले. त्याची मनोभावे प्रार्थना केली. देव प्रसन्न झाला. तो त्यांच्यापुढे प्रगटला. चौघांनी देवाला नमस्कार केला. आपल्या मनातील व्यथा सांगितली.
देवाने त्यांची परीक्षा बघण्याचं ठरवलं.
“देव म्हणाला, जनतेच्या व्यथेने तुम्ही दु:खी झालात, हे चांगुलपणाचं लक्षण आहे. पण केवळ चांगूलपणा असून चालत नाही. तुम्ही काहीतरी कृती करायला हवी.”
“देवा, आम्ही आमच्या जनतेसाठी काहीही करायला तयार आहोत.”
“तुम्हाला तुमचं बलिदान द्यावं लागेल.”
“देवा, आम्ही तयार आहोत. चारही ड्रॅगन एका सुरात म्हणाले.
“बघा पुन्हा विचार करा. या बलिदानामुळे तुमचं अस्तित्व संपून जाईल.”
“देवा, आमच्या दुष्ट राजाच्या हातून नष्ट होण्याऐवजी जनतेच्या हितासाठी नष्ट होणं हे आमच्यासाठी अभिमानाचं ठरेल.” चौघेही म्हणाले. देवाने त्यांना पुन्हा एकदा विचार करण्याची संधी दिली. पण ते बलिदानाच्या विचारापासून ढळले नाहीत.
त्यांचा तो दृढ निश्चय बघून मग देवाने चारही ड्रॅगनवर मंत्र टाकला. बघता बघता चारही ड्रॅगनचे चार नद्यांमध्ये रुपांतर झाले. चारही नद्या वेगवेगळया दिशेने वाहू लागल्या. सर्वत्र पाणी उपलब्ध झाल्याने जनतेचा त्रास कमी झाला. त्यांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी मिळालं. जनावरांना पाणी मिळालं. वृक्षवल्ली पुन्हा बहरुन आले. गेलेली रया पुन्हा परत आली. दुष्काळ संपला.
हा दुष्काळ ड्रॅगनच्या बलिदानामुळे संपला असल्याचं सर्वांना जाऊन सांगा, असा आदेश देवाने पोपटांना दिला. पोपटांनी गावागावात जाऊन ड्रॅगनच्या बलिदानाची कथा सांगितली. आपल्या मदतीला राजाने धावून येण्याऐवजी तो या प्रेमळ ड्रॅगनच्या जीवावर उठला होता. असेही ते पोपट सांगू लागले. त्याचा वेगळाच परिणाम झाला.
लोकांमध्ये राजाबध्दल भयंकर चिड निर्माण झाली. एका गावातील एका बहादूर तरुणाने गावकऱ्यांमधील तरुणांचे सैन्य तयार केलं. हे सैन्य राजावर चालून गेलं. राजा नाचगाण्यात मग्न असला तरी त्याच्याकडे चांगले बलवान, प्रशिक्षित सैन्य होते. त्यांच्याकडे चांगली हत्यारे होती. त्यामुळे या सैन्यापुढे गावक-यांच्या सैन्याचा टिकाव लागला नाही. राज्याच्या सैन्याने सर्वांना पकडून साखळदंडात बांधलं नि राजासमोर उभं केलं. राजाने संतापून त्या गावकऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.
अशी शिक्षा जाहीर करताना मोठमोठ्याने घंटा वाजवण्याची प्रथा होती. गुन्हेगारांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली जात असल्याचं प्रजेला कळावं हा त्यामागचा हेतू होता. या घंटेचा आवाज नदीत रुपांतरीत झालेल्या हैलाँगजिअँग या ड्रॅगनच्या कानावर गेला. आपला राजा निरपराध व्यक्तींना मृत्यूदंड देत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. राजाला धडा शिकवलाच पाहिजे, असं त्याच्या मनाने घेतलं.
हैलाँगजिअँगरुपीन नदीने आपली दिशा बदलली नि ति वेगाने राजवाड्याच्या दिशेने वाहू लागली. बघता बघता ही नदी राजवाड्यात शिरली आणि तिने राजाला गिंळगृत केले. नदीतील मगरीला राजाचे लचके तोडण्यास सांगितलं.
मात्र, त्याचवेळी तिथे देव प्रगटला. तो नदीला म्हणाला, “या दुष्ट राजाला शिक्षा त्याची प्रजाच करेल. तू तुझे काम केले आहेस. आता प्रजा तिचं काम करेल.” असे बोलून देवाने मृत्यूदंडासाठी राखीव ठेवेलेल्या मैदानात राजाला आणून सोडले. राजा भयभित झाला होता. तो प्रजेपुढे लोटांगण घालून क्षमा मागू लागला. आपण यापुढे असं काही करणार नाही. प्रजेच्या हिताचीच सर्वात आधी काळजी घेऊए असे पुन्हापुन्हा सांगून प्राण वाचवण्यासाठी गयवाया करु लागला.
“अरे दुष्टा, प्रजेच्या हिताची काळजी घेण्यासाठी तू यापुढे आमचा राजा तर राहिला पाहिजेस ना.” ज्या तरुणाच्या नेतृत्वाखाली जनतेने राजावर हल्ला केला होता, तो गरजला.
“हो हो हो, हा आमचा सेनापती बरोबर बोलतोय.” आता तू आमचा राजा नाही. नागरिकांमधून आवाज आला.
“आता आमचा राजा हा तरुण सेनापतीच.” कुणीतरी म्हणालं. जमलेल्या नागरिकांनी तरुणाचा जयजयकार केला. हा जयजयकार सुरु असतानाच नागरिकांचे लक्ष नाही हे बघून राजा पळून जाऊ लागला. देवाचं लक्ष त्याच्याकडे होतंच. त्याने राजाच्या बखोटीला पकडलं आणि नागरिकांसमोर आदळलं.
या पळपुट्या आणि दुष्ट राजाला ताबडतोब तुरुंगात टाका, देवाने आदेश दिला. राजाला साखळदंडात बांधून अंधारकोठडीत टाकण्यात आलं.
देवाने, त्या तरुणाचा नवा राजा म्हणून राज्यभिषेक केला. यावेळी देवाने त्याला सल्ला दिला,
“राजा झालास म्हणून तू उतू नकोस मातू नकोस. सर्वात आधी आपल्या प्रजेच्या हिताचं रक्षण कर. त्यांच्यावर अन्याय करु नकोस. त्यांना दु:खात लोटू नकोस. ते आनंदी राहतील, सुखी राहतील याची कायम काळजी घे”.
नव्या राजाने हा सल्ला मानण्याचं देवाला वचन दिलं.
नागरिकांनी नव्या राजाचा जयजकार केला. देव त्यांना म्हणाला,
“तुमचं दु:खं दूर करण्यासाठी आपलं अस्तित्वच संपवून टाकणाऱ्या हैलाँगजिअँग, झुझीअँग, हुआंगे आणि चँग जिअँग या चार ड्रॅगनची कायम आठवण ठेवा. संकटात सापडलेल्यांच्या मदतीला धावून जाण्याचा त्यांचा गुण लक्षात ठेवा. दुष्काळाचं संकट एखाद्या शत्रूसारखं तुमच्या प्रदेशावर आलं होतं. असं संकट दूर करण्यासाठी आणि समोरच्या शत्रूचा सामना करण्यासाठी प्रसंगी प्राणही द्यावे लागतात हे लक्षात ठेवा तरच तुमचे राष्ट्र आणि तुमचा हा प्रदेश सुरक्षित राहील. तुम्ही कोणत्याही संकटाचा आणि अडचणीचा सामना करु शकाल. इतके बोलून देव अंतर्धान पावला.
सगळयांनी देवांचा जयजयकार केला. नव्या राजाने देवाने सांगितल्याप्रमाणे सर्वांसोबत शपथ घेतली. आपल्या प्रदेशाला नवसंजीवनी देणारे चारही ड्रॅगन हेच आपले देव असल्याचं त्याने घोषित केलं. सर्वांनी नदीरुपातल्या चारही ड्रॅगनची पूजा करुन नदीचं पावित्र्य जपण्याची शपथ घेतली.
“हे पावित्र्य तुम्ही जपलं नाही तर नदीरुपी ड्रॅगन तुमचाही नायनाट करतील असा इषारा आकाशातील देवाने दिला…“(चिनी लोकथेवर आधारित)
सुरेश वांदिले
७०१,देवराई सहकारी गृहनिर्माण संस्था,चारकोप,सेक्टर सहा,हरयाणा भवनजवळ,कांदिवली पश्चिम,मुंबई-४०००६७
९३२४९७३९४७