(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

ज्याचा त्याचा प्रश्न!

नॅशनल डिफेंस ॲकॅडमी आणि नॅव्हल ॲकॅडमी (एनडीए-एनए) मधील प्रवेशासाठी उत्सुक विद्यार्थ्यांची संख्या वाढत चाललीय, हे शुभचिन्हच. मात्र विद्यार्थ्यांपेक्षा त्यांच्या पालकांना याबाबत अधिक उत्साह दिसून येतो. यातसुध्दा वावगं नाही. या उत्साह आणि ओढीला, ‘एनडीए परीक्षा तयारी शिकवणी वर्ग’ चालकांनी बरोबर हेरलं आहे. हे एक आणखी वाढतं मार्केट असल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानं, (हमखास) एनडीए प्रवेश गॅरंटी किंवा हमी देणारे शिकवणी वर्ग बरेच सुरु झाले आहेत. अशा वर्गात नाव नोंदवलं की कल्याण झालंच म्हणून समजा अशी मनोवृत्ती असल्यानं, या शिकवणी वर्गांना मिळणारा प्रतिसाद देदिप्यमान असणार, यात दुमत होण्याचं कारण नाही. आता कुणी कोणत्या शिकवणी वर्गात  नाव टाकावं, त्यासाठी किती शुल्क मोजावं, हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत अधिकार. त्याला कुणी आव्हान देऊ शकत नाही. तथापि अशा शिकवणी वर्गात मुलांचं आणि आता मुलींचं सुध्दा नाव टाकण्याआधी किती पालक, संघ लोकसेवा (युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन-यूपीएस्सी) आयोगामार्फत प्रकाशित एनडीए-एनए, परीक्षेचे माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचतात? हे त्यांनी स्वत:लाच विचारायला हवं. याच महत्वाचं कारण हेच की, एनडीए-एनए मध्ये प्रज्ञावंत मुले/मुली निवडली जाणं अत्यावश्यकच आहेत. कारण हीच मुलं-मुली भविष्यातील अत्यंत सक्षम आणि समर्थ अशा लष्करासाठी स्मार्ट नेतृत्व देणार आहेत. तथापि एनडीए परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी केवळ प्रचंड बुध्दीमान असून चालत नाही. तो शारीरिक, मानसिक आणि वैद्यकीयदृष्ट्या तितकाच सक्षम, कणखर आणि तंदुरुस्त हवा. एनडीएमार्फत तो अधिकारी पदासाठी निवडला जात असला तरी, तो सर्वात आधी सैनिक असतो. या सैनिकाला कोणत्याही क्षणी आणि कुठेही युध्दाला किंवा युध्दसदृष्य परिस्थितीला सामोरं जावं लागतं. त्यावेळी “बाहू आणि बुध्दी,” समान सक्षम असणं अत्यावश्यक असतं. त्यामुळेच वैद्यकीय आणि शारीरिक तंदुरुस्तीची मानकं काळजीपूर्वक ठरवण्यात आली आहेत. एनडीएच्या माहितीपत्रकातील १११ पृष्ठांपैकी निम्मीपृष्ठे यावरची आहेत.

एनडीए परीक्षेचा अर्ज भरण्याआधी ही सगळी पृष्ठं पालकांनी बारकाईनं वाचून, समजून घेतली पाहिजे. आपला मुलगा किंवा मुलगी एनडीए परीक्षा यशस्वी होण्यासाठी बुध्दीमान असण्याचा आत्मविश्वास असला तरी तो किंवा ती वैद्यकीय मानकांमध्ये बसतो किंवा नाही, हे आधी तपासून घ्यायलाच हवं. काही वैद्यकीय व्याख्या समजत नसतील तर त्या डॉक्टरांकडून समजून घ्यायला हव्यात किंवा ज्या एनडीए शिकवणी वर्गात मुलांचे नाव टाकण्यासाठी उत्सुक असाल त्यांच्याकडून समजून घ्यायला हवे. किंबहुना अशा संचालकांनीच विद्यार्थ्याचं नाव दाखल करण्याआधीच पालकांना व त्यालाही या बाबी समजून सांगायलाच हव्यात. पण किती शिकवणी चालक असे करत असतील? हा भला मोठा प्रश्नच आहे. किंबहुना किती संस्था चालकांनी अर्ध्याहून अधिक पृष्ठातील माहिती वाचली असेल? हा त्यातून मोठा प्रश्न आहे. अशा शिकवणी वर्गात नाव टाकण्यासाठी जाणाऱ्या, पालकांना जर, ” वैद्यकीय आणि शारीरिक मानकांचं नंतर बघू आणि शिकवणी वर्गाचं शुल्क आधी भरा”, असा आग्रह धरला जात असेल तर सावधगिरी बाळगलेली बरी.

आपला मुलगा किंवा मुलगी शारीरिक , मानसिक आणि वैद्यकीयदृष्ट्या कितपत तंदुरुस्त, याची उत्तम जाण पालकांनाच असायला हवी. काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करता येतील का? याचाही विचार करायला हवा. डॉक्टर आणि फिजिकल फिटनेस ट्रेनर यांच्या साहाय्यानं या दुरुस्ती करतासुध्दा येतील. हे न करताच एनडीए क्लास लावायचाच असेल तर, हा मग ज्याचा त्याचा प्रश्न!

०००

गेल्या वर्षी आणि हे वर्ष सुरु झाल्यावर आयआयटीमध्ये हमखास प्रवेशाची (आभासी) हमी देणाऱ्या कोटा या शहरात बऱ्याच मुलांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या सतत येत राहिल्या. पण या बातम्या पाण्यावरच्या बुडबुड्याप्रमाणे विरुन गेल्या. यंदासुध्दा कोट्याला जाण्याचा ओघ काही कमी होण्याची कोणतेही चिन्ह दिसत नाहीत. कोट्याला गेलं की आयआयटीतील प्रवेश झालाच म्हणून समजा, असं प्रचंड मोठ्या प्रमाणावर पालकांना कां वाटतं? हे चमत्कारीच आहे. काही पालक तर तिथे दोन वर्षासाठी घर सुध्दा करायला मागेपुढे पाहत नाही. असो, हा सुध्दा ज्याचा त्याचा प्रश्न.

आयआयटीसारख्या अत्यंत उच्च प्रतिचं शिक्षण देणाऱ्या संस्थेत प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न करायलाच हवा. यात दुमत होण्याचं कारण नाही. पण आपला मुलगा अथवा मुलगी खरोखरच, जॉईंट एंट्रन्स टेस्ट मेन आणि ॲडव्हान्स परीक्षा देण्यासाठी बौध्दीक दृष्टया सक्षम आहे का? हे तर पालकांना समजू शकतं. ते समजून घ्यायचेच नसेल तर मग कोटा पासून हैदराबाद पर्यंत कुठेही जायला काहीच हरकत नाही. आयआयटी प्रवेश शिकवणी वर्गाचं मोठं गारुड समाजमनावर पडलय. दरवर्षी जेइइ- मेन आणि नंतर ॲडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल लागल्यावर या शिकवणीवर्गाच्या पानपान जाहिराती येतात. यामध्ये यशस्वी झालेल्या मुलांची संख्या तसेच त्यांची छायाचित्रं  दिली जातात. अशा सर्व शिकवणी वर्गातील यशस्वी मुलामुलींची संख्या मोजली तर कदाचित आयआयटीच्या एकूण जागांपैकी या जागा अधिक निघतील. शिवाय बहुतेक सर्व शिकवणी वर्गवाले आमच्या वर्गातून अखिल भारतीय पहिला रँक दुसरा रँक, पाचवा रँक असं घोषित करतात. असे पहिल्या-दुसऱ्या रँकचे किती विद्यार्थी राहू शकतात? हा प्रश्न पालकांना पडला पाहिजे. एका शिकवणी वर्गाने तर “रँक”ची हमी अशीच जाहिरात केल्याचं दिसून आलं. अत्यंत प्रखर बुध्दीमान विद्यार्थी सुध्दा अशी स्वत:ची हमी देऊ शकत नाही. म्हणजे हा शिकवणी वर्ग जादुचाच असायला हवा.

यंदा ३० टक्क्याहून अधिक आयआयटी विद्यार्थ्यांना नोकरी (प्लेसमेंट) मिळालं नसल्याचं वृत्त एप्रिल महिन्यात आलं होतं. मे महिन्याच्या शेवटी हे वृत्त पुन्हा आलं. माहितीच्या अधिकारात ही माहिती उघडकीस आली. नोकरी न मिळणाऱ्या आयआयटीमध्ये मुंबई दिल्ली, मद्रास अशा जुन्या आयआयटींचा समावेश आहे.

त्यामुळेच “कोट्याचा मोह” आणि “आयआयटीचाच ओढा” – या बाबिंचा साधकबाधक विचार पालकांनी व विद्यार्थ्यांनी करायला हवा. तो करायचा नसेल तर हा ज्याचा त्याचा  प्रश्न!

०००

मार्च-एप्रिल आला की परदेशातील शिक्षण संस्थांतील प्रवेशासाठी मार्गदर्शन शिबिरं पंचतारांकित हॉटेल्समध्ये लागतात. या ठिकाणी विविध देशातील परदेशी शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी सामील होतात किंवा तसं जाहीर केलं जातं. ही मंडळी “आमच्याकडे या नि लगेच किंवा दोनतीन तासात प्रवेश पत्र घ्या.” असं सांगतात. खरोखरच हे शक्य आहे का? असे प्रश्न पालकांना आणि विद्यार्थ्यालाही पडले पाहिजे. मग जीआरइ, टोफेल किंवा आयलेट्स अशा परीक्षांचं काय? ज्या संस्था या परीक्षांचे गुण प्रवेशासाठी सर्वात महत्वाची अर्हता समजतात त्यांचे काय? आपल्याकडे बालवाडीतसुध्दा “या आणि प्रवेश घ्या” अशी सध्या स्थिती नाही. मग परदेशातील शिक्षण संस्था इतक्या सुलभतेने प्रवेश कसा काय देऊ शकतात? आमची संस्था अमूक रँकिंगची, तमूक रँकिंगची आहे, असेही सांगितलं जातं. त्यांच्या सांगण्यावर कितपत विश्वास ठेवायचा? ज्या संस्थेने असे रँकिंग केलेय, त्याचा अधिकृत अहवाल दाखवा असा आग्रह धरला पाहिजे. शिवाय रँकिंग संस्थेची आहे की या संस्थेतंर्गत जे विविध अभ्यासक्रम चालवले जातात त्यांची आहे हेही तपासले पाहिजे.

काही परदेशी शिक्षण संस्था प्लेसमेंटची हमी, असे यंदा सांगू लागल्याचं दिसून आलं. परदेशातील कितीही नामवंत व दर्जेदार शिक्षण संस्था असली तरी तिथे प्लेसमेंटसाठी कंपन्या जात नाहीत. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वबळावरच प्लेसमेंट मिळवावं लागतं. हळूहळू आपल्याकडेही अशी परिस्थिती येऊ लागलीय. (अर्थातच दर्जेदार शिक्षण संस्थेतून शिकण्याचा फायदा प्लेसमेंटच्या वेळी होतो.) त्यामुळे अशा शिबिरातील शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधिंना आणि ज्या स्थानिक कांऊसलिंग संस्थेमध्ये मोठे शुल्क भरुन नोंदणी केली असेल त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारुन आपल्या शंकाचं १०० टक्के निरसन केलचं पाहिजे. अमूक एका संस्थेमध्ये नाव नोंदवलं म्हणजे कल्याण झालं, अशी समजूत करुन घेणं श्रेयस्कर नाही. मात्र ज्यांना असं वाटत असेल तर, हा ज्याचा त्याचा प्रश्न!

सुरेश वांदिले