(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

टिंकीचं आभाळ

चिंकी, मिंकी, पिंकी, टिंकी, छिंकी या पाच खारुताईपैंकी टिंकी जरा आगावू असल्याचं तिच्या आईबाबांना वाटायचं. आगावू कां, तर तिला नको ते प्रश्न पडत. हे प्रश्न ती आई-बाबांना विचारायची. आई-बाबांनी अमूक करु नको म्हंटलं की ते कां करु नको? असं ती लगेच विचारायची. अनेकदा ती आधी तसं करुनही बघायची. अशीच उडी मार असं बाबांनी सांगितलं की ती तशी उडी मारुन बघायची. त्यामुळे मग ती धडपडायची. मग आई- बाबांचं रागावणं आणि अंगावरचं दुखणं आलचं. त्यानंतर एखादा दिवस शांत राहायची. मग तिचं पुन्हा येरे माझ्या मागल्या. पुन्हा तेच धडपडणं आणि आई बाबांचं रागावणं. याला कंटाळून एके दिवशी टिंकीने ती राहत असलेल्या झाडावरुन दुसरीकडे जाण्याचं ठरवलं. तसं तिने केलं सुध्दा.

या झाडावरुन त्या झाडावर उड्या मारत मारत ती जवळच्या जंगलात पोहचली. जंगलातील वेगवेगळी झाडं बघून हरखून गेली. ही झाडं फलाफुळांनी बहरुन गेली होती. वेगवेगळे पक्षी, या झाडावरुन त्या झाडावर जात होते. मनास येईल तेव्हा, हवं तेवढं खात होते. झोका घेत होते. गाणं म्हणत होते. हे फळ झालं की ते फळ, ते झालं की तिसरं फळं असं त्यांचं खाणं सुरु होतं. कुणीही कुणाला काही म्हणत नव्हतं.

माकडांची टोळी या झाडावरुन त्या झाडावर उड्या मारत होती. त्यांची बाळही उड्या मारत होती. फांद्यांना लटकत होती. झोपाळा घेत होती. हे बघून टिंकी जाम खुष झाली. इथे आपणास कुणीही काही बोलणारं नाही की टोकणार नाही की रागावणार नाही.असं तिला वाटलं. तिने काही क्षण डोळे मिटले. मोठा श्वास घेऊन डोळे उघडले. तिला आता खूप उर्जा मिळाल्यासारखी वाटली. तिने मग छातीत हवा भरली, शेपूट वर उचलून हलवली. या झाडावरुन त्या झाडावर उडी घेतली. या झाडावरची फळं , त्या झाडावरची फळं खाल्ली. अशी वेगवेगळी फळं या आधी तिने कधी खाल्ली नव्हती. ती राहत असणाऱ्या झाडावर व आजूबाजूच्या झाडांवर एकाच प्रकारची फळं येत. त्यामुळे या झाडावरची फळं मिळाल्यानं ती आनंदून गेली.

तिला एका झाडावर कोकीळा भेटली. तिच्यासोबत टिंकीने गट्टी केली. आपल्या सोबतच राहा, असं टिंकीला, कोकीळेनं सांगितलं.

   बघता बघता रात्र झाली. टिंकीला आई -बाबांची आठवण येऊ लागली. इकडे टिंकीचे आई – बाबाही काळजित पडले. रात्र झाली तरी पोर आली नाही म्हणून आईने हुंदका दिला. टिंकीला उगाच रागावलं म्हणून बाबांना वाईट वाटलं. इतर बहिणीही काळजित पडल्या. आतापर्यंत आनंदानं आणि उत्साहानं बागडणाऱ्या टिंकीलाही  काळजी वाटून रडू येऊ लागलं. पण तिने लगेच स्वत:ला सावरलं. ‘आता रडायचं कशाला ? स्वत:हूनच नाही का इकडे आलो?  आईबाबा काळजी करत असतील, तर उद्या जाऊ नि त्यांना सांगू की आता तुम्ही काळजी करु नका. माझं आभाळ मला मिळालय.मी तिथेच राहणार.’असा विचार मनात येताच टिंकीस खूप बरं वाटलं.

दिवसभर खेळल्याने ती दमून गेली होती. त्यामुळे तिला लगेच झोप लागली. दुसऱ्या दिवशी कोकीळ पक्ष्याच्या आरवण्यानं तिला पाहटेच जाग आली. तिने कोकीळेस सांगितलं की, आता, आईबाबांकडे जाऊन माझी काळजी करु नका असं सांगते.

ती उलट्या दिशेनं एकेक झाडावर उड्या मारत पुन्हा आई-बाबा, तिच्या बहिणी राहत असलेल्या झाडाकडे परतली. तिला बघताच सर्वांना आनंद झाला. आईने तिला पोटाशी धरले. बाबांनी पाठीवरुन मायेने हात फिरवला. आईबाबा म्हणाले,

आम्ही आता तुला कधी रागवणार नाही बरं का टिंकी, तू इथेच मनासारखं वागं. मनासारखं खेळ.

आई-बाबा, तुमच्यावर रागावून मी थोडेच गेले होते. एकाच ठिकाणी किती दिवस राहायचं? नव्याचा शोध घेतला पाहिजे. त्यासाठी हे घर तर सोडावच लागेलना.काल मी तिकडे जंगलात गेले तेव्हा किती नव्या गोष्टी दिसल्या मला. खूप नवी फळं खायला मिळाली. नव्या मैत्रिणी मिळाल्या. आता मला तिकडेच जायचंच.टिंकी म्हणाली.

आई-बाबा आणि बहिणींनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती काही थांबली नाही.

टिंकी पुन्हा उड्या मारत जंगलात पोहचली. तिची मैत्रिण कोकीळा तिची वाट बघत होती. कोकिळीने तिला मग पूर्ण जंगल दाखवलं. हे अनोखं जग बघून टिंकी हरखून गेली.

तिने, आता कोकीळेसोबतच पोपट, चिमणी, कोतवाल, निळकंठ अशा पक्षांशी मैत्री केली. नवे मित्र करण्याचा छंद जडला. वानरदादांच्या लहानग्यांसोबत तिची गट्टी झाली. त्यांच्या अंगावर बसून तिही झाडांच्या फांद्यांना लटकू लागली. झाड्याच्या शेवटच्या टोकाला जाऊन ती लुसलुशीत पानं खाऊ लागली. तिची निरीक्षण क्षक्ती उत्तम होती. त्यामुळे वानरदादा आणि त्यांचे लहानगे जशा उड्या मारत तसे ती प्रयत्न करु लागली. या प्रयत्नांचं वानरदादांना कौतुक वाटायचं. त्यामुळे ती उड्या मारत असताना दोनतीन वानरदादा कौतुकानं तिच्याकडे बघत. कधी कधी तिची उडी चुकली तर चपळाई करुन ते तिला पकडत.

असं टिंकीचं नव्या जंगलात छान सुरु होतं. मात्र काही दिवसांनी तिला आणखी नवं काही तरी बघायची इच्छा झाली. तिने कोकीळेस तसं सांगितलं. तेव्हा ती म्हणाली,

अगं टिंके, तू स्वत:चं घर सोडून इथपर्यंत आलीस ते ठीक. आतापुढे कुठे जाणार? यापुढे आणखी घनदाट जंगल आहे. इतकं की तिथे म्हणे सूर्य प्रकाशही पोहचत नाही. तिथे म्हणे शिकारी राहतात. तिकडे कुणी फिरकलं तर त्यांना ते ठार करतात. कशाला बाई सुखाचा जीव धोक्यात घालायचा. इथे तुला छान खायला मिळतं. खेळायला मिळतं. आणखी काय हवं, नाही कां?’

कोकीळेने सांगितलेलं टिनीने काळजीपूर्वक ऐकलं. आपल्याबद्दलची काळजी कोकिळेस वाटत असल्याचं बघून तिचं ह्रदय भरुन आलं. मात्र, आणखी पुढे जाण्याचा केलेला निश्चय तिने काही मोडला नाही.

टिंकी म्हणाली,

कोकीळाताई, आपण पुढे गेल्याशिवाय समोर काय, आहे हे कसं बरं कळेल. घनदाट जंगलात शिकारी राहतात, ही फक्त एैकीव माहिती नाही का? मग त्याचा कुणीतरी तपास करायला नको का? असं घाबरुन कसं चालेल. मी घाबरले असते तर माझ्या आईबाबांना सोडून या जंगलात ये शकले असते का? तुझ्यासोबत माझी मैत्री झाली असती का? नाहीना. म्हणूनच आता मी इथून पुढच्या जंगलात जाईल. असं म्हणतात की आपल्या मनातच भीती असते. ती एकदा काढून टाकली की मग, कशाची आणि कुणाची जरासुध्दा भीती वाटत नाही. कितीही संकटं आलं तरी त्यावर मात करता येतं.

टिंकी ऐकणार नाही, हे लक्षात आल्यावर कोकीळेनं सर्व मित्रांना बोलावून टिंकीला निरोप दिला. वानरदादा आणि त्यांच्या लहानग्यांच्या डोळयातून अश्रू ओघळले. स्वत:ला आवरुन टिंकी पुढच्या प्रवासाला निघाली.

कोकीळा म्हणाली होतं, त्याप्रमाणे पुढचं जंगल आणखी घनदाट होत गेलं. मात्र आतापर्यंत तिने बघितलेल्या झाडांपेक्षा वेगळया वेगळया आकाराची, लांबींची, बुटकी, अवाढव्य, आभाळापर्यंत पोहचणारी झाडं, त्यावरची वेगळया रंगांची फुलं, वेगवेगळया आकारांची फळं टिंकीला दिसली.

ही झाडं एकमेकांना खेटून असल्यानं टिंकी झपाझप एका झाडावरुन दुसऱ्या झाडावर विनासायास जात राहिली. अशी ती खूप दूर आली. अचानक तिला काहीतरी खाली चमचमताना दिसलं. चांदीसारखं शुभ्र असं. ती उत्सुकतेनं खाली उतरली. बघते तर काय, त्या जंगलाच्या मधोमध एक सुंदर नदी वाहत होती. ते पाणी इतकं स्वच्छ होतं की त्यात टिंकीला स्वत:ची छबीही दिसली.

पाण्यातली अशी छबी तिने कधी बघितली नव्हती. तिला हे पाणी प्यायची इच्छा झाली. तिने आपल्या इवल्याशा जिभेने पाणी पिलं. अहाहा ! कार्य वर्णावी या पाण्याची गोडी. असे मधूर पाणी तिने कधीही प्याले नव्हते.

हळूहळू रात्र झाली. ते घनदाट जंगल भेसूर वाटू लागले. त्या निरव शांततेत वेगवेगळ्या प्राण्यांच्या आवाजानं आणखी भीतीदायक वातावरण निर्माण झालं. टिंकी कावरीबावरी झाली. आपण कोकीळेचं ऐकलं असतं तर बर झालं असतं, असं एक मन तिला म्हणालं. मग तिने डोळे मिटले. लांब श्वास घेवून सोडला. हळूहळू डोळे उघडले. त्या किर्र रात्री इकडे तिकडे काहीच दिसत नव्हतं.

एव्हाना आभाळात चंद्रोदय झाला होता. तारे- तारकाही आकाशात अवतरल्या होत्या. त्या सर्वांचं प्रतिबिंब नदीच्या पात्रात पडलं होतं. ते दृष्य मनमोहक होतं. ते बघून टिंकी आनंदली. आपण असं इथे आलो नसतो तर हे दृष्य कधी दिसलं असतं का, तिने स्वत:लाच विचारलं. ती खुदकन हसली. या निरव घनदाट जंगलात तिच्या इवल्याशा हसूने सुध्दा शांतता भंग पावली. त्याचवेळी तिथून जाणाऱ्या देवदुताच्या कानावर ते हसू गेलं.

किर्रSS रात्री इतक्या घनदाट जंगलात या नदीच्या किनारी कोण बरं आलं असेल? त्याला भीती नसेल का वाटली असं देवदुताला वाटलं. तो नदी किनाऱ्यावर आला. तिथे टिंकीला बघून आश्चर्यचकित झाला. कधीही या ठिकाणी त्याला इवलासा जीव दिसला नव्हता. त्याला टिंकीचं कौतुक वाटलं.

बिचारी रस्ता चुकलेली दिसते, असे मनात म्हणत तो टिंकी समोर प्रगटला. देवदुताच्या प्रकाशाने टिंकीचे डोळे दिपले. आता आपण खरोखरच संकटात सापडलो याची तिला जाणीव होत असतानाच पुन्हा एकदा तिने स्वत:ला धीर दिला. समोर प्रगटलेल्या देवदुताकडे धीटपणे बघितलं. ते बघून तो देवदूत आणखी आश्चर्यचकित झाला. टिंकी जवळ बसून म्हणाला,

काय गं, तू इथे चुकून माकून आली का? तुला आता भीती तर वाटत नाहीना.

त्या प्रेमळ बोलण्यानं टिंकीला बराच धीर आला.

ती न घाबरता म्हणाली.

मी चुकूनमाकून अजिबातच आले नाही. ठरवून इथे आले. काही क्षण भीती वाटली. मग या भीतीला म्हटलं, जा बाई माझ्या दूर. मी भ्याले असते तर इथे आले नसते.नवा शोध मला लागला नसता.

तुझं काही बरं वाईट झालं असतं तर?’ देवदुतानं विचारलं.

बऱ्याचाच विचार आधी करावा. तसा तो करत  राहिला तर बरच होणार ना.वा ईट घडायचं असेल तर या बऱ्या विचारानं वाईटाचा सामना करण्याची शक्ती नाही का मिळणार?तशी मला मिळते.

पिटुकल्या टिंकीचं उत्तर ऐकून देवदूत खूष झाले. ही पिटकुली असली तरी आत्मविश्वासानं भारलेली आहे. असा आत्मविश्वासच प्रगती घडवतो, यश मिळवून देतो. असं देवदुतानं तिला सांगितलं. तिच्या या शौर्य आणि आत्मविश्वासाचं बक्षीस देण्याचं त्याने ठरवलं.

टिंकी, तू आज पासून या जंगलाची राणी!’ असा आशीर्वाद देऊन देवदूत निघून गेला.

ही वार्ता सर्व प्राणी-पक्षी यांच्यापर्यंत वाऱ्यामार्फत जाईल याची काळजीही त्याने घेतली.

जंगलाच्या आत कुणीच भीतीदायक राहत नाही,हे सर्व प्राणी- पक्ष्यांना कळून चुकलं. आपण ऐकीव माहितीवरच विसंबून राहिलो. पण टिंकी  हिमतीने तिथे गेली. ती खरोखरच जंगलाची राणी बनण्याच्या पात्रतेची असल्याचं सर्व प्राणी- पक्ष्यांचही मत झालं.

सुरेश वांदिले

०००