(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

टू बी ऑर नॉट टू बी

  शेक्सपिअर सर अत्यानंदाने नाचू लागल्याचं बघून कालीदास बुवांना अतिव आश्चर्य वाटलं. हा म्हातारा या वयात बूड हलवण्याची, हातपाय वर करण्याची क्रिया करुन स्वत:चे हातपाय तोडून घेण्यास कां बरं तयार झाला असेल, असं काहीसं, तो नाचो अथवा खड्डयात जावो, असा वैश्विक सुज्ञ विचार करत बुवांनी सरांना न राहवून विचारलं,

  सर, आज खुष दिसता तुम्ही. एकदम रामप्रहरी नाचायलाच लागलात की.

  हा कोण दिवटा, आपल्या आनंदात व्यत्यय आणणारा, असं वाटून सरांनी मान वळवून बघितली, समोर कालीदासबुवा बघून त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी जशी नाराजीची इंग्लंडी रेष उमटायची तशी आज उमटली नाही. बुवानांही आश्चर्य वाटलं. कारण असं ते दोघं इंद्रप्रस्थात पहिल्यांदा भेटले तेव्हापासून पहिल्यांदाच घडलं होतं.

  कालीदासबुवांना आर्यावर्ताचा शेक्सपिअर असं आर्यावर्तातले स्वत:स प्रज्ञावंत म्हणणारे काही भंकस आणि भंकप मनुष्यप्राणी समजतात, असं इंद्रप्रस्थी एकदा बडाखान चंगेझखान यांनी त्यांच्या कानी टाकलं तेव्हापासून ते कालीदासबुवांवर खार खाऊन होते. त्यामुळे बुवा जेव्हाजेव्हा रामप्रहरी इंद्रप्रस्थाच्या उद्यानात फिरताना दिसत, तेव्हातेव्हा आपण आता फिरायचं की नाही हा, टू बी ऑर नॉट टू बी प्रश्न, स्वत:लाच विचारुन ते माघारी परतायचे.

  आज कालीदासबुवांचा प्रश्न कानी पडताच शेक्सपिअर सर नाचायचे थांबून त्यांनी बुवांना करकचून मिठी मारली.अशी मिठी बुवांच्या एकाही नायकाने नायिकेस कधीही मारली नव्हती. गुदमरवून टाकणाऱ्या या मिठीतून कशीबशी सुटका करत बुवांनी सरांच्या आजच्या अत्यानंदाचं कारण पुन्हा विचारलं.

  बुवा,आनंदानं मी आज बेहोष कां झालो नाही. हे मज कळत नाही.

  पण सर,आज असे झाले तरी कायतुम्हास इथे नवे प्रेमप्रकरण सुरु करण्याची प्रेरणा सुश्री रंभाजींनी दिली की सुश्री मेनकाजींना बघताच नवी सुनितं तुम्हास सुचली. की एलिजाबेथ टेलर यांसी बघून,अशीच जर असती आमची अर्धांगीनी तर तर असं वाटून गेलं नाही ना.

  नाही हो कालीदासबुवा. जेव्हा आमच्या इंग्लंडावर सूर्यच मावळत नव्हता तेव्हा आम्ही मनात आणलं असतं तर, आमचे राजेसाहेब जेम्स एक यांनी दक्षिण गोलार्धापासून ते उत्तर गोलार्धापर्यंत कोणत्याही प्रांतातील एलिझाबेथ टेलरला झक मारायला लावेल अशा पाचपन्नास मदनिकांचा नजराणा आम्हास पेश केला असता. तेव्हा तसं काही समजू नका.

  मग असे आज झाले तरी काय सर,

  अहो, कालीदासबुवा आम्हास आत्ताच कळले आहे की, पृथ्वीतलावरील सांप्रतकालीन मनुष्यप्राण्याने संगणक नावाच्या यंत्रात गणिताची काही सूत्रबित्र टाकून त्याच्या मदतीने, त्यास जे एक नाटकाचे बाड लंडनच्या जुनी पुस्तकं विकणाऱ्या दुकानात सापडलं, ते म्हणे आम्हीच लिहलय, हे सिध्द करता आलय.

  पण यात नाचून आनंद मनवण्यासारखं काय आहे सर?

  अहो बुवा, आम्हास नेहमीच हे असच वाटत होतं ना. पण ते कुणी कधी मनावर घेतलं नाही. सौ. ॲनी राणीसाहेब या आर्यवर्ताच्या राणी म्हणून जेव्हा मिरवत होत्या, तेव्हा त्यांनी सुध्दा आमचं ऐकलं नाही. आम्ही एके दिवशी त्यांसी कॉमेडी ऑफ एरर या नाटकाचा पहिला ड्रॉफ्ट वाचून दाखवून असताना सांगितलं होतं की राणी सरकार या जगातले सारे साहित्य आम्हीच आणि आमच्या पूर्वजांनीच लिहिल्याची आमची खात्री ,विश्वास आणि अतूट श्रध्दा आहे. पण त्यांच्या पिटुकल्या मेंदूपर्यंत आमची बात नीट पोहचलीच नाही.

  सर, तुम्हाच म्हणावयाचे तरी काय,

  आता हेच बघा ना बुवा, इलियड नाटकाचं श्रेय त्या ग्रीसच्या होमर का फोमरला दिले जाते. होमरला असे महाकाव्य लिहिण कसं शक्य आहे बुवा. ते शेक्सपिअरनच लिहलं असलं पाहिजे.

आँ.

  अहो ते महाभारत. कुणीतरी ऐरागैरे व्यासमुनी यानं लिहिलं म्हणतात. जगात जे जे काही घडून गेलं किंवा जे जे घडणार आहे ते ते सारं ऑलरेडी महाभारतातच आहे. इतर जे कुणी लिहितील. ते उष्टच असणार. असं अमर वचन त्या कुणीतरी व्यासांना कसं बरं सुचू शकतं. ते सुचणार ते, जग ही एक रंगभूमी असून सर्व मनुष्यप्राणी हे या रंगमंचावरील नट आहेत. रंगमंचावरील त्यांचा प्रवेश आणि त्याचं जाणं हे ठरलेलं असतं आणि एकास या रंगभूमीवर अनेक भूमिका बजवाव्या लागतात,असं शाश्वत सत्य सांगणाऱ्या शेक्सपिअरलाच की नाही.

  शेक्सपिअर सर, व्होडका आणि स्कॉच एकत्र न घेताही तुम्ही असे कसे बहकू शकता.

अहो बुवा हे बहकणे नव्हे. हे वास्तव आहे.आम्हास तर अशी सुध्दा दाट शंका आहे की तुमच्या नावावर ज्या मेघदूत, कुमारसंभवची तिकिटं फाडली जातात, ते सुध्दा शेक्सपियरनेच लिहिलं असलं पाहिजे.

  तुम्ही काहीतरीच काय बरळता शेक्सपिअर सर.

  कालीदासबुवा आम्ही बरळत नाही. सौ.ॲनी राणी सरकारांनी आमच्या सांगण्याकडे तेव्हा दुर्लक्ष केलं. पण येशूच्या दरबारी, देर है लेकिन अंधेर नही है, असं म्हणतात, ते अखेर सत्य ठरलं. सांप्रतकालीन मनुष्यप्राण्यानं शोधलेला संगणक आता बघा गणितातील सूत्रांच्या मदतीने शेक्सपिअरनेच इलियड लिहिलं. शेक्सपियरनेच महाभारत लिहिले, शेक्सपियरचीच लिखाणाची शैली मेघदूतपर्यंत पोहचते असे सिध्द करेल..हा हा हा आहात कुठे तुम्ही बुवा..

  हे ऐकायला कालीदासबुवा शुध्दीवर कुठे होते. त्यांना केव्हाच ग्लानी येऊन ते खाली पडले होते..