एकदा कोल्होबा आणि लांडगोबांनी ठरवलं की, सिंहासारखा आळशी प्राणी आपला राजा कसा काय राहू शकतो? यापुढे त्याला वननगरीचा राजा राहू द्यायचा नाही. आता आपणच सत्ता हाती घेतली पाहिजे.
“तुम्ही राजे!” लांडगोबा कोल्होबांना म्हणाले.
“तुम्ही आमचे प्रधान!” कोल्होबा लांडगोबास म्हणाले. दोघांनी एकमेकांना पायांनी टाळ्या दिल्या.
पण लांडगोबा, कल्पना तर उत्तम आहे. पण आम्ही राजा होण्यासाठी सध्याचे राजे सिंह महाराजाचा काटा काढला पाहिजे ना. तो आळशी असली तरी इतका बलशाली नि बलदंड आहे की आपण त्याच्यासमोर धड उभेही राहू शकत नाही. त्याला हरवणार कसं आपण?”
“कोल्होबा, तुम्ही कशाला काळजी करता. आपण युक्तीने सिंहाचा नायनाट करु. त्याच्या शक्तीपुढे आपली युक्ती भारी ठरेल बघा.” लांडगोबा म्हणाले.
कोणती युक्ती करायची हे त्यांनी कोल्होबांच्या कानात सांगितलं. ते ऐकून कोल्होबांचे डोळे चमकले. त्यांना दिवसाच्या लख्ख प्रकाशात आपण जंगलाचे राजे झाल्याचं स्वप्न पडलं. या धुंदितच ते लांडगोबांना म्हणाले,
“प्रधानजी, चला तर मग त्या मूर्ख सिंहाकडे, त्याचा बंदोबस्त करण्यासाठी.”
“अरे, कोल्होबा जरा धीर धरा. अजून कशात काही नाही, आणि तुम्ही स्वप्न बघायलाही सुरुवात केली.”
लांडगोबांचे हे बोल ऐकल्यावर कोल्होबा ओशाळले. त्यांनी लांडगोबांची क्षमा मागितली. असा उतावीळणा पुन्हा करणार नाही असं सांगितलं.
दोघेही ठरल्यानुसार सिंह महाराजांकडे गेले. मनातून ते घाबरले होतेच. पण त्यांनी तसं काही दाखवलं नाही.मात्र सिंह महाराज समोर दिसताच त्यांची बोबडी उडाली. ते त त तप करायला लागले.
“अरे, तुम्ही असं घाबरता कशाला? मी अजून माझा पंजा उगारला नाही तुमच्यावर.” सिंह महाराज हसत म्हणाले.
महाराजांच्या हसण्यामुळे कोल्होबा आणि लांडगोबांना आलेला तणाव दूर झाला.
लांडगोबा, हिम्मत करुन म्हणाला. “महाराज, तुम्ही किती दयाळू आहात. कृपावंत आहात. पण तुमच्या या स्वभावाचा फायदा घेण्यासाठी दुसऱ्या वननगरीतला सिंह आपल्या राज्यात आलाय महाराज. तो फार दुष्ट आहे.”
“एका जंगलात दोन सिंह महाराज कसे काय राहू शकतील ना महाराज.” कोल्होबाने मखलाशी केली.
“हो का?मला हे माहीतच नव्हतं.”
“तेच सांगायला आलो महाराज.वेळीच सावध व्हा नि त्या दुसऱ्या सिंहाचा बंदोबस्त करा.”
“पण, तुम्हाला हा दुसरा सिंह कुठे बरं भेटला?”
“अहो महाराज, आपल्या वननगरीच्या मध्यभागी असणाऱ्या विहिरीत लपून बसलाय तो.”
“म्हणजे फारच घाबरट दिसतोय हा सिंह.”
“महाराज ताबडतोब चला तिथे नि त्याचा बंदोबस्त करा.”लांडगोबा म्हणाले.
सिंह महाराज त्यांच्या बरोबर विहिरीपर्यंत आले. महाराज जरा बघा या विहिरीच्या पाण्यात तो दडलेला सिंह दिसेल तुम्हास.
सिंह महाराजांनी पाण्यात डोकावून बघितलं. त्यांना त्यांचं प्रतिबिंब दिसलं. काही क्षणांनी त्यांनी वर बघितलं.
“महाराज काय झालं? तुम्ही त्या दुसऱ्या सिंहाला मारण्यासाठी उडी घेतली नाही पाण्यात?” राजा होण्यासाठी उतावीळ झालेला कोल्होबा म्हणाला.
“उडी मारणार तोच मला तिथे एक कोल्होबा आणि लांडगोबा पण दिसला ना. मी उडी मारायची नि ती नेमकी कोल्होबाच्या अंगात पंजा घुसायचा. येणार की नाही आफत?”
“आँ!”कोल्होबांनी आँ फाकला. लांडगोबाची मान खाली गेली.
“अरे मूर्खांनो, किती काळ त्याच जुन्या गोष्टींना घेऊन बसणार तुम्ही.आता तरी शहाणे व्हा. नव्या कल्पना काढा. मी कल्पनेच्या जगात राहणं सोडून दिलय.तुम्हीपण सोडा.या वन नगरीतला सिंह असो की दुसऱ्या वननगरीतला तो असा पाण्यात दडून राहणार नाही. तो जंगलातल्या गुहेतच राहणार ही साधी गोष्ट कशी लक्षात आली नाही तुमच्या.”दोघांचेही कान उपटत महाराज म्हणाले.
त्या दोघांनी महाराजांची क्षमा मागण्याचा प्रयत्न केला पण महाराजांनी त्यांचं काही ऐकलं नाही.कोल्होबा आणि लांडगोबास जंगलातून हाकलून लावले.
सुरेश वांदिले