तोतया वाघोबा?
एकदा वननगरीत वाघोबा आणि त्यांची दोन मुलं रमतगमत चालली होती. फिरता फिरता त्यांना एक तलाव लागला. तलावातील वनस्पतींना सुंदर सुंदर फुलं लागली होती. तलावात बदक आणि दुसरे पक्षी छान विहार करत होते. तलावाच्या भोवती असणारी झाडे फुलं-फळांनी लदबदून गेली होती. त्यांचा मोहक सुगंध सर्वत्र दरवळत होता. त्या झाडांवर माकडं इकडून तिकडे उड्या मारत खेळत होती. वेगवेगळे पक्षी झाडांवर निवांत बसले होते. काही पक्षी डुलक्या घेत होते, काही फळं-फुलं खाण्यात मग्न होते. काही पक्षी गात होते. असे ते प्रसन्न वातावरण बघून वाघोबास तिथे काही क्षण थांबण्याची इच्छा झाली. त्याने दोन्ही बछड्यांना तसं बोलून दाखवलं.त्यांनाही तहान लागलीच होती.ते लगेच हो म्हणाले.
तिघांनीही आधी तलावाचं चवदार पाणी प्राशन केलं. ते गोड पाणी पिऊन तिघांची तहान शांत झाली. पाणी प्याल्यानंतर तिघेही एका मोठ्या डेरेदार वृक्षाच्या सावलीत येऊन बसले. त्या सावलीत वाघोबांना थोड्यावेळाने झोप आली.
वाघोबा झोपल्याचं बघून दोन्ही बछडे खेळू लागले. त्या झाडावर काही माकडं आणि त्यांची पिल्लं दंगामस्ती करत होती. वाघोबांची पिल्लं बघून माकडांच्या पिल्लांना मजा वाटली. त्यातला एकजण झरझर खाली आला. एका पिल्लाची मिशी ओढून पटदिशी झाडावर चढून गेला. त्यानंतर दुसरा पिल्लू झरझर खाली उतरला. दुसऱ्या बछड्याची शेपूट ओढून तोही पटदिशी झाडावर चढला. वाघोबांच्या दोन्ही बछड्यांनी त्यांच्याकडे हसून बघितलं. ते बघून त्या झाडावरची मोठी माकडं आश्चर्चकित झाली. कारण, ते बछडे जरी असले तरी ते वाघच होते. शक्तीशाली,चपळ.तीक्ष्ण दात असलेले.शिकारीत तरबेज असलेले. अशांची छेडछाड करणे म्हणजे जीवावर उदार होणेच!
माकडाच्या दोन्ही पिल्लांना त्यांच्या आईबाबांनी तसं समजावलही. पण त्यांनी इकडून ऐकलं नि तिकडून सोडून दिलं. त्यांनी वाघोबाच्या बछड्यांना पुन्हा छेडलं. पण त्या दोघांनांही राग न येता,ते दुसऱ्यांदाही हसल्याचं बघून ते दोघे वाघोबाच आहेत की आणखी कुणी दुसरे तोतये? अशी शंका मोठ्या माकडांना येऊ लागली. मात्र बाजूला झोपलेला वाघच असलेल्याची काही मोठ्या माकडांना खात्री पटली होती.तर काहीजण मात्र तोही तोतयाच आहे असं म्हणू लागले. यावरुन त्या माकडांमध्ये दोन गट पडले. ते जोरजरात वाद करु लागले. हमरीतुमरीवर आले.
त्यांच्या आरडोओरडीमुळे वाघोबांची झोपमोड झाली. ते आळोखे-पिळोखे देत जागे झाले. त्यांनी डरकाळी फोडली. त्या आवाजाने माकडं घाबरली. काही माकडं त्यांच्यासमोर खाली पडली. वाघोबांना इतक्या जवळ बघून काहींची शुध्द हरपली. काहींना काय करावं हेच सुचेनासं झालं. वाघोबांच्या जवळून पळून जाण्याचंही भान त्यांना राहिलं नाही. त्यांची ती अवस्था बघून वाघोबांना हसू आलं. बछड्यांनांही हसू आलं. मात्र तिघांपैकी कुणीही माकडांवर हल्ला केला नाही. त्या तिघांचं हसणंही तसं तुच्छतादर्शक नव्हतं.
या तिघांचं हसणं बघून, जी माकडं खाली पडली नव्हती आणि ज्यांनी झाडाच्या फांद्यांना घट्ट पकडून ठेवलं होत, त्यांना तिनही वाघ नक्कीच तोतयाच असले पाहिजे असं,वाटू लागलं.
आपण उगाचच घाबरतो बुवा, या तोतयांना? चांगलाच धडा शिकवला पाहिजे. वाघ बणून आमच्या डोळयात धूळ फेकता काय? बघा आता कशी शिक्षा करतो ते आम्ही! असं दोन तीन मोठी माकडं एकमेकास म्हणाली. त्यांनी वाघोबाच्या समोर उडी मारली.
काय रे तोतया, भामट्या, कोण आहेस तू? वाघाचं सोंग घेऊन आम्हाला घाबरवतोस!
कोण तोतया? कोण भामट्या? वाघोबाने शांतपणे विचारलं.
तू आणि ही तुझी दोन पिल्लं! माकडं म्हणाले.
अहो काका,तुमचा काहीतरी गैरसमज होतोय.एक बछडा म्हणाला.
गैरसमज हा हा हाSSS, अरे, भामट्यांनो वाघाने कसे वाघासारखे वागले पाहिजे ना! पण तुम्ही...
आम्ही काय केलं?वाघोबांनी शांतपणे विचारलं.
भामट्यांनो,अरे जेव्हा आमची पिल्लं खाली येऊन तुमच्या बछड्यांची मिशी ओढतात ,शेपूट ओढतात,तरी ही मुलं हसतात त्यांच्याकडे बघून.
माझी बछडी तुमच्या मुलांकडे बघून हसली म्हणून तुम्हाला आम्ही तोतया वाटतो का माकडोबा?आम्ही काय करायला पाहिजे होतं,म्हणजे मग तुमची गैरसमजूत नसती झाली? वाघोबांनी विचारलं.त्यांना आता राग आला होता.
त्यांनी आपला जबडा उघडून डरकाळी फोडली.ते बघून दोन्ही मोठी माकडं गर्भगळीत झाली.
मूर्खांनो,दैव वाईटच वागलं पाहिजे का? आमच्या मुलांना आम्ही तसे संस्कार केले नाहीत.चांगलं वागण्यासाठी शक्ती लागते. ती आम्ही बछड्यांना दिली. ते त्यांचं वागणं तुम्हाला खुपलं. तोतयेगिरी वाटली.
वाघोबा वाघोबा चूक झाली. क्षमा असावी. त्यातला एक माकड कसाबसा म्हणाला. दुसरा माकड तर बेशुध्द पडला. झाडावरची इतर माकडं थरथर कापू लागली.
दुसऱ्यांचा चांगुलपणावरही विश्वास ठेवा जरा.जे चांगले वागतात त्यांच्यावर यापुढे शंका घेतली तर, याद राखा, गाठ माझ्याशी आहे.असं बोलून वाघोबाने पुन्हा डरकाळी फोडली. त्या डरकाळीच्या आवाजाने आणखी काही माकडं खाली पडली. त्यांची ती अवस्था बघून तिघांनांही हसू आलं.एकमेकांना टाळ्या देत ते तिघेही तिथून निघाले. एकाही माकडास त्यांनी काहीही केलं नाही.
ते निघून गेल्यावर रात्रभर माकडं,वाघोबा आणि त्याची बछडी तोतया होती का खरी? यावर डोके फोड करत बसली.
सुरेश वांदिले