(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

एकदा कोंबडे आजोबा आपल्या नातवंडांना घेऊन फिरायला निघाले. थोडं फिरुन झाल्यावर नातवंडं थकली. त्यामुळे आजोबा एका झाडाच्या सावलीत बसले. त्यांच्या अवतीभवती नातवंडं बसली. त्यातील काही जण आजोबांच्या पाठीवर बसून खेळू लागली. तर काही नातवंडं त्यांच्या तु-याशी खेळू लागली. नातवडांच्या या खेळात आजोबा रममाण होऊन गेले. खेळता खेळता एका नातवानं त्यांना अचानक विचारलं,

आजोबा आजोबा, आपण सकाळी आरवतो म्हणून सूर्य उगवतो कां हो?

या प्रश्नावर आजोबा हसले.

आजोबा हसता कशाला? नातवाने रुसून विचारलं.

सूर्य महाराज आपल्या आरवण्यामुळे उगवतात असं तुला कुणी सांगितलं? आजोबांनी विचारलं.

कुणी कशाला सांगायला हवं. लहानपणापासून तेच तर कानावर पडतय ना!

म्हणजे तू मोठ्ठा झालास वाटतं, त्या पिल्लूकडे बघून हसत आजोबा म्हणाले.

आजोबा, हे काही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही.

बाळा, आपल्या बाबतीतली ही दंतकथा. म्हणजे याने त्याला सांगितली,त्याने याला सांगितली, असं करत करत ती तुमच्यापर्यंत पोहचली.

अहो आजोबा, आपण आरवलो की सकाळ झाली असं सगळं जग समजतं.

अगदी बरोबर.

पण, सूर्यमहाराज उगवल्यावर सकाळ होते ना.

अगदी बरोबर.

म्हणजे याचा अर्थ आपण आरवतो तेव्हाच सूर्य महाराज उगवतात आणि सकाळ होते.

बरोबर. आजोबा बोलून गेले.

आजोबा, हेही बरोबर तेही बरोबर तर मग आपल्या आरवण्याची दंतकथाही बरोबरच ना!

अरे, तुम्ही तर माझी उलट तपासणीच घेतली. आजोबा हसत म्हणाले.

अहो, ही आजची स्मार्ट पिल्लं.हुषार आणि चुणचुणित.त्यांचं कौतुक करावं तितकं कमीच!

असं कुणीतरी झाडाच्या आडून बोललं. आजोबा आणि नातवंडाचं लक्ष तिकडे गेलं. मनुष्यरुपात सूर्यदेवच तिथे आले होते.

सर्वांनी त्यांना नमस्कार केला.

एका धीट पिल्लूने सूर्यदेवांना विचारल, समजा आम्ही आरवलोच नाहीत तुम्ही उगवणार नाही का सूर्यदेवा.

बाळा, मी उगवण्यासाठी मला जाग तर यायला हवी ना. ती तुमच्या आरवण्यामुळे येते. माझ्या आईबाबांच्या घरी अलार्म घडी नाही.तेव्हा तुम्हीच माझे अलार्म.

म्हणजे आमच्या आरवण्याचा इतका प्रभाव आहे म्हणायचा!

बघा आजोबा, आम्ही तेच सांगत होतो.तर तुम्ही आपले दंतकथा ऐके दंतकथा करत बसलात. एक नातू आजोबांना म्हणाला.

अरे बाळा, असं आजोबांना रागावू नकोस. ते म्हणतात, तशी कोंबडा आरवणं नि सकाळ होणं ही दंतकथाच आहे की.

आँ! आजोबासकट सगळया नातवांडांनी आँ फासला. काही क्षणापूर्वी सूर्यदेव वेगळच म्हणत होते, आता त्याच्या अगदी विरुध्द बोलताहेत.

सूर्यदेवा, तुम्ही तुमच्या बोलण्यावर ठाम राहा. आधी एक नंतर दुसरं असं गोलमटोल काही बोलू नका.

नाही रे बाळांनो, तुम्ही आरवता तेव्हा मी उगवतो नि मग सकाळ होते, हे सिध्द झालं नाहीय. एखादी गोष्ट सिध्द होत नाही तोपर्यंत तेव्हा ती दंतकथाच असते. आजच्या स्मार्ट मुलांनी दंतकथेचा उगाच अभिमान बाळगू नये. विज्ञानाने सिध्द झालेली गोष्ट खरी समजायची. बरोबर ना आजोबा. सूर्यदेव हसत म्हणाले.

बरोबर बरोबर सूर्यदेवा, तेच यांना सांगत होतो. आपल्याशी निगडीत दंतकथा उगाळत बसलो तर फुकाशी फुशारकी ठरते आणि त्यातून अहंकार येतो. ज्याच्या अंगी अहंकार, त्याचा होतोसर्वनाश…

कळलं का रे बाळांनो.सूर्यदेव म्हणाले. आणि त्यांनी सर्वांचा निरोप घेतला.

संध्याकाळ झाल्याने आजोबांसोबत नातवंडं घराकडे निघाली. घरी पोहचताच आजोबा नातवंडांना जवळ घेत म्हणाले, सध्या त्या दंतकथा नि अहंकाराचा फारसा विचार करु नका. मस्त खेळा, बागडा. दंगा करा.मस्ती करा.गाणी गा आणि

आणि काय?

आजोबांना विसरु नका.आजोबा म्हणाले. सर्व नातंवडं आजोबांना बिलगून त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करु लागली.

सुरेश वांदिले