(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

धडा

चंद्रयान तीनचा प्रवासी प्रज्ञान, चंद्राच्या दक्षीण ध्रुवावर अलगद उतरला. त्यादिवशी तेजोमयीच्या घरी आईने रात्री शिरा केला. भजी केली. अशा छोट्या पार्टीने हा आनंद साजरा केला.

रोव्हर चंद्रावर अलगद उतरले तेव्हा बाबा, तेजोमयी आणि आईने टाळ्या वाजवल्या. म्हणजे याचा अर्थ काहीतरी आनंददायी घडलयं याची खात्री पटून अलेक्झांडरने सोफ्यावरुन खाली उडी मारत नि पुन्हा सोफ्याकडे झेपावत आपला आनंद व्यक्त केला.

बाबा किती सोप्प असतं ना आनंद व्यक्त करणं? तेजोमयीने अलेक्झांडरकडे बघत बाबांना विचारलं.

म्हणजे गं काय? आईला तिच्या प्रश्नाचा रोख न कळल्यामुळे विचारलं.

चंद्रयान ३ ची स्वारी यशस्वी करण्यासाठी किती कठीण परिस्थितीचा सामना शास्त्रज्ञांना करावा लागला,असं मला म्हणायचं होतं.

हो मग? कोणतीही अशक्यप्राय गोष्ट साध्य करण्यासाठी अशा कठीण परिस्थितीचा सामना करावाच लागतो. बाबा उत्तरले.

काय हो बाबा, या चांद्रयान-३ गोष्टीचे तात्पर्य काय समजायचं आपण? तेजोमयीनं विचारलं.

अगं, वेडाबाई ही काही गोष्ट नाही. सत्य आहे. आई हसत म्हणाली.

बरं बाई, सत्य तर सत्य! मग या सत्याचं तात्पर्य काय? तेजोयमीने आपला मुद्दा लावून धरला.

काहीतरी गंभीर विषयावर चर्चा सुरु झाल्याचं अलेक्झांडरच्या बरोबर लक्षात आलं. अशा चर्चेचं त्याला भारी अप्रुप! त्यामुळे स्वारी सोफ्यावरुन खाली उतरली आणि आईच्या बाजूला कान टवकारुन बसली.

चला तर आता, अलेक्झांडर महाशयांनासुध्दा या गोष्टीचं, सॉरी… सॉरी, सत्याचं तात्पर्य काय? हे समजून घ्यायचय, त्यामुळे तुम्हाला सांगावच लागेल, आई अलेक्झांडरचा कान प्रेमानं हलकेच उपटत बाबांना म्हणाली.

बाबा हसले. अलेक्झांडरकडे बघत म्हणाले, या सत्याचं पहिलं तात्पर्य हे अलेक्झांडरनेच दाखवून दिलय.

म्हणजे काय? आई आणि तेजोमयी दोघेही एकाचवेळी म्हणाल्या.

अगं, उत्सुकता! त्याला आपलं संभाषण ऐकण्याची उत्सुकता वाटली नि तो सोफ्यावरुन खाली आला. काहीतरी नवीन शोधण्याची अशी उत्सुकताच अशा सत्यांना जन्म देतात.

अहो, असं कोड्यात टाकणारं बोलू नका. आमचा नाही तर अलेक्झांडरचा तरी जरा विचार करा. आई म्हणाली. अलेक्झांडरनेही होकारार्थी मान हलवली. आई-बाबा-तेजोमयी तिघेही हसले.

अगं, शास्त्रज्ञाना चंद्राच्या दक्षीण ध्रुवावर नेमकं काय आहे, हे जाणून घेण्याची फार उत्सुकता होती. ती उत्सुकता पूर्ण करण्यासाठी चंद्रयान मोहीम आखण्यात आली. ही मोहीम म्हणजे या उत्सुकतेचं यश आहे.

पण बाबा, केवळ उत्सुकता वाटून चालत नाही ना. जसं अलेक्झांडरला आपल्या संभाषणाची उत्सुकता वाटून उपयोग नव्हता. तेजोमयीनं मुद्दा मांडला.

अगदी बरोबर. त्याला उत्सुकता वाटूनही तो सोफ्यावर झोपू शकत होता. पण त्याने तसं केलं नाही. त्याने खाली‍ येण्याची कृती केली. शास्त्रज्ञांचंही तसंच असतं, त्यांच्या मनात आधी उत्सुकता निर्माण होते, मग ते झटून कामाला लागतात.

हे काम मनापासून केलं की यश मिळतच. आईने मुद्दा मांडला. अलेक्झांडरने मान डोलावली.

अरे अलेक्झू, शास्त्रज्ञांचं काम इतकं सोपं नसतं. त्यांच्या कामात अनेक अडथळे येतात. बाबा म्हणाले.

या चांद्रयान मोहिमेतही खूप अडचणी आल्या का? तेजोमयीनं विचारलं.

मग काय? चांद्रयान मोहीम २, मधील विक्रम  लँडर चंद्रावर पाऊल टाकणार तोच भरकटलं नि मोहीम फत्ते झाली नाही.

मग काय झालं हो? बिच्‍च्याऱ्या शास्त्रज्ञांना दु:ख झालं असेल ना. रडले असतील ते. आईने काळजीयुक्त स्वरात विचारलं.

इतकी मेहनत केल्यावर अपयश येतं, तेव्हा दु:खं तर होणारच.अश्रूही ओघळणारच. पण शास्त्रज्ञ झटदिशी या दु:खातून बाहेर पडतात. नि पुन्हा जोमाने कामाला लागतात. काय काय चुका झाल्या, याचा प्रामाणिकपणे शोध घेतात. आपल्या चुका मान्य करतात. या चुका होऊ नये म्हणून सखोल अभ्यास करतात. नवे काही मार्ग सुचतात का याचा विचार करतात. चांद्रयान-३ मोहिमेच्या बाबतीतसुध्दा हेच घडलं. बाबांनी सांगितलं. अलेक्झांडर एकटक त्यांच्याकडे बघून सारं काही एकाग्रचित्तानं श्रवण करत होता.

बाबा, चांद्रयान-३, मोहिमेत काय घडलं म्हणालात    ?तेजोयमीनं विचारलं.

अगं चांद्रयान-२, मोहीम अयशस्वी झाल्यावर चार वर्षे शास्त्रज्ञ मंडळी चांद्रयान-३ मोहीमची तयारी करत होती.

चार वर्षे? आईने आश्चर्यानं विचारलं.

हो हो, चार वर्षे ! न थकता, नं कटाळता. त्यांचं फक्त एकच लक्ष होतं, चंद्रावर आपलं यान सुखरुप उतरवायचं. मग दिवसाची रात्र नि रात्रीचा दिवस  करुन शास्त्रज्ञ मंडळी पुन्हा जोमानं कामाला लागली. आधीच्या मोहिमेमधील सगळ्या त्रुटी त्यांनी दूर केल्या नि मग चंद्रावरील स्वारीसाठी ते सज्ज झाले.

आणि यशस्वी झाले. असं म्हणत आईने टाळ्या वाजवल्या.

तर, मगं बाळ आता तूच सांग बघू या सत्यकथेचं तात्पर्य काय ते?बाबांनी तेजोमयीस विचारलं.

उत्सुकता, कार्यरत होणं, अपयश आलं तरी निराश न होणं, चुकांचा शोध घेणं, चुका स्वीकारणं, या चुका पुन्हा होणार नाही याची काळजी घेणं, नव्या पध्दतीचा शोध घेणं, परीश्रमता कोणतीही कसूर नं ठेवणं. तेजोमयी म्हणाली.

बाबांनी टाळ्या वाजवल्या. अजेक्झांडरने कौतुकाने शेपूट हलवून तेजोमयीला शाबासकी दिली.

उठता उठता बाबा म्हणाले, या सर्व ताप्तर्यांचा अंगिकार आपण आपल्या जीवनात केला ना की आपणही कोणत्याही कठीण प्रसंगावर मात करुन यश मिळवू शकतो. हो ना गं, असं म्हणत त्यांनी आईकडे टाळीसाठी हात केला. आईने टाळी देण्याआधीच शिताफिने अलेक्झांडरने आपला पंजा बाबांच्या हातावर ठेवला…