(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

नवे पर्याय,नवी संधी

भारत सरकारने वेगवेगळया ज्ञानशाखांचे अभ्यासक्रम सुरु केले आहेत. त्यासाठी राष्ट्रीय महत्वाच्या शैक्षणिक संस्था, असा दर्जा दिलेल्या संस्थांची स्थापना केली आहे. या संस्थांमध्ये आजच्या काळाला आवश्यक आणि कौशल्य निर्मितीच्या अभ्यासक्रमांवर भर दिला जातो. हे अभ्यासक्रम करिअरचे नवे पर्याय उपलब्ध करुन देतात. या पर्यायांचाही विचार विद्यार्थ्यांनी करायला हरकत नाही.

(१) गती शक्ती विश्वविद्यालय

नॅशनल रेल्वे ॲण्ड ट्रान्सपोर्टेशन युनिव्हर्सिटीचे रुपांतर यंदापासून भारत सरकारने गती शक्ती विश्वविद्यालयामध्ये केले आहे. रेल्व वाहुतकीशिवाय देशातील इतरही वाहतुकीचे व्यामिश्र प्रश्न आणि समस्यांच्या निराकरणासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मिती व्हावी यासाठी हा बदल करण्यात आला.

रेल्वे मंत्रालयाचे संनियंत्रण असणाऱ्या या विद्यापीठाला केंद्रिय विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे. या विद्यापीठचा मुख्य भर दळणवळण आणि वस्तू आणि विविध प्रकारच्या सामान (रसद) वाहतूक क्षेत्राशी संबंधित शिक्षण आणि प्रशिक्षण देणे आणि संशोधन कार्याला प्रोत्साहन देणे हा आहे. अशा प्रकारचे अभ्यासक्रम चालवणारी ही आपल्या  देशातील एकमेव संस्था आहे. या संस्थेचे अभ्यासक्रम आंतरज्ञानशाखीय आहेत. संवाद कौशल्य, नाविन्यता आणि वेगळा विचार करण्याची क्षमता हे कौशल्य विद्यार्थ्यांना प्राप्त करता यासाठी भर दिला जातो. पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते.

अभ्यासक्रम

या संस्थेने पुढील अभ्यासक्रम सुरु केले आहेत- बीटेक इन (१) सिव्हिल इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन रेल इंजिनीअरिंग, (२) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन रेल इंजिनीअरिंग, (३)  इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन रेल इंजिनीअरिंग, (४) ऑर्टिफिशिअल इंटेलिजन्स वुइथ स्पेशलयझेशन इन ट्रान्सपोर्टेशन ॲण्ड लॉजिस्टिक्स.

या सर्व अभ्यासक्रमांना, आयआयटीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या, जेइइ मेन परीक्षेच्या गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो. अर्हता – खुल्या  संवर्गातील विद्यार्थ्यांना १२ वी विज्ञान शाखेत (भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र) ५५ टक्के गुण मिळायला हवेत. अनुसूचित जाती जमाती, इतर मागास वर्ग संवर्गासाठी गुण -५० टक्के

व्यवस्थापन शाखा

या शाखेशी संबंधित पुढील अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत-(१) एमबीए इन ट्रान्सपोर्ट इकॉनॉमिक्स ॲण्ड मॅनेजमेंट, (२) एमबीए इन लॉजिस्टिक्स ॲण्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट. या अभ्यासकम्रमाच्या प्रवेशासाठी कॅट (कॉमन ॲडमिशन टेस्ट), मॅट( मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट), सीयुईटी-पीजी (कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स एक्झामिनेशन – पोस्ट ग्रॅज्युएट) या परीक्षांमधील गुणांचा आधार घेतला जातो.

अर्हता – खुल्या  संवर्गातील विद्यार्थ्यांना पदवी परीक्षेत ५५ टक्के गुण मिळायला हवेत. अनुसूचित जाती जमाती, इतर मागास वर्ग संवर्गासाठी गुण -५० टक्के

प्लेसमेंटसाठी येणाऱ्या कंपन्या-     या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार पुढील कंपन्या प्लेसमेंट साठी येतात-

अदाणी पोर्ट्स ॲण्ड लॉजिस्टिक्स,सिमेन्स,राईट्स,एल ॲण्ड टी,अल्ट्रा टेक सिमेंट,रेल्वे विकास निगम लिमिटेड,आयबीएम,नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन,एअरबस,डीएचएल,महिंद्रा लॉजिस्टिक्स,अरुप,डीटीडीसी,चेतक लॉजिस्टिक लिमिटेड,लेगार्ड,ट्रान्सवर्ल्ड लॉजिस्टिक्स,पीजीपी ग्लास,हिताची वंतारा.

संपर्क- गती शक्ती विश्वविद्यालय,लालबाग,वडोदरा-३९०००४, दूरध्वनी- २६५२६४८३, संकेतस्थळ-https://gsv.ac.in/,ईमेल-info@ gsv.ac.in

०००

(२) राष्ट्रीय शक्ती युनिव्हर्सिटी

या युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इंटरनल सेक्युरिटी ॲण्ड पोलीस ॲडमिनिस्ट्रेशन मार्फत, बीए इन सेक्युरिटी मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम चालवला जातो. ही युनिव्हर्सिटी केंद्रीय गृहमंत्रालायाच्या अंतर्गत कार्यरत आहे. या संस्थेला राष्ट्रीय महत्वाची शैक्षणिक संस्था म्हणून दर्जा देण्यात आला आहे.

अर्हता- हा अभ्यासक्रम कोणत्याही शाखेतील ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण १२ वीतील विद्यार्थ्यांना करता येतो. राखीव संवर्गासाठी गुणांमध्ये ५ टक्के सूट देण्यात येते. हा आंतरज्ञानशाखीय अभ्यासक्रम असून क्षेत्रीय भेटी आणि सैध्दांतिक बाबींचे यात एकात्मिकरण करण्यात आले आहे.

काय शिकाल?

या अभ्यासक्रमात पुढील विषय घटकांचा समावेश आहे-

वाहतूक सुरक्षा, राजशिष्टाचार आणि संपर्क, गुप्तचर  आणि शोध, उद्योजकीय व्यवस्थापन, फौजदारी कायदे आणि प्रकिया, माहिती सुरक्षिततेची तोंडओळख,आपत्ती नियंत्रण आणि व्यवस्थापन, सुरक्षाविषयक नेतृत्व कौशल्य, सामाजिक अव्यवस्थेचे समाजशास्त्र आणि आडवळणे, कॉर्पोरेट सुरक्षा, धोक्याचे विश्लेषण आणि नुकसान नियंत्रण, फौजदारी तपासणी,

समाज,राजकीय व्यवस्था आणि इतिहास याबाबींचे चिकित्सक ,सर्जनशील आणि नावीन्यपूर्ण विश्लेषण करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, या अनुषंगाने विविध विषय शिकवले जातात. समाजशास्त्र आणि राज्यशास्त्राची ओळख, संस्कृती आणि  सभ्यता, कौशल्य वृध्दी, शासन आणि राजकीय व्यवस्था, प्राचीन भारताचा इतिहास,भारतीय समाजाचे समाजशास्त्र,भारतातील राजकीय प्रक्रिया,मध्ययुगीन भारताचा इतिहास,संगणकीय कौशल्य,सामाजिक विचारवंत,आंतरराष्ट्रीय संबंध, ब्रिटिश राज आणि स्वातंत्र्य, पर्यावरणीय अभ्यास,तार्किक विश्लेषण क्षमता आदी विषय घटकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.

या अभ्यासक्रमाची रचना सेंट्रल असोशिएशन ऑफ प्रायव्हेट सेक्युरिटी या संस्थेच्या सल्ल्याने करण्यात आली आहे.या संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आल्याने   आहे,त्यामुळे विद्यार्थ्यांना इंटर्नशीप आणि प्लेसमेंट मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

करिअर संधी

हा अभ्यासक्रम केल्यावर विद्यार्थ्यांना रिस्क असेसर (जोखिम निर्धारक), लॉस प्रिव्हेंशन ऑफिसर ( हानी प्रतिबंधक अधिकार), पोलीस डिटेक्टिव्हट, करेक्शन ऑफिशिअल (प्रशासकीय सुधार अधिकारी), कॉर्पोरेट सेक्युरिटी कंसलटंट अशा सारख्या करिअर संधी मिळू शकतात.

संपर्क– राष्ट्रीय रक्षा युनिव्‍हर्सिटी, लवाद, ता.-देहगाम, गांधीनगर-३८२३०५, दूरध्वनी- ०७९-६८१२६८००, संकेतस्थळ- https://rru.ac.in

000

 (३) इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटी – या संस्थेने बीबीए इन मेरिटाइम लॉजिस्टिक्स, हा सागरी मालवाहतुकीच्या संदर्भात व्यवस्थापन आणि संनियंत्रणाच्या अनुषंगाने उपयुक्त ठरेल असा अभ्यासक्रम सुरु केला आहे. हा अभ्यासक्रम विशाखापट्टणमच्या कॅम्पसमध्ये शिकवला जातो.

कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण हा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यात एक वर्ष कालावधीच्या अप्रेंटिसशीपचा समावेश आहे. याचा फायदा भविष्यात रोजगार संधित रुपांतरित करण्यासाठी होऊ शकते. अप्रेंटिसशीपच्या कालावधीत प्रत्येक विद्यार्थ्याला दरमहा ७ हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. या अभ्यासक्रमाला, कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स-यूजी एक्झामिनेशनच्या गुणांवर प्रवेश दिला जातो.

याच संस्थेच्या कोची आणि  चेन्नई कॅम्पस येथे बीबीए इन लॉजिस्टिक्स,रिटेलिंग ॲण्ड ई कॉमर्स हा अभ्यासक्रम करता येतो. कालावधी तीन वर्षे. या अभ्यासक्रमाला सीयूइटी-यूजी व्दारे प्रवेश दिला जातो.

संपर्क- https://imu.edu.in/imuadmissions/ संकेतस्थळ-bba23@imu.ac.in दूरध्वनी-०४४-२४५३९०२७

(५) सायबर शिक्षा

२०२५ सालापर्यंत भारतीय आयटी उद्योगाची वार्षिक उलाढाल ३५० बिलियन डॉलर इतकी होण्याची शक्यता नॅसकॉम-मॅकेन्सी या संस्थांच्या एका अहवालात वर्तवण्यात आली आहे. या वाढीमध्ये सायबर सेक्युरिटी क्षेत्राचा मोठा सहभाग असेल, ही बाब या अहवालात नमूद करण्यात आली आहे. २०२५ पर्यंत या क्षेत्रातील मनुष्यबळाची संख्या १ मिलियन पर्यंत जावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या मनुष्यबळामुळे भारत हे जगातील सर्वात मोठे सायबर सुरक्षा मनुष्यबळ पुरवठा करणारे ,या क्षेत्रात संशोधन प्रकल्प राबवणारे केंद्र ठरु शकते.

ही बाब लक्षात घेऊन, सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात अधिकाधिक महिलांना करिअर संधी मिळावी यासाठी मायक्रोसॉफ्ट, डेटा सेक्युरिटी काउंसिल ऑफ इंडिया केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सहकार्याने सायबर शिक्षा प्रकल्प सुरु केला आहे.  या अभ्यासक्रमाव्दारे महिलांना सायबर सुरक्षेविषयी महत्वाचे कौशल्य प्रदान करुन केले जाते. त्यांना या क्षेत्रात अधिकाधिक करिअर संधी मिळण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरतो.

हा अभ्यासक्रम केलेल्या महिलांना प्लेसमेंट मिळण्यासाठी सहाय्य केले जाते. दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणी (टायर) तील शहरांमधील महिलांना, सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात समर्थरीत्या कार्यरत होता व्हावे हासुध्दा उद्देश हे प्रशिक्षण सुरु करण्यामागे आहे.

माहिती तंत्रज्ञान उद्योगात महिलांचा सहभाग कमी आहे. त्यातही सायबर सुरक्षेमध्ये तो त्याहूनही कमी आहे. या प्रशिक्षणामुळे महिलांना संधी मिळून ही संख्या वाढू शकते. सीडॅक सेंटर ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग मार्फत प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणाचा कालावधी चार महिने.

अर्हता- कोणत्याही अभियांत्रिकी शाखेतील महिला उमेदवार या प्रशिक्षणासासाठी नाव नोंदवू शकतात. या उमेदवाराचे वय २१ ते २६ वर्षे या दरम्यान असावे. या उमेदवाराच्या कुटुंबीयांचे वार्षिक उत्पन्न सात लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

या प्रशिक्षण खर्चाचा भार मायक्रोसॉफ्ट कंपनीमार्फत उचलला जाणार आहे. या प्रशिक्षणातील विषय घटकांची संरचना या क्षेत्रातील उद्योजकांनी केली आहे. प्रशिक्षण काळात व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असणारी काही कौशल्येही शिकवली जातात. प्लेसमेंटसाठी सहकार्य केले जाते.

संपर्क- डाटा सेक्युरिटी काउंसिल ऑफ इंडिया, नॅसकॉम कॅम्पस, प्लाट नंबर ७ -१०, सेक्टर १२६ नॉयडा,-२०१३०३, दूरध्वनी- ०१२०-४९९०२५३,cyber.sikshaa@dsci.in

 

() राजीव गांधी नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एव्हिएशन

या संस्थेने बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज इन एव्हिएशन ॲण्ड एअर कार्गो ,हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. हा अभ्यासक्रम कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना करता येतो. खुल्या संवर्गातील विद्यार्थ्याला  ५० टक्के आणि राखीव संवर्गातील विद्यार्थ्याला ४५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. कालावधी- तीन वर्षे. या पैकी तिसरे वर्ष हे अप्रेंटिसशिपचे असून या काळात प्रत्यक्ष काम करण्याची संधी दिली जाते.

हा  अभ्यासक्रम हवाई वाहतूक क्षेत्रासाठी आवश्यक असणाऱ्या कुशल  मनुष्यबळ निर्मितीसाठी, राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाच्या सल्ल्याने सुरु करण्यात आला आहे. अभ्यासक्रमासाठी निवड १२ वीतील गुण, या संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेतील गुण आणि मुलाखतीचे गुण यावर आधारित केली जाते.

संपर्क- https://www.rgnau.ac.in

००००

(८) नॅशनल फॉरेंसिक सायंस युनिव्हर्सिटी

या संस्थेच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीजने, बीबीए-एमबीए हा पाच वर्षे कालाधीचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरु केला आहे . कॉर्पोरट क्षेत्राला उपयुक्त ठरु शकेल असा हा आपल्या देशातील एकमेव अभ्यसक्रम आहे. या अभ्यासक्रमांतर्गत, फॉरेंसिक अकाउंटिंग ॲण्ड फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन, फायनांशिअल मॅनेजमेंट आणि बिझिनेस ॲनॅलिटिक्स ॲण्ड इंटेलिजन्स या तीन विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. अर्हता- कोणत्याही शाखेतील १२ वी, खुला संवर्ग- ६० टक्के गुण, राखीव संवर्ग-५५ टक्के गुण.

अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १२ वीतील गुण, या संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेतील गुण आणि मुलाखतीचे गुण यांचा आधार घेतला जातो.

संपर्क– सेक्टर ९ गांधी नगर-३८२००७, दूरध्वनी-२३९७७१००, संकेतस्थळ-

https://beta.nfsu.ac.in, ईमेल-info@ nfsu.ac.in

सुरेश वांदिले

०००