नागोबा आणि सर्पोबांचं दु:ख !
नागोबा आणि सर्पोबा बऱ्याच दिवसांनी भेटले. तसे ते दोघेही सारखे भ्रमंतीवरच असत.मग कधी कधी त्यांची या भ्रमंतीत एखादे ठिकाणी भेट व्हायची.दोघांनाही फार आनंद व्हायचा.आताही त्यांना आनंद झाला.पण दोघांच्याही चेहऱ्यावर काळजीचे आणि दु:खाचे भाव उमटले.
काय झालं?दोघांनीही एकाच वेळी एकमेकांना विचारलं.
म्हणजे तू सुध्दा कोणत्यातरी चिंतेत आहे म्हणायचा?नागोबा सर्पोबास म्हणाला.
तू सुध्दा तसाच दिसतोस रे! सर्पोबा नागोबास म्हणाला. हंSSS असं म्हणून दोघांनी दीर्घ श्वास घेतला आणि एका झाडाच्या सावलीत ते बसले आणि सध्याच्या भ्रमंतीत काय काय बघितलं याची माहिती देउु लागले.पण यावेळी दोघांनाही फार उत्साह वाटत नव्हता.
म्हणजे तुला सुध्दा ते दिसलं?
याचा अर्थ तुलाही दिसलं?
हो गड्या मला दिसलं.आपला काय कसा उपयोग करतील याचा नेमच राहिला नाही रे!
असा काही उपयोग होईल असं मी स्वप्नात देखील बघितलं नव्हतं!
अरेरे!कशाला देवाने आपली निर्मिती केली, असं मला वाटून गेलं.
मलासुध्दा!सर्पोबा नागोबास म्हणाले आणि नागोबा सर्पोबास म्हणाले.दोघांचेही चेहरे आणखी पडले.आपण देवाकडे जाऊन जाब विचारायला हवा.
काय जाब विचारणार तुम्ही! नागोबा आणि सर्पोबा बसले होते त्या झाडाजवळ आवाज घुमला.त्या आवाजाने सावध होऊन नागोबा आणि सर्पोबा यांनी इकडे तिकडे बघितले.वर झाडावर गरुडोबा बसल्याचं त्यांना दिसला.
अच्छा तर तू आमचा पाठलाग करत होतास म्हणायचा? नागोबा गरुडोबाकडे बघत म्हणाला
ठीक आहे तर मग ये खाली नि खाऊन टाक आम्हास!सर्पोबा गरुडोबाकडे बघत म्हणाला.
अरे,तुम्हा दोघांना झालं तरी काय?तुम्ही स्वत:हून मला तुम्हास खाण्याची मेजवाणी देता!
काय करणार गरुडोबा,अरे आम्ही जिवंत राहून काय उपयोग?
आमचा दुरुपयोगच जास्त!
असे कोड्यात कां बोलता?जरा स्पष्ट सांगा ना.तुमची परवानगी असेल तर येऊ का खाली तुमच्याजवळ! गरुडोबानं विचारलं.
ये बाबा ये.नाही तरी आम्हास जिवंत राहण्यास काही रस उरला नाही.तू खाली ये.गप्पा करु थोड्यावेळ मग,तुझी इच्छा होईल तेव्हा तू आम्हाला खा!सर्पोबा अत्यंत दु:खी अंत:करणाने म्हणाला.
त्याचे हे दु:खद बोलणे ऐकून गरुडोबास फार वाईट वाटले. तो खाली त्या दोघांजवळ आला.आपण दोघांनांही काहीही करणार नाही,अशी शपथ त्याने घेतली.
ही शपथ घेऊ नकोस म्हणून नागोबा आणि सर्पोबांनी विनवणी केली पण गरुडोबाने एकेले नाही.
काय झालं इतकं दु:ख करण्यासाठी सांगाल का आता तरी?गरुडोबाने विचारलं..
अरे गरुडोबा] या पृथ्वीतलावरची मानसं खूप हुषार आहेत रे!
त्याचं दु:ख झालं होय तुम्हाला?
नाही… नाही…अरे, त्याने आपल्या हुषारीने किती प्रगती केली.त्याला वाचता येतं.लिहिता येतं.गाणं गाता येतं.नाचता येतं.त्याने विमानाचा शोध लावला.उंच उंच इमारती बांधतो.चंद्राकडे जाण्याचं विमान शोधलं.तिथेही गेला.आणखी कुठं कठं गेला आकाशात!
पण हे तुमच्या दु:खाचं कारण कसं होऊ शकतं?
नाही रे,हे दु:खाचं कारण नाही?
मग?अरे ही या मानसाची हुषारी त्याला भलते सलते काम करण्याची प्रेरणा देते!
म्हणजे?
हेच बघना,आताच्या भ्रमंतीच्या वेळेस मी एका मुलाच्या खांद्यावर माझं चित्र बघितलं.ते जरा विचित्रच होतं.त्यात मी मलाच, माझ्या शेपटीकडून गिळतोय असं रंगवलं होतं.नागोबा म्हणाला.
मी सुध्दा असच चित्र बघितलं.
बापरे बाप!
हो ना,अरे, ते फक्त चित्रापुरत मर्यादित असतं,तर इतकं दु:ख झालं नसतं.
म्हणजे?
ज्या मुलाच्या खांद्यावर ते चित्र मी बघितलं.त्या मुलाला माझ्या देखत एका पोलिसाने पकडलं.नि नेलं त्याला पोलीस ठाण्यात.मीही त्यांच्या पाठिमागे गेलो तिथे!
मी सुध्दा असाच गेलो.
मग पोलीस ठाण्यात काय घडलं?
त्या पोलिसांनी त्या मुलाला दरडावलं.एक कानफटित दिली.
उगाचच का?फार दुष्ट म्हण्याचे ते पोलीस!
मलाही तसच वाटलं.एका क्षणी तर त्या पोलिसाच्या गळा आवळावा असं मला वाटलं.
मला तर डंख मारुन विष त्याच्या अंगात भिनवावं असं वाटलं.
मग?
मग काय?त्या पोलिसाने त्या मुलाच्या खांद्यावरील आमच्या चित्राकडे बघून हे काय, असं त्याला दरडावून विचारलं.त्या घाबरलेल्या मुलाने पँटित सू केली नि भडाभडा बोलू लागला..
काय सांगितलं त्याने.
शेपटाकडून स्वत:लाच खाणारा नाग हा, नशा आणणाऱ्या पदार्थाची चोरुन-लपून विक्री करण्यासाठीचे संकेत चित्र निघालं.हे चित्र खांद्यावर असणारे विक्रेते आणि ग्राहक दोन्ही असतात.दोघेही एकमेकांना पटकन ओळखू यावेत,दगाफटका होऊ नये म्हणून हा शेपटाकडून स्वत:लाच खाणारा नाग गोंदवून घेतात,ही मुलं.
बापरे बाप!
आता तूच सांग,आमचा असा इतका वाईट उपयोग होत असताना आम्ही जिवंत तरी कशासाठी राहायच ना?
आमच्यापैकी चार–दोन सर्पोबा किंवा नागोबाचं विष भिनतं.बाकिकच्यांनी डंख मारला तरी काही होत नाही.पण ही मुलं नशा करणारी औषधं घेतात,गोळया घेतात,पावडर घेतात,इंजेक्शन घेतात.ते सगळं विषारी.यात त्यांना कोणता आनंद मिळतो देव जाणे?हा खोटा-फसवा-मृत्यूकडे नेणाऱ्या आभासी आनंदाची देवाण घेवाण करण्यासाठी आमच्या चित्राचा वापर व्हावा!हे फार दु:खकारक आहे गरुडोबा.नागोबा म्हणाला.सर्पोबाही असच काहीसं म्हणाला.
गरुडोबाने मोठा निश्वास टाकला.मानवाची हुषारी अशा दुष्ट कामासाठी आपल्यापेक्षाही वेगाने भरारी घेते,हे ऐकून तोही दु:खी झाला.
सुरेश वांदिले
.jpg)