(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

म्हणे मी देवमासा! नाव मोठं नि दर्शन खोटं!

तुम्ही म्हणाल, हे काय, स्वत:लाच असं कुणी दूषणं देत कां ?तुमचं म्हणणं अगदी बरोबर असलं तरी हे दूषण मी स्वत:ला का देतोय, हे माझी गोष्ट ऐकल्यावर तुमच्या लक्षात येईल.

तुम्हाला हे नक्कीच ठाऊक असणार की तुमच्या-माझ्या पृथ्वीवरुन प्रचंड मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साइड (सीओटू) हा वायू वातावरणात सोडला जातो. तो आकाशात गेल्यावर सूर्याच्या उष्णतेला शोषूण घेण्याचं काम करतो. त्याला हे काम कुणी सांगितलय, हे बुवा मला काही ठाऊक नाही. पण आपल्याला काय त्याचं? असतं की बऱ्याच जणांना हे करुन बघ, ते करुन बघण्याचा छंद! तसचं या कार्बन डायऑक्साइडचं असावं. तसा हा छंद म्हणा की टाइमपास म्हणा, आपल्यासाठी लाभाचा ठरतोय. कारण हा “सीओटू” सूर्याची उष्णता शोषतो नि इकडे पृथ्वीचं सरासरी वातावरण १३ ते १४ अंश सेल्शियस राखण्यास मदत होते. हा झाला माझ्या कथेतला एक भाग.

दुसरा भागसुध्दा या “सीओटू”शी संबंधित आहे. तुम्हा मानवांनी १९ व्या नि २० शतकात मोठ्ठीच मोठ्ठी औद्योगिक प्रगती केली. इथे हा कारखाना उघडला, तिकडे तो कारखाना उघडला. मोटार गाड्या इकडून तिकडे भरधाव धावू लागल्या. विमान उडू लागली. अगिनगाडी तर काय? तिचा डौलच न्यारा. कुठून कुठेही मोठ्या थाटात धावू लागली. अशी या सगळया धावाधावीसाठी आवश्यक इंधनाचा धूर वातावरणात मोठ्या प्रमाणावर जाऊ लागला. या धुरात श्रीयूत “सीओटू” विराजमान होतेच. मात्र मानवाची धावाधाव इतकी मोठी की त्यामुळे या “सीओटू” महाशयांचं वातावरणातलं प्रमाण प्रमाणाबाहेर वाढलं. त्यामुळे पृथ्वीचं तपमान वाढू लागलं. हे प्रमाण आणखी वाढलं असतं तर पृथ्वीवर बरीच उलथापालथ झाली असती. तुम्हाला नि इतरही जीवजंतूना राहणं अशक्य झालं असतं. आणि या ठिकाणी माझा म्हणजेच देवमाशाचा प्रवेश झाला. एखादी गोष्ट पुढे जाण्यासाठी नाही का, सिनेमात, मालिकेत, नाटकात, कथेत एखाद्या पात्राचा धमाकेदार प्रवेश होता ना, तसंच बरं का हे.

देवमाशाबद्दल तुम्हाला तशी बऱ्यापैकी माहिती आहे. कुणी आम्हास व्हेल म्हणतं. कुणी राक्षसी मासाही असही टचदिशी बोलून जातो. एकीकडे देव आणि दुसरीकडे राक्षस अशी दोन्ही रुपं आमच्यात असल्याचं तुम्हाला कां वाटतं असावं? आमची लांबी १०० फूट! तर वजन दीड लाख किलोपक्षा अधिक. अबाबा! नि बाबाआ! असं हे आमचं वजन.

एखादा देवमासा जेव्हा तोंड उघडतो तेव्हा मोठ्या प्रमाणावर “सीओटू”ला शोषून घेतो. आमच्या एका देवमाशाच्या पोटात ३३ ते ६३ टन “सीओटू”साठवण्याची क्षमता असते. खरंतर हे अचाट, अफाट आणि अफलातून! इतकं प्रचंड “सीओटू” घेऊन आम्ही मजेत जगत राहतो. एके दिवशी निसर्गाच्या नियमानुसार आमचा मृत्यू होतो. तेव्हा आम्ही समुद्राच्या तळाशी निजधामास जातो. आमच्या पोटात साठवलेलं “सीओटू” सुध्दा तळात साठवलं जातं. ज्या ठिकाणी खूप सारे व्हेल असतात, त्या ठिकाणी तर वर्षाला ३ हजार ७०० कोटी टन “सीओटू” शोषला जातो. ॲमेझानसारखी चार अत्यंत दाट वने प्रकाश संश्लेषणासाठी जेवढा कार्बन शोषून घेतात, तितकं हे प्रमाण भरतं. अर्थात हे तुम्हा मानवांचच संशोधन बरं का?

आम्ही देवमासे नायट्रोजन, लोह आणि सेंद्रीय पदार्थांनी तयार झालेली विष्ठा समुद्राच्या पृष्ठभागावर सोडतो. या विष्ठेचा उपयोग समुद्रात तरंगणाऱ्या सूक्ष्म वनस्पतींसाठी म्हणजेच प्लवकांसाठी खतासारखा होऊन त्यांची झपाट्याने वाढ होते. हे प्लवक, प्रकाश संश्लेषणासाठी, सूर्यप्रकाशासोबत वातावरणातील “सीओटू”ही मोठ्या प्रमाणावर शोषून घेतात आणि ऑक्सिजन म्हणजेज प्राणवायू सोडतात. वातावरणातील ५० टक्के प्राणवायू या प्लवकांच्या कृपेने मिळतो, बरं का! आणि हे कुणामुळे घडतं तर देवमाशांमुळे!

आम्ही एकिकडे “सीओटू” शोषून घेतो नि पोटात साठवतो नि दुसरीकडे विष्ठेच्या रुपात-तुमच्या सध्याच्या “कूल” भाषेत -प्रोटिन, व्हिटॅमिन, मिनरल्स अशी उर्जा या प्लवकांना पुरवून त्यांचा वाढीस साहाय्य करतो. अशाप्रकारे वातावरणातील “सीओटू”चे प्रमाण कमी करुन धरतीमातेला थंड करण्यास साहाय्य करतो. हे तर तुमच्या हिताचंच नाही का?

पण, दुर्देव्य असं की, आम्ही हे जे काही करतो, याची काहीही जाण न ठेवता, तुम्ही आमच्या जीवावरच उठला आहात. तेल, मांस आणि हाडं यासाठी दरवर्षी तुम्ही किती देवमाशांना ठार करता हे ठाऊकाय? तब्बल तीन लाख! आता गेल्या दहा वर्षात ३० लाखाहून अधिक देवमासे तुम्हाला बळी पडले. त्यामुळे “सीओटू” शोषून घेण्याचं प्रमाण प्रचंड घटलच की! परिणाम तुम्हीच बघताच की…वसुंधरेचं तापमान सारखं वाढतय. यंदा तर म्हणे पृथ्वीच्या इतिहासात कोणता तरी एक दिवस सर्वात उष्ण होता. कोणत्यातरी खंडात उष्णतेची लाटच आली. आणि यंदा उन्हाळा संपण्याचं नावच घेईना! हेसुध्दा तुमचच संशोधन. आमचा त्याच्याशी काही गंध नाही. तुम्ही आधीच इतके हुषार आणि आता ती कृत्रिम बुध्दीमत्ता तुमच्या मदतीला. तेव्हा तुम्हीच हे असे निष्कर्ष काढता. तेव्हा काहीजण काळजीचे उसासे टाकतात. काहीजण घाबरतात. काय होणार या पृथ्वीचं? हा सवालही शहाजोगपणे विचारतात. पण हे इतकं काही करण्याऐवजी, देवमाशाला ठार करणंच टाळलं तर?

पण आम्ही काय बुवा, फक्त नावाचे देवमासे! तुम्हाला दगडाबिगडातला देव चालतो. पण जिवंत देव कदाचित भावत नसावा. म्हणूनच आमचं नाव मोठं नि दर्शन खोटं!!

००००००