(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

ना होता मै, तो क्या होता…

मुसळधार पाऊस कोसळत होता. किर्र अंधार. कोणालाही न दिसणारी पायवाट. पण ते दहाजण मात्र जणू सकाळच्या रामप्रहारी नेहमीच्या रस्त्यावरुन निघावे तसे सराईतपणे चालत होते. एका मोठ्या वटवृक्षाखाली ते दहाही जण थांबले.त्यातील एकाजणानं सर्वांना हुक्का दिला. त्यातील एकानं नकार दिला. त्या दहातील सर्वात ज्येष्ठ असलेल्याने, त्याच्यावर डोळे रोखून,

तुझी फकिरीगिरी बस्स झाली. तब शायद चुपकेसे छुपकेसे सबकुछ करता था. हमे सब पता है, आता घ्यायला कां लाजतोस रे, आँ. असं चढ्या आवाजात विचारलं.

त्या जेष्ठतमाचा मान राखायचा की नाही, हा प्रश्न हुक्का नाकारणाऱ्याच्या मनात आला. या जेष्ठतमाचा शिरच्छेद करायचा विचार मनात येत असतानाच, त्याने शाही कबाबच्या प्लेटमधील झुरळासारखा बाहेर फेकून दिला. तो ज्येष्ठतम त्याच्या पिताजींच्या पिताजींच्या पिताजींचा अब्बाहुजूर होते. याअर्थी तो जेष्ठतम याचा ग्रेट ग्रेट ग्रेट ग्रेट गँडफादर होताच. पण वडील वगैरे नातं फारसं काही महत्वाचं नसतं. क्षण महत्वाचा असतो. हा क्षण जो साध्य करतो तो होतो सर्वश्रेष्ठ, असं मानणारा हा हुक्का नाकारणारा होता. तो त्याच्या काळात तसाच वागला होता.  त्यामुळे आजोबांच्या आजोबांच्या आजोबांचा शिरच्छेद करण्यास त्यास काहीही वाटलं नसतं.

असे विचार त्याच्या मनात या चर्चेच्याप्रारंभी विजेसारखे तळपून गेले. पण या विजेला त्याने तक्ष्णी जमिनित गाडलं. त्यासाठी त्याच्याजवळ महत्वाचं कारणही होतं. ते म्हणजे चित्तोडपासून दख्खनपर्यंत ज्या तलवारींनी त्याने युध्दभूमित पराक्रम गाजवला. शत्रुचे मुंडके उडवण्याचा आनंद मनसोक्त उपभोगला, त्या तलावारींपैकी एकही तलवार आता या क्षणी त्याच्यापाशी नव्हती. या त्याच्या सगळया तलवारी बडोद्याच्या  सयाजीराव वस्तुसंग्रहालयापासून ते हैदराबादच्या सालारजंग वस्तुसंग्रहालयात त्याच्या नावानीशी विराजमान झाल्याचे वर्तमानात दिसून येत आहे. खरं-खोटं उपरवाले आणि खालच्यांना ठाऊक. असं हुक्का नाकारलेला स्वत:शीच बोलला. नाईलाजानं त्याने हुक्का तोंडी लावला. जोरदार झुरका घेऊन त्याने झोकात नाकातोंडातून धूर बाहेर काढला.  इतरांनीही त्या पावसाळी ढगाळ वातावरनात हुक्काचा आस्वाद घेतला. या अशा वातावरणात पोटात गेलेल्या त्या धुराने दहाजणांना नवी स्फुर्ती आणली. उर्जा आणली.

थोडं स्थिरस्थावर झाल्यावर,

अब्बाजान, तुम्ही कां बोलावलत असं अर्जंट या अशा तुफान आणि अंगावर येणाऱ्या पावसाळ्या रात्री. दुसऱ्या क्रमांकाचा जेष्ठ सर्वात जेष्ठास विचारता झाला.  याचा अर्थ हा या जेष्ठतमाचा साहेबजादा होता.

कां बोलावलं म्हणजे? तेवढा पण आमचा अधिकार राहिला नाही की काय. अरे, हम ही है, जिनके कारण इतके मोठे साम्राज्य निर्माण झाले. तू आणि तुझी मुलं, त्यांची मुलं सम्राट झाले. अरे कृतज्ञता म्हणून काही चिज असते की नाही.ज्येष्ठतम व्यक्ती रागावून म्हणाली.

अहो, अब्बाजान तुम्ही कोणत्या युगात राहता आहात. जब आप जिंदा थे, या हम जिंदा थे तब भी कृतज्ञता – वृतज्ञता यमुनेतील एक थेंबभर पाण्याएवढीही नव्हती.  आता तर प्रश्नच नाही. ज्येष्ठतमाचा साहेबजादा त्यास सांगता झाला.जमलेल्या इतर आठ जणांपैकी काही जणांनी मान हलवली. एकाने डोळे मिटून घेतले.  एकजण फिस्सकन हसला.

अब्बाजान मुद्द्यावर या. झोपेचं खोबरं केलंच आहे तुम्ही. आता जास्त ताणू नका. जेष्ठतमाचा साहेबजादा म्हणाला.

बरोबर, आम्ही स्वप्न बघत होतो, आपलं साम्राज्य या आकाशगंगेत स्थापन झाल्याचं…

और हम, हमारी दिलोजान के लिय कुछ अच्छीसी गजल लिखना चाहते थे. उसके लिए मिर्झा गालीब को बुलानेवालेही थे की आपने बुला लिया. हमारी जान क्या सोचेगी अब,  अब्बाजानके अब्बाजानके अब्बाजानके अब्बाजानजी.

एवढ्या वेळ्यात आमच्या दोन टोप्या शिवून झाल्या असत्या. वेळ दवडलेला आम्हाला अजिबातच चालत नाही. आमच्या वेळेच्या आड जो जो येतो त्याची वेळ आणि सद्दी संपल्याचं, आप सभी बुजुर्गोतो पताही है.. हुक्का पिण्यास नकार देणारा सहाव्या क्रमांकाचा जेष्ठ थंडपणे म्हणाला.

याचा अर्थ तू आमचा मुडदा पाडणार की काय?  अरे गधड्या आता तरी शहाणा हो. किती मुडदे पाडणार आहेस. इतरांचे मुडदे पाडता पाडता, तुझा कधी मुडदा पडला हे तरी कळलं का तुला. दिल्लीच्या तख्ताचा सम्राट कोठे गाडला  तर  खुल्ताबादमे. कहाँ दिल्ली और कहाँ खुल्ताबाद. कहाँ यमुना और कहाँ खडकीका नाला.. बरखुदार, उपरवाल्यानं तुझी काय दुर्दशा केली रे…सुंभ जळला पण पीळ गेला नाही गधड्या…तुझा… ज्येष्ठतम व्यक्ती म्हणाली.

अहो, अब्बाजान के अब्बाजान के अब्बाजान के अब्बाजान, एवढं जर तुम्हास सारं काही माहीतच आहे आणि आमच्याबद्दल इतकी खात्रीच आहे तर कां बोलावलत आम्हास इथे…आम्हाला काही पुरणातल्या वांग्यात अडकून बसायला शौक नाही…हम एैसेही थे. ज्याचा आम्हास गर्व आणि अभिमान आहे. आता बदलण्याचं कष्ट आम्ही कां घ्यायचे…आमच्या बदतमिजीवर इतिहासानं शिक्कामोर्तब केलेय ना. ती आमची बदतमीजी नव्हती, तो आमचा पराक्रम होता..समजलं…

अरे, आता आपसात असे भांडून, झगडून, एकमेकाला पाण्यात बघून, एकमेकाला पाणी पाजून आणि एकमेकाच्या जीवावर उठून काय उपयोग ? नवीन साम्राज्य तर काही स्थापन  करता येणार नाही ना. इतिहासात आपण एकमेकाच्या जीवावर उठलो नसतो तर आपलं साम्राज्य आज इथपर्यंत आलं असतं. त्या दहामधील सर्वात गंभीर आणि तेजस्वी चेहऱ्याची व्यक्ती म्‍हणाली.

पण हुक्का घेण्यास नकार देणारी व्यक्ती रागाने लालबुंद झाली होती. टोप्या शिवण्याच्या आपल्या उद्योगाचा वेळ घेणाऱ्या त्या जेष्ठतम व्यक्तिचा त्याला अनावर राग आधीच आला होता. त्याचे हात पुन्हा शिवशिवायला लागले. तेव्हा पुन्हा त्याच्या लक्षात आलं की आपल्या तलवारी कोल्हापूर आणि लंडनच्या वस्तुसंग्रहालयात आहेत. या तलावरींच्या जोरावरच आपण आपल्या भावांना चिरनिद्रेची संधी दिली आणि अब्बाजानास तोंडघशी पाडलं. इतक्या पराक्रमी तलावारी आपल्या हातून निसटून गेल्या. एकसुध्दा तलवार इकडे आणता आली नाही. शर्म आनी चाहिये. तो स्वत:शीच पुटपुटला. पण त्याचं पुटपुटणे जेष्ठतमाच्या कानावर गेलच..

शर्म किस चीज का नाम है पता है क्या तुझको, बरखुरदार…

आवडणाऱ्या मुलीकडे बघून नजर खाली गेली की समजायचं शर्म आ गयी. त्या मुलीने खाली नजर केली समजायचं वो शर्मा गयी. असं त्यांच्यातील तिसऱ्या क्रमांकाच्या ज्येष्ठ  म्हणाला. त्याने त्या अतिगंभीर वातावरनातील ताण किंचित हलकासा प्रयत्न केला.

हे सगळचं शर्मनाक आहे. असं त्या हुक्का पिण्यास नकार देणाऱ्या व्यक्तिस म्हणावसं वाटलं. पण त्याने स्वत:ला कसं बसं सावरलं.

तुम्ही का बोलावलत, असं पुन्हा कुणीतरी त्या जेष्ठतम व्यक्तिकडे बघत जोरात म्हणालं.

अरे, तुम्ही चिरनिद्रेसाठी इथे आलात याचा अर्थ डोळे मिटूनच राहायला पाहिजे का ?

मग काय करायला पाहिजे. आजूबाजूला बेगमा आणि नर्तकी पण नाहीत. शराब-शबाब-कबाबही नही है तो आँखे खुली रखनेका मतलबही नही है, अब्बाजान के अब्बाजान के अब्बाजान..चौथा उद्गारला.

म्हणूनच आम्ही तुम्हा सर्वांना इथे तातडीने घेऊन आलो आहे. आपले साम्राज्य इतिहासात गडप झाले असले तरी आपल्या आठवणी अस्तित्वात आहेत. २५ वर्षे दख्खनमध्ये जाऊन पडलास ते एका अर्थी बरच झालं असं बरच झालं असे आता आम्हास वाटू लागले आहे. उपरवालेका शुक्र है की जेव्हा तू जिवंत होतास तेव्हा तुला ती आठवण उडवून द्यावी वाटली नाही. हुक्का पिण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीकडे बघत ती ज्येष्ठतम व्यक्ती म्हणाली.

पुन्हा एकदा हुक्का पिण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीला त्याच्या तलवारीची आठवण झाली. दिल्लीच्या वस्तुसंग्रहालयात काही तलवारी त्याच्याच होत्या. पण त्यावर त्याचं नाव लिहिलं नव्हतं. प्रत्येक खेपेस आपणास तलवारच कां आठवते. या तलवारीनं आपणास साम्राज्य दिलं. या तलावरीनेच आपले साम्राज्यही घालवलं. तरीसुध्दा ही तलवारच पुन्हा पुन्हा कां आठवते. तो मनात म्हणाला. त्या जेष्ठाचे काय करु नि काय नको असं त्यास झालं. पण त्याने स्वत:ला सावरले.

लेकीन हुवा क्या अब्बाहुजूर. दुसऱ्या क्रमांकाच्या जेष्ठानं सर्वात जेष्ठतमास उत्सुकतेनं आणि  घाबरुन विचारलं..

अरे, ताजमहल मरने जा रहा है. जेष्ठतम व्यक्ती आक्रोश करत उद्गारली..

नाही नाही असं होणं शक्य नाही. पाचव्या क्रमांकाची जेष्ठ व्यक्ती अस्वस्थ होत म्हणाली.

जब तक चाँद सुरज रहेगा, ताज तेरा नाम रहेगा. असं आम्हासही वाटलं होतं. तिसऱ्या क्रमांकाच्या जेष्ठ व्यक्तीनं आपली भावना व्यक्त केली.

ताजला कोण मारायला निघालाय. त्याची मुंडकीच उडवून टाकेन मी.

त्यासाठी तलवारीची गरज असते. त्या तलवारी आपल्याकडे नाहीत. जिथे आहेत तिथे आपणाला जाता येणार नाही. गेलो तरी आपण सांगूनही आपणास कुणी देणार नाहीत. वेड्याच्या इस्पितळात नेऊन टाकतील. नाहीतर दंड करतील. दंड देण्यासाठी आपल्याकडे पैसे नाहीत. तेव्हा तुरुंगात जावे लागेल. जेष्ठतेच्या यादितील दहाव्या क्रमांकाचा व्यक्ती बोलला.

तो यांच्यापैकीच असला तरी इसवीसन १५२६ पासून सुरु झालेल्या प्रवासाचा तो १८५७ मधील शेवटची कडी होता. मध्ये तिनशे वर्षाच्या काळात बरच काही घडून गेलं होतं. मध्ययुगातून आधुनिक युगात प्रवेश झाला होता. त्यास आधुनिक काळातल्या शिष्टाचार आणि नियमांचे फेरे बऱ्यापैकी ठाऊक होते. या फेऱ्यात अडकून त्याची अवनती सम्राटपासून सामान्यजनापर्यंत झाली होती. त्यामुळे त्याने आजचं वास्तव ह्रदयातूनच सांगण्याचा प्रयत्न केला. भूतकाळात रमलेल्या इतर जेष्ठांनाही त्याचं सांगणं पटलं. सर्वसमर्थ सम्राटांच्या तलवारी जेव्हा त्यांच्या हातातून निसटून जातात तेव्हा त्याच्या शरीरातील रक्ताचही पाणी होऊन जातं. याची जाणीव सर्वांनाच झाली..त्या निरव शांततेला त्या दहाही जणांच्या या अस्वस्थतेनं भयावह आणि केविलवाणं बनवून टाकलं. दहाजणातील कुणीतरी हुंदका सुध्दा दिला. तलावार गेली की सामर्थ्य जातं. सामर्थ्य गेलं की अश्रूंचे मोल शून्य होऊन जातं. या वास्तवाची खात्री त्यांच्यापैकी काहींना पटली.

ताजचा मृत्यू कशामुळे होत आहे, अब्बाजान के अब्बाजान के अब्बाजान के अब्बाजान, तिथेतर हमारी दिलोजान राहतेय. आमच्या जानच्या जीवावर साडेतिनशे वर्षानंतर कोण बरं उठलाय ?  हाय रे कर्मा. हायरे दैवा. काय ही फळ या नशिबास. किस जनम का मै ये पाप फेड रहाँ हूं. आता है दाग—हसरत-ए, दिल का शुमार याद/ मुझसे मेरे गुनाह क हिसाब ऐ खुदा न माँग..असं काहीसं पुटपुटत तो पाचव्या क्रमांकाचा जेष्ठ जोरजारानं हुंदके द्यायाला लागला.

ही वेळ आता अशी रडत बसण्याची, हुंदके देण्याची आणि एकमेकांचे उणे दुणे काढण्याची नाही बरुखुरदारो.. ताजचा मृत्यू थांबवण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. जेष्ठतम व्यक्ती काळजीनं सर्वांना सांगता झाला..

काय केले पाहिजे? कुणीतरी विचारलं.

त्याचाच विचार करण्यासाठी आम्ही तुम्हा सर्वांना इथं या अमावसेच्या रात्री बोलावलं. झोपेतून जागं केलं.

ताज मेला तर काय होईल ?

काय होईल ?

खरच की, काय होईल ?

याचा आपण कधी विचारच केला नाही. सातव्या क्रमांकापासूनचे सर्व जेष्ठ एकसुरात म्हणाले.

आपण मेलो तर काय झालं ? तिसऱ्या क्रमांकाचा जेष्ठ तत्ववेत्याच्या सुरात बोलला.

काय झालं ? चौथ्या क्रमांकाच्या जेष्ठानं विचारलं.

काय झालं, काय विचारता अब्बाजान के अब्बाजान. आपले साम्राज्य लयाला गेले.

पण त्यामुळे काय झालं ?

काहीच नाही.

मग तसच ताज मेला तर काय होईल ?

काहीच नाही.

मग कशाला त्याची चिंता करायची.

ज्यांनी चिंता करायची ते करत नाहीत. ज्यांना करायची गरज नाही ते मात्र करत बसले. झोपी गेलेल्यांना जागं करुन काय उपयोग. दिल्लीच्या तख्तावर पुन्हा बसता येईल का ?

अरे, तुम्ही असा कसा विचार करता. ताज आपली शेवटची आठवण आहे. ताज याच्या बायकोचं जरी असला तर आपल्या घराण्याचा सरताज आहे. त्यामुळेच त्याचा मृत्यू थांबवला पाहिजे. असं तुमच्यापैकी कुणासही वाटत नाही का ? जेष्ठतम काळजीच्या स्वरात म्हणाला.

जे घडायचं असतं, ते त्याची वेळ काळ आली की बरोबर घडत असतं. भाग्यापेक्षा आधी आणि त्यापेक्षा अधिक मिळत नाही. असं पिरबाबांनी सांगितलेलं तुम्ही कसं विसरलात ते. ताजच्या मृत्यूची वेळ आणि काळ जर आला असेल तर आपण ते थांबवणारे कोण ? हे तर निसर्गनियमाच्या विरुध्दच ठरेल की.

म्हणजे ताजला आपण मरु द्यायचा.

होय मरु देऊया. ते त्याचे भाग्य आणि आपले नशिब.

नही. असं कदापी होणं नाही. आपल्या घराण्याच्या इतिहासात भाग्याला स्थान नाही. स्थान आहे ते केवळ तलवारीच्या धारेला. तलवारीच्या प्रत्येक थेंबावर आपल्या घराण्याच्या यशाच्या पाऊलखुणा उमटल्या आहेत.

पण आपण असं आपसातच वादविवाद करुन काय मिळणार ? अब्बा हुजूर के अब्बाहुजरजी का कहना हमे ठीक लगता है, की ताज हमारे यादो का परिंदा है. उसे जिंदा रहनाही होगा.

मरु द्या हो त्या ताजला. उगाच डोकेदुखी आपण कां घ्यायची. इतके वर्षं तो जगलाच कसा हेच आश्चर्य नाही का ?

अरे मूर्खा, या ताजमध्ये आपल्या दुसऱ्या साम्राज्याची बिजे दडली आहेत. हे तुमच्यापैकी कुणाच्याही लक्षात येत नाही का  ?

ते कसं, आतापर्यंत वितंडवाद घालून सतत तलावारीची भाषा मनात करणारी सहावी जेष्ठ व्यक्ती व्यक्ती मोठ्या उत्सुकतेनं विचारती झाली.

या ताजला आपण पळवायचं.

आणि त्याचं काय लोणचं करायचं की आल्प्स पर्वतावरुन ढकलून द्यायचं. हुक्का न पिण्याचा हट्ट करणारी व्यक्ती उपहासानं म्हणाली.

बरखुरदार, अरे जमिनीवरचे साम्राज्य स्थापन करण्याचे दिवस संपले आता, वर आकाशात नव्या साम्राज्याची पायाभरणी आपण करु शकतो. जेष्ठतम व्यक्ती म्हणाली.

आजोबाच्या आजोबांचे आजोबा, वय झालं की माणसाला म्हातरचळ लागतो म्हणतात. तसं तुमचं झालय. आपण सारेजण जमिनिवरील कब्रस्तानातच आहोत. साम्राज्य कोण स्थापन करणार ?

गधड्यांनो, आपण कब्रस्तानात राहत होतो. आता आपला आत्मा, आपली रुह या इथे मंगळावर आली  आहे.

इथे तर कोणीही नाही. या ओसाड गावात कोणासाठी साम्राज्य स्थापन करणार आपण.

मूर्खांनो आगे की सोचो.

काय आगे की सोचो. अब्बाहूजूर..

गधो, अरे आज ताज मेला, उद्या लाला किला मरणार, परवा कुतुबमिनार मरणार, परवा पुराणा किला मरणार. असं एक एक करत मेल्यावर सगळीकडे खंडहार होणार. वो तो कब्रस्तानसे भी बत्तर समजा जाता है.

हे आता खालच्यांनाही माहीत झालं आहे. त्यामुळे ते आता वर येत आहेत. तो दिवस दूर नाही की ते इथे मंगळावर सुध्दा येतील. आपले मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठी उठकपठक करतील. पण त्याआधीच आपले साम्राज्य जर इथे स्थापित झालं, तर त्यांना तशी संधीच राहणार नाही.

अब्बाहूजूर के अब्बाहूजूर के अब्बाहूजूर लेकीन ताज का इससे क्या लेना देना.

आपल्या साम्राज्याचा ताईत बणून ताज इथे उभा राहील. खालून येणारे सगळेजण ताज बघून वाह ताज, वाह ताज करत राहतील. मंगळावरच्या ताजने त्यांचे डोळे दिपून जातील. डोळे दिपून गेलेल्यांना गुलाम बनवणे सोपे नाही का जाणार?

गुलाम क्यू. त्यांना आपण आपले नागरिक बनवू. साम्राज्यासाठी त्यांची गरज राहणारच की.

खालच्यांनी ताज साडेतिनशे वर्षे बघितला . आता वरच्यांना साडेतीन हजार वर्षे बघण्याची संधी देऊ. ताज बघायला आकाशगंगेतील अपनेही भाईबंद येतीलच की. ते येतील नि ताजच्या प्रेमात पडतील. या प्रेमात पडलेल्यांच्या भाईबंदांच्या मदतीने त्यांच्याच ग्रहावर जाऊन आपण आपले महासाम्राज्य स्थापन करु.

यालाच म्हातारचळ म्हणतात. हुक्का पिण्यास नकार देणारा सहाव्या क्रमांकाचा ज्येष्ठ उपहासानं म्हणाला.

याला दूरदृष्टी म्हणतात. तिसरा जेष्ठ म्हणाला.

डोंबल्याची. सहावा फिस्सकन हसत म्हणाला.

गधड्या, मी समरकंदातून हिंदुस्थानात आलो नसतो तर तुम्ही सर्वजण सम्राट झाला असता का ? ही माझी दूरदृष्टी होती. तसेच आता दूरदूरचा विचार करण्याची वेळ ताजमुळे आली आहे. निचेवाला हिंदूस्थान वाळवंटातील अब्जावाधी वाळूंच्या एक दान्यासारखा आहे. अशा लाखो हिंदुस्थानांना एकत्र केले तरी कमी पडणार नाही अशा आकाशगंगेत साम्राज्य आपणास स्थापन करता येईल.

 आजोबांच्या आजोबांचे आजोबा, तुमचं म्हणणं आम्ही ग्राह्य धरतो, पण ताजला इथे
 आणायचं कसं.
सहाव्या जेष्ठानं विचारलं.

पळवून आणू. जेष्ठतम तत्काळ उद्गारला.

वो कोई जोधाबाई तो है नही. तिसरा जेष्ठ म्हणाला.

युध्द करुन ताजला पळवण्यासाठी तलवारी हव्यात. त्यासगळ्या वस्तूसंग्रहालयात बंदिस्त झाल्या आहेत.सहावा जेष्ठ म्हणाला.

जसे तू मला बंदिस्त केले होते. पाचव्या क्रमांकाचा जेष्ठ सहाव्याकडे तिरस्कारानं बघत म्हणाला. त्याच्या स्वरात मोठा विषाद भरला होता.

अब्बाहुजूर, जुन्या जखमेवर मीठ चोळून काय उपयोग आता. आप भी नही हो आणि आम्ही सुध्दा नाही आहोत. आता कोळसा कितीही उगळला तरी त्यातून हिऱ्याचा प्रकाश बाहेर पडणार नाही. सहावा जेष्ठ तत्ववेत्याच्या भूमिकेत शिरत पाचव्याकडे बघत म्हणाला.

ये गधा, जो भी कह रहा है ,ते सध्यस्थितीत बरोबर आहे. त्यामुळे जुन्या कढीला पुन्हा कुणी उकळू नका. त्यामुळे ती ताजी होणार नाही. आता फक्त आपण ताजमहाल इथे कसा आणता येईल याचा विचार करु. जेष्ठतम चढ्या आवाजात बोलला. त्याच्या जेष्ठतमतेचा मान ठेवत सर्वांनी मान हलवली.

०००

त्यानंतर ते दहाही जण विचारमग्न झाले. ताज इथे आणायचा कसा यावर बराच खल झाला. या मंथनातून जेष्ठतमास काहीतरी आठवलं. त्याने आपल्या अंगरख्यातून पोथी काढली. रामचरित मानसची ती प्रत होती.

आपणास जेव्हा अयोध्येत पुरले तेव्हा कुणीतरी ही प्रत बाजूला ठेवली. ती तेव्हापासून जपून ठेवली. पारायणं केली आहेत याची. यामध्ये कोई हनुमान गोसाई है जिसे बजरंगबलीके नामसे भी जाना जाता है, याच्याबद्दल लिहिलं आहे या पोथित. जेष्ठतमानं इतर नउु जणांना पोथी दाखवत सांगितलं.

या हनुमान गोसाई बद्दल जोधाबाईला माहीत आहे. त्यांच्या माहेरी राधेकृष्ण आाणि बजरंगबलीची पूजा केली जायची. तिसरा जेष्ठतम पटकून बोलून गेला.

आम्ही २५ वर्षे दख्खनात काढल्यानं आमच्या कानावर या हनुमान गोसाईची कीर्ती आली आहे. खुल्ताबादेत तो भद्रामारुती म्हणून सोया हुवा हमने देखा है. सहावा जेष्ठ उत्साहानं सांगता झाला.

पण, या हनुमान गोसाईचं गुणगौरव करण्यात आजोबांच्या आजोबांचे आजोबा वेळ कां दवडता ? हा तुमचा वेळकाढूपणा बघून आमच्या हाती तलवार असती तर आम्ही आम्हालाच कंठस्नान घातलं असतं. असं पाचवा जेष्ठ या चर्चेनं कंटाळून आवेगात म्हणाला.

अरे, आता असं कुणी वैतागू नका, रागावू नका, चिडू नका. आम्ही काही वेळ काढत नाही. हा जो हनुमान गोसाई आहे ना. त्याने हिमालयातला एक पर्वतच्या पर्वत उचलला नि तो तिकडे एका युध्दाच्या ठिकाणी घेऊन गेला. तूच विचारलं होतस ना की येथे ताज कसा आणायचा ते. हनुमान गोसाईला आपण सांगू. विनंती करु.

अब्बाहुजूर, ये हनुमान गोसाई हमारी बात क्युं मानेगा. ताज मरे या जिंदा रहे, उसे क्या लेना देना. दुसऱ्या जेष्ठानं जेष्ठतमास आपली शंका विचारली.

अगदी बरोबर माझ्या लेकरा. पण त्याला आपण सांगूच नाही ताज आणायला. जेष्ठतम रहस्यमयरीत्या स्मित करत उद्गारला.

मग…

 हनुमान गोसाईला सांगू की, अरे तुझ्या तेजोलयाची अवस्था फार वाईट झालीय रे. केव्हाही त्याची पडझड होऊ शकते. या तेजोलयात तर साक्षात शिवजी भगवन रहते है. हे कानावर पडताच हनुमान गोसाई सगळी कामं सोडून मृत्युरुपी कृष्णमेघात वेगानं जात असलेल्या ताजला यूंव उचलेल आणि इथे मंगळावर यूंव आणेल. मंगळावर नदी असल्याचा शोध लागलाच आहे. त्याठिकाणी हा ताज ठेवायला त्याला सांगू. ही मंगळावरची यमूना. यमूनेच्या काठी आपला ताज. हनुमान गोसाईचा तेजोलय..

पण हे हनुमान गोसाई सापडणार कुठे आपल्याला? तिसऱ्या जेष्ठानं जेष्ठतमास विचारलं.

तोच प्रश्न आहे. तोच मोठा सवाल आहे. तुम्ही सर्वजण आता आत्म्याच्या रुपात आहात. तुमचा हा आत्मा प्रकाशाच्या वेगानं कुठही जाऊ शकतो. तेव्हा आता निघा. हनुमान गोसाईचा शोध घ्या. असं कळकळीनं ज्येष्ठानं त्या सर्वांना उसांगितलं.

सध्या ते दहाही जण हनुमान गोसाईच्या शोधात अंतराळात निघाले आहेत. तो कधी आणि कुठे सापडेल हे कुणासही ठाऊक नाही. ….

००००

पार्ट टू

स्थळ आग्रा

ताज मरणाच्या दारात पोहचत असल्याची बातमी सह्रदय महाराणी मल्लिका ए हिंदोस्थान जोधाबाईंपर्यंत पोहचलीच होती. आपल्या पडनातसुनेला धीर देण्यासाठी त्यांचा जीव कासावीस होऊ लागला. सम्राटांच्या परवानगीचे सोपस्कार  न करताच त्या एके मध्यरात्री मुमताज महलला भेटायला गेल्या..

ताजच्या मृत्यूच्या आशंकेनं मलूल झालेली आणि कोमेजून गेलेली आपली पडनातसून मुमताजमहल बघून त्यांचं ह्रदय भरुन आलं. महाराणींना बघताच मुमताज महल त्यांच्या कुशित शिरली.

मल्लिका ए हिंदुस्थान, आपल्या कुटुंबकबिल्यातील जेष्ठ दहाजण हनुमान गोसाईच्या शोधायला गेल्याचं तुम्हास ठाऊकच आहे. पण तो सापडला आणि त्याने ताज उचलून मंगळावर आणण्याचं कबूल केलं तर अत्युत्तम. पण त्याने ताज मंगळावर आणण्यास नकार दिला तर…

ताजचा मृत्यू अटळ आहे असंच समजायचं.

जोधाबाई मुमताजमहलला दु:खी अंत:करणानं म्हणाली. ते बोल कानी पडताच मुमताज महलच्या नयनी अश्रूंची धार सुरु झाली…

०००

त्या अश्रूंनी भांबावून गेलेला ताजचा वास्तुपुरुष स्वत:शीच पुटपुटला..

ना था कुछ, तो खुदा था

कुछ ना होता, तो खुदा होता

डुबोया मुझको होनिने

ना होता मै, तो क्या होता…