(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

निंदानालस्ती

एका तलावाच्या काठी असलेल्या झाडाच्या आडोशाला अनेक पक्षी येत. दिवसभर त्यांची दंगामस्ती चाले. इकडूनतिकडे उडायला, या पक्षांना खूप आवडत असे. एकही पक्षी, फार काळ एखाद्या ठिकाणी स्वस्थ बसत नसे. एका फांदीवरुन दुसऱ्या आणि दुसरीवरुन तिसऱ्या आणि मग लगेच पंख फैलावून आकाशात सूर मारणार, सभोवताली चक्कर मारली की पुन्हा झाडांच्या फांद्यावर येऊन बसणार. पुन्हा काही वेळाने हाच खेळ नव्याने सुरु.

अशा या ,तलावाच्या ठिकाणी काही बगळे येत. तलावातली बसण्यासारखी एखादी जागा ते बघत. त्यावर तासनतास बसून राहत. क्वचितच ते या जागेवरुन, त्या जागेवर जात किंवा काही दूर उडून येत. इतर पक्षांसारखं मात्र, सारखे उडणे बसणे, पुन्हा उडणे असं काही ते करत नसत.

इतर पक्षांना याचं फार आश्चर्य वाटायचं.

एकदा पक्षांची सभा भरली .त्यात कावळा, पोपट, चिमणी, टिटवी, कोकीळ, कोकिळा, कबुतर, निळकंठ इत्यादी पक्षी होते. ते सर्वजण तलावात एका जागेवर बसलेल्या बगळयाबद्दल चर्चा करु लागले.

“हा बगळोबा, फारच आळशी दिसतो बुवा.”कावळा म्हणाला.

“उडता येत असूनही फार उडत नाही. मख्ख बसून राहतो, दिवसेंदिवस एकाच ठिकाणी.”पोपट म्हणाला.

“इतका आळशी पक्षी दुसरा कुणीच नसेल.”कबुतर म्हणाला.

“त्याला,शक्य असते तर, त्याने दुसऱ्याकडून उडून घेतले असते.” निळकंठ विनोदाने म्हणाला.

अशाप्रकारे, प्रत्येक पक्षी बगळ्याची खिल्ली उडवत होता. हे सर्व बगळ्याच्या कानी पडत होतं. पण त्याने यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

“बघा, कसा मख्खपणे बसलाय. बोलण्याचे सुध्दा कष्ट घेत नाही.”टिटवी म्हणाली.

या सभेत काही वेळाने, एक वयस्क गरुड सामील झाला.बगळ्याला नाव बोटं ठेवणं त्याला काही आवडलं नाही. तो इतर पक्षांना रागावला सुध्दा.

“अरे, अशी दुसऱ्यांची निंदानालस्ती करणं बरोबर नाही.”

“गरुड काका, आम्ही निंदानालस्ती करत नाही हो. आपली किंचितशी गंमतजंमत सुरु आहे.” पोपट सावरासावर करत म्हणाला.

“दुसऱ्याला टोचून बोलणे म्हणजे विनोद नव्हे पोपटोबा.आपल्या बोलण्यामुळे इतरांना दु:ख होतं, हे तुमच्या, कधी लक्षात येणार? तुम्हाला वाकड्या चोचिचा पोपट म्हंटलं तर चालेल काय?”गरुडाने पोपटाला विचारलं. पोपटाने दुसरीकडे मान वळवली आणि हळूच तिथून पोबारा केला.

“कावळोबा, सतत तुम्हास काळुंद्र्या काळुंद्र्या म्हंटलं तर, ही तुम्हास, गंमतजमत वाटेल का?” गरुड कावळयाकडे वळून म्हणाला. कावळयाने दुसरीकडे मान वळवून पोबारा केला. अशाप्रकारे गरुडाने प्रत्येक पक्षाकडे असलेली वैगुण्ये दाखवली. त्यामुळे एकएक पक्षी तिथून उडून गेला. आता फक्त उरली चिमणी. तिच्या डोळयातून अश्रू वाहत होते.

“कां गं, रडतेस तू?”गरुडाने चिमणीस विचारलं.

“गरुड काका, तुमचं सांगणं कुणाला रुचलं नाही बघा. म्हणून ते इथून निघून गेले. मला मात्र माझी चूक पटली. यापुढे बगळयासच काय कुणालाही मी वेडेवाकडे बोलणार नाही,कुणाची टिंगलटवाळी करणार नाही.”

“हो ना, मग छान आहे की. आपली चूक पटली व पुन्हा तसं वागायचं नाही, असं पक्क ठरवलं की चुकीची दुरुस्ती झाली, समजायची.”

“गरुड काका, मला बगळेकाकांची क्षमा मागाविसी वाटते हो.पण त्यांच्याकडे जाण्याची भीती वाटते.”

“अगं, भीती कशाला बाळगायची? चुकीसाठी क्षमा मागणं कधीही चांगलंच असतं. आपल्या मनावरचा भार कमी होतो. एकमेकांच्या मनात, काही वाईट असेल तर ते निघून जातं. क्षमा मागायला मात्र कधी विलंब लावयाचा नसतो.” गरुड चिमणीस म्हणाला.

चिमणी हिम्मत करुन बगळ्याकडे गेली. तिने आपण पक्षांच्या सभेत बगळयाच्या निंदानालस्तीत सामील झाल्याबद्दल क्षमा मागितली.

बगळयाने शांतपणे मान वर केली. डोळे उघडले. त्याला नुकताच पाण्यात मिळालेला किटक चिमणीस खायला दिला. त्याने चिमणीशी मैत्री केली. इतका चांगला मित्र मिळवून दिल्याबद्दल चिमणीने गरुडाचे आभार माणले.

सुरेश वांदिले