
ठिकाण दुबई. एका सभागृहात संयुक्त राष्ट्रांमार्फत भरवलेल्या जागतिक हवामान परिषदेचं कामकाज सुरु होतं. तिथे अचानक गडबड झाली. एक चिमुरडी कुणालाही न भिता, व्यासपीठाकडे धावली. त्यावेळी तिचं वय होतं १२ वर्षे. या प्रकाराने सगळेजण अवाक झाले. पण, या चिमुरडीच्या हातात बंदूकबिंदूक नसून, एक निरुपद्रवी फलक असल्याचं दिसताच सगळयांनी सुटकेचा निश्वास टाकला. काय बरं लिहिलं होतं, त्या फलकावर, “जिवाश्म इंधनाचा वापर थांबवा, पृथ्वीला वाचवा, माझं भविष्य सुरक्षित करा.”
या फलकाने आयोजक मंडळी गडबडली. तिला हाटहूट करु लागली. कुणीतरी सुरक्षा रक्षकालाही बोलावलं. पण, एका सभ्यगृहस्थाच्या लक्षात आलं की हे तर हवामानबदल नि पर्यावरण रक्षणाचं महत्वं सांगणारं. मग, सुरक्षारक्षक थांबले. तिला त्या व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली गेली.
“पर्यावरणाच्या नाशाला कारणीभूत ठरत असलेल्या जीवाश्म इंधनामुळे पृथ्वीचं अस्तित्व धोक्यात आलं असून, माझ्यासारख्या कोट्यावधी मुलामुलींचं भविष्य अंधकारमय झालय.” अशा आशयाचं मत तिने ठामपणे व्यक्त केलं. जमलेले सगळे अवाक झाले. पर्यावरण रक्षणासाठी असच, निडरपणे वागणाऱ्या, स्वीडनदेशाच्या ग्रेटा थनबर्ग या मुलींची, यावेळी सगळ्यांना आठवण झाली. आणखी एक ग्रेटाचा उदय झाल्याचे काहिंना वाटलं.
पण हे वाटणं, फक्त काहिंपुरतचं मर्यादित राहिलं. कारण तिथे जमलेल्या बहुसंख्यकांना, हा या चिमुरडीचा आगावूपणा वाटला. आतापर्यंत, ती जे बोलली किंवा बडबडली म्हणा, ते पुरे झालं, असं आयोजकाना वाटलं नि मग या मुलीला अक्षरक्ष: तिथून हाकलून लावलं गेलं.
तिला मिळालेल्या या वागणुकीमुळे ती निराश झाली नाही. उलट नव्या जोमाने पर्यावरण रक्षण मोहिमेत स्वत:ला झोकून दिलं.
०००
पर्यावरणातील बदल आणि त्याचे वाईट परिणाम हे तिला लहानपणापासूनच लक्षात आले होते. तेव्हा तिचं वय होतं सात वर्षाचं. मनोसक्त खेळण्याच्या नि बागडण्याच्या त्या वयात ही चिमुरडी, तिच्या घरीदारी आलेल्या-गेलेल्या लोकांकडे पर्यावरण रक्षणाबद्दल बोलू लागली. काहींना गंमत वाटली, काहिंनी कौतुक केलं. फार कमी लोकांनी तिला पाठिंबा दिला.
वयाच्या सहाव्या वर्षीच तिने हवामान बदलाबद्दल जमेल तसा आवाज उठवायला सुरुवात कली. २०१८ साली तिने वडिलांसमवेत मंगोलियात, संयुक्त राष्ट्रसंघाने आयोजित केलेल्या आपत्ती परिषदेत भाग घेतला. यातून तिला पर्यावरण कार्यकर्ती होण्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर तिने, “पृथ्वी वाचवण्यासाठी, हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्ती याबाबत जाणीव जागृती करण्यासाठी, मुलांची चळवळ”, अशी संघटना स्थापन केली.
या मुलीने, पर्यावरण रक्षणाचा ध्यासच घेतला. जमेल तिथे जाऊन, ती या विषयावर बोलू लागली. तिच्या वयोगटातल्या मुलांना सांगू लागली. तिला हळूहळू प्रतिसादही मिळू लागला. पर्यावरण रक्षणासाठी कार्यकरणाऱ्या काही संस्था, संघटनांचं तिच्याकडे लक्ष गेलं. त्यांनी तिला प्रोत्साहन दिलं
२०१९ साली अंगोला राष्ट्रातील लुआँडा येथे संयुक्त राष्ट्र संघानेच आयोजित केलेल्या व्दीवार्षिक परिषदेत तिने सहभाग घेतला. अंगोला, माली, मालावी, कांगो या राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष, नोबल पारितोषिक विजेते डेनीस मुकवेगे, युनोस्केचे संचलाक आदी मान्यवरांसमवेत हवामान बदलावर आपली मते पोटतिकडीने मांडली.
केरळ राज्यात २०१८ साली आलेल्या महापुरात बळी पडलेल्या मुलांच्या साहाय्यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी आपल्या बचतीतील १ लाख रुपये देणगी दिली.
०००
स्थळ दिल्लीतील संसदभवन.
तिथे या मुलीने ठिय्या मांडला. भारतातील प्रचंड प्रदुषणपातळी कमी करण्यासाठी कायदा केला जावा आणि शाळांमध्ये पर्यावरण साक्षरता बंधनकारक करावी, यासाठी तिचं आंदोलन होतं. तिला पंतप्रधानांचं लक्ष वेधून घ्यायचं होतं.
४ ऑक्टोबर २०१९ रोजी तिने, हवेच्या प्रदुषणापासून भविष्यात टिकून राहण्यासाठी, “सुकिफू” (सर्व्हायवल किट फॉर फ्युचर) असं एक प्रतिकात्मक उपकरण, आयआयटी जम्मूमधील प्राध्यापक चंदन घोष यांच्या साहाय्यानं तयार केलं. पंजाब आणि हरयाणा विधासभेच्यासमोर या उपकरणाचा शुभारंभ केला. याव्दारे तिने राजकीय नेत्यांचं लक्ष हवेच्या पद्रुषणामुळे होणाऱ्या दुष्परिणामाकडे वेधण्याचा प्रयत्न केला. मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी हे अत्यंत आवश्यक असल्याचं ठासून सांगू लागली.
२१ ऑक्टोबर २०१९ रोजी तिने दिल्लीतील इंडिया गेटजवळून हजारो पाठिराख्यांसह, ‘ग्रेट ऑक्टोबर मार्च (ऑक्टोबर महायात्रा)’ सुरु कली. २७ ऑक्टोबर पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन या यात्रेने, हवामान बदलाच्या अनुषंगाने तत्काळ कायदा करण्याची मागणी केली.२०१९मध्ये ती माद्रिद मध्ये ,संयुक्त राष्ट्रसंघाच्या २५ व्या हवामान बदल परिषदेत सहभागी झाली.या परिषदेत १९६ देशातील २६ हजार व्यक्ती सहभागी झाल्या होत्या.या ठिकाणी तिने जगातील सर्व मुलांच्या वतिने,एक निवदेन संयुक्त राष्ट्र संघाच्या सचिवांना दिले.जगातील मुलांसाठी उत्तम स्थान आपल्याला निर्मित करायवयाचे असल्याचे तिने या परिषदेत सांगितलं.तिचं या ठिकाणी बरच कौतुक झालं.२०२०च्या इकॉनॉमिक फोरम परिषदेच्या निमित्त जगातील तिच्यासारख्याच तरुण पर्यावरण कार्यत्यांसमवेत एक निवदेन प्रसृत करुन जीवाश्म इंधन निर्मितीसाठी सरकार,बँका यांनी तत्काळ अनुदान देणं थांबवावं यासाठी निवदेन काढलं.हे कधीतरी २०५० किंवा २०३० किंवा २०२१मध्ये होण्याऐवजी तत्काळ व्हावे,अशी मागणीही त्यांनी नोंदवली.शाश्वत तंत्रज्ञान,संशोधन आणि निसर्गाच्या जीर्णाध्दारासाठी,सरकारांनी अधिकाधिक गुंतवणूक करायला हवी .भविष्यातल दीर्घ कालावधीच्या जीवनाच्या स्थैर्याला,लघु कालावधीच्या नफ्यापेक्षा अधिक महत्व देणं आवश्यक असल्याचं त्यात नमूद होतं.२०२०मध्ये करोनाच्या काळात वाश्गिंटन येथील वसुंधरा दिवस(अर्थ डे) परिषदेत, ती आभासी पध्दतीने जगातील ५० मान्यवरांच्या समवेत सहभागी झाली होती.पर्यावरण समस्येबाबत तिचे विचार सर्वांनाच आाशयादी वाटले.२३ फेब्रुवारी २०२०ला तिने हवामान बदल,पर्यावरण रक्षण या विषयावर टेड टॉक मध्ये भाषण दिलं.हे तिचं सहावं भाषण होतं.त्यावेळी तिचं वय होतं अवघ ९ वर्षे.शाळांमध्ये पर्यावरण रक्षणाचा धडा समाीविष्ट केला जावा,या तिचमागणीला गुजरात सरकारने स्वीकारले नि असा धडा शालेय शिक्षणात सामील करण्याच्या निर्णय घेतला.तिच्या या अथक प्रयत्नांची दखल घेऊन,रायझिंग स्टार,ग्लोबल चाइल्ड प्रोडिजी अशा सारखे अनेक पुरस्कारही मिळाले.
२०१९ साली स्पेन देशात, माद्रिद येथील हवामानबदल परिषदेत तिला बोलण्याची संधी मिळाली. हवामान बदलाबाबत जागृती करण्यासाठी धडपडणारी सगळयात तरुण कार्यकर्ती असा तिचा गौरवही झाला. ‘हवामानबदलाचा प्रश्न जर तुम्ही गांभिर्याने घेतला नाहीतर, ही पृथ्वी तुम्हाआम्हास क्षमा करणार नाही.’ असं तिने अनेक जागतिक नेत्यांना सुनावलं. तिच्या या धाडसाचं कौतुकही झालं. तिला पर्यावरण रक्षणासाठी कार्य करण्यासाठी असेलेले अनेक मानसन्मान मिळाले. पण सन्मान महत्वाचा नाही, पर्यावरण रक्षण महत्वाचं, असं ती प्रत्येक सन्मानाच्या वेळी ठासून सांगते.
तर, अशा ही निडर मुलगी, लिसिप्रिया कांग्जुआम. आपल्या देशातल्या मणिपूर राज्याची रहिवाशी!
सुरेश वांदिले