
पर्यटन क्षेत्रातील करिअर संधी
करोना काळात एकमदमच मान खाली टाकलेले हे क्षेत्र नवी उर्जा अनुभवायाला लागले आहे. मोठ्या ट्रॅव्हल कंपन्यांच्या पानपानभर जाहिराती या क्षेत्रातील चैतन्याचे निर्दशक ठरत आहेत. छोट्या ट्रॅव्हल कंपन्याही यामध्ये मागे नाहीत.
पर्यटनाचे विविध प्रकार आता रुजू होत आहेत. तुम्हाला पाहिजे तसा आणि पाहिजे तेव्हा टूर म्हणजे तुम्हीच डिझाइन केलेला किंवा कस्टमाइज्ड टूर सुध्दा या कंपन्या सेवा देऊ लागल्या आहेत. नवी नवी ठिकाणं शोधून त्या ठिकाणी पर्यटकांना नेलं जात आहे. विमान प्रवास, क्रुझ (लक्झरी बोट) प्रवास, हेलिकॉप्टर प्रवास, बाईक प्रवास, ट्रेन प्रवास, कॅब प्रवास, महिन्याभराचा प्रवास अशी विविध आकर्षणे पर्यटकांच्या समोर आहेत. वीकएन्ड म्हणजेच आठवड्या शेवटच्या दोन दिवसाचे पर्यटन सुपर हिट झाले आहे. पर्यटन क्षेत्रातील वाढलेल्या या गतिविधींमुळे पुन्हा एकदा प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज या क्षेत्राला भासू लागली आहे. या क्षेत्रासाठी आवश्यक असणारे कौशल्य, तंत्र देणारे शिक्षण प्रशिक्षण दर्जेदार संस्थामधून घेतल्यास पर्यटक कंपन्यामध्ये प्लेसमेंटच्या संधी सहजतेने उपलब्ध होऊ शकतात.
अशा काही संस्था आणि अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहेत-
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टुरिझम आणि ट्रॅव्हल मॅनेजमेंट
पर्यटन आणि यात्रा व्यवस्थापन या विषयातील शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी आपल्या देशातील सर्वात महत्वाची आणि दर्जेदार संस्था म्हणून इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टुरिझम आणि ट्रॅव्हल मॅनेजमेंट (आयआयटीएम) या संस्थेने ख्यातीप्राप्त केली आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी ही स्वायत्त संस्था असून या संस्थेचे ग्वाल्हेर, नॉयडा, भूवनेश्वर , गोवा आणि नेल्लोर या ठिकाणी कॅम्पस आहेत.
संस्थेच्या वतिने बॅचलर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए) इन टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल, मास्टर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (एमबीए) इन टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल हे दोन अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत.
(बीबीए) इन टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल- कालावधी तीन वर्षे. या अभ्यासक्रमला कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला प्रवेश मिळू शकतो. खुल्या सवंर्गातील उमेदवारास ५० टक्के आणि राखीव संवर्गातील उमेदवारांना ४५ टक्के गुण मिळायला हवेत. (यंदा बारावीची परीक्षा दिलेले उमेदवारा ही चाळणी परीक्षा देऊ शकतात.मात्र त्यांचा निका ३० सप्टेंबर पर्यंत लागायला हवा.)अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातल जागा रिक्त राहिल्यास त्या जागा,याच संवर्गातील ज्या उमेदवारांनी चाळणी परीक्षा दिली असेल,त्यांच्यामधून भरल्या जातात.
प्रवेश प्रकिया-या अभ्यासक्रमाला दोन पध्दतीने प्रवेश दिला जातो. (1)सीयुईटी-युजी 2025(सेंट्रल युनिर्व्हसिटी एन्ट्रस टेस्ट- अंडर ग्रज्युएट)
किंवा (२) आयआयटीएम ॲडमिशन टेस्ट– ही परीक्षा ग्वाल्हेर, भुवनेश्वर, गोवा, नॉयडा आणि इतर काही केंद्रावर घेण्यात येईल. चाळणी परीक्षेत विशिष्ट गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मुलाखत आणि समूहचर्चेसाठी बोलावण्यात येईल. तिनही घटकांच्या कामगिरीवर आधारित अंतिम निवड केली जाईल. त्यासाठी प्रवेश परीक्षेतील किंवा सीयुईटी परीक्षेतील कामगिरीला 70 टक्के वेटेज आणि समूहचर्चा व मुलाखतीसाठी प्रत्येकी 15 टक्के वेटज दिले जाते.
अशी असते परीक्षा
ही परीक्षा वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी पध्दतीची आहे. एकूण गुण 100. या पेपरमध्ये सामान्य अध्ययायनाचे 50 प्रश्न, भाषिक कौशल्याचे 25 प्रश्न आणि सांख्यिकी कौशल्याचे 25 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला एक गुण असून निगेटिव्ह गुण नाहीत. पेपरचा दर्जा 12 वी परीक्षेचा असतो.
अर्हता- कोणत्याही शाखेतील 50 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यास या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांग प्रवर्गासाठी गुणांमध्ये 5 टक्क्यांची सूट देण्यात येते. या अभ्यासक्रमाच्या एकूण 375 जागा आहेत. ग्वाल्हेर कॅम्पसमध्ये 112, भूवनेश्वर कॅम्पसमध्ये 113, गोवा आणि नॉयडा कॅम्पसमध्ये प्रत्येकी 75 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
काय शिकाल?
या अभ्यासक्रमामध्ये व्यवस्थापनाची तत्वे आणि संकल्पना, पर्यटनाची तोंडओळख, भारतीय इतिहास, इंग्रजीतून संवाद कौशल्य, लेखाविषयक मुलभूत तत्वे, आतिथ्यसेवेची तोंडओळख, भुगोलाची तत्वे, व्यवसायाचे अर्थकारण, विपणन व्यवस्थापन, पर्यटनासाठी माहिती तंत्रज्ञान, यात्रा/ प्रवास/ पर्यटनाचे आयोजन, वाहतूक व्यवस्था, पर्यटन संसाधने, परदेशी भाषा (फ्रेंच किंवा जर्मन), पर्यटनाच्या कायदेशीर चौकटी, भारतीय संस्कृती आणि परंपरा, सांख्यिकी शास्त्राची तोंडओळख, हवाई वाहतुकीची तिकिटे आणि मूल्य निर्धारण, हवाईवाहतूक व्यवस्थापन, कार्यान्वयन व्यवस्थापन, पर्यटन छायाचित्रण, मनुष्यबळ व्यवस्थापन, साहस पर्यटन, योग आणि सुदृढ आरोग्य, इव्हेंट व्यवस्थापन या विषय घटकांचा समावेश आहे.
भारत सरकारच्या वेगवेगळया संस्थांमार्फत विविध संवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या शिवाय अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना राज्य आणि केंद्र सरकारमार्फत शैक्षणिक शुल्काचा परतावा दिला जातो. साधारणत: १५० विद्यार्थ्यांना यांचा लाभ मिळतो. ग्वाल्हेर, नॉयडा, नेल्लोर आणि भूवनेश्वर कॅम्पसमध्ये नाममात्र शुल्कात मर्यादित स्वरुपात निवासाची व्यवस्था करण्यात येते.
एमबीए इन टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल
या क्षेत्राशी संबंधित हा महत्वाचा अभ्यासक्रम समजला जातो. या उद्योगाच्या गरजा लक्षात घेऊन, विद्यार्थ्यांमध्ये सर्व प्रकारची आव्हाने स्वीकारण्याचे कौशल्य आणि तंत्र या प्रदान केले जाते. एकूण 750 जागा पुढील प्रमाणे भरल्या जातात. ग्वाल्हेर कॅम्पस- ३३४, भुवनेश्वर कॅम्पस- ११२, नॉयडा कॅम्पस- १८९, नेल्लोर कॅम्पस- ७५ आणि गोवा कॅम्पस-५०.
प्लेसमेंट
संस्थेने दिलेल्या माहितीनुसार मेक अप माय ट्रिप, थॉमस कूक, ली पॅसेज टू इंडिया, टीयूआय डॉट इन, द रिट्ज कार्लटॉन, कुओनी, यात्रा डॉट कॉम, हॉलिडे इन, आयआरसीटीसी, केरला हॉलिडे मार्ट, शेरॅटॉन हॉटेल्स ॲण्ड रिसॉर्टस, बनायन टूर ॲण्ड ट्रॅव्हल, मॅरिऑट हॉटेल्स रिसॉर्ट, बाल्मर लॅवरी ट्रॅव्हल आणि व्हॅकेशन, पॅलेस ऑन व्हील्स, इंडियन हॉरिजॉन-इंडियन ट्रॅव्हल एजन्सी, जिंजर,ॲडव्हेंचर ट्रॅव्हल, ग्रीन ॲडव्हेंचर्स, ॲडव्हेंचर टुर्स इंडिया, हॅप्पी टूर-कॉर्पोरेट ट्रॅव्हल मॅनेजमेंट, राजविलास जयपूर आदी कंपन्यांमध्ये हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाले आहे.
अर्हता – या अभ्यासक्रमाला कोणत्याही विद्याशाखेतील 50 टक्के गुणांसह पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. राखीव संवर्गातील उमेदवारांना गुणांमध्ये 5 टक्क्यांची सूट दिली जाते. प्रवेशासाठी दोन पध्दती अवलंबण्यात येतात. (अ) पुढील चाळणी परीक्षेपैकी कोणतीही एक परीक्षा दिलेली असावी- (1) मॅट- मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट, (2) कॅट- कॉमन ॲडमिशन टेस्ट, (3) सीमॅट- कॉमन मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट, (4) झॅट- झेवियर ॲप्टिट्यूड टेस्ट , (5) जीमॅट- ग्रॅज्युएट मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट, (6) असोशिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कूल मार्फत घेतली जाणारी एआयएमएस टेस्ट फॉर मॅनेजमेंट ॲडमिशन. (7) (1)सीयुईटी-युजी 2025(सेंट्रल युनिर्व्हसिटी एन्ट्रस टेस्ट- पोस्ट ग्रॅज्युएट) यापैकी कोणतीही परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना, आयआयटीएम ॲडमिशन टेस्ट द्यावी लागेल. ही परीक्षा ग्वाल्हेर, नॉयडा, भुवनेश्वर, नेल्लोर आणि इतर केंद्रांवर घेतली जाईल.
ही परीक्षा वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी पध्दतीची आहे. एकूण गुण 100. या पेपरमध्ये सामान्य अध्ययनाचे 50 प्रश्न, भाषिक कौशल्याचे 25 प्रश्न आणि सांख्यिकी कौशल्याचे 25 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला एक गुण असून निगेटिव्ह गुण नाहीत. पेपरचा दर्जा हा पदवी परीक्षेचा असतो. ही परीक्षा किंवा उपरोक्त नमूद परीक्षेतील गुणांवर आधारित निवड विद्यार्थ्यांना मुलाखत आणि समूहचर्चेसाठी बोलावले जाते. अंतिम निवड करताना प्रवेश परीक्षेतील कामगिरीला 70 टक्के वेटेज आणि समूहचर्चा व मुलाखतीसाठी प्रत्येकी 15 टक्के वेटज दिले जाते.
संपर्क – इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, गोविंदपुरी, ग्वाल्हेर- ४७४०११, दूरध्वनी- ०७५१-२४३७३००, ईमेल- admissions@iittm.ac.in, संकेतस्थळ-www.iittm.ac.in
सुरेश वांदिले