(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

  

पावनखिंडीची भीती

काही दिवसांपूर्वी राघव व त्याचे आईबाबा आणि त्यांचे काही मित्र कोल्हापूर परिसरात पर्यटनास गेले होते. पहाटे अंबाबाईचं दर्शन करुन सर्वमंडळी किल्‍ले पन्हाळाकडे कूच करती झाली. पन्हाळा गडावर तास दोन घालवून मंडळी पुढे आंबेघाटातून निघाली ती पावनखिंडीकडे.

पावनखिंडीकडे जाताना राघवच्या डोळयासमोर बाजीप्रभू देशपांडे यांनी या खिंडित गाजवलेला पराक्रम डोळयासमोरुन तरळून गेला. त्याचे इतिहासाचे शिक्षक पावनखिंडाची लढाई रंगवून सांगत.

०००

१६ जुलै १६६० रोजी ही लढाई झाली. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाला धुळ चाखल्यानंतर, अफझलखानाने ताब्यात घेतलेला प्रदेश पुन्हा जिंकत छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा गडावर पोहचले. महाराजांना पकडण्यासाठी या गडाला आदिलशहाच्या फौजांनी वेढा घातला. महाराजांकडे आदिलशाही फौजेच्या तुलनेत अतिशय अल्पप्रमाण सैन्य असूनही त्यांनी या फौजेचा समर्थपणे मुकाबला केला. मात्र काही महिन्यानंतर गडावरील रसद संपत आली तेव्हा महाराजांनी पन्हाळयावरुन निघून विशाळगडावर जाण्याचं ठरवलं. त्यावेळी त्यांच्याकडे केवळ ६०० सैनिक होते.

विशाळगडावर जाण्यासाठी घोडखिंडीचा मार्ग त्यांनी निवडला. यामार्गातून जाताना आदिलशाही फौज गाफील रहावी म्हणून महाराजांनी त्यांच्या सारख्या  दिसणा-या शिवा काशीद या शूर मावळयास मागे ठेवले आणि ते सैन्य घेऊन रात्रीच घोडखिंडीच्या मार्गे वेगाने निघाले. आदिलशाही फौजेचा प्रमुख सिध्दी जोहर यास जेव्हा आपली फसगत झाल्याचं कळलं तेव्हा त्याने महाराजांचा  पाठलाग सुरु केला. त्याच्याकडे १० हजार सैनिक होते. तर महाराजांकडे केवळ सहाशे!

 घोडखिंडित आल्यावर महाराजांचे सेनापती बाजीप्रभू देशपांडे त्यांना म्हणाले, महाराज आता तुम्ही इथून पुढे निघून जा. विशाळगडावर पोहचल्यावर पाच वेळा तोफेचा आवाज आला की तुम्ही सुखरुप पोहचल्याचं आम्हास कळेल. तोपर्यंत आम्ही याखिंडीतून आदिलशाही फौजेला अडवून ठेवू. आपल्या सैन्याला असं मागे ठेवून पुढे जाणं महाराजांना पटलं नाही. पण बाजीप्रभू त्यांना रागावून म्हणाले, लाख सैनिक मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे.

आपल्या सेनापतीच्या या प्रेमाच्या रागवण्यापुढे महाराजांचा नाईलाज झाला. महाराजांनी मग आपल्यासोबत ३०० सैनिक घेतले आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या सहाय्यासाठी तिनशे सैनिक ठेवले. महाराज घोडखिंडीतून पुढे निघाले. तोवर आदिलशाही फौज चिंचोळ्या अशा घोडखिंडित पोहचली होती.

या ठिकाणी घनघोर युध्द झाले. ३०० शूर मावळे, १० हजार आदिलशाही फौजेला भारी पडत होते.

 बाजीप्रभू आणि त्यांचा भाऊ फुलाजीप्रभू पराक्रमाची शर्थ करत होते. शत्रूच्या सैन्यांना कापून काढत होते. या धुमश्चक्रित फुलाजींना वीरमरण आले. मात्र बाजीप्रभू एखाद्या पहाडासारखे शत्रूसमोर उभे राहिले. जखमावर जखमा होत होत्या पण त्याने जराही खचून न जाता ते लढत राहिले. महाराज विशाळगडावर सुखरुप पोहचण्याकडे त्याचे कान लागले होते. सकाळ होता होता, तोफेचे पाच आवाज कानी पडले तेव्हाच बाजीप्रभूंनी आपला देहत्याग केला. बाजीप्रभू आणि त्यांच्या सैनिकांनी ३ हजारांहून अधिक शत्रूच्या सैन्यास यमसदनास पाठवलं. बाजीप्रभू आणि त्यांच्या सैनिकांच्या असिम त्यागाने पावन झालेल्या या घोडखिंडीचं नाव महाराजांनी पावनखिंड ठेवलं.

०००

अशी ही पावनखिंड प्रत्यक्ष बघायला मिळेल म्हणून राघव आणि इतर सर्वांना स्फुरण चढलं होतं. कधी तिथे पोहचतो आणि कधी नाही असं राघवला झालं होतं.

दोनेक तासानंतर पावनखिंडीच्या परिसरात सर्व पोहचले. थोडी आडवाटेला असली तरी पावनखिंडीकडे जाण्यासाठी आता चांगला रस्ता आहे. पायऱ्याही बांधल्या आहेत. जाताना अवतीभवती घनदाट वृक्षराजी लागतात. माकडं आणि वेगवेगळे पक्षी सर्वांचं लक्ष वेधून घेत होते. प्रत्यक्ष पावनखिंड येताच सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. खोल दरीसारखी ही खिंड आहे. ओबडधोबड असे खाचखळगे, दगडं  आणि वाहणारे पाणी, यामुळे या ठिकाणी जाणं खूप अवघड असल्याचं लक्षात येत होतं.

सध्या तिथे खोलवर उतरण्यासाठी लोखंडी जिना केला आहे. त्यामुळे तिथे जाऊन वेगळा थरार अनुभवता येतो. या मंडळींसोबत असणाऱ्या गाईडने उतरायचं का खाली? असं सर्वांना विचारलं. सर्वजण एकमेकांकडे बघू लागले.

अहो, काही होणार नाही. मी आहेना सोबत. गाईड म्हणाला.

पण कुणीही समोर येईना. हे बघून गाईड स्वत:च खाली उतरला. काहीही कठीण नाही, या या असं खालून सांगू लागला. पण कुणीही समोर येईना.

यामुळे राघवची घालमेल होऊ लागली. ही मोठी मंडळी एकिकडे महाराजांच्या पराक्रमाविषयी तावातावाने बोलतात. पण ज्या ठिकाणी इतकी महत्वाची लढाई लढली गेली. ती सुध्दा अत्यंत बिकट परिस्थितीत, जिथे आता अगदी सहज आणि सुलभतेने जाणं शक्य असूनही भीतात….अरेरे!

असं स्वत:शीच पुटपुटून राघवने पायऱ्यांच्या दिशेने पाऊल टाकलं. त्याची आई ओरडली. बाबांनी, गधड्या म्हणून त्याला मागे खेचलं.

अरे, कशाला उपद्व्याप करतोस, असं इतर काका-काकू म्हणाले.

राघवला सर्वांचा फार राग आला. त्याने बाबांचा हात झिडकारला आणि पायरीकडे गेला आणि गाईड ज्याप्रमाणे खाली उतरला तसा एकएक पायरी उतरला. त्याचे आईबाबा आणि इतरजण श्वास रोखून बघत राहिले. आईने रडायचं तेव्हढं शिल्लक ठेवलं. खाली उतरल्यावर गाईडने राघवला मिठी मारली. कुणाला तरी फोटो काढायला सांगितलं. वर कसं जायचं हे समजावलं. त्यानुसार अगदी काटेकोरपणे राघव वर चढला. वर येताच बाबांनी त्याला मिठीत घेतलं. त्याला सॉरी म्हंटलं.

इतरांनीही सॉरी म्हंटलं.

महाराजांनी इतक्या अत्यंत खडतर आणि अशक्यप्राय गोष्टी साध्य केल्या. त्यासाठी जीवाचं रान केलं, आपण मात्र सध्या -सोप्या गोष्टीही कां कठीण करतो असं राघवला कितीतरी वेळ वाटत राहिलं.

सुरेश वांदिले

०००