वननगरीतल्या कोंबडेरावांचा थाट काही औरच होता. त्याची ती ऐटदार चाल, डोक्यावरचा मुकुटासारखा तुरा, तुरुतुरु धावण्याची नि धावताधावता पंख पसरवून उडण्याची कला! त्यामुळे इतर पक्षी आणि प्राणी त्याचा हेवा करत. त्यामुळे आपण काहीतरी विशेष असल्याचा अहंकार, या कोंबडेरावांना झाला. त्यामुळे ते सर्वांना तुच्छ समजू लागले.
एके दिवशी हे कोंबडेराव एैटदार चालीने वननगरीतील पाणवठ्यावर पोहचले. पाणवठ्याजवळील एका झाडावर चढले. फिरवली नजर इकडेतिकडे. डोक्यावरच्या तुऱ्याला हलवलं मोठ्या अभिमानाने.
जोरात म्हणाले,
“कुकुच कुकुच कू,
मीच, या जंगलाचा राजा खरा. काय मस्त, माझा तुरा. अहाहा! माझा काय तोरा! सगळीकडे माझाच दरारा! मीच या जंगलाचा राजा खरा. कुकुच कू, कुकुच कू! “
त्यावेळी पाणवठ्वरील दुसऱ्या एका झाडावर एक पोपटराव, बसले होते. त्यांनी हे ऐकलं नि ते भुरदिशी उडाले. जंगलाच्या आत जाऊन ज्याला त्याला सांगू लागले, “जंगलात आलाय नवा राजा, काय त्याचा तोरा नि काय त्याचा डोलारा, जंगलात आलाय नवा राजा.”
उडत उडत ही बातमी सिंह महाराजांपर्यंत पोहचली.
“जंगलात नवा राजा कसा काय येऊ शकतो? आपणच तर खरे राजे. हा कोण उपटला उपटसुंभ!” त्यांनी महाराणींकडे चिंता व्यक्त केली.
महाराणींनी त्यांना ताबडतोब विशेष जनता दरबार बोलावण्याची सूचना केली. महाराजांनी तेच केलं. सगळी जनता आणि दरबारी दरबाराकडे धावतपळत सुटले. काहीतरी विशेष प्रसंग असेल तरच महाराज दरबार बोलावत. पण तेसुध्दा अनेक दिवस आधी सगळयांना कल्पना देऊन.
“मग, अचानक आज काय मोठं संकट कोसळलं?” गजराजाने कोल्होबा विचारलं.
“नक्कीच आभाळ कोसळण्याची बातमी महाराजांपर्यंत पोहचली असावी.” आभाळाकडे बघत कोल्होबा म्हणाला. गजराजाने आभाळाकडे बघितलं तर ते जागच्या जागी होतं.
“कोल्होबा, ही विनोदाची वेळ नाहीय. तुम्ही काहीतरी बाष्फळ बडबड करु नका.” गजराज रागावून कोल्होबास म्हणाले.
कोल्होबा फिस्सकन हसले नि दरबाराकडे धावू लागले. गजराजही धावू लागले. ते दोघे धावत असल्याचं बघून इतरही प्राणी धावू लागले. त्यामुळे कुणाचा पायपोस कुणात राहिला नाही. छोटे प्राणी मोठ्या प्राण्यांच्या पायाखाली चेंगरु लागले. “मेलो, वाचवा, अरे बापरे, गेलं माझं डोकं, गेला माझा पाय, गेला माझा डोळा नि फुटलं माझं पोट,” अशा आक्रोशाने आसमंत भरुन गेला.
सगळेजण दरबाराकडे धावताहेत हे बघून वेगवेगळे पक्षीही दरबाराच्या दिशेनं उडू लागले. त्यांच्या पंखांच्या कलकलाटाचा आवाज इतका मोठा झाला की धावणारे प्राणी वर बघू लागले. त्यामुळे त्यांचा तोल जाऊन ते एकमेकांवर कोसळू लागले. “तुला दिसत नाही का? तू भोकणा आहेस की चकणा?” असं एकमेकांना म्हणत एकमेकांवर चालून गेले. दरबारात जाण्यापूर्वी प्राणी आपसात एकमेकांशी भिडले. प्रचंड हाणामारी सुरु झाली. झाडावर बसलेले पोपटराव, हे दृष्य बघून महाराजांकडे वेगानं पोहचले.
“महाराज महाराज झाला घात, नव्या राजाचा बघा प्रताप. त्याने केली जादू नि आपली प्रजा लागली भांडू. करताहेत एकमेकांचे डोके फोडू. नव्या राजाचा बघा हा प्रताप, त्याने केलाय घात आता लावेल तुमची वाट! “अशी वटवट करुन पोपटराव उडून गेले.
खरं तर महाराजांना पोपटरावांच्या या वटवटीचा फार म्हणजे फारच राग आला. मारावा त्याच्यावर पंजा नि करावी त्याची चटणी… काय होईल मस्त मेजवाणी, असं महाराजांना वाटलं. पण आताची वेळ मेजवाणीची नसल्याचं त्यांच्या पटकन लक्षात आलं. ज्या कोणत्या नव्या राजामुळे गोंधळ निर्माण झालाय, तो आधी निस्तरायला हवा, असं त्यांनी ठरवलं नि ते महालाच्या बाहेर पडून नि जंगलाच्या दिशेने निघाले.
समोरचं दृष्य बघून ते हादरले. जंगलातील प्राणी एकमेकांना चांगला चोप देताहेत हे बघून त्यांना धस्स झाले. त्यांनी मोठ्ठी डरकाळी फोडली. काही प्राण्याचं लक्षं त्यांच्याकडे गेलं.
महाराज आले, महाराज आले, असा गलका त्यांनी केला.
सिंहमहाराज एका उंच दगडावर चढले नि जोरात गर्जना करुन ते म्हणाले, “काय चाललाय हा मूर्खपणा. थांबवा तुमचा अडाणीपणा नि फुकाचा शहाणपणा!”
महाराजांचा करडा आवाज ऐकून प्राण्यांनी एकमेकांना चोप देणं थांबवलं. या मारामारित बरेच प्राणी चांगलेच जखमी झाले. काही रक्तांच्या थारोळयात पडले. काहिंचे प्राण गेले .काहिंचे हातपाय तुटले. काहिंचे डोळे बाहेर आले. ते भयावह दृष्य बघून महाराजांना ग्लानी येऊ लागली. पण त्यांनी स्वत:ला सावरलं. पुन्हा करड्या आवाजात त्यांनी विचारलं,
” कशासाठी हा
चालवलाय मूर्खपणा?”
गजराज त्यांच्यासमोर येऊन म्हणाले, “महाराज तुम्ही, अवचित दरबार बोलावला ना, त्यासाठी आम्ही धावत सुटलो. पक्षीही कलकलाट करत दरबाराच्या दिशेने उडू लागले. कुणीतरी म्हणालं, नव्या राजाचा हा प्रताप. महाराज, कोण आहे हा नवा राजा? काय केला त्याने प्रताप! सांगा मजला, एक हाणीन लाथ, आठवेल त्याला देवाघरी गेलेला बाप!”
“म्हणजे, नव्या राजाची बातमी तुम्हाला कळली वाटतं. त्यासाठीच आम्ही खास दरबार बोलावला. असं काही घडेल हे आम्हाला वाटलं नाही.”
“पण महाराज ही बातमी आणली कुणी? आली कुठून?” वाघोबानं विचारलं.
“बापरे बाप! याचा तर आपण काही विचारच केला नाही.” महाराज स्वत:शीच बोलले.
भानावर येत म्हणाले, “नाही म्हणजे, एक पोपटराव आले उडत, सांगून गेले, उडत उडत.”
“याचा अर्थ ही उडणारी बातमी समजायची तर!” घोडेराव म्हणाले.
“पण महाराज, त्याला विचारायचं ना की, कुठे दिसला त्याला नवा राजा आणि कुणी सांगितलं, कर त्याचा गाजावाजा! उंटाने त्याची आधीच उंच असलेली मान उंचावून म्हणाला.
“अगदी बरोबर, अगदी बरोबर.” अस्वलाने उंटाची री ओढली.
महाराजांनी गरुडाला आदेश दिला की त्याने ताबडतोब पोपटरावाला त्यांच्यासमोर हजर करावं.
गरुडाने पोपटरावाकडे निरोप पाठवला. ते महाराजांपुढे हजर झाले.
“पोपटा पोपटा, बोलतोस गोड, देईन तुला पेरुची फोड! पण गधड्या, कुठे भेटला तुला नवा राजा? कां वाजवतोस त्याचा बँड बाजा? बघ बघ, तुझ्या वटवटीने काय विपरित घडले. प्राणी एकमेकांना भिडले. धडकले. डोके फोडून बसले. सांग कुठे दिसला तुला राजा? नाहीतर तुझाच वाजवीन बँडबाजा?” महाराजांनी पोपटरावास तंबी दिली. गरुडानेही त्याला फटकारलं.
पोपटराव गांगरुन गेले. ततपप करु लागले.
ते म्हणाले, “मी फक्त ऐकलं पाणवठ्यावर, कुणीतरी म्हणालं, मी आता जंगलाचा नवा राजा, कुकुच कू!”
“अरे गधड्या, तो तर अतीशहाणा कोंबडेराव असल्याचं, तुझ्या लक्षात आलं नाही का?” गरुड रागावून म्हणाला.
“न न नाही महाराज, मी ते ऐकलं नि उडालो, तसं सांगत.”
“म्हणजे पोपट्या तू कोणतीही खातरजमा
केली नाहीस?” गरुडाने त्याला रागावलं.
“होय महाराज…”
“गधडया, बघितलस काय झालं ते. असल्या अफवांना हवा देली काय होतं ते?” सिंह महाराज गरजले.
पोपटरावाने मान खाली घातली. नव्या राजाची बातमी ही अफवाच असल्याचं सगळयांच्या लक्षात आल्यानं सर्वांना हायसं वाटलं. प्राण्यांनी एकमेकाची क्षमा मागितली. यानंतर खातरजमा केल्याशिवाय अशा बातम्यांवर विश्वास ठेवायचा नाही अशी शपथही त्यांनी घेतली.
कोंबडेरावाला अद्दल घडवण्याचा आदेश महाराजांनी कोल्होबांना दिले.
तोंडाला सुटलेलं पाणी जिभेनं चाटत, कोल्होबा लगेच, आनंदाने ही मोहीत फत्ते करायला उड्या मारत निघाले…
सुरेश वांदिले