प्रल्हादरावांची अट
आज रात्री प्रल्हादराव, कॉलनीत येणार असल्याचं सकाळी उठल्या उठल्या तेजोमयीने, आई-बाबांना सांगितलं. कोण हा प्रल्हादराव, आईबाबांना काही आठवेना.
काय गं, हे प्रल्हादराव रात्रीच कां येणार आहे, सकाळी कां नाही? आईनं विचारलं.
प्रल्हादरावांना कसं विचारणार?ते तर हिरण्यकश्यपूचे चिरंजीव. तेजोमयी नाटकी सुरात म्हणाली.
आँ! आईबाबांनी एकाचवेळी प्रतिक्रिया दिली. दोघांचाही भलामोठा आँ, कानावरुन जाताच अलेक्झांडरने कान टवकारले. तिघांमध्ये काहीतरी वेगळं चाललय हे त्याच्या लक्षात आलं. स्वारी जीभ लांब करुन बाबांजवळ येऊन बसली. चालू द्या तुमचं, आपल्याला त्यात रस नाही,असे भाव चेहऱ्यावर आणून, तो अर्धवट डोळे मिटून, तिघांच्या हालचाली न्याहळत बसला. त्याचं असं वागणं हे परिचयाचं असल्याने तिघेही त्याच्याकडे बघून हसले.आपली चोरी पकडली गेल्याचं लक्षात येताच स्वारी उडी मारुन बाबांच्या मांडीवर जाऊन बसली.
आता कसा, शहाणा सारखा वागलास रे तू…थेट बघायचं नि थेट ऐकायचं…अध्येमध्ये काही नाही.. अलेक्झांडरचा कान प्रेमाने हलकेच पिरगाळत आई म्हणाली. त्याने आज्ञाधारकपणे मान हलवली.
तुला माहीताय का हे प्रल्हादराव कोण ते? बाबांनी हसून अलेक्झांडरला विचारलं. तो ढिम्म.
त्याला कसं कळणार? प्रल्हादराव आणि हिरण्यकश्यपूविषयी.आई हसत म्हणाली.
कां कळणार नाही?प्रल्हादरावांच्या काळातसुध्दा अलेक्झांडरचे पूर्वज होतेच की.
अगं, जरा आम्हाला कळणारं बोल बरं. प्रल्हादराव काय? हिरण्यकश्यपू काय? अलेक्झांडरचे पूर्वज काय? तू शुध्दीवर आहेस ना की पहाटेच्या गोड स्वप्नातच रममाण आहेस अजून, बाबांनी विचारलं.
अगदी बरोबर बाबा, प्रल्हादराव मला स्वप्नातच भेटले.
अच्छा! तर हे असं आहे होय वेडाबाई! बरं मग, प्रल्हादराव कशासाठी येणार, आपल्या कॉलनित. आईने मिश्किलपणे विचारलं.
आपण होळी कशी साजरी करतोय हे त्यांना बघायचय. त्यांच्या बाबांना म्हणजे हिरण्यकश्यपूंना, भगवान विष्णूंची पूजा करणं, नामस्मरण करणं आवडायचं नाही. त्यामुळे चिडून त्यांनी होलिका राक्षसीणला सांगितलं की, तू प्रल्हादला घेऊन आगीत बसं. तसं तिने केलं. पण भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने प्रल्हादरावांना काहीच झालं नाही. दुष्ट होलिका जळून खाक झाली.
ही तर होळीची गोष्ट. दुष्ट होलिका म्हणजे दुष्ट विचार, वाईट सवयी, गर्व, अहंकार हे जाळायचे असतात, होळीच्या दिवशी. बाबा म्हणाले.
आज तुम्ही तसं करताय की नाही हेच बघायचंय प्रल्हादरावांना…तेजोमीय हसत म्हणाली.
हे प्रल्हादराव म्हणजे भक्त प्रल्हाद म्हणायचे. होळी पेटली की पुरणपोळी खायला घेऊन येऊ आपण घरी, त्यांना. आई तेजोमयीचा गालगुच्चा घेत म्हणाली.
मी दिलय निमंत्रण त्यांना पुरणपोळीचं, तुमच्याआधीच.
मग येणार ना ते आपल्या घरी.
त्यांची एक अट आहे, आई.
कोणती गं?
उन्हाळ्याच्या सुटित अभ्यासाचा माझ्यापाठीमागे लकडा लावायचा नाही. व्यक्तिमत्व विकास वगैरेच्या शिकवण्यांना मला पळवायचं नाही. मस्त खेळू द्यायचं, छान छान गोष्टी आईबाबांकडून ऐकायच्या, त्यांना सांगता येत नसतील तर गोष्टीची पुस्तकं विकत घेण्याचा हट्ट करायचा …
फारच हुश्शार आणि मनकवडा दिसतो गं हा प्रल्हादराव…आई तेजामयीच्या डोक्यावर हलकीशी थापट मारत म्हणाली.
तो हुशार की मूर्ख की मनकवडा हे नंतर ठरवू,आधी त्याची अट मान्य आहे की नाही हे सांग बघू…तेजोमयी म्हणाली.
प्रल्हादरावांना भेटण्यासाठी ही अट मान्य करावीच लागेल ना, नाहीतर आमच्या ताईसाहबांचं रुसुबाई- रुसुबाई तर ते पुढच्या होळीपर्यंत जायचं नाही. बाबा तेजोमयीला चिडवत म्हणाले.
आईही हसली.
प्रल्हादरावांची अट आईबाबांनी मान्य केलीय अलेक्झू, तुला मान्य आहे ना ते. अलेक्झांडरकडे बघत तेजोमयी आनंदाने उडी मारत म्हणाली. आपल्याकडे वळून तेजोमयी बोलली की होकारार्थी मान हलवायची असते, हे समजलं असल्यानं अलेक्झांडरने मान हलवून आईकडे बघितलं.
अच्छा तर, तू प्रल्हादरावांसोबत स्वप्नात गप्पा करताना,अलेक्झांडर महाशय तिथे होते म्हणायचे...आई हसत म्हणाली.बाबांनीही स्मित केलं.
सुरेश वांदिले