
प्रेमाची शिकवण!
मिन्नू कोंबडीस झालं एकदा पिल्लू. सोनेरीरंगाचं गुबगुबित आणि चुणचुणित. मिन्नूनं त्याचं नाव ठेवलं सिल्लू. तो हळूहळू मोठा होऊ लागला. फार चौकस असल्याने त्याला इकडेतिकडे भटकायला, नाक खुपसायला आवडायचं. हे सगळं आई, आसपास असताना व्हायचं. ती सिल्लूकडे कौतुकानं बघायची. सिल्लूचं, मोठं होणं, पळणं, पडणं, उडायचा प्रयत्न करणं, नवे मित्र बनवणं, हे तिला आवडायचं. ती त्याला म्हणायची,
“बाळ, असाच खेळत राहा, नवे मित्र कर. पण सारंकाही सांभाळून. तुझ्यावर माझं खूप प्रेम आहे. तुला लागलं, खरचटलं तर मला खूप वाईट वाटेल.” आईची काळजी सिल्लूच्या लक्षात यायची. त्याचा प्रयत्नही तसाच असे.
दिवसभर खेळून दमूनभागून सिल्लू घरी आला की, आई त्याला प्रेमानं खाऊ घाली. त्याला ज्वारीचे दाणे खूप आवडत. त्यासोबतच त्याचे नावडते दाणे आई द्यायची. याचा सिल्लूला राग येई. मग तो रुसून फुगायचा. तेव्हा, आई त्याला जवळ घेऊन म्हणायची,
“फुगोबा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू माझ्या ह्रदयाचा तुकडा आहेस. तू बळकट नि दणकट होण्यासाठी सगळ्या प्रकारचं अन्न खायला हवं. आवडत्या अन्नासोबत नावडतं खाल्ल्यानं प्रतिकारशक्ती वाढून, तब्येत चांगली राहते.” आईच्या प्रेमाच्या सांगण्यानं सिल्लूचं रुसणं पळून जाई.
आईनं सांगितलं होतं की, खाताना कोणत्याही दाण्याकडे बघून नाक मुरडायचं नाही. प्रेमानं बघायचं. ते केलं की, मग दाने आपल्यावर प्रेम करतात, नि शरीरास बळकट करतात. सिल्लू, आईच्या शब्दाबाहेर जायचा नाही.
सिल्लू, आता आणखी मोठा झाला. आईला सोडून एकटाच बाहेर पडू लागला. आईनेही त्याला थांबवलं नाही, एकदाच त्याला म्हणाली, “बाळ, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू माझ्या ह्रदयाचा तुकडा आहेस. तू आता एकटाच बाहेर जातोस. आनंदाने जा. पण, एक लक्षात ठेव, काही वेडंवाकडं करु नकोस, स्वत:ला जखमी करुन घेऊ नकोस. मला ते सहन नाही व्हायचं.” सिल्लू एकटाच भटकून आल्यावर, आईला सारं काही सांगायचा. आई काळजीपूर्वक ऐकायची. कंटाळा करायची नाही. त्यामुळे आईशी बोलताना सिल्लूला खूप आनंद व्हायचा.
पुढे, सिल्लूच्या मित्रमंडळीत बरीच वाढ झाली. सिल्लूचं सारखं आईआई करणं त्यांना आवडायचं नाही. ते त्याला चिडवत. पण सिल्लू त्यांना सांगायचा, “माझं आईवर खूप प्रेम आहे. मी तिच्या ह्रदयाचा तुकडा आहे. तिला दु:ख होईल असं, नाही मी वागणार. तुम्हीसुध्दा तुमच्या आईचं ऐकायला हवं.” सिल्लूचे मित्र यावर हसत. आईचं सांगणं, तिच्यासमोर ऐकायचं असतं. तिच्या मागे काहीही केलं तर चालतं. तिला कुठं कळणार? पण सिल्लूला ते पटायचं नाही. पण, तो काही वाद घालायचा नाही.
एकदा सिल्लूच्या मित्रमंडळीनं डोंगरचढून खाली उतरायचं ठरवलं. पलिकडचं जग त्यांना बघायचं होतं. पण, कुणीही घरी ते सांगितलं नाही. सिल्लू म्हणाला, “मी आईस सांगितल्याविना येणार नाही. तुम्हीसुध्दा घरी सांगा.”
पण, त्याचं कुणी ऐकलं नाही. सगळेजण डोंगर चढू लागले. काय करावं बरं? सिल्लूला प्रश्न पडला. त्यालासुध्दा डोंगराच्या पलिकडचं बघण्याची उत्सुकता होती. जावं की जाऊ नये? हा प्रश्न त्याला पडला. गेलो तर आईला कळणार कसं, त्याने स्वत:ला प्रश्न केला. मग, जायला काय हरकत? स्वत:शी पुटपुटत त्याने एक पाऊल पुढं टाकलं. तोच, त्याला आईचं बोल आठवले, “बाळ, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू माझ्या ह्रदयाचा तुकडा आहेस. तुला काही झालं तर, मला सहन व्हायचं नाही.” चटदिशी पुढे पडलेलं पाऊल सिल्लूने घेतलं. तो पळत घरी आला. आईला बिलगून रडू लागला.
“आई माझी चूक झाली. क्षमा कर.” सिल्लू म्हणाला. “बाळा, माझं तुझ्यावर नि तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. तू काही चुकीचं करणार नाही, याची मला खात्री आहे. मग कशाला रडतोस नि क्षमा मागतोस. काही चुकीच करावं वाटलं की, बस्स माझी आठवण करं.” आईने समजावलं. सिल्लूने आईच्या प्रेमाची शिकवण कायम लक्षात ठेवली.
सुरेश वांदिले