प्लॅस्टिक विरोधातील दुर्गा
लिली पॅट, तेव्हा सात वर्षाची होती. सकाळी उठलं की तिचं ठरलेलं एकच काम असायचं, ते म्हणजे रस्त्यावर इकडे-तिकडे फेकलेले वेगवेगळया प्रकारातील प्लॅस्टिक एका पिशवित गोळा करणं. न थकता, न कंटाळता या चिमुरडीचं हे काम तिच्याच तालात सुरु असायचं.
प्रांरभी प्रारंभी कुणाचं तिच्याकडे लक्ष गेलं नाही. पण ही चिमुरडी दररोज हे प्लॅस्टिक उचलण्याचं काम करतेय हे काही जणांच्या नंतर लक्षात आलं. त्यापैकी एकानं विचारलं
बाळ, हे तू कां करतेस?
यावर चिमुरडी लिली, त्यांनाच म्हणते कशी, हे तुम्ही कां करत नाही?
लिलीच्या या प्रश्नाने, तिला प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तिला लिली, आगावू मुलगी वाटली. त्याने तिचा नाद सोडला आणि आपल्या रस्त्याला लागला. रस्त्यावरचं प्लॅस्टिक गोळा करण्याचं लिलीचं काम उत्साहात सुरुच राहिलं.
तिने नंतर, प्लॅस्टिक गोळा करा मोहीम,अशी मोही सुरु केली. तिच्या वयाची काही मुलं या मोहिमेत सामिलही झाली.
०००
या मोहिमेत मोठी माणसं कां सामील होत नाहीत, असं लिलीला सारखं वाटायचं.,
कारण प्लॅस्टिक हे मानवासाठी, पृथ्वीवरील प्रत्येक सजीवासाठी घातक असतं. ते विषासारखं असतं. समुद्राच्या पाण्याला प्रदूषित करतं.हे पाणी जेव्हा जलचर पितात तेव्हा त्यांना अपाय होतो. अनेक प्राणी मरतात.काही मासोळ्यांच्या पोटात प्लॅस्टिक जातं. त्या मासोळया मानूस जेव्हा खातो, तेव्हा त्याचा वाईट परिणाम मानसांच्या शरीरावर होतो. समुद्रातील वनस्पतींवर होतो. जमिनीवरील प्लॅस्टिक जनावरं खातात. त्याचा त्यांच्या शरीरावर परिणाम होतो. पृथ्वीच्या पर्यावरणाचं संतुलन बिघडवण्याचं काम प्लॅस्टिक करतं. असं लिलिला एकदा तिच्या आजोबांनी सांगितलं होतं.त्यावेळी ती होती सहा वर्षाची. हे ऐकून तिच्या अंगावर शहारे आले. तिने तेव्हाचं ठरवलं की आपणच प्लॅस्टिकचा कचरा गोळा करुन त्याची विल्हेवाट लावायची. तिचं लहान वय यासाठी अडसर बनलं नाही. लोकांनी चार प्रश्न विचारले तर ती तिला जमेल तसं त्याचं उत्तरं द्यायची.
०००
लिली जशी मोठी होऊ लागली,तसा तिचा प्लॅस्टिक विरोधातला लढा आणखी तीव्र होऊ लागला. प्लॅस्टिकच्या ढिगाची छायाचित्रे व्टीटर,इंस्टाग्राम व इतर समाजमाध्यमांवर टाकून, प्लॅस्टिक विरुध्द ती जनजागृती करु लागली. तिची तळमळ हळूहळू लोकांच्या ध्यानात येऊ लागली. काही शेतकरी, प्लॅस्टिकमुळे मरण पावलेल्या त्यांच्या गुरांची छायाचित्रे लिलीकडे पाठवत. प्लॅस्टिकचा त्यांच्यावर कसा वाईट परिणाम झाला हे कळवत. हे सारं काही ती पुन्हा समाजमाध्यमांचा उपयोग करुन लोकांपर्यंत पोहचवत असे.
प्लॅस्टिकमय झालेल्या लिलीने जवळपास १ लाख प्लॅस्टिकच्या वस्तू गोळा करण्याचा विक्रम केला. या सर्व वस्तू तिने प्लॅस्टिक पुनर्प्रक्रिया क्रेद्रांकडे व्यवस्थित वर्गिकरण करुन नेऊन सुध्दा दिल्या.
प्लॅस्टिक विरुध्द लिलीच्या जनजागृती मोहिमेची दखल, प्लॅस्टिक पोल्युशन कोॲलिशन या जागतिक संस्थेनं घेतली.या संस्थेत प्लॅस्टिक विरोधात काम करण्याऱ्या ७५ देशातील सामान्य व्यक्ती,संघटना,विचारवंत यांचा समावेश आहे.या संस्थेनं ,प्लॅस्टिक विरोधी मोहिमेची जागतिक युवा दूत म्हणून लिलीला निवडलं.२०१९ साली तिला आंतरराष्ट्रीय इको हिरो पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं.
या पुरस्कारानं लिली फार काही भारावून गेली नाही.पुरस्कारापेक्षा लोकांना प्लॅस्टिकचे धोके पटवून देण्याचं काम महत्वाचं असं तिचं सांगणं.प्लॅस्टिक विरोधात काम करणाऱ्या अनेक संस्था आणि व्यक्तिंसोबत तिची हळूहळू ओळख झाली.त्यांच्यासोबत ती या कामासाठी जगभर फिरते असते.
०००
तिचा देश नेदरलँड.या देशाचं सरकार प्लॅस्टिक विरोधात फार काही करण्यास उत्सुक नाही असं तिच्या लक्षात आलं.हवामानातील बदल,प्लॅस्टिकसारख्या वस्तुंमुळे होणारे प्रदूषण यामुळे आर्टिक प्रदेशातील बर्फ वेगाने वितळायला लागलाय. त्याचा सर्वाधिक फटका नेदरलँडला म्हणजेच आपल्या मायदेशाला बसतो,हे लिलीच्या लक्षात आलं.याविषयी ती सतत लोकांना सांगून प्लॅस्टिक विरोधी मोहिमेत त्यांनी सहभाग द्यावा म्हणून प्रयत्न करते.
आपल्या मायदेशाच्या सरकार विरुध्द एका जागतिक संस्थेने पुकारलेल्या प्लॅस्टिक विरोधी संपात ती हिरहिरीने सहभागी झाली.त्यानंतर ती आता दर शुक्रवारी सरकारी कार्यालयांसमोर जाऊन प्लॅस्टिक विरोधात जाणीव जागृतीसाठी उभी राहते.प्लॅस्टिकमुळे वाढत असलेलं प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न कसे अपुरे आहेत याविषयी ती पोटतिडकीनं सांगते.शुक्रवारची तिची ही चळवळ आता नावारुपाला येत चाललीय.हळूहळू तिचे मित्रमैत्रिणी यात सहभागी होत आहेत.
गेल्या डिसेंबरमध्ये इजिप्त येथे झालेल्या वर्ल्ड युथ फोरममध्ये या कार्याबद्दल तिचा गौरव करण्यात आला.पण पुन्हा तिचं तेच सांगणं, कौतुक करु नका,प्लॅस्टिक विरोधातील लढयात सामील व्हा.
प्लॅस्टिकचा कचरा गोळा करण्यास सुलभ जावं म्हणून लिलीने,प्लॅस्टिक पिकअप बांबूसेट तयार केला.लिलीने सुरु केलेली प्लॅस्टिक कचरा स्वच्छता मोहीम आता २७ देशांमध्ये पोहचली..
ही मोहीम जगात सर्वत्र पोहचावी आणि आपली एकमेव पृथ्वी वाचावी यासाठी लिली,दिवसाढवळया स्वप्न बघते.अशीच स्वप्नं वास्तवात येतात,हे तिच्या आजोबांनी सांगून ठेवलय..आजोबा म्हणतात, म्हणजे ते खरच होणार असा विश्वास लिलीला आहे.
सुरेश वांदिले
९३२४९७३९४७