(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

प्लेसमेंट

रामाराव आणि सीतादेवी या दांम्पत्यास एकुलती एक मुलगी होती. रश्मी. दिसायला बऱ्यापैकी छान – सुंदर आणि मस्त यांच्या अधेमधे. उच्च शिक्षित. सौंदर्य आणि बुध्दीमत्ता असं दोन्ही अंग असल्यानं तिच्या कुटुंबात आणि कॉलनित तिची वट होती. रश्मीस स्वत:ला कधीकधी ती आलिया भट वाटत असे. त्याचं कारण सुध्दा हेच होतं. तिच्यामते सौंदर्य आणि बुध्दीमत्ता हे डेडली कॉम्बिनेशन जसं आलियाकडे आहे, तसंच हिच्याकडेही आहे. मुलीचं आलियाप्रेम सीतादेविस मात्र अजिबातच मान्य नव्हतं. सोचो तो बडा, असं तिचं रश्मीस सांगणं होतं. म्हणजे काय, अशी विचारणा रश्मीनं जेव्हा केली, तेव्हा सीतादेविंनी तिच्यापुढे माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या रॉय यांचे फोटो टाकले. या दोघी तिच्या काळातल्या, सोचो तो बडा या श्रेणीतल्या होत्या. पण रश्मीच्या काळात आलिया ही, सोचो तो बडा, या श्रेणीत कधीचीच पोहचली होती. पण काळ पुढे गेला तरी आई मात्र माधुरी आणि ऐश्वर्यातच गुंतलेली बघून रश्मीस तिची दया यायची. असं काहीसं जेव्हा ती आईस सांगू पाहे तेव्हा आईचा स्फोट व्हायचा.

एकदा ती रागारागाने रश्मीला म्हणाली, अगं भवाने आपण जर विलेपार्ल्यात राहिलो असतो तर संजय लीला भंसाळीनं त्याच्या बाजी सिनेमात काशीबाईची भूमिका तुला दिली दिली असती. पण आपण राहतो नालासोपाऱ्यात. बाजीची तलवार आणि भन्साळीचा कॅमेरा यासाठी एकदमच परग्रह. त्यामुळे संधी हुकली. नसता माधुरी नंतर हिरोईन होणारी तू दुसरी विलेपार्लेकरीन ठरली असती.

अगं, पण आई काशीबाईची भूमिका प्रियंका चोप्रानं केली होती, माधुरी दीक्षितनं नाही. अशी दुरुस्ती जेव्हा रश्मीनं केली.

तेव्हा फार तू आगावू झालीस हं आता. अशी आईनं प्रतिक्रिया दिली. चुकीची दुरुस्ती करणं म्हणजे आगावूपणा करणं ही नवी व्याख्या आईनं जन्मास घातली, हे रश्मीच्या लक्षात आलं. ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या संपादकांना आगावूपणाचा हा नवा अर्थ कळवायला काय हरकत आहे, असं जेव्हा ती आईची टोपी उडवत म्हणाली, तेव्हा तिला आईनं मारायचं तेव्हढं ठेवलं होतं.

०००

सीतादेवींना रश्मी ही प्रति माधुरी आणि प्रति ऐश्वर्या वाटू लागल्याचं प्रकरण अखेर रामारावांपर्यंत पोहचलं तेव्हा त्यांनी सीतादेविंना कपाटाच्या आरशासमोर उभं केलं. आधी स्वत:चं थोबाड आरशात बघून घे आणि मग पोरिला हिरॉईन कर असं काहीसं रामारावांना सांगायचं होतं. ते काम त्या आरशानं केलं…त्यानंतर हिरॉईन बनण्याचा विषय सीतादेविंनी उघडरीत्या काढला नव्हता.

रश्मीला जरी ती आलिया भट वाटत असली तरी तिला मात्र सिनेमात काम करुन नालासोपाऱ्याचं नाव दिगंत करण्यात अजिबातच रस नव्हता.

अगं, हिरॉइन झालीस तर दोन तीन वर्षात तुला एखादा राजबिंडा सिध्दार्थ किंवा रणबीर कपूर मिळेल साताजन्माचा साथिदार, असं सीतादेविंनी तिला सांगून पाहण्याचा प्रयत्न केला. पण नालासोपारा, हे बॉलिवूडच्या नकाशावरचं महत्वाच ठिकाण ठरण्यासाठी आपण जरासुध्दा हातभार लावणार नाही. वाटल्यास आजपासून स्वत:स आलिया भटच काय, भारतीसिंग सुध्दा समजणार नाही, असं रश्मिनं तेव्हा सांगून टाकलं.

मग तू करणार काय आहेस तर..सीतादेविंनी तिला विचारलं.

काय करणार म्हणजे. आर्यावर्तातील वयात आलेल्या समस्त मुली जे करतात म्हणजे तेच करणार.

पळून जाणार की काय.

हे बघ आई, नालासोपाऱ्याची प्रसिध्दी जशी मला करायची नाहीय ना तशीच वाईट प्रतिमाही करायची नाही.

अगं, पण तू पळून जाण्यानं कसली होतेय वाईट प्रतिमा. तू स्वत:ला कोण अनुष्का शर्मा समजतेस की काय..

अगं, आई मी अनुष्का शर्मा कशी समजेन बरं. समजा ती जरी आता पळून गेली असती तरी तिच्या गावाची काही वाईट प्रतिमा झाली नसती. ती हिरॉईन आहे.

म्हणून तर म्हंटलना तू हिरॉईन हो.

अगं, आई हिरॉईन होण्यासाठी टॅलेंट हवे. माझ्याकडे आहे का ते. भरित वांग्याचं करतात की बटाट्याचं करतात हे कालपरवापर्यंत मला ठाऊक नव्हतं. नाचता येईना पण अंगण वाकडं, ही म्हण म्हणण्यासाठी मी एकदम सुपात्र आहे. अभिनय करणं म्हणजे बटाट्याचा शिरा करण्यासारखं सोप्प थोडच आहे..

मग, तू काय करणार आहे बाँ..

तेच गं, भारतातील वयात आलेल्या मुली जे करतात, तेच.

म्हणजे अफेअर..तोबा तोबा..

अफेअर करण्यासाठी मुलगा मिळायला हवा आई.

मग तू मिळवला का तो.

अगं, मुलगे काय मॉलमध्ये गेले आणि दोडके किंवा फुलकोबीसारखे घेऊन आले, असं घडतं का, त्यांच्या पाठिमागं जावं लागतं. किंवा त्यांनी आपल्या पाठिमागं लागावं यासाठी चोवीस पांढरे बुधवार आणि सत्तावीस हिरवे शुक्रवार करावे लागतात. आपल्याच्यानं नाही बुवा जमायचं हे..

हे जमायचं नाही, ते जमायचं नाही. सगळं काही आम्हीच करायचं काय..

अगं आई आता या वयात तुझ्या पाठिमागे कोण लागेल बाँ. बाबा सुध्दा लागणार नाहीत.. रश्मी सीतादेवींना चिडवित म्हणाली..

०००

हे सारं काही हलक्याफुलक्या वातावरणात घरी चाललं असलं तरी सीतादेवीस रश्मीच्या या बोलण्याचा प्रचंड राग आला. रामाराव ऑफिसातून घरी आले की हिचे कानच चांगले उपटायचं असं त्यांनी मनोमन निश्चय केला.

रामाराव, बरोबर संध्याकाळी साडेसात पर्यंत ऑफिसमधून घरी येत. बूट काढून ठेवल्याबरोबर सीतादेवी त्यांना ग्लासभर पाणी देत. पण आजकाही तसं घडलं नाही. त्यामुळे घरातील वातावरण हे द्रमुक आणि अण्णाद्रमुक पक्षातील कार्यकर्त्यांतील साठमारीसारखं झालं असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी रश्मीस हाक मारली. ती आतल्या खोलित, मेरे पिया की खोज, ही हिंदी कांदबरी वाचत बसली होती.

काय हो बाबा. ती आतून दिवाणखान्यात येत म्हणाली.

माँसाहेब, कां बरे आज रागावल्या आहेत. रामाराव नाटकी स्वरात म्हणाले. तो नाटकीस्वर ऐकून सीतादेवी स्वयंपाक खोलितून बाहेर आल्या. नाक फुगवून रामारावांना म्हणाल्या.

तुमची पोरगी पूर्ण कामातून गेली आहे. आता तुम्हीच सांभाळा तिला.

म्हणजे, तुझं अवतारकार्य संपले की काय, या पृथ्वीतलावरील. रामाराव मिश्लिकपणं सीतादेवीकडे बघत म्हणाले. रश्मीला हसू आवरत नव्हतं.

वा, वा त्याचीच वाट बघता आहात दोघेही बापलेक.. सीतादेवी पुन्हा नाक फुगवत जोरात म्हणाल्या.

अग, थांब थांब इतक्या जोरानं नाक फुगवत राहिलीस तर त्याचा बेडूकच व्हायचा. रामारावांनी सीतादेवींची फिरकी घेतली. या फिरकीनं सीतादेवींचा पारा गगनातच गेला. त्या तरातरा आत स्वयंपाकखोलित गेल्या आणि भांड्यांची आदळआपट सुरु केली. पुण्याला जाणारी इंद्रायणी एक्सप्रेस साडेतीन मिनिटेही लेट झाल्यावर जसा प्रवाशांना वैताग येतो नि ते रेल्वेस वाट्टेल तशा शिव्याशाप देऊ लागतात तसं सीतादेवीचं झाल्याचं रामारावांच्या लक्षात आलं. त्यांना आपली रेल्वे होऊ द्यायची नव्हती. त्यामुळे ते आणि रश्मी दोघेही स्वयंपाक खोलित गेले. दोघांनींही कान पकडले, आणि सॉरी माँसाहेब म्हणत दोघांनी एक उठाबशी काढली. दोघांच्या या सपशेल माघारीनं  इंद्रायणी एक्सप्रेस आदळआपट कमी करत करत रुळावर आली. रामारावांनी सीतादेवींना स्वयंपाकखोलितून दिवाणखान्यात आणलं. मोठ्या अदबिनं सोफ्यावर बसवून घेतलं आणि गंभीर चेहऱ्यानं त्यांनी, पोरगी कामातून गेली, या विधानाचा नेमका अर्थ काय, असं सीतादेविंना विचारलं.

०००

आज दिवसभरात मायलेकींमध्ये जो काही सुसंवाद किंवा विसंवाद झाला तो सीतादेविंनी रामारावांना साग्रसंगीत सांगितला. आजच्या काळात बाबासुध्दा सीतादेवींच्या पाठिमागे लागणार नाही, या अचुक, वस्तुनिष्ठ आणि काहीही फेक नसलेल्या विधानरुपी कावळ्याची  कावकाव बाईसाहेबांना आवडली नसल्याचं रामारावांच्या लक्षात आलं. त्यांना यावयातच नव्हे तर लग्न करण्याआधी सुध्दा बायकोपेक्षा कट्रिना कैफच्याच पाठिमागे लागणं निश्चितच अधिक आवडलं असतं. पण एकतर या कट्रिना मॅडम नेमक्या कुठे राहतात हे काही लग्नकार्य ठरवण्यापूर्वी आणि नंतर लग्न उरकल्यावर त्यांना ठाउुक नव्हतं. समजा आता रामारावांनी कॅट्रिना मॅडमचा पत्ता शोधून काढलाच आणि त्यांच्या पाठिमागे लागायचं ठरवलं तरी ते शक्य नव्हतं. कारण मॅडम त्यांच्या राहत्या इमारतीतून उतरल्यावर स्वत:च्या आलिशान गाडीत बसणार आणि भूर्र निघून जाणार. आपण काय धावत जाणार तिच्या पाठिमागं, अशी रामारावांची वस्तुनिष्ठ धारणा होती. शिवाय त्यांचा खिसा कायमच दारिद्र्यरेषेच्या किंचित थोडा वर राहत असला तरी ऑटो किंवा टॅक्सी दिवसभर पळवायची परवानगी त्याच्याकडून मिळणं शक्यच नव्हतं.

चारचाकी गाडी विकत घेणं सोडा, त्याचं स्वप्नसुध्दा बघण्याची रामारावांची तयारी नव्हती. समजा असं स्वप्न पहाटेला पडलं आणि पहाटेचं स्वप्न खरं ठरतात या उक्तीप्रमाणं खरोखरच आपल्या नशिबी गाडी आली तर ती ठेवायची कुठं. डोक्यावर तर ठेऊ शकत नाही. बिचाऱ्या रस्त्यांना कित्ती ताण द्यायचा. नालासोपाऱ्यातील नगरसेवकांच्या ताणामुळेच आधीच रस्ते रडकुंडीस आलेले. त्यात आपली गाडी.. त्यामुळे स्वप्नात सुध्दा गाडी नक्कोच हे रामरावांनी पक्कं ठरवलं होतं. असं काही स्वप्न पडूसुध्दा देऊ नको म्हणून त्यांनी उद्यान गणेशाला नवसही बोलला होता. त्यामळे कट्रिना मॅडमच्या पाठिमागे लागण्याचा प्रश्न आपोआपच निकाली निघाला होता.

०००

रामाराव या दिवास्वप्नात रंगल्यानं काही क्षण स्तब्धतेत गेले. विचित्र स्वरुपाची शांतता खोलित पसरली. नवरा असा त्याक्षणाला तात्पुरता बहिरा झाल्याचं लक्षात येताच सीतादेवीच नाक फुगवून विचारत्या झाल्या,

आता वाचा कां बसली, महाराज.

वाचा नाही बसली सीतादेवी, मी विचार करत होतो की पोरगी कामातून गेली, या वाक्याची व्याख्या कशी बरं करायची..

म्हणजे अजूनही तुमचा पांचटपणा संपलेला नाही वाटतं. सीतादेवी पाय आदळत आणि नाक फेंदारत म्हणाल्या.

अहो बाईसाहेब, तुम्हास प्रश्न सोडवायचा असेल तर ओबामा व्हा नसेल तर ट्रॅम्प व्हा.

पुरे झाला शहाणपणा..

यात कसला आलाय शहाणपणा..

हा वाद असाच पुढे चालत राहिला तर वितंडवादाची दक्षीण कोरियन ठिणगी आपल्या घरी पडल्याशिवाय राहणार नाही, हे रश्मीच्या लक्षात आलं. ती दोघांचंही बोलणं थांबवत म्हणाली.

असं तुम्ही दोघेहीजण अमेरिका- इराण सारखं भांडत बसू नका बाँ. आईच्या मुख्य प्रश्नाचं मीच उत्तर देते. तिला वाटतं मी आता काय करणार? तेच तिला सांगायचा प्रयत्न करतेय ना की भारतातल्या वयात आलेल्या मुली जे करतात तेच मी करणार…

स्पष्ट कां सांगत नाहीस तू .. मघापासून एकच पोपटपंची… भारतातल्या मुली, भारतातल्या मुली.

लग्न करतात..

म्हणजे तुला लग्न करायचं…

हो, मला काही आलिया भट, माधुरी दीक्षित व्हायचं नाही. लग्न करायचय आणि संसार थाटायचा..

ग्रेट…

अगं, मग हे आधी नाही का सांगायचं..

तेच तर सांगतेय, पण लक्षात कोण घेतो. वयात आलेल्या मुली केवळ पळून जावूनच लग्न करतात असं नव्हे तर आईबाबांच्या संमत्तीनं रितसर मुलगे पाहूनसुध्दा लग्न करतात आई...रश्मीचं स्पष्टीकरण ऐकून आईचा चेहरा एकदमच छोटा काश्मीरमधील गुलाबांच्या ताटव्यासारखा फुलला. रागाने नाकाचा झालेला बेडूक कुठल्याकुठे उड्या मारत निघून गेला होता.

००००

पोरगी स्वत:हून लग्नासाठी तयार झाल्याचं बघून रामारावांनीही आनंद झाला. सीतादेवीसाठी आदर्श असलेल्या माधुरीने वयाची पस्तीशी  ओल्यांडल्यावर लग्न केले होते. ऐश्वार्यासुध्दा वयाची छत्तीसी ओलांडल्यावर बोहल्यावर चढली होती. आलिया भट तिशीत पोहचण्याचा मार्गावर असली तरी बोहल्यावर चढण्याचं विचारलं की, बघू..पाहू..आता काय वय झालं का, अशा धाटणितील उत्तरं देते. या पोरिंपेक्षा आपली लेक आदर्श आणि सुसंस्कारी निघाली. वयाच्या पंचेवीशितच लग्न करायची म्हणते. संतोषीमातेला २५ नारळच वाहायला हवेत, असं सीतादेवी मनात म्हणाल्या..

सीतादेविंना त्यांच्या माहेरच्या एक दोन कुटुंबातील मुलं रश्मीसाठी सुयोग्य वर असल्याचं वाटत होतं. या कुटुंबातील वडीलधाऱ्यांना तसं सूचक इषारे त्यांनी देऊन ठेवले होते. माहेरच्या कुटुंबात वट वाढवण्याची संधी त्या शोधतच होत्या. रश्मीच्या लग्न करण्याच्या होकारानं ही संधी त्यांना मिळत होती. त्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. रामाराव आणि रश्मी दोघेही वेडात काढतील म्हणून त्यांनी, आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहिकडे, या गाण्यावर नृत्य केलं नाही इतकंच.

रामारावांनीसुध्दा त्यांच्या जवळच्या कुटुंबातील दोन मुलांमध्ये संभाव्य जावई शोधून ठेवला होता. त्या कुटुंबातील वडीलधाऱ्यांना त्यांनी आश्वासन दिले नसले तरी सुचक विधानांची चिमणी चिवचिव करायला त्यांच्याकडे धाडून ठेवली होती. रश्मीच्या लग्नाचा होकार येतात, त्यांनाही सीतादेवींसारखं आपल्या कुटुंबात स्वत:ची वट वाढणार असं वाटून त्यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला. पण त्यांनी आपला आनंद गुप्तच ठेवला. त्यांचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालं असल्यानं त्यांना आनंदी आनंद गडे हे गाणं माहीत असण्याचं कारण नव्हतं त्यामुळे हे गाणं म्हणत नाचण्याचा प्रश्नच नव्हता.

०००

रश्मीच्या लग्नाची तयारी सुरु झाली. आप्त-मित्र-इष्टपरिवारांकडे निरोप धाडले गेले. या निरोपाची चातकासारखी वाट ही सर्व मंडळी बघतच होती. कारण एकुलती एक, दिसयाला देखणी आणि सोने-पे-सुहागा म्हणजे बँकेत चांगली नोकरी. अशी बहुगुणी बहुसंपन्न वधु मिळवण्यासाठी संभाव्य नवरेमंडळी त्यांच्या त्यांच्या आईबाबांसमवेत देव आणि देव्यांसुध्दा पाण्यात टाकूनच बसले होते.

रामाराव सीतादेविंच्या मनातील तिच्या लग्नाच्या प्लेसमेंटबद्दलची कल्पना रश्‍मीस आलीच होती. प्लेसमेंटसाठी कंपन्या या विचारपूर्वक बोलवाव्या लागतात. प्लेसमेंटमध्ये पॅकेज जसं महत्वाचं असतं, तसं किंवा त्यापेक्षा अधिक महत्वाचं प्रोफाईल असतं. कंपन्या जरी आई-बाबांनी आणल्या तरी प्रोफाईल मात्र आपणच निश्चित करायचा, त्यात काही हयगय करायची नाही, हे रश्मीनं पक्क ठरवून टाकलं होतं.

०००

स्थळं पाहण्याचा कार्यक्रम करण्याआधी रश्मीनं तसं आईबाबांना स्पष्ट सांगितलं. तिच्या प्रोफाईलच्या व्याखेत संभाव्य नवरदेवापेक्षा, संभाव्य सासूबाईंना अधिक महत्व होतं. नवरदेवाच्या बाबतीत कॉम्प्रमाइज करण्याची तयार होती. पण सासूच्या बाबतीत, नो वे. तिनं स्पष्ट केलं. सासू आपल्या परीक्षेत उत्तीर्ण झाली तरच, सप्तपदीची वाट मोकळी, असं तिनं सीतादेविंना सांगून टाकलं. आतापर्यंत तुमचं सारं काही ऐकलं आता, माझं एव्हढं तरी तुम्ही ऐकायलाचं हवं, अशी गळ तिने घातली.

रश्मीला सासू कशी हवी होती, यासाठी तिने काही मुद्दे काढले होते. त्यानुसार – सासू गोरी हवी. लिपस्टिक लावणारी हवी. फेशियल करणारी हवी. पदवीधर हवी. विज्ञानाची पदवी असेल तर दोन गुण अधिक. वाणिज्यशाखेची अजिबातच चालणार नाही. कलाशाखेची पदवी असेल तर समाजशास्त्र हा मुख्य विषय असावा. होमसायंस असेल तर पहिले प्राधान्य. नाटकी नको. नकटी चालेल. हायहिल घालणारी नको. व.पूं.चे समस्त वाङमय वाचलेली असावी. पु.लं.च्या वाटेला जाणारी नको.

अशासारख्या तिच्या अटी ऐकून सीतादेविंना भोवळ आली. रामाराव शून्यात जाता जाता थांबले. या अटी नसून अडकित्ता असल्याचं रामारावांनी ताडलं. अडकित्त्यात टाकून सुपारी फोडण्याचा किंवा अडकित्ता दाखवून सुपारीलाच पळवून लावण्याचा, खेळ काही काळ रश्मी खेळणार हे त्यांनी ताडलं. मात्र पोरिनं दोन पावलं समोर टाकल्यानं आता माघार घेणं शक्य नव्हतं. सगळीकडे सांगून झालं होतं. वेगानं स्थळं यायला सुरुवात झाली.

रामाराव आणि सीतादेवींनी आपआपले घोडे दामटवायला सुरुवात केली. सीतादेवीचा घोडा हा घोडा नसून बैल असल्याचं रामारावांना सांगावसं वाटलं. रामारावांचा घोडा हा बैलच काय गाढवसुध्दा नसल्याचं सीतादेविंना सांगावसं वाटलं. पण दोघेही गप्पच राहिले. आपण आणलेलाच घोडा, डर्बीशर्यत जिंकणार आणि रश्मीच्या गळ्यात वरमाला घालणार अशी दोघांनांही खात्री होती…त्यामुळे रश्मीच्या सासूपरीक्षेला नाखुशिनं कां होईना त्यांनी परवानगी दिली…

००००

पहिल्या नवरा मुलग्याने जेव्हा सासूबद्दलच्या अपेक्षांची यादी बघितली तेव्हा तो आणि त्याचे कुटुंबीय चहा-पोहे न घेताच पलायन करते झाले. हा नवरामुलगा रामराव-सीतादेविंच्या जवळच्या नातेवाईंकामधील नसल्यानं दोघांनाही फारकाही विषाद त्यांना वाटला नाही.

दुसरा मुलगा किंवा घोडा होता तो रामारावांच्या कुटुंबातील जवळच्या नातेवाईकांचा.. हा घोडा जिंकणारच ही खात्री रामारावांना होती. या घोड्याचे पाय लचकू दे आणि घोड्याच्या आईस मलेरिया होऊ दे, अशी मरी आईकडे सीतादेविंनी प्रार्थना केली.

रश्मीला बघण्याच्या कार्यक्रमात या दुसऱ्या संभाव्य नवऱ्या मुलाच्या आईच्या हातात रश्मीनं सासूबद्दलच्या अटिंचा कागद टिकवला. संभाव्य सासूने तिच्या अटी बघून तिचा व रामाराव- सीतादेवींच्या सात पिढ्यांचा उध्दार केला. सोसायटित भांडणाच्या प्रसंगी नेहमी फुल्ल डिजेचा सूर लावणारी आपली सौभाग्यवती आज, आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स केल्यानंतरच्या शांत-प्रशांत अवस्थेत कशी काय गेली, याचं महद आश्चर्य रामारावांना वाटलं. कारण संभाव्य विहीनबाई वाट्टेलतशी बडबड करत असताना, सीतादेवी शांतच नव्हत्या तर त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे तरंगही उमटायला लागले होते. त्याकाही काळ तिथेच थांबल्या असत्या तर त्या तरंगाचा फवारा झाला असता. तो टाळण्यासाठी त्या आत निघून गेल्या. चाणाक्ष रामारावांच्या नजरेतून ही बाब काही सुटली नाही. आपल्या घोड्याला मायलेकिंनी ठरवून नापास केले, अशी रामारावांची खात्री झाली. त्यांनी सॉरी म्हणत या दुसऱ्या नवरदेवास व त्याच्या कुंटुंबीयास निरोप दिला.

०००

तिसरा मुलगा, सीतादेविंच्या जवळच्या कुटुंबीयांमधला. या बैलास पॅरिलिसीसच होऊ देरे गिरडोबा, असं रामारावांनी त्यांच्या कुलैदैवताला साकडं घातलं. पाकिस्तानी गोलंदाज भारतीय खेळांडूकडे, मी आता बघूनच घेतो, असं नजरेनं सांगत गोलंदाजी करतात, त्याप्रमाणे रामारावांनी सीतादेविंकडे बघितलं. सामन्यातील एकही षटक टाकण्याआधीच आपण सामना जिंकला, एवढीच प्रौढी मिरवायची रामारावांनी बाकी ठेवली होती.

बघण्याचा कार्यक्रम सुरु होताच, रश्मीनं संभाव्य सासूच्या अटिंचा कागद नवऱ्यामुलाच्या हाती डकवला. अगं सटवे, असा अपमान करायला मीच मिळाले का तुला, असं ती संभाव्य सासू सीतादेविंकडे जळजळीत कटाक्ष टाकत म्हणाली. तिने सीतादेविंच्या झिंज्याच फक्त ओढायच्या शिल्लक ठेवल्या. भवाने, त्या ऐश्वर्यानंसुध्दा तिच्या सासूची परीक्षा घेतली नव्हती. तुझ्या पोरिला तिच्यापायाच्या नखाची सर तरी येईल का. स्वत:ला कोण मेघना मार्केल समजते का केट मिडलटोन. आँ.. जन्मभर लग्नाविना राहील बघ तुझी ही महा-शहाणी पोट्टी..

आता रामारावांचा आनंद नाकातोंडातून बाहेर पडू इच्छित होता. तसं काही घडू नये म्हणून ते आतल्या खोलित निघून गेले. चाणाक्ष सीतादेविंच्या नजरेतून ही बाब काही सुटली नाही. आपल्या घोड्याचा गाढव करण्याची ही साजीश बापलेकिंनी केल्याचं त्यांना वाटलं.. त्यांनी कसंबसं नवऱ्या मुलाच्या आईस शांत केलं आणि थंड शरबत देऊन घरी रवाना केलं.

०००

हा नवरा मुलगा आणि त्याची आई निघून गेल्यावर सीतादेवींनी रश्मीच्या हातातील सासू अटिंचा कागद घेतला आणि टराटरा फाडून टाकला.तोपर्यंत खोलित आलेल्या रामारावांनी टाळ्या वाजवल्या.

तुम्ही दोघेजण मिळून हा गेम करताहात ना, असं आई आकांडतांडव करत म्हणाली.

माझा काय संबंध. रामाराव सीतादेवीकडे बघत म्हणाले. तुम्ही दोघिंनी मिळून, मी आणलेल्या नवऱ्या मुलाचा घात केलात त्याचं काय..

अहो, तुम्ही घोडा असतात तर मी तुमच्या नाकात लगाम आणि  तोंडात जाळी टाकली असती. वाट्टेल तसं बोलायला तुमची जीभ जरा सुध्दा लाजत नाही का..

म्हणजे तुझा त्या पोराला घालवण्यात काहीच हात नाही.

हात काय, पायसुध्दा नाही.

मग माझासुध्दा या मुलाला घालवण्यात हात-पाय-तोंड वा कोणताच अववय नाही.. रामाराव सीतादेविंना त्यांच्या कुलदैवतेची शपथ घेत म्हणाले. याचा अर्थ रश्मीच सारा घोळ करते आहे तर…सीतादेवी म्हणाल्या.

मी कसला घोळ करतेय आई.. मी आधीच सारं काही तुम्हा दोघांना सांगितलं आहे.

अगंबाई, सासूसाठी हवे असणारे सगळे गुण तुला म्हशीतच दिसतील एखाद्या. म्हशीच्या पोरासोबत लग्न करायचेय का तुला.. सीतादेवी रागारागात म्हणाल्या. त्या रागात उपहास दडला होता.

काहीतरी काय बोलतेस तू आई. मी लग्न करायला तयार आहे तर, माझ्या मनाप्रमाणे थोडं तरी व्हायला नको का ?

रश्मीने तिची बाजू मांडली.तिच्या म्हणण्यात तथ्य असल्याने,या चर्चेला तिघांनी विराम दिला.

त्यानंतर रामाराव सीतादेविंनी त्यांच्या त्यांच्या पक्षातील आणखी प्रत्येकी दोन स्थळं रश्मीस दाखवली. पण सासूअटींमुळे दोन्ही स्थळं पाण्यात गेली. आता मात्र आईची सहनशीलता संपत आली. रामारावही हळूहळू शॉकमध्ये जावू लागले. नवऱ्या मुलासाठी अटी टाकल्या जातात. सासूसाठी अटी टाकून हिला लग्नच तर करायचं नाही ना. अशी शंका रामारावांना आली. त्यांनी तसं बोलून दाखवलं.

तसं असतं तर लग्नाची गोष्ट आपण स्वत:हून काढलीच नसती ना बाबा, रश्मी म्हणाली. रश्मीचं हे उत्तर त्यांना व सीतादेविंना निरुत्तर करणारं होतं.

रश्मी सासूला पारखून घेते, अशी तिची ख्याती जरी हळूहळू पसरु लागली तरी सोन्याची अंडी देणारी ही कोंबडी आपल्या जाळयात सापडेल या अपेक्षेनं आणखी काही स्थळं येऊन गेले. प्रत्येक स्थळागणिक रश्मीच्या अटी शिथिल होत गेल्या तरीही त्या अटिंच्या आसपास फिरकू न शकणारी सासू काही भेटतच नव्हती.

०००

रामाराव आणि सीतादेविंच्या पक्षातल्या  मुलांचा पत्ता कट झाला. याचं दोघांना दु:ख झालं असलं तरी रश्मी मात्र आनंदानं न्हाऊन निघत होती.

या सगळयांनी कातावलेल्या रामाराव सीतादेविंनी रश्मीस, तुझा नवरा तूच शोध, असं अखेर निर्वाणीचं सांगून टाकलं.

या क्षणाची ती वाटच बघत होती. मात्र तशा काही भावना व्यक्त न करता तिने, आपण स्वत: नवऱ्या मुलाचा शोध घेऊ असं, जणू काही त्या दोघांवर आपण फार मोठे उपकार करत आहोत, अशातऱ्हेनं सांगितलं..

त्याप्रमाणे एकेदिवशी एक नवरा मुलगा ती घरी घेऊन आली. तो एकटाच होता. सीतादेविंनी त्याच्या हातात रश्मीच्या सासूअटी टिकवल्या. त्याबघून नवरा मुलगा गडगडाट करत म्हणाला, अहो मला आईच नाहीय. त्यामुळे सासूबाईसाठी असलेल्या या अटी बासनात गुंडाळून टाका..आणि व्हा लग्नास तयार…

असं कसं होणार, असं कसं होणार ..सासूशिवाय लग्न म्हणजे कैकेयी शिवाय सिताच नाही का..हे नाही चालायचं…

आँ, नवऱ्या मुलग्याने आँ फाकला. सीतादेवी काय म्हणाली हे त्याला काही कळलं नाही. रामारावांनाही कळलं नाही.

सासूच हवी, असं आपण म्हणालो नव्हतो. असेल तर या अटित बसणारी हवी. नसेल तर अटी गेल्या आकाशात. नाही का. रामारावांकडे बघत डोळे मिचकावित रश्मी म्हणाली. रश्मीने आपल्याला मामा बनवलं हे त्यांच्या लक्षात आलं..

रश्मीनं स्वत:साठी एक स्थळ आधीच शोधून ठेवलं होतं. तिच्या ऑफिसातला सिध्दार्थ कांबळे. तो काही रामाराव-सीतादेविंना पसंत पडला नसता, त्यामुळे तिने ही सासूपरीक्षेची युक्ती केली. त्या युक्तीमुळे ती मेरिटनं उत्तीर्ण झाली. तिला तिच्या मनाजोगतं उत्तम प्लेसमेंट मिळालं.