(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

तेजोमयीच्या बाबांना व्यायामाचा फार कंटाळा. अलेक्झांडरला फिरायला नेण्यापुरतं त्यांचं चालणं.

ते सातव्या मजल्यावर राहतात. किमान जाता येताना पायऱ्यांचा वापर करा. असं आईनं कितिदा तरी सांगितलं. ते त्यावेळी हो म्हणत. मात्र या कानानं ऐकलं नि त्या कानानं सोडलं, असचं त्याचं वागणं होतं. लिफ्ट कशासाठी, असं त्यांचं यावरच उत्तर.

एखादे दिवशी लिफ्ट बंद असल्यास कार्यालयाला दांडी मारण्याचा विचार आधी त्यांच्या मनात येई. मात्र आई त्यांना घरी राहू देत नसे. तेव्हा फार कष्टाने ते पायऱ्या उतरत.

व्यायाम न करण्यामुळे त्याचं वजन हळूहळू वाढू लागलं. ते चांगलेच गोलमटोल दिसू लागले. गुडघे दुखू लागले. त्यांना दमही लागणं सुरु झालं.

एके दिवशी बाबांचे मित्र असलेले डॉ.देशपांडे घरी आले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर देशपांडे काका, बाबांच्या पोटाच्या वाढलेल्या घेराकडे बोट दाखवत, अलेक्झांडरला म्हणाले.

काय रे अलेक्झू, तू पळवत नाहीस का याला?

आपल्याला कुणीतरी महत्वाचं सांगतय हे ध्यानात आल्यानं अलेक्झांडर तत्काळ देशपांडे काकांजवळ जाऊन त्यांच्याकडे आणि बाबांकडे आळीपाळीने बघू लागला.

मी काय म्हणालो ते तुला कळलय का अलेक्झू.. त्यांनी अलेक्‍झांडरला विचारलं.

त्याला सारं कळतं. पण यांना कळत असूनही वळत नाही..आई चहा-बिस्किटं देत म्हणाली.

म्हणजे, काय वहिनी?

यांना मी कितीदा सांगते, सकाळी फिरायला जाताना लिफ्टचा वापर करु नका. अलेक्झांडरला फक्त दहा मिनिटेच फिरवून आणू नका. चांगलं अर्धातास फेरफटका मारा. त्याला मोकळं वाटेल नि यांच्या पायाला व्यायाम मिळेल.पण ऐकतील तेव्हा ना…

अरे, काय सांगतात वहिनी…

काहीही सांगते रे, लक्ष देउु नकोस..

मी नाही लक्ष देत. पण तुझ्या पोटाचा वाढत चाललेला घेर म्हणतोय, लक्ष द्या, लक्ष द्या. त्याचं काय? देशपांडे काकांनी बाबांना हसत सवाल केला.

द्या उत्तर याचं, तेजोमयी म्हणाली. अलेक्झांडरने मान आणि शेपूट दोन्ही हलवलं.

काय उत्तर देणार? कित्ती त्रासदायक नाही का,लिफ्टनं चढणं उतरं..मग चालणं..सुखाचा जीव दु:खात..बाबा म्हणाले.

आता, व्यायामाचं महत्व मी समजावून सांगायचं का तुला? वजन वाढलं की हालचाल कमी होते, ती कमी झाली की शरीरातील साखर वाढते. मग तब्येतीच्या वेगवेगळया समस्या होतात. मग सुरु होतो दवाखान्यातला प्रवास..तो तुला करायचाय वाटतं..

तसं नाही रे..

तसं नाही नि असं नाही. देशपांडे काका आधी बाबांना आणि नंतर तेजोमयीस म्हणाले.

तुझ्या बाबांची गुरु तू झालीच आहेस, आता उद्यापासून त्याला सकाळीच फिरायला नेण्याची जबाबदारी घे. त्याने कंटाळा केला की शिक्षा दे..

मी आणि शिक्षा..तेजोमयी आश्चर्यानं म्हणाली.

बोलूच नको याच्याशी. अलेक्झू, तू सुध्दा याच्याशी लाडीगोडी करायची नाहीस..देशपांडे काका अलेक्झांडरकडे बघत म्हणाले..

नको बाबा ही शिक्षा..हे दोघं म्हणजे माझ्यासाठी आनंदाचं झाडं आहेत. बाबा तत्परतेनं म्हणाले.

मग ते सदैव आनंदी राहण्यासाठी तरी तू व्यायाम कर. फिरायला जा. मी तर सांगेन तुम्ही चौघेही सकाळी तासभर भराभर चालून या ना…बघ तुझ्या या पोटाचा घेर कसा कमी होत नाही ते.

सोनारानं कान टोचले की बरं असतं भाउुजी..आई म्हणाली.

डॉक्टरांच्या इंजेक्शनची सुई टोचून घ्यायची नसेल तर याला माझं ऐकलच पाहिजे. बाबांकडे बघून देशपांडे काका स्मित करत म्हणाले.

०००