(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

भाऊबीज

दिवाळीत खाण्यापिण्याची चांगलीच चंगळ असते. आईने दिवाळीसाठी बनवलेले चकली-बेसन लाडू- रव्याचे लाडू- शंकरपाळे- चिरोटे- अनारसे-चिवडा- सेव, हे पदार्थ या पाच सहा दिवसात मनसोक्त खाता येतात. असं असलं तरी भाऊबिजेच्या दिवशी आणखी काहीतरी वेगळं गोडधोड आई करते. कधी पुरणपोळी तर कधी गुलाबजामून तर कधी साजूक तुपातला बदामाचा शिरा! याचं तेजोमयीला नेहमी आश्चर्य वाटे. आज तिने अखेर आईला विचारलच…

“अगं तू, इतकं गोडधोड आधीच केलं असताना, मग पुन्हा आजच्या दिवासासाठी कां करतेस नवा पदार्थ. किती त्रास होत असेल तुला?”

यावर आई हसली.

“अगं यात हसण्यासारखं काय?” तेजोमयीने विचारलं. अवतीभवती घुटमळत असणाऱ्या अलेक्झांडरनेही, तशाच आशयाचे भाव आणत आईकडे बघितलं.

त्याला जवळ घेत आई  म्हणाली,

“ठोंब्या, भावाच्या प्रेमासाठी करावं लागतं   , हे सारं.”

“अगं पण, तुझा भाऊ यंदा कुठे येणारेय भाऊबिजेला.” तेजोमयी म्हणाली. अलेक्झांडरने प्रश्नार्थक चेहऱ्यानं तिच्याकडे बघितलं

“आणि आकाशातला चांदोबाभाऊराया, तो काही खाली उतरायचा नाही.” बाबा हसत म्हणाले.

“पण, त्याने मला आज एक निरोप पाठलाय?”

“केव्हा? कधी? कोणता?” तेजोमयीनं अधिरतेनं विचारलं.

“व्हॉटसॲप होता की व्हिडियो कॉल?” बाबांनी किंचित तिरकसपणे विचारलं. हे अलेक्झांडरच्या लक्षात आलं असावं. त्यामुळे त्याने बाबांकडे रागाने बघितलं.

“सॉरी माझ्या राज्या, मला म्हणायचं होतं की, काय निरोप आला, वरच्या भाऊरायाचा,” अलेक्झांडरला कुरवाळत बाबा म्हणाले.

“सांग की आई, काय निरोप आला ते?” तेजोमयीने पुन्हा विचारलं.

“ते तुला संध्याकाळीच कळेल हो.” असं म्हणून, हसत हसत आई स्वयंपाकखोलीत निघून गेली नि कामाला लागली.

बाबा आणि तेजोमयीने एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेनं बघितलं.

“संध्याकाळपर्यंत वाट बघायची,” बाबा म्हणाले नि त्यांनी पेपरमध्ये डोकं खुपसलं. आईचं काहीतरी वेगळचं असतं असं स्वत:शीच पुटपुटत तेजोमयीने हा विषय डोक्यातून काढून टाकला.

०००

दिवसभरात आईने चांगलीच तयार केली. पुराणाची पोळी, वडे, मसाला भात, साधा भात, ताक, कोशिंबीर, आमटी, पालकाची दाळभाजी असा बेत होता. एकदोनदा स्वयंपाकखोलीत जाऊन तेजोमयीने आईला विचारलंसुध्दा, “इतकं सारं केलंस म्हणजे आख्ख्या सोसायटीला जेवायला बोलावलस की काय?”

“संध्याकाळीच तुला कळेल बघ,” असं सांगून आईने तिची बोळवण केली.

०००

संध्याकाळी साडेसातच्या सुमारास तेजोमयीच्या घरी, दुधवाला, पेपर टाकणारा, इलेक्ट्रिशियन, तेजोमयीला शाळेत घेऊन जाणारा ऑटोवाला, सोसायटीचा स्वच्छक, चौकीदार नि भाजीवाला ही मंडळी आली. आईने त्यांना सन्मानाने सोफ्यावर बसवलं.

हे कशासाठी? असं विचारण्याचा मोह, बाबा आणि तेजोमयीला झाला. आई घरी आलेल्यांशी इतक्या प्रेमाने वागतेय म्हणजे त्यांच्या अंगावर धावून जायचं नाही, हे अलेक्झांडरच्या बरोबर लक्षात आल्याने तो आईच्या अवतीभवती घुटमळून, शेपूट हलवत सगळ्यांचं त्यानेही स्वागत केलं.

००००

आईने मग सगळयांना ओवाळलं. त्यांचं औक्षण केलं. सर्वांना नवे कपडे दिले. मग त्यांना जेवायला वाढलं.

“आज माझा भाऊ तर येऊ शकला नाही, आकाशातल्या भाऊरायाला फक्त ओवाळून तसं म्हंटल तर काहीच उपयोग नाही. म्हणून तुम्हा सर्वांना आज भाऊबिजेला बोलावलय. तुम्ही सगळेजण, या ना त्या रुपात मला सदैव मदत करता. माझी कामं हलकी करता. मला दिलासा देता. तुमचा मोठाच आधार वाटतो मला.” आई त्या सर्वांना म्हणाली. सर्वांनाच गहिवरुन आलं.

तेजोमयी आणि बाबांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. चांदोबाभाऊरायाचा हाच निरोप असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. तेजोमयीला आईचा अभिमान वाटला.  न राहवून तिने आईला मिठी मारली.

आईने काहीतरी भारी काम केल्याचं अलेक्झांडरनेही खोळखलं त्यामुळे स्वारीने उड्या मारुन मारुन आपला आनंद व्यक्त केला.

सुरेश वांदिले