(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

भागू का गाव!

राजस्थान सहलीचा पहिला टप्पा संपवून तेजोमयी, तिचे आईबाबा आणि काकाकाकू मंडळी उदयपूरवरुन जोधपूरकडे निघाली. त्यांनी भाड्याने गाडी केली होती. त्यामुळे प्रवास रमतगमत सुरु होता. पर्वतरांगा, हिरवीगार झाडी, गुळगुळीत रस्ते यामुळे प्रवास आनंददायी होता. खिडकीजवळ बसून तेजोमयी बाहेरची दृष्ये टिपत होती. वाटेत रस्त्यात तिला,’खजूर सफारी, असा बोर्ड लिहिलेला आढळला.

या ठिकाणी गाडी थांबली. खजुराची २० एकर मध्ये पसरलेली ती बाग होती. खजुराच्या निर्मितीपासून ते त्यावर प्रक्रिया करुन पॅकबंद करण्याचे सर्व टप्पे त्यात होते. तेजोमयीने,’टायगर सफारी, लायन सफारी यांचं नाव ऐकलं होतं. पण,’खजूर सफारीचं नाव पहिल्यांदाच तिने ऐकलं. टायगर सफारी सारखच या बागेत फिरवून आणलं जातं. त्यासाठी फी घेतली जाते. ही आगळीवेगळी सफारी बघण्याची सगळयांची इच्छा होती. पण फीचा आकडा ऐकल्यावर सगळयांनी ही इच्छा मारुन टाकली.

प्रवास पुन्हा सुरु झाला. एका पाठोपाठ एक गावाच्या पाट्या येत होत्या. अशाच एका पाटिकडे तेजोमयीचं लक्ष गेलं. त्या पाटिवर लिहिलं होतं,’ भागू का गाव! ‘ते नाव वाचून तिला गंमत वाटली. तिने ते नाव बाबांना दाखवलं. बाबांनी काकांना सांगितलं.

असतात अशी चित्रविचित्र नावं गावांची, काका म्हणाले. तेजोमयीच्या मनातून ते नाव काही जाईना. सारखी ती मागे वळून बघू लागली. काकांच्या ते लक्षात आलं. त्यांनी वाहन चाकलास गाडी मागे घेण्यास सांगून ज्या ठिकाणी, ‘भागू का गाव ‘,असं लिहिलं होतं, त्या ठिकाणी घ्यायला लावली.

भागू का गाव, असं लिहिलेल्या पाटीवर त्या गावाची दिशा दर्शवली होती. साधा रस्ता होता. गाडी जाऊ शकत होती. दहा मिनिटात, गावात गाडी पोहचली. गाव छोटं होतं. गावाच्या वेशीवर एका मंदिराच्या पारावर काही व्यक्ती गप्पा करत होते. तिथे गाडी थांबली. सर्व जण खाली उतरले. आपल्या गावात अनोळखी गाडी अशा अवेळी आल्याचे बघून गावकरी आश्चर्यचकीत झाले.

काकांनी त्यांच्याजवळ जाऊन नमस्कार केला.

काही काम आहे का?” एकानं विचारलं.

तेव्हा काकांनी तेजोमयीचा प्रश्न त्यांना विचारला, या गावाचं नाव,’ भागू का गाव कां बरं?’

असा प्रश्न त्यांना इतक्या वर्षात कुणी विचारला नव्हता. त्यामुळे त्या व्यक्तीस आणि इतरांना आश्चर्य वाटलं.

आम्हाला तर काही ठाऊक नाही बाँ!”दुसरा म्हणाला.

तुमच्या गावाचं नाव असं कां आहे हे माहीत कसं नाही? तेजोमयी म्हणाली.

नाही बाळ,खरंच माहीत नाही.” तिसरी व्यक्ती म्हणाली.

गावात कुणाला ठाऊक असेल का काका? तेजोमयीनं विचारलं.भागू बद्दलचा तिचा उत्साह बघून आई रागावली.

अगं,आपण भागूचा शोध घेतला तर जाधवपुरला जायला उशीर नाही का होणार?

अहो वहिनी, होऊ द्या उशीर. आपण पर्यटनासाठीच आलो ना. भागू का गावसुध्दा तसंच बघू या की!” काका तेजोमयीच्या बाजूने बोलले.गावात जाण्यास सर्वजण तयार झाले.

गावात जाणारा रस्ता अगदीच लहान होता. मातीचा थर दिल्याने धूळ उडत होती. ही धूळ खात मंडळी गाव बघू लागली. रस्त्यावरुन वाहणारं  सांडपाणी ,सर्वत्र कचऱ्याचे ढीग, इकडूनतिकडे धावणारी फाटक्या कपड्यातील मुलं, सोबतील कोंबडे त्यांची पिल्लं, बदकं, बकऱ्या मेंढ्या, मरतुकडी कुत्री! दोन डुकरं आणि एक गाढव कचऱ्यातील मेजवाणी फस्त करण्यात गुंग होती.

हे असलं पर्यटन करायला आलो की काय आपण?” आई चिडून म्हणाली. बाबांनी नाराजी व्यक्त केली. फक्त काका उत्साहात होते, त्यामुळे तेजोमयीही उत्साहात!

भागू का गावाचं नाव, असं का?’ हे कुणीतरी सांगेल, असं तिला पक्कं वाटतं होतं. रस्त्यात एके ठिकाणी चहाचं दुकान लागलं. त्या ठिकाणी एक खूप वृध्द माणूस बसला होता. त्याच्याजवळ जावून काकांनी, या गावाचं नाव भागू कां? असं विचारलं.

माझं नाव भागू आहेना.तो बेरकीपणे हसत म्हणाला.

म्हणून या गावाचं नाव, भागू का? असं काकांना विचारावं वाटलं. पण काका चूप बसले.

दुकानदारच स्वत:हून म्हणाला,

साहेब, हे म्हातारं काहीही सांगतो, त्याच्यावर विश्वास ठेवू नका.आता भागू  म्हणेल, थोड्या वेळाने मधू म्हणेल.

काका हसले.

मग, तुम्ही सांगाना दादा, भागू, असं नाव कां बरं असेल,या  गावाचं? तेजोमयीनं त्या दुकानदारास विचारलं.त्यानेही नकारार्थी मान हलवली.

शहरातील काही माणसं, ‘भागू‘ नावाची करताहेत ही बातमी गावात वणव्यासारखी पसरली. थोड्याच वेळात गावातील बरीच  मंडळी त्यांच्याभोवती गोळा झाली. बरेच जण त्यांच्याकडे संशयाने बघू लागले.

कशासाठी पाहिजे ही माहिती?” एका मध्यमवयीन व्यक्तीने विचारलं.त्याच्या विचारण्यात नाराजी स्पष्ट दिसत होती.

अहो, आमचा काही हेतू नाही.

वेगळं नाव वाटलं म्हणून मी बाबांना विचारलं , हे असं कसं नाव असू शकतं?” तेजोमयी त्या व्यक्तीकडे बघून धिटाईने म्हणाली.

त्या व्यक्तीने तेजोमयीकडे वळून तिला विचारल…

बाळ, तुझं नाव काय?”

तेजोमयी.

असं कसं नाव असू शकतं? त्याने प्रतिप्रश्न केला.

कां नाही,असू शकत?”बाबा  म्हणाले.

मग भागू का गाव, हे नाव कां नाही असू शकत? त्याने प्रतिप्रश्न केला.

यावर कुणाकडेच काहीच उत्तर नव्हतं.

भागू का गावातलं‘, पर्यटन इथेच थांबवणं शहाणपणाचं असल्याचं काकांच्या लक्षात आलं. त्यांनी जमलेल्या व्यक्तींना नमस्कार करुन त्यांचे आभार माणले. सर्व मंडळी परत फिरली. गाडीपर्यंत गावातली काही मंडळी होती.त्यांच्या डोळयातला अविश्वास जात नव्हता.सर्वजण गाडीत बसले.

गाडी सुरु होत असतानाच एक चुणचुणीत मुलगा म्हणाला, आम्ही खजुराच्या वाडीतून खजूर पळवतो, आमच्यापैकी एकजण लक्ष ठेऊन असतो. कुणी चौकिदार दिसला की आम्ही, ‘भागो भागो म्हणतो. म्हणून…

त्या मुलाचं बोलणं संपण्याच्या आतच एका वयस्क गृहस्थानं त्याला सणसणीत हाणली.आता इथे थांबण्यात अर्थ नाही, आपणासही, भागो करायला हवं, असं काका हळूच बाबास म्हणाले.

तेजोयमी खळखळून हसली. खजुराच्या बागेत “भागूचं रहस्य दडल्याचं तिला कळलं होतं…..

सुरेश वांदिले