भास्करची प्रेरणा
भास्कर हलमाची गोष्ट सर्वांनाच प्रेरणादायी अशी. आपल्याकडे अमूक नाही, तमूक नाही, असं सतत कमरतेचं भांडवल करणाऱ्या आणि त्यामुळेच आपण मागे पडलो, यश मिळत नाही, काहीच जमत नाही असं सांगून स्वत:ला फसवणाऱ्यांसाठी अधिकच प्रेरणादायी आणि डोळयात अंजन घालणारी!
तर, हलामी असं थोडं वेगळच आडनाव असणारा भास्कर मुळचा गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात येणाऱ्या चिरचाडी या अगदीच चिरकूट किंवा छोट्या गावातील आदिवासी. त्याचा जन्म झाला १९७८ साली. घरी अठराविश्वे दारिद्र्य! म्हणजे किती? तर दोन वेळेचं जेवणसुध्दा बरेचदा मिळणं अशक्य व्हायचं. त्याच्या वडिलांकडे जमिनीचा एक छोटा तुकडा होता. त्यावर ते भाताचं पीक घेत. ते पोटभरण्यासाठी पुरेसं नव्हतं. घरी आईबाबा आणि एक छोटा भाऊ. भाताचं पीक निघालं की त्याचे आईबाबा शासकीय कामांवर जात. त्यातून जो काही मोबदला मिळायचा तो जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी पुरेसा नसे. तीन-चार महिने त्यांच्या घरी कोणतच उत्पन्नाचं साधन नसायचं, कारण शासकीय काम हे मर्यादित काळापुरतं असायचं.
१९८० साली हलामी कुटुंबाला या गावात जीवन जगणं कठीण होऊन गेलं. तेव्हा त्यांनी १०० किलोमीटर दूर असलेल्या एका गावी जाण्याचं ठरवलं. हे गाव होतं नक्सलग्रस्त एटापल्ली तालुक्यातील कसनसूर! नक्सलग्रस्त म्हणजे ज्या ठिकाणी, काही व्यक्ती सतत या ना त्या कारणांसाठी शासकीय यंत्रणा व नागरिक यांना वेठीस धरतात. प्रसंगी शासकीय कर्मचारी, पोलीस आणि अधिकारी यांना ठार करतात. शासनाच्या म्हणजेच जनतेच्या मालमत्तेची नासधूस करतात.
अशा या सदैव धोकादायक आणि स्फोटक ठिकाणी असलेल्या आश्रमशाळेत स्वयंपाक्याची एक जागा निघाल्याचं भास्करच्या वडिलांना एका ओळखीच्या व्यक्तीने सांगितलं. त्यांच्याकडे तेव्हा एक तोडकीमोडकी सायकल होती. १०० किलोमीटरचा रस्ता त्यांनी या तोडक्यामोडक्या सायकलीवर बसून करणं शक्य नव्हतं. त्यावर बसून काही अंतर कापलं की या गंजून गेलेल्या या सायकलीला चालवणं शक्य होत नसे. त्यामुळे बरेचदा पैदलच चालावं लागायचं. बाबांच्या खांद्यावर त्यांचा दोन वर्षाचा भाउु असायचा. भास्करसुध्दा तेव्हा छोटाच होता. त्याला पायी चालण्यावाचून पर्यायच नव्हता. अत्यंत खडतर असा प्रवास करुन चौघेहीजण कसेतरी कसनसूरला पोहचले.
इथे या कुटुंबाला थोडा दिलासा मिळाला. आश्रमशाळेच्या परिसरात भास्करचं शिक्षण सुरु झालं. या अत्यंत बिकट परिस्थितीत भास्करच्या बाबांनी त्याला कायम समजावलं की, जीवनात प्रगती करायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षणासाठी अखंड परीश्रमच केले पाहिजेत, ते तू कधीही विसरु नकोस. आपल्या बाबांचे हे बोल भास्करने कायम लक्षात ठेवले. कितीही अडचणी आल्यातरी शिक्षणाकडे त्याने कधीच दुर्लक्ष केलं नाही.
कसनसूर येथील शिक्षण संपल्यावर भास्कर १२ वीचं शिक्षण घेण्यासाठी गडचिरोली या तेव्हाच्या तालुक्याच्या ठिकाणी पोहचला. पुढे तिथेच त्याने बी.एस्सी (बॅचलर ऑफ सायंस) ही पदवी मिळवली . गडचिरोली हे तेव्हा तालुक्याचं ठिकाण असूनही खूप मागास होतं. तिथे कोणत्याही सोईसुविधा फारशा उपलब्ध नव्हत्या. दळणवळणाची साधनं नव्हती. मात्र याही परिस्थितीचा बाऊ न करता, भास्करने स्वत:ला ज्ञानार्जनात गुंतवून टाकलं. तो १२वी उत्तमरीत्या उत्तीर्ण झाला. मग त्याने गडचिरोलितच बी.एस्सी केलं.
आता त्याची ज्ञानतृष्णा आणखी वाढली. याच काळात नागपूर शहरात पुढच्या शिक्षणाची सोय असल्याचं भास्करला कळलं. नागपुरातील, इंस्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेत त्याने बी.एस्सीनंतर एम.एस्सीसाठी प्रवेश घेतला. भास्करचा जीवन बदलवून टाकणारा हा निर्णायक टप्पा ठरला. त्याच्यासाठी नवं जग उघडलं गेलं. प्रगतीच्या संधी त्याला दिसू लागल्या. काही संधी त्याच्याकडे स्वत:हून चालत येऊ लागल्या. शिक्षणाच्या ध्येयापासून वंचित होऊ नकोस असं सतत सांगणाऱ्या आपल्या बाबांच्या शिकवणुकीचा त्याने कधीही विसर पडू दिला नाही. सगळया विषयांचा परिपूर्ण आणि सखोल अभ्यास यापलिकडे त्याला काही सुचत नसे. त्यातून त्याला पुढे अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली. ही संधी होती त्याच्या आवडत्या विषयात पीएचडी करण्याची म्हणजेच संशोधन करण्याची. आता त्या घटनेला दहा वर्षे झालीत.
गरिबीने आणि भुकेने गंजून गेलेला भास्कर, आज डॉ. भास्कर हेलामी या नावाने अमेरिकेत सुपरिचित झाला आहे. अमेरिकेची राजधानी वाश्गिंटन येथील सिरनॉमिक्स या आघाडीच्या औषधनिर्मिती कंपनीत वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून डॉ.भास्कर कार्यरत आहे. अत्यंत आधुनिक अशा तंत्रज्ञानवर त्याची हुकूमत आहे. बऱ्याच महत्वाच्या औषधींची निर्मिती ही कंपनी करते. त्यातील काही औषधींचा मूळ आराखडा डॉ.भास्कर तयार करतो. आपल्या कठोर परीश्रमानं आणि परिस्थितीला दोष न देण्याच्या वृत्तीनं डॉ.भास्करने आज या कंपनीत आपलं स्वत:चं आगळवेगळं स्थान अधोरेखित केलं आहे. काही औषध निर्मितीत त्याचा शब्द अखेरचा समजला जातो. आपल्या दारिद्र्याचा पुसटसाही बागूलबुवा न करता, केवळ शिक्षणासाठी कठोर परीश्रम घेणारा भास्कर सर्वांसाठी आदर्श ठरतो.
भास्कर म्हणजे सूर्य. सूर्याची किरणे आपल्या पृथ्वीला प्रकाशमान करतात. आपल्याला उर्जा देतात. मात्र हा आकाशातील सूर्य तर आपल्यापासून कोट्यावधी प्रकाशमैल दूर असा. पण महाराष्ट्रातला भास्कर आपल्याजवळचा आहे. अथक परीश्रम करण्याची त्याची उर्जा आपण घेतली पाहिजे आणि शिक्षणातूनच प्रगती साध्य होऊ शकते, हे कायम स्मरणात ठेवलं पाहिजे.
सुरेश वांदिले