अधूनमधून वाघोबा महाराज दरबार भरवायचे. या दरबारात पंतप्रधान कोल्होबा,सेनापती अश्वसिंगांसह अष्टप्रधान मंडळ असायचं. वननगरी अधिक सुखी आणि संपन्न झाली पाहिजे,यावर वाघोबा विचारविनिमय करत.
वननगरी पूर्वीसारखी राहिली नव्हती. पूर्वी अधूनमधून शिकारीसाठी येणाऱ्या मनुष्यप्राण्यांशिवाय वननगरीत केवळ प्राणीच वास्तव्याला होते. मात्र हळूहळू मनुष्यप्राण्याने वननगरीत आक्रमण केलं. त्याचं जाणं–येणंही खूप वाढलं. प्रारंभी हे सगळं वाघोबांना जड गेलं. पण मग त्यांच्या लक्षात आलं की आपणास आता मनुष्यप्राण्यांसोबतच रहावं लागणार. तसं त्यांनी दरबारी आणि प्रजाजनांना समजावून सांगितलं. सर्वांना त्यांचं म्हणणं पटलं. तेसुध्दा वननगरीत मनुष्यप्राण्याच्या सतत येण्याला आणि राहण्याला सरावले.
पण, नंतर मनुष्यप्राण्याची हाव वाढत गेली. तो अधिकाधिक शिकार करु लागला. त्यात त्याला पराक्रम वाटू लागला. वाघोबांचे कित्येक नातेवाईक त्याने ठार केले. गजराजाची हत्या करण्यापर्यंत त्याची मजल गेली. काही पक्षी आणि प्राण्यांची शिकार करुन त्यांना खाऊ लागला. हे थांबवण्यासाठी आपण काहीच करु शकत नाही, याचं दु:ख वाघोबांना व्हायचं. एकटे असताना ते अश्रू ढाळत. इतरांच्या लक्षात येऊ नये यासाठी मात्र ते दक्ष असत.
मनुष्यप्राण्याची ही हाव अशीच वाढत राहिली तर सगळे प्राणी-पक्षी नष्ट होतील ही चिंता त्यांना भेडसावू लागली. यावर चर्चा करण्यासाठी त्यांनी आजचा दरबार बोलावला.
बैठकीत, प्रारंभी त्यांनी त्यांच्या काळजीचा विषय सांगितला. मनुष्यप्राण्याला लगाम कसा लावायचा यावर बरच विचारमंथन झालं. पण या चर्चेनंतर लक्षात आलं की मनुष्यप्राणी जसा दुष्ट आहे, तसाच हुषारसुध्दा! त्याच्याशी एकट्यानं जसं लढू शकत नाही, तसंच सगळे मिळूनही लढू शकत नाही.
‘पण, आपण काहीच केलं नाही तर लवकरच नष्ट होऊन जाऊ.’ वाघोबांनी लक्षात आणून दिलं. कोणालाच काही सूचेना तेव्हा या बैठकीला विशेष निमंत्रित म्हणून आलेल्या वाघोबांच्या मावश्या- काळी मनी आणि पांढरी मँऊ म्हणाल्या, ‘आम्ही उपाय सांगू का?’
‘मावश्यांनो, हा मनुष्यप्राणी गजराजांना भीत नाही, तेव्हा तुमच्यासारख्या पिटुकल्यांना तो कसा भीक घालणार?’
‘भाच्या, तुझं म्हणणं बरोबर असलं तरी, कधीकधी शक्तीपेक्षा युक्ती आणि युक्तीपेक्षा भीती मोठं शस्त्र ठरतं. पांढरी मावशी म्हणाली.
‘म्हणजे गं काय?’, वाघोबांनी विचारलं.
‘भाचऱ्या, हा मनुष्यप्राणी बुध्दीमान असला तरी भीत्राही तेव्हढाच! या त्याच्या भीतीचा उपयोग आपल्या संरक्षणासाठी करायचा.’ काळी मावशी म्हणाली.
‘म्हणजे गं, काय करणार?’
‘ते आम्ही करु. यामुळे तो खूप शहाणा होईल, आपली शिकार थांबेल असं नाही. पण त्याच्या अशा वागण्याला थोडातरी धक्का बसेल.‘
‘पण, तुम्ही काय करणार ते सांग ना?’ वाघोबांनी दोन्ही मावशांकडे बघत विचारलं.
०००
मावशांनी मग, त्यांना आपण काय करणार ते सांगितलं. काळी मावशी म्हणाली,
‘आम्ही मनुष्यप्राण्यांच्या वस्तीत जातो. जेव्हाजेव्हा शक्य होईल, तेव्हातेव्हा त्याला आडवं जाऊ. आम्ही आडवं गेलं की वाईट होतं, काळा रंग त्याला अशूभ वाटतो. त्यामुळे त्याला आमच्या आडव्या जाण्याची भीती वाटेल. या भीतीपोटी तरी तो जंगलात यायचा कमी करेल.शिकार कमी करेल.’
०००
पांढरी आणि काळ्या मावशीने सांगितलेला उपाय दरबाऱ्यांना पटला नाही. मात्र हा उपाय करुन बघायला हरकत नसल्याचं वाघोबांनी बोलून दाखवलं. दरबाऱ्यांनी नाइलाजाने दोघींना परवानगी दिली.
०००
काळी मावशी आणि पांढरी मावशी मग मनुष्य प्राण्यांच्या जगात आल्या. पांढऱ्या मांजरीने मनुष्यप्राण्याला लळा लावला आणि काळया मांजरीने सतत आडवं जाण्याचं व्रत घेऊन जमेल तशी आडवी जात राहिली. मनुष्यप्राण्याच्या मनात भीती निर्माण करत राहिली. त्यामुळे प्राण्यांच्या बाबतीतल्या मनुष्याचा वागणुकीत फरक पडला नाही. मात्र, त्याच्या मनात वाघोबांबद्दल जितकी भीती नसेल त्याच्या पन्नासपट भीती काळ्या मांजरीच्या आडव्या जाण्याची भरली. वाघ दिसल्यावर एखादेवेळेस त्याला धडकी भरणार नाही. पण काळी मांजर आडवी गेली तर धडकी भरणारच नाही असा मनुष्यप्राणी विरळाच!
सुरेश वांदिले
०००