(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

भूर्र उडालं जुनं वर्ष..

   नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बाप्पा आणि तेजोमयी बांद्र्याच्या बँड स्टँडवर फिरायला गेले. बँड स्टँड किना-याजवळील खडकावर दोघेही बसले. दोघांच्या गप्पा सुरु झाल्या.

   वर्ष येतं कसं नि जातं कसं हेच कळत नाही बाप्पा. तेजोमयी म्हणाली.

   असं वाटतं,अरे आत्ता आत्ता तर नवं वर्ष सुरु झालं होतं.बघता बघता भुर्रकन उडून गेलं.बाप्पा म्हणाले.

   बाप्पा असं कां होत हो?

   असं काही होत नाही बाळ.नवीन वर्ष सुरु झालं की 365 व्या दिवशीच ते संपतं.

   मग आपल्या भास कां बरं होतो?

   कारण आपण आपल्याच धुंदित असतो. पळत असतो. टाइमपास करत असतो. मॉल मध्ये जात असतो. मल्टीप्लेक्समध्ये जात असतो. सुट्टी मिळाली की एंजॉय करायला पळतो. घरी आलो टीव्हीत गुंतून जातो. त्यामुळे दिवस कधी सुरु झाला नि कधी संपला हेच कळत नाही. पुन्हा दुस-या दिवशी तेच. तिस-या, तिसाव्या , साठाव्या, एकशे विसाव्या, दोनशे चाळीसाव्या, तिनशेव्या आणि तिनशे पासष्टव्या दिवशी तेच. तिनशे पासष्टव्या दिवसाची रात्र तर आपण साजरी करतो.

   नवीन वर्षाचं स्वागत असतं बाप्पा ते.

   अगं,रात्र कुठे साजरी करायची असते. रात्री शांत झोपायचं. कारण नव्या वर्षाची पहाट म्हण किंवा सकाळ म्हण ती बघण्यासाठी,नव्या उत्साहानं उर्जेनं नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी उठायचं असतं. पण होत उलटं. जुन्या वर्षाच्या 365व्या दिवशी रात्र जागून काढायची आणि नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी ढाराढूर झोपायचं.असं आपण नव्या वर्षाचं स्वागत करतो नि मग पुढचे सारे दिवस असेच येतात नि जातात.आपण गेल्या वर्षी जिथे होतो तिथेच राहतो.बाप्पा म्हणाले नि तेजोमयी यावर अंतर्मुख होऊन विचार करु लागली.

00

     बँड स्टँडवरुन तेजोमयी आणि बाप्पा घरी आले. बाप्पांनी जे सांगितलं त्यावर तेजोमयी विचार करु लागली. बाप्पांचं सांगणं किती खरं होत. ती स्वत:लाच म्हणाली.

   गेल्या वर्षी तिने किती गोष्टी करायच्या ठरवल्या होत्या. तिने डायरी काढली. नवीन वर्षात काय करायचं हे तिने लिहून ठेवलं होतं. तिने यादी वाचली. काही गोष्टींची तिने सुरुवात केली होती. वर्ष संपलं तरी काही गोष्टी सुरु करु शकली नव्हती. ज्या गोष्टी सुरु केल्या,त्या करण्याचा उत्साह नंतर कमी झाल्यानं अर्धवटच राहिल्या होत्या. तिचं तिलाच हसू आलं. दु:खही वाटलं.

   दररोज दोन इंग्रजी शब्द पाठ करायचं तिने ठरवलं होतं. पंधरा वीस दिवस ते तिने केलं. कधीतरी अधूनमधून केलं.त्यामुळे वीस-तीस शब्द पाठही झाले. जर ठरविल्याप्रमाणे दररोज दोन शब्द पाठ केले असते तर वर्षाच्या शेवटी 720 शब्दांनी आपण समृध्द झालो असतो. तेजोमयी  स्वत:लाच म्हणाली. जे ठरवलं ते करु शकलो नाही. म्हणूनच वर्ष आलं कधी नि गेलं कधी हे आपल्याला कळलं नाही. जे ठरवलं ते साध्य केलं असतं तर वर्ष सार्थकी लागलं असतं. या पराक्रमाचा आनंदही घेता आला असता. तेजोमयीचं विचारचक्र असं खूप वेळ सुरुच राहिलं.

सुरेश वांदिले