(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

एकदा मोरांच्या कुटुंबातील सर्वात वयोवृध्द आजोबांच्या वाढदिवसासाठी त्यांचे बरेच नातेवाईक गोळा झाले. वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा झाला. खाणं-पिणं झाल्यावर मोर मंडळी गप्पांमध्ये रंगून गेली.

एका नातवाने आजोबांना विचारलं,

आजोबा आम्ही असं ऐकलय की, आपल्या एका पूर्वजानं आपल्या कर्कश आवाजाबद्दल देवी सरस्वतीकडे तक्रार करुन गोड आवाजाची देण मागितली होती.

होय, ते खरं आहे बाळा.

मग देवीने त्यांना ही देणगी कां दिली नाही?”

अरे, देवीनं त्यांना समजावलं की प्रत्येक पशू-पक्षाकडे एक तरी खास गुण देवानेच दिला असतो. त्या गुणाचा सार्थ त्याने सार्थ अभिमान बाळगळा पाहिजे. त्या गुणांमध्ये वाढ कशी होत राहील याकडे लक्ष पुरवलं पाहिजे. इतरांचा याचा हेवा करुन काही उपयोग होत नसतो.

मग त्यांना पटलं का ते, आजोबा?”

आपल्या पूर्वजांना ते नक्कीच पटलं असलं पाहिजे बाळा, कारण त्यानंतर सरस्वतीदेवीकडे कुणी अशी मागणी केली नाही. आपल्या पूर्वजाने विचार केला की, देवीच्या सांगण्याप्रमाणे आपण आपल्याकडे असणाऱ्या गुणांमध्ये वाढ करुया.”

अरे वा!आपल्याकडचा गुण म्हणजे आजोबा?”

अरे, आपण नृत्य करु शकतो ना. या आपल्या गुणामध्ये वाढ करण्यासाठी आपल्या पूर्वजानं खूप परीश्रम घेतले. त्यांच्याकडूनच आपणाकडे हा नृत्याचा गुण चालत किंवा नाचत आलाय. आपण आपला पिसारा फुलवून नाचतो तेव्हा सर्वजण देहभान हरपतात. आतातर आपल्या नृत्याने प्रभावित होऊन मानवाने मयूर नृत्य नावाचा प्रकारही शोधून काढला.

हो आजोबा आम्हाला ठाऊक आहे. आपल्या पूर्वजांनी जर नृत्याच्या गुणावर लक्षच केंद्रित नसतं केलं तर हा सन्मान आपणास मिळाल नसता.

होय रे बाळा, अगदी बरोबर.चला तर मग आपण सर्व मिळून छानसं मयूर नृत्य करु या.”

आजोबा म्हणाले.

सर्वांच्या सामूहिक मयूर नृत्याने आजोबांच्या वाढदिवसाची सांगता झाली.

सुरेश वांदिले