(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

महाराष्ट्राच्या उभारणीचे गौरवशाली साक्षिदार

मंत्रालय विधीमंडळ पत्रकार संघ हा मंत्रालयाच्या इतिहासाचा अविभाज्य भाग ठरतो. गेली अनेक दशके या संघातील पत्रकारांनी मंत्रालयास जिवंतपणा दिला. पत्रकार संघाचे दालन किंवा कक्ष हे सर्वाधिक हॅपनिंग  असे क्षेत्र ठरले आहे. होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते करण्याची क्षमता आणि उर्जा या क्षेत्रात असते.

पत्रकार संघाने मंत्रालयाच्या कामकाजाला ओळख दिली. आपआपल्या माध्यमातून शासकीय योजना, निर्णय, धोरणे लोकांपर्यंत पोहचवली. शासन आणि लोकांमधील खऱ्या अर्थाने हा पत्रकार संघ दुवा किंवा सेतू हा संघ ठरला आहे. या संघाच्या अपरिमित शक्तीचा जाण आणि जाणिव ज्या ज्या राज्यकर्त्यांना नीट कळली त्यांनी त्याचा उपयोगही तितक्याच प्रभावीरीत्या राज्य हितासाठी करुन घेतला.

सुलभ संधी

मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या अधिकाधिक जवळ जाण्याची संधी या संघातील पत्रकारांशिवाय महाराष्ट्रातील इतर पत्रकारांना इतक्या सुलभतेने मिळू शकत नाही. मुख्यमंत्र्यांच्या शब्दश: कानाला लागणे सुध्दा अनेक ज्येष्ठ, कनिष्ठ पत्रकारांना इथेच शक्य होऊ शकते.

राज्यकर्त्यांना समाजात, विरोधी पक्षात, पक्षातील विरोधकांमध्ये नेमके काय चालले आहे याची खबरबात मिळण्याचे स्त्रोत सुध्दा अनेक पत्रकार ठरतात. आपली व्युहनीती ठरवण्यासाठी या माहितीचा नेमका उपयोग प्रसंगपरत्वे शासन आणि प्रशासनातील प्रमुख व्यक्ती करतात.

गेल्या पंधरा सोळा वर्षापासून मी या पत्रकार संघाचे कामकाज जवळून बघत आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात असताना पत्रकार संघाच्या शक्तीचे अधिक जवळून दर्शन झाले. दर आठवड्यास होणाऱ्या मुख्यमंत्र्याच्या पत्रकारपरिषेसाठी त्यांना निमंत्रण द्यावे लागत असे. असे निमंत्रण देण्यापासून ते पत्रकार परिषद संपल्यानंतर प्रेस नोट देण्यापर्यंतचा सगळा प्रवास हा या पत्रकारांच्या सहकार्याने उत्तम पार पडत असे. मंत्रीमंडळ बैठकित झालेल्या निर्णयांच्या व्यतिरिक्त काही स्फोटक  माहिती या पत्रकार परिषदेतून काढण्यात काही पत्रकारांचा हातखंडा असल्याचे याच काळात लक्षात आले. हे असे कौशल्य मंत्रालयातील पत्रकारांकडे अधिक असते. मंत्रीमंडळ बैठकीनंतर होणारी पत्रकार परिषदेची आतुरतेने वाट बघितली जायची. निर्णयांच्या माहितीची देवाण घेवाण झाली की मग खरे प्रश्न सुरु होत. या प्रश्नांच्या उत्तरांमधून वेगवेगळ्या बातम्यांनी दुसऱ्या दिवशीचा पेपर सजून जाई. या उत्तरांमधून कधीकधी सोईस्कर माहिती दिली जाई. दुसऱ्या दिवशीचे चैतन्य अशा विविध प्रकारच्या बातम्यांधून अधिकच अनुभवयाला येत असे. कुणा कुणापर्यंत बातमी दडलेला आशय कसा कसा पोहचला याविषयी चर्चा होई. सारे काही अपेक्षित साध्य झाल्याचे लक्षात आल्यावर संबंधित सर्वांच्या समाधानाची लकेर येई.

उत्तम गुण

पत्रकारांनी नेमकेपणे  व वस्तुनिष्ठपध्दतीने माहिती द्यावी अशी अपेक्षा सर्वजण व्यक्त करतात. त्यादृष्टिनेही मंत्रालयीन पत्रकारांना उत्तम गुण द्यावेच लागतील. शासनाची माहिती लोकांपर्यंत पोहचवून त्यांना सक्षम करण्याचे काम या पत्रकारांनी निष्ठेने केले असल्याचं माझं मत आहे. या पत्रकारांच्या सकारात्मक बातम्यांच्या संख्येची मोजमाप किंवा त्यांचे आशय विश्लेषण अद्याप कुणी केलेले नाही. तसे ते केल्यास निश्चितपणे सिध्द होईल की मंत्रालयीन पत्रकारांनी विकास पत्रकारितेत भरीव कामगिरी केली आहे.

मंत्रालयाच्या निर्जीव भिंतीत रुक्षपणे तसेच कठोरपणे चालणाऱ्या कामकाजास मानवी चेहरा देण्याचे ,या कामकाजातील ह्रदयास भिडणारे क्षण टिपण्याचे कार्य या पत्रकारांनी गेली कित्येक दशके केले आहे. या कालावधीत महाराष्ट्राची जडणघडण कशी कशी होत गेली,याचे प्रत्यक्षदर्शी हे पत्रकार आहेत. या पत्रकार संघाच्या सदस्य सर्व पत्रकारांनी गेल्या अनेक दशकातील महिनानिहाय बातम्यांचे संकलन केले तर त्याचे अनेक खंड तयार होतील. ही महाराष्ट्राची खरीखुरी बखर ठरेल. यामध्ये राजकारण, समाजकारण, अर्थकारण या साऱ्या बाबी ठसठशितपणे समोर येतील. महाराष्ट्र कसा कसा उत्क्रांत होत गेला हे कळून येईल. प्रत्येक कालावधीतील सरकार वेगवेगळे निर्णय कां घेते, त्याची पूर्वतयारी कशी होते किंवा केली जाते. या निर्णयांच्या मागेपुढे कोणत्या शक्ती असतात. हेतूअसतात. बिटवीन द लाइन काय काय घडलेले असते हे सारे काही या दस्तऐवजात दडलेले आहे..

बातमीची चाहूल

मंत्रालयीन पत्रकारांना बातमीची चाहूल बरोबर लागते. काही बातम्या त्यांच्याकडे स्वत: चालत येतात. पूर्वी काही नेत्यांकडे मंत्रीमंडळ बैठक झाली की लगेच पत्रकारांचा पाडाव पडायचा. त्यात मग बातमीमागची बातमी मिळायची असे अनेक पत्रकारांचे सांगणे असायचे. अशी बातमी अमूक एक देतो हे काही गुपित राहिलेले नसायचे. ज्यांना ठाऊक असायला हवे ते सुध्दा अजिबातच अनभिज्ञ नसत. जे सांगत त्यांनाही नेमका वा कोणाच्या मर्मी या ऑफ द रेकॉर्ड माहितीचा बाण वर्मी लागणार हे ठाऊक असायचे. ही गंमत-जम्मत जिवंतपणा आणणारीच होती. त्यातून ज्याला जसा आणि जिथे पाहिजे तसा संदेश सुव्यवस्थितरीत्या पोहचवला जात असे.

माहिती काढून घेण्याची सिध्दी

मंत्रालयात सर्वत्रच या संघातील प्रत्रकारांचा वावर असतो. माहिती काढून घेण्याची सिध्दी अनेकांना अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर प्राप्त होते. या पत्रकारांकडे माहितीचा प्रचंड साठा असतो. या साठ्याचे विश्लेषण करायला गेल्यास अनेक चमत्कारिक ,सुरस आणि सर्वसामान्यांसाठी उपयुक्त बाबी उघडकीस येऊ शकतात.

विधीमंडळ अधिवेशनातील जिवंतपणा पत्रकारांमुळे लोकांपर्यंत पोहचतो. विधीमंडळातील सदस्यांच्या कामगिरीचे हे पत्रकार केवळ दर्शकच नसून त्यांचे मूल्यमापकही ठरतात. अनेक आमदारांना प्रकाशझोतात आणण्याचे कौशल्य यांच्याकडे असते. विधीमंडळात कुणी कितीही प्रभावी कामगिरी केली तरी ती जोपर्यंत लेखणीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचत नाही तोपर्यंत त्याचे महत्व मर्यादित परिघात बंदिस्त राहते. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील उत्तम वत्कृत्व असणा-यांचा, विधीमंडळाचे रण गाजवणाऱ्यांचा पराक्रम या पत्रकारांनीच सामान्य जनतेपर्यंत पोहचवला. त्यामुळे अनेक  नेत्यांची ओळख अभ्यासू, जागरुक लोकप्रतिनिधी अशी झाली.काही लोकप्रतिनीधी राज्यस्तरीय नेते बनू शकले.विधीमंडळातील बातम्यांनी अनेक लोकप्रतिनिधींना सूर्यतेज प्राप्त करुन दिले. राज्यातील प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून ही नेते मंडळी स्थापित होऊ शकली. देशभर या नेत्यांना स्वंयस्पष्ट अशी ओळख मिळाली. या पत्रकारांचे हे महत्व फार मोठे आहे. राजकीय नेत्यांना सुध्दा पत्रकारांच्या या शक्तीची जाणीव आहे. पत्रकारांच्या गॅलरीकडे बघून भाषणे देण्याचे उदाहरण या पत्रकारांच्या चर्चेत नेहमीच असते.

विधीमंडळ कामकाजाची कार्यपध्दती, नियम, कायदे यांचीसुध्दा इत्थंभूत माहिती अनेक पत्रकारांना असते. यासाठी त्यांना भरपूर कष्ट करावे लागतात. अभ्यास करावा लागतो.

कष्ट आणि अलर्टनेस

मंत्रालय व विधीमंडळाचे कव्हरेज करणे हे अनेकांना ग्लॅमरस सुध्दा वाटू शकते. पण ते तसे नाही. सतत अलर्ट राहून कार्य करण्याची क्षमता मंत्रालय विधीमंडळ पत्रकारांना प्राप्त करावी लागते. नियमित स्वरुपाच्या बातम्यांसोबत खास बातम्या मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात. सातत्यपूर्ण वावर असूनही या पत्रकारांना सुध्दा माहिती मिळणे अनेकदा जिकरीचे होते. पण चिकाटी न सोडता हे पत्रकार माहितीच्या पाठीमागे असतात. निराश होत नाहीत. आपले सोर्सेस अधिकाधिक सक्षम करण्यासाठी त्यांना खूप वेळ द्यावा लागतो.

मंत्रालय आणि विधीमंडळ पत्रकारिता ही काही गुलाबाच्या पाकळयांवरुन चालण्याचे सुख देणारी सहज सुलभ पत्रकारिता नाही. अनेक काटे अवती भवती असतात. पण त्याला पुरुन जे पत्रकार उरतात, त्यांच्या यशाची कमान वाढत जाते. त्यांचा आदरही वाढतो.  त्यांनी लिहिलेल्या बातम्यांकडे खूप गंभीरपणे शासन आणि प्रशासनातील प्रमुख बघतात. त्याची दखलही घेतली जाते. सुधारणा केल्या जातात. चेक ॲण्ड बॅलन्स म्हणून या पत्रकार संघातील अनेक पत्रकारांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.

पत्रकार सघांशी सबंधित काही परंपरा सुध्दा निष्ठेने पाळल्या जातात. शपथ घेतल्यानंतर सर्वात आधी पत्रकार संघात येऊन मनमोकळा संवाद साधण्याची परंपरा मुख्यमंत्री पाळत असतात. पूर्वी मंत्रालयातील कामकाज संपवून बंगल्याकडे जाता जाता मुख्यमंत्री वा अनेक मंत्री पत्रकार कक्षात डोकावून जात. बसत. गप्पा मारित. हास्य विनोद करत. हे त्यांच्यासाठी स्ट्रेस बस्टरच ठरत असे.

मंत्रालय विधीमंडळ पत्रकारांची स्वत:ची एक सामूहिक शक्ती आहे. ही शक्ती त्यांच्या शब्दांद्वारे महाराष्ट्राची पायाभरणी आणि त्यानंतर उभारणीसाठी आतापर्यंत कामी आली आहे. यापुढेही येणार आहे.

सुरेश वांदिले