माझीच गोष्ट कशी सांगायची हा माझ्यापुढचा खरा प्रश्न ! पण प्रश्न पडला की त्याचं उत्तर शोधलं पाहिजे, असं नाही का आपले एडिसन काका, आईनस्टाईन आजोबा नेहमी सांगत. तुम्हाला ते ठाऊक असणारच. नसेल तर शाळेच्या विज्ञान शिक्षकांना विचार बरं का? लगेच उद्याच्या उद्या. कारण काही गोष्टी जेव्हाच्या तेव्हा केल्या की डोक्याला ताप आणि ताण राहत नाही. मी तर बुवा, हेच तत्व अंगिकारते. म्हणूनच आज ठरवूनच टाकलं, माझी कथा तुम्हाला सांगून सांगून मोकळं व्हायचं.
खरतर मी म्हणजे तुमच्यासाठी एक इटुकला पिटुकला प्राणी. इकडून तिकडे आणि तिकडून इकडे, पळ पळ पळणारा. माझी झुपकेदार शेपटी तशी सर्वांना मोहात पाडणारी. आणि ते समोर आलेले दात. जाऊ द्या. ज्या मुलांचे दात समोर आलेले असताना त्यांना इतर मुलं हसतात. माझ्यावरही इतर प्राणी हसतात. मी म्हणते, बेटेहो हसा हसा. जे हसतात त्यांचे पिवळे पिवळे आणि कीड लागलेले दात दिसतात. त्यांचच खरं तर हसू होतं. त्यामुळे मी तिकडे दुर्लक्ष करते. तसच ज्यांचे दात समोर आले असेल ना, त्यांनी हसणाऱ्यांकडे लक्षच द्यायचं नाही. लक्ष दातांकडे नाही तर अभ्यासाकडे असावं. म्हणजे मग हसणाऱ्यांना त्यांची जागा बरोबर दिसते. अगबाई हे काय? उपदेशच करत सुटले मी. गोष्ट राहिली की बाजूला.
मी म्हणजे तुमची खारुताई. बऱ्याच झाडांवर असते. घरातल्या बागेत येऊन या झाडावरुन त्या झाडावर नाचून जाते. एक बरं आहे बाँ, त्या कबुतरदादासारखं कुणी मला हॅटहूट करत नाही. उलट मी दिसले रे दिसले की घरचे सगळे जण कसे आनंदी होतात. लहानग्यांना बोलावून ती बघा, ती बघा खारुताई असं सांगतात. मस्त मजा वाटते मला. आपल्यामुळे कुणाला तरी आनंद मिळतो, हे किती भारी नाही का? तुम्हीसुध्दा असेच इतरांना आनंद द्या बरं का मित्रांनो.
हे काय, पुन्हा गाडी भरकटली वाटते. सॉरी सॉरी..आता थेट मी गोष्टीवरच येते. माझ्या या गोष्टीत एक गुपित दडलं आहे. ते परवा परवाच मला कळलं.
परवा परवा की नाही, ॲमेझानच्या जंगलात राहणारी माझी आतेबहीण सांगत होती? तुम्ही म्हणाल, ती कशी काय सांगू शकते बॉ ! काय हा अनाडीपणा? व्हीडिओकॉल नाही का? जगातल्या या कोपऱ्यातली व्यक्ती त्या कोपऱ्यातल्या व्यक्तीशी प्रत्यक्ष बोलू शकते. जसं तुमचं, तसचं आमचं. बापरे पुन्हा प्रस्तावनेतच गुंतले. काय माझा वेंधळेपणा. तो तर नेहमीचाच. तुम्ही म्हणाल.
हा हा हा वेंधळी वेंधळी तर वेंधळी. अहो आम्ही वेंधळेच नाही तर आम्ही विसरभोळेही आहोत बरं का? सत्य सांगायला कसली बरी आलीय लाज?
त्याचा या गोष्टीचा काय बुवा संबंध? तुम्ही विचाराल.
आहे ना, अमेझॉनमध्ये राहणारी माझी आतेबहीण तेच तर सांगत होती. त्या जंगलात आम्ही झाडांवरची फळं विशेषत: ब्राझील नट गोळा करतो. कारण ते आम्हाला जाम म्हणजे प्रचंडच आवडतं. इतकं ते यम्मी असतं. त्यातील गर आम्ही काढतो आणि मस्त मजेत गटवतो. पण आमचं पोट इवलसं. त्यामुळे सगळा गर काही खाणं होत नाही. मग आम्ही जंगलात सुरक्षित ठिकाणाचा शोध घेतो नि त्या ठिकाणी हा गर आणि बिया पुरतो. जेव्हा कधी पुन्हा भूक लागेल तेव्हा तयार मेवा खायला मिळावा म्हणून ही मेहनत घ्यायची. पण खरी गंमत पुढे घडते. आम्हाला जेव्हा भूक लागते तेव्हा आम्ही झाडावरचे फळच शोधतो, गर काढण्यासाठी. सुरक्षित ठिकाणी गर पुरुन ठेवलाय हे विसरुन गेलो असतो आम्ही. आहे की नाही आमचा महान विसरभोळपणा! पण त्यातच आमचं एक गुपित दडलय.
कोणतं बरं? तुम्ही अधिरतेनं विचारालात ना.
सांगते सांगते, जरा धीर धरा. तर मित्रांनो, पाऊस पडतो तेव्हा आम्ही पुरुन ठेवलेल्या बिया रुजू लागतात. मग काही दिवसांनी त्याचं रोपटं होतं. पुढे त्याची वाढ होत होत ब्राझीलनटाचं रुपांतर वृक्षात होतं. डेरेदार आणि उंचच उंच. अशी शेकडो नव्हे तर हजारो झाडं आमच्या या विसरभोळेपणाच्या दुर्गुणामुळे उगवली आहेत. ॲमेझानचं जंगल घनदाट होण्यासाठी म्हणूनच आमचा सिंहाचा वाटा आहे बरं का?
इवलीशी खारु पण वाटा मात्र सिंहाचा म्हणजे अबाबा! आहे की नाही गंमत. हे झालं पहिलं सिक्रेट. मात्र महत्वाचं सिक्रेट राहिलचं की.
आम्ही गर आणि बिया पुरुन ठेवण्यासाठी जी जमीन निवडतो ना ती निरोगी असते. मोकळी असते. भुसभुशीत आणि ओलसर असते. महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी कीटक-मुंग्या यांचा प्रादुर्भाव होत नाही. शिवाय या बिया सुरक्षित राहाव्या म्हणून आम्ही त्यावर व्यवस्थित पालापाचोळा सुध्दा टाकतो. आता इवल्याशा खारुस लवकरच काही पालापाचोळा गोळा करता येत नाही ना. त्यामुळे दिवसभर आमचा हा उद्योग चालतो. एकदा पूर्ण पालोपाचोळा टाकून पुरलेल्या बियांना सुरक्षित केल्यावरच आम्ही निवांत होतो.
तुम्ही म्हणाल, यात कसलं आलय सिक्रेट?
यातच सिक्रेट दडलय बरं का मित्रांनो. ते आम्हाला
ज्यांनी सांगितलय त्यांचं नाव ऐकून तुम्ही उडालाच.
काय म्हणालात आधी सांगना त्याचं नावं? सांगते सांगते जरा धीर धरा. धीर धरला की फळही गोड मिळतात ना? अशी नाही का एक म्हण परवाच मराठीच्या सरांनी शिकवली. आठवली ना तुम्हाला.
तर बर का, त्याने सांगितलं की आम्ही बिया पुरतो ते फळ शंभर टक्के निरोगी असतं. ज्या जमिनीत आद्रता आणि ह्युमिक आम्ल ४० टक्के असते, तीच जागा निवडतो. हे आम्ही आमच्या श्वासाच्या मदतीने निवडतो. खरतर इथे माझी गोष्ट संपते.
पण खर सिक्रेट अजून राहिलच की, आणि ज्यांना आम्हाला हे सांगितलं त्याचं नावही राहिलयं. तर, मित्रांनो जंगलात किंवा कोणत्याही जमिनीत बी चांगलं रुजण्यासाठी जमिनीखाली योग्य प्रकाश, योग्य तपमान, प्राणवायू,सेंद्रीय कर्ब, आर्दता आणि खोली लागते. हे तुमच्या विज्ञानानं दोनशे वर्षापूर्वी शोधून काढलं. पण आम्हास म्हणजे तुमच्या खारुताईस हे ज्ञान दोन हजार नव्हे तर हजारो वर्षापासून आहे.
काय करणार आम्हाला बोलता येत नाही ना. म्हणून सांगता आलं नाही.
मग तुम्ही विचाराल हे रहस्यस आता कुणी बरं उघड केलं आत्ताच?
अरे मित्रांनो, हे सत्य तुमच्यातल्या काही शास्त्रज्ञांनी म्हणजे तुम्हीच शोधून काढलय. या शास्त्रज्ञांचं म्हणणं की, प्रयोगशाळेत तयार केलेली रोपे बरेचदा निसर्गात टिकतसुध्दा नाही. मात्र खारुताई हीच खरी निसर्गशास्त्रज्ञ. तिने पुरलेलं बी शंभर टक्के रुजणार म्हणजे रुजणारच!
हे सिक्रेट तुमच्या शास्त्रज्ञांनीच शोधलय, त्यामुळे त्यावर विश्वास ठेवायलाच हवा. हो ना?
बापरे गोष्ट फारच लांबली बुवा. सांगून सांगून थकले मी. भूक लागली मला. पळते आता. चढते झाडावर आणि खाते एखादं फळं, चालेल ना.आणि हो, त्या फळाची बी सुध्दा सुरक्षित ठिकाणी पुरणार बरं का? मीच खरी निसर्गशास्त्र ना. मग कसं विसरणार बरं ते!