(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मिलिटरी शाळा ()

लष्करातील भरतीसाठी तसेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी येथील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सक्षम आणि समर्थ करण्यासाठी संरक्षण मंत्रालयामार्फत सैनिक शाळा आणि मिलिटरी स्कूल चालवले जातात. सैनिकी शाळांमध्ये सर्वसाधारण नागरिकांच्या मुलांना प्रवेशात प्राधान्य दिले जाते. मिलिटरी स्कूलमध्ये लष्कारातील अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या मुलांना प्रवेशामध्ये प्राधान्य दिले जाते.

सैनिकी शाळा

सैनिकी शाळांच्या संकल्पनेची रुजुवात १९६१ साली झाली. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (नॅशनल डिफेन्स ॲकॅडेमी) येथे काही विशिष्ट संवर्गातील व राज्यातील मुलांना प्रवेश मिळत असल्याचे दिसून आल्याने, ही तफावत दूर व्हावी, इतर राज्ये आणि समाजातील सर्वच घटकातील मुले या प्रबोधिनित प्रवेश घेण्यासाठी सक्षम व्हावी, यासाठी सैनिकी शाळा देशभरात उघडण्यात आल्या. या शाळांमध्ये मुलांना शारीरिक आणि बौध्दिकदृष्ट्या सक्षम बनवले जाते. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सैनिक स्कूल सोसायटीमार्फत या शाळांचे संनियंत्रण केले जाते.उच्च श्रेणीच्या अध्ययनाची संधी सर्व घटकातील व तळागाळातील सर्वसामान्य मुलांनाही मिळावी यासाठी या शाळा कार्यरत आहेत.एनडीएतील प्रवेशापासून ते लष्करातील इतर अधिकाऱ्यांच्या भरती प्रक्रियेत या विद्यार्थ्यांची कामगिरी व उत्कृष्ट व्हावी,त्यांच्या व्यक्तिमत्वाचा चौफेर विकास व्हावा,या अनुषंगाने अभ्यासक्रमाची संरचना केली आहे.सध्या देशात ३१ सैनिकी शाळा असून महाराष्ट्रात सातारा आणि चंद्रपूर येथे या शाळा आहेत.या सैनिकी स्कूलमधील ६७ जागा संबंधित राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात.हा निवासी अभ्यासक्रम आहे.

प्रवेश प्रक्रिया

भारतातील सैनिक शाळांच्या प्रवेशासाठी ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झामिनेशन (अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा) घेतली जाते.

सैनिक शाळेत इयत्ता सहावी आणि इयत्ता नववी मध्ये प्रवेश घेता येतो.  अर्हता – (१) वर्ग सहा- वयोमर्यादा ३१ मार्च रोजी १० ते १२ वर्षं , संबंधित विद्यार्थी मान्यताप्राप्त शाळेत पाचव्या वर्गात शिकत असावा. (२) वर्ग नऊ – वयोमर्यादा ३१ मार्च रोजी, १३ ते १५ वर्षं. संबंधित विद्यार्थी मान्यताप्राप्त शाळेत आठव्या वर्गात असावा. चाळणी परीक्षेतील गुणांवर आधारित निवड केली जाते.

अशी असते परीक्षा-

प्रश्न बहुपर्यायी आणि वस्तुनिष्ठ पध्दतीचे असतात. सहावीच्या पेपरची भाषा इंग्रजी, हिंदी आणि स्थानिक भाषा असते. (उदा.- महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना इंग्रजी / हिंदी आणि मराठी भाषेतील पेपर मिळतो.) मात्र ९ वी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या पेपरची भाषा फक्त इंग्रजी असते. वर्ग सहाच्या पेपरमध्ये १२५ प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न सामान्य ज्ञान (एकूण प्रश्न-२५ / प्रत्येक प्रश्नाला २ याप्रमाणे ५० गुण), गणित (एकूण प्रश्न- ५० / प्रत्येक प्रश्नाला ३ याप्रमाणे १५० गुण), भाषा (एकूण प्रश्न-२५/ प्रत्येक प्रश्नाला २ याप्रमाणे ५० गुण) आणि बुध्दिमत्ता चाचणी (एकूण प्रश्न-२५/ प्रत्येक प्रश्नाला २ याप्रमाणे ५०) यावर आधारित असतात. एकूण गुण ३००.

 वर्ग नऊच्या पेपरमध्ये १५० प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न सामान्य ज्ञान (एकूण प्रश्न-२५/ गुण प्रत्येक प्रश्नाला २ याप्रमाणे ५० गुण), गणित (एकूण प्रश्न-५०/ प्रत्येक प्रश्नाला ४ याप्रमाणे २०० गुण), भाषा आणि बुध्दिमत्ता चाचणी (एकूण प्रश्न-२५ / प्रत्येक प्रश्नाला २ याप्रमाणे ५० गुण) आणि सामाजिक अभ्यास/शास्त्रे (सोशल सायन्स/ स्टडीज) (एकूण प्रश्न-२५/ प्रत्येक प्रश्नाला २ याप्रमाणे ५० गुण) यावर आधारित असतात. एकूण गुण ४००,

या परीक्षेमध्ये प्रत्येक संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी किमान गुण निर्धारित केले जातात. हे गुण मिळालेले विद्यार्थी पुढच्या टप्प्यासाठी म्हणजेच वैद्यकीय चाळणीसाठी पात्र होतात. अंतिम निवड या दोन्ही बाबींवर केली जाते. सैनिकी शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याने वैद्यकीय दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक ठरते.

प्रवेश परीक्षेच्या पेपरमध्ये सीबीएसईच्या (सेंट्रल बोर्ड ऑफ सेंकडरी एज्युकेशन) अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातात. सध्या राज्य माध्यमिक बोर्डाचाही अभ्यासक्रम, सीबीएसईच्या धर्तीवरच बेतला असल्याने, महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांना ही परीक्षा कठीण जाऊ नये. तथापि विद्यार्थ्यांच्या विषय घटकांच्या संकल्पना स्वयंस्पष्ट असणे आवश्यक ठरते.

सैनिकी शाळेतील अभ्यासक्रम हा सेंकडरी बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशनशी संलग्नित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची एनडीए (नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी-राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी) व इतर परीक्षांची तयारी अभ्यासक्रमाच्या काळात होणे सुलभ जाते.

संपर्क (१) प्राचार्य, सैनिकी शाळा सातारा, पोस्ट बॉक्स क्रमांक-२०, पीन-४१५००१, दूरध्वनी-०२१६२-२३५८६०, संकेतस्‍थळ-www.sainiksatara.org, ईमेल- sainikss@rediffmail.com (२) सैनिकी शाळा चंद्रपूर, भिवकूंड, तालुका-बल्लारपूर , पिन- ४४२७०१, दूरध्वनी- ०७१७२-२९७९६३ संकेतस्थळ- https://sainikschoolchandrapur.com/ ईमेल- sscn2019@gmail.com